4.9.15

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग दुसरा - सातवा दिवस (वेंगुर्ला - गोवा - देवरुख)

११ जून २०१०, ठरल्या प्रमाणे सकाळी लवकर ६.३० च्या दरम्यान आम्ही उठलो. सर्व प्रातविधी उरकून हॉटेलच्या बाहेर पडलो आणि वेंगुर्ला बंदर पाहायला गेलो. येतानाच कुठे तरी नाश्ता करून येऊ असे ठरले. सकाळच्या मस्त शांत वातावरणातून आम्ही वेंगुर्ला बाजारातून पुढे बंदरा पर्येंत गेलो. आज मस्त वाटत, समुद्राला पण भारती आली होती. बंदरा वर आमच्या शिवाय तसे कोणी नव्हते. मस्त आरामात आम्ही सकाळच्या वेळेत समुद्र आणि परिसराचे फोटो काढून घेतले. समुद्राला मजबूत लाटा उसळल्या होत्या. बराच वेळ खडकांना आपटणाऱ्या लाटांचा आनंद लुटत होतो. थोडे या परीसरातले आणि लाटांचे फोटो व वीडियो काढून घेतले आणि मग बंदरा जवळच असलेल्या टेकडावर चढून सागरेश्वर बंगल्या जवळ गेलो. थोडी इकडे पण फोटोग्राफी करून बंगल्या वरुन दिसणार्‍या समुद्राचा नजारा पाहू लागलो. मन भरून समुद्राला पाहून घेतले आणि मग आलो खाली. खाली येऊन बाईक घेतल्या आणि परत बाजारात आलो. बाजारातच बाईक लावून  तिथल्याच एका लोकल हॉटेल मध्ये नाश्ता केला.



मस्त गरम गरम नाश्ता पटकन हांडला आणि जरा दिवसाच्या वेळी बाजारात फेर-फटका मारू असे माझे मत होते. पण राजुला मात्र रूम वर जाऊन प्रातविधी अजून उरकायचे होते. म्हणून ते सर्व परत हॉटेल वर गेले आणि मी व अक्षता बाजारात पायीच फिरू लागलो. चालताना मध्येच मला एक तांब्या पितळेचे दुकान वजा कारखाना दिसला आणि मी लगेच आत शिरलो. वास्तविक मला फक्त एका मस्त मोठ्या घंगाळाची किंमत विचारायची होती. त्यांनी सांगितले कि तुम्हाला ४ - ५ हजारांच्या जवळ पास पडेल. मस्त जाड काठचे घंगाळ बनवून मिले. त्याच बरोबर मी मात्र संपूर्ण दुकान न्याहाळून पाहात होतो. तेवढ्यात मला त्यांच्या कपाटात पितळेची वजनाची मापे दिसली. ते पाहिल्यावर मला कसले राहवते. मी त्या दुकान वाल्यांना ती सर्व मापे कपाटाच्या बाहेर काढायला सांगितली आणि किंमत विचारून घेतली. मला हि दुर्मिळ मापे मिळाली याचा झालेला आनंद पाहून त्या दुकान वाल्याने लगेच १२०० रुपये सांगितले. मला कुठली हि अशी दुर्मिळ गोष्ट आवडली कि मग मी किंमत बघत नाही. मी लगेच ती सर्व मापे सांगितलेल्या किंमतीला घायला तयार झालो. पण पाहतो तर त्यात एक माप कमी होते मग मात्र मी त्यांना जरा पैशे कमी करा अस सांगितले. पण ते काही केल्या कमी करेनाच वरुन तेच मला सांगायला लागले की त्याची खरी किंमत २००० ते २५०० आहे. तरी पण मी त्यांच्या कडे ते मापे १००० मध्ये मागायला लागलो. तरीही ते काही केल्या ऐकेनाच आणि मी पण ऐकेना. शेवटी ते ११०० ला द्याला  तयार झाले आणि शेवटी मी पण घ्ययला तयार झालो. बरीच दुर्मिळ वस्तू मिळाली आणि हे घेण्यात बराच वेळ गेला म्हणून आम्ही पुढे अजुन वेंगुर्ला मार्केट न फिरता मापे घेऊन हॉटेल वर गेलो. 

हॉटेल वर येऊन मी मापे राव आणि राजुला दाखवली, त्यांनी तर मला वेड्यातच काढले. त्यांच्या मते मी हा कसला वेडे पणा केला. ११०० रुपयांना ४-५ लहान मोठी पितळेची भांडी आणली होती. माझी थोडावेळ त्यांनी टेर खेचून आम्ही सर्व आता निघायच्या तयारीला लागलो. सर्व सामान भरून आम्ही बाईकला लावायला लागलो. एवढ्यात अभी तिकडे आला, त्याच्या मदतीने हॉटेलवाल्यांचे पैशे चुकते केला आणि थोडेशे पैशे मी त्याच्या पण हातावर टेकवले. अभीची परिस्थिती पण तशी बेताचीच आणि त्यातून त्याच्या ५ वर्षांचा मुलाला डोळ्याचा कॅन्सर झाला होता. हे मला आई कडून या पूर्वीच कळले होते. मुलाच्या आजारपणावर त्याच्या फार खर्च होत होता, हे ही मला कळले होते. या सर्व खर्चा मुळे त्याची फार अडचण होत होते हे पण मला माहीत होते. म्हणूनच मी त्याला थोडेशे पैशे माझ्या ऐपती प्रमाणे फूल ना फुलाच्या पाकळी प्रमाणे देऊ केले. प्रथम तो घेइनाच पण नंतर माझ्या फार आग्रहा वरू शेवटी घेतले.

अभिलाच पुढे वेंगुर्ल्या वरुन वेतोबाच्या मंदिराकाडे आणि तिथून पुढे रेड्डीच्या गणपती करून मग तेरेकोळला काशे जायचे हे विचारून घेतले. अभीचा निरोप घेऊन निघालो पुढे त्याने सांगितलेल्या मार्गाने. अभीने सांगितल्या प्रमाणे आम्ही मोचेमाड करून १२ किलोमीटरचे अंतर आरामात अर्ध्या तासात पार करून शिरोडा आरवलीत वेतोबाच्या मंदिरा जवळ आलो. मंदिरात कसल्या तरी उत्सवाची तयारी चालू होती आणि बाहेरच्या बाजूला बऱ्याच गाड्या होत्या. आता उन्ह पण डोक्यावर आले होते, म्हणून आम्ही बाईक रस्त्याला लागून एका मोठ्या झाडाच्या सावलीत लावल्या. आम्हाला मंदिरात उत्सवा मुळे गर्दी असेल याची फार भीती होती. माझे तर ठरले होते कि फार गर्दी असेल तर मी काय आत देवळात येणार नाही. राव, उन्मेष व राजू चे पण तसेच मत होते आणि नेहमी प्रमाणे फक्त अक्षताचे काहीही चालेल असे मत होते. मग काय तिला काहीही चालेल म्हणजे एका मानाने देवळात जायचे होते असे हि होते ना. त्यामुळे आता आत जाऊन तर पाहू किती गर्दी आहे आणि मग पुढचा निर्णय घेऊ असे ठरले. पण आत गेल्या वर फार काही गर्दी नव्हती. पटापट वेतोबाचे दर्शन घेतले आणि लगेच बाहेर बाईक कडे आलो. देवळात मिळालेला केळ्यांचा प्रसाद आम्ही बाईक कडे खात गप्पा मारत बसलो. एवढ्यात आमच्या  मुंबईच्या बाईक पाहून एक तरुण जोडपे आमच्या जवळ आले आणि आमच्याशी गप्पा गोष्टी करायला लागले. चर्चेअंती आम्हाला ते ठाण्याचे असल्याचे कळाले. मग तो आमची चौकशी करायला लागला. आम्ही मुंबईत कुठले आणि वगैरे- वगैरे. मग मी कांदिवलीचा हे सांगताच तो म्हणाला कि त्याचा एका चुलत भाऊ पण असाच बाईक वरुन भरपूर भटकंती करतो आणि त्याच्या बरोबर तो मुलगा पण फिरला आहे. म्हणूनच त्या मुलाला आमच्या कडे पाहून बोलावेसे वाटले असेल. वास्तविक सम आवडीची अनोळखी लोक पण पटकन मिसळतात. पुढे चर्चेअंती त्याच्या कांदिवलीच्या भावाकडे बुलेट आणि त्याचे नाव संजू असे कळले. त्याने त्याच्या भावाचे नाव संजू सांगताच मी त्याला विचारले की तो संस्कृतचा पंडित आहे का? आणि त्याचा कांदिवली मध्ये क्लास आहे का? त्याने हो असे सांगताच मी ओळखतो त्याला असे सांगितले. लगेच मी रावला सुंजू कोण याची आठवण करून दिली. आमच्या लेह बाईक ट्रीप ची सराव ट्रीप राजमचीच्या वेळेला संजू बुलेट घेऊन आला होता. आमची आणि त्याची ओळख याच ट्रीपवर झाली होती. संजू अभिजीत नाचरेचा सारपास ट्रेकचा मित्र आहे.

बराच वेळ संजूच्या भावाशी आमच्या गप्पा झाल्या आणि आम्ही त्याचा निरोप घेऊन पुढे निघालो. लगेच ७-८ किलोमीटरच अंतर पार करून रेड्डीच्या गणपती मंदिरा पाशी आलो. आता उन्ह डोक्यावर आले होते. मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले आणि बाहेर आलो. मंदिराच्या जवळच समुद्र किनारा दिसतो. समुद्र किनारा पाहिल्यावर आम्ही कसले थांबणार. समुद्र किनाऱ्या जवळचा आणि आजू-बाजूला एक फेर फटका मारला आणि थोडा वेळ तिकडेच झाडा जवळ बसलो. आम्हाला रेड्डी जवळ सर्वत्र लाल व काळी माती वजा वाळू दिसली आणि हाच रंग समुद्राच्या पाण्यात पण मिसळेला दिसला. प्रथम दर्शनी आम्हाला हि निसर्गची किमया वाटली पण नंतर पुढे तेरेकोल कडे जाताना याचे मूळ कारण कळाले. ही सर्व निसर्गाची किमया नसून माणसाचा हव्व्यास होता हे कळाले. माणसाचा हव्व्यास काय हे तुम्हाला पुढे कळेलच. आता आमच्या पुढच्या ट्रीपची चर्चा इकडेच उभ्याने करू लागलो. आमच्या प्लान नुसार अजून आम्हाला यशवंतगड पाहून मग पुढे तेरेकोल किल्ला पाहायचा होता आणि मग सावंतवाडी मार्गे कुठल्या ही परिस्थितीत देवरुख गाठायचे होते. २००७ च्या गणपती मध्ये मी पिंगे कानांच्या बरोबर वेंगुर्ल्याला आलो होतो.  तेव्हा काकांनी मला वेतोबा आणि रेड्डीचा गणपती दाखवले होते. त्या वेळेला मी रस्त्यात यशवंतगड पाहिला होता. बाकींच्या किल्ल्यांन प्रमाणेच या पण किल्ल्याची दूरावस्ता झाली आहे. किल्ल्याचे काहीच आवषेश राहीले नाहीत. किंभवना या किल्ल्या वर तर फार जास्त दाट झाडी मला पहायला मिळाली. शेवटी सर्व मत ठरवून आम्ही यशवंतगड न पाहता सरळ तेरेकोलचा किल्ला पहायचा असे ठरवले. थोडेसे रेड्डीच्या किनाऱ्याचे फोटो काढले आणि निघलो पुढे तेरेकोलच्या दिशेने.

माणसाचा हवव्यास काय हे मी तुम्हाला आता सविस्तर सांगतो. रेड्डी सोडल्यावर लगेच पुढे रस्त्याला आणि रस्त्या बाजूला तीच काळी व लाल माती दिसू लागली. आता रस्त्याला बरेच डम्पर पण दिसू लागले. जस-जसे पुढे जाऊन लागलो तसे लाल-काळ्या मातीचे व दम्परचे प्रमाण पण वाढले आणि जरा पुढे गेलो तर सर्व भुगर्भ पोखरून खणण्याचे काम सुरू असल्याचे दिसले. अरेच्या इकडे माइनिंग चालू होते. आता माझ्या मनातल्या सर्व प्रश्नांचा उलघडा लागला. समुद्राचे पाणी निसर्गाच्या किमयाने नाही तर माणसाच्या हलकट हव्व्यासा मुळे प्रदूषित झाले  होते. आम्ही या सर्व गोष्टी मनातच ठेऊन तसेच पुढे निघालो. आता मातीचा रंग परत बदलेला दिसायला लागला. आता सर्व परिसर पण वेगळा दिसु लगला होता. तेरेकोल पासून एक-दोन किलोमीटर आधी पासूनच पुरूष व स्त्रिया यांचे कपड्यांची पद्धत गोव्याच्या ख्रिचन सारखी दिसू लागले होती. आम्हाला या वरूनच जाणवायला लागले कि अचानक आम्ही गोव्यात आलो होतो. गावातच तेरेकोल किल्ल्याचा रस्ता विचारून घेतला.  किल्ल्याच्या जवळ जाऊन पोहोचलो. बाहेरूनच किल्ला फार मस्त दिसत होता. संपूर्ण महाराष्ट्राच्या किनार पट्टीतला महाराजांच्या सर्व किल्ल्यान पैकी सर्वांत चांगला राहिलेला किल्ला हाच आहे असे मला वाटले. हा किल्ला एका खाजगी कंपनीला आता हॉटेल म्हणून चालवायला दिला आहे.  माझ्या मते म्हणूनच किल्ला चांगला राहिला आहे. त्यांनी हा किल्ला फारच चांगला जोपासला आहे. किल्ल्याला जराही राकट पण राहिला नाही आहे आता, त्यांनी सर्वत्र किल्ल्याची डागडूगी करून नवीन पद्धतीने रांग रंगोटी करून थोडेसे किल्ला रुपी हॉटेल चे स्वरूप आणले आहे.

आम्ही बाईक हॉटेल रूपी किल्ल्याच्या बाहेरच लावल्या आणि किल्ल्याच्या आत शिरलो. हा किल्ला सर्वांना पाहायला मिळतो. हॉटेलचे सर्व भाग पर्यटकांसाठी मोकळे नाही आहे, पण किल्ल्याचा काही भाग मात्र नक्कीच पाहायला मिळतो. किल्ल्याच्या आता मध्य भागी एक मोठे चर्च आहे. आम्ही चर्चच्या भोवती आणि किल्ल्याच्या तटबंदी वरू फेरा मारला आणि हॉटेलच्या गच्चीवरच्या रेस्तोरंट मध्ये जाऊन बसलो. हॉटेलच्या या बाजूने समुद्र किनारा मस्त दिसत होता. फारच गरम होऊ लागले म्हणून सर्वांनी थंडा मागवला. थंडा येई पर्येंत मी व राव फोटोग्राफी करू लागलो. मस्त राजेशाही पद्धतीने थंडा आम्ही गटकात होतो. आमच्या कोकण सागरी किल्ले ट्रीपच्या प्लान नुसार या किल्ल्या पासून परतीचा प्रवास ठरला होता. कारण मराठा राज्याचा कोकणातला हा शेवटचा किल्ला. १७०० च्या शतकात हा किल्ला मराठा राज्याचा होता. मग १८१९ मध्ये या किल्लावर पोर्तुगजांनी ताबा घेतला ते १९६१ पर्येंत त्यांच्याच कडे होता. म्हणूनच आता या किल्ल्या मध्ये चर्च आहे आणि किल्लाला सुद्धा पोर्तुगीज साम्राज्याची छाप दिसून येते. खऱ्या अर्थाने आमची कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप संपन्न झाली याचा सर्वांना आनंद होता. त्याच आनंदाच्या भरात आम्ही किल्ल्याच्या बाहेर आलो आणि निघालो परतीच्या प्रवासाला. 

किल्ल्या वरुन परत गावाकडे येताना मध्ये खाडी काठी मस्त घरगुती हॉटेल दिसले. सर्वांना आता भूख पण लागली होती म्हणून तिकडेच जेवायला थांबलो. जेवणाची घरगुती सोय होते असे कळाल्यावर लगेच ऑर्डर पण दिली. लोकल खाडीच्या माश्याचे कालवण ते ही गूवन पद्धती नुसार आणि भात हे आमचे जेवण ठरले. अक्षता माश्याचा रस्सा फक्त खाते म्हणून काय हरकत नव्हती. गर्मी मुळे आम्ही परत इकडे पण थंडा मागवला. या घर रूपी हॉटेलचा परिसर बर्‍या पैकी थंड होता. बहुदा त्याचे कारण असे की घरा भोवती भरपूर दाट झाडांची सावली होती आणि हे घर पण खाडीच्या बाजूला लागून एका छोट्याश्या टेकाडावर होते. जेवण येई पर्येंत मस्त आराम करत सर्व दिशेला आडवे पडलो होतो.

जेवण आले आणि मग काय लगेच ताडकन उठलो. गरम - गरम घरगुती जेवणावर तुटून पडलो. ते गोवन  पद्धतीचे जेवण फारच मस्त होते. जेवण फस्त केले आणि परत सर्व अर्धा तास भर आराम करत आडवे पडलो. रावने तर एक मस्त डुलकी काढून घेतली. थोडेसे उन्ह सरल्या वर आम्ही पुढे निघालो. तेरेकोल गावतच रावने एका दारूच्या दुकाना जवळ बाईक थांबवली. त्याच्या मागे आम्ही पण थांबलो आणि त्याच्या मागो-मग आम्ही सर्व पण दारूच्या दुकानात शिरलो. रावने त्याच्या भाऊ वेवेकसाठी म्हणून २ विवेकच्या आवडीच्या बाटल्या विकत घेतल्या. इकडेच आम्ही सावंतवाडीला जाणारा रस्ता पण विचारून घेतला आणि निघलो आमच्या कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीपच्या परतीच्या प्रवासाला. आता तसे सर्वच आनंदात होतो पण मी हा सर्वांचा आनंद "आज कुठल्या ही परिस्थितीत आपल्याला देवरुख गाठायचे आहे" या आरोळीने फार जास्त वेळ टिकून दिला नाही.

तेरेकोल करून सुटलो ते मध्ये कुठेहि न थांबता आरोंदा मार्गे थेट सावंतवाडी गाठली. सावंतवादीच्या शहराच्या चौकात पहिला ब्रेक घेतला. या आरोंद्याच्या  रस्त्याला जरा जास्तच अवजड रहदारी होती. सावंतवादीच्या शहराच्या चौकाच्या बाजूलाच सावंतवाडीची प्रसिद्ध असलेली लाकडी खेळणांच्या दुकान दिसले, मग काय आम्ही घुसलो. थोडा वेळ तिकडे टाइम पास करत आराम करून घेतला. वास्तविक काही आवडले असते तर मग घेतले पण असते. पण मला तिकडे तसे काही विशेष आवडले नाही. किमती पण कायच्या काय होत्या. शेवटी आता जास्त वेळ टाइम पास नको म्हणून मग झालो बाईक वर स्वार. चौकातून निघालो आणि गोवा-मुंबई महामार्गाला लागलो. जरा पुढे गेलो असू आणि रस्त्याला लागूनच रावने एका हॉटेल जवळ बाईक थांबवली आणि म्हणाला चहा पिऊया. चहा बरोबर आम्ही थोडेसे हांडले पण, काय माहीत पुढे खायला थांबू की नाही. कारण दिवसा उजेडी जास्तीच - जास्त रस्ता कापायचा होता आणि देवरुख अजुन १७५ किलोमीटर लांब होते.

चहा नाश्त्या बरोबर पटा - पट फ्रेश होऊन घेतले आणि लगेच बाईक वर स्वार होऊन निघालो देवरुखच्या दिशेने. सावंतवाडी शहराच्या जवळ जरा जास्त गाड्या होत्या, मात्र जरा पुढे गेल्यावर रहदारी कमी झाली होती, त्यामुळे आम्ही आता जरा सुसाट सुटलो होतो. आज तर मी पण बाईक पळवायला लागलो होतो. किंबहुना आज तर मी सर्वात पुढे होतो. सावंतवाडी वरुन सुटलो ते दीड-एक तासात कुडाळ, कसाल आणि कणकवली पार करून पुढे गेलो. कणकवली वरुन १०-१२ किलोमीटर पुढे मी एका गावाकडे बाईक थांबवायला सांगितल्या. आता सुर्य मावळयच्या आत एक छोटासा ब्रेक घेऊ असे बोललो. सर्व तयार झाले. राजू व उन्मेष ने जाऊन बाजूलाच असलेल्या दुकानातून थंडा  घेऊन आला. थंडा पीत आणि गप्पा मारत रिलॅक्स होत होतो. उन्मेष तर मला बोलला "काय मामा आज बाईक मस्त पळवत आहेस". या बाईक ट्रीपवर माझे व अक्षताचे सर्व सामान आम्ही बाईकच्या दोन्ही बाजूला बांधले होते. यामुळे मी आता पर्येंत बाईक जरा हळूच चालवत होतो. पण इतके दिवस या पद्धतीत बाईक चालवून मला आता सवय झाली होती, त्यमुळे मी आज जर बाईक पळवत होतो. 

थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही निघालो पुढे. आता सुर्य पण मावळला होता. त्यामुळे संपूर्ण अंधार पडायच्या आत जास्तीत-जास्त रस्ता कापायचा आम्ही प्रयेत्न करत होतो. नाही म्हंटले तर अजुन देवरुख १००-११० किलोमीटर होते. आता परत सर्व सुसाट सुटलो. अंधार पडे पर्येंत आम्ही बर्‍या पैकी बाईक पळवून आलो होतो. जसा ठप्प अंधार झाला तसा सर्वात पहिला मी हळू झालो आणि मागाहून मग सर्व हळू झाले. वास्तविक माझी हि सवयच आहे. अंधार पडला की मी बाईक वर बर्‍या पैकी हळू होतो. मी अक्षताला बोललो पण आता राव मला शिव्या घालेल बघ "रात आंधळा, साला !! अंधार पडला कि झाला हळू". पुढे जेव्हा आम्ही राजापूर जवळ थांबलो तेव्हा तो तसेच मला बोलला. परत एक-दीड तासांची बाईक चालवून आम्ही राजापुरच्या पुढे मध्येच रस्त्याला लागून थांबलो. आता जरा अक्षताला थकवा जाणवायला लागला होता. आजू-बाजूला काहीच नव्हते आणि त्यात चीट्ट अंधारात आम्ही बाईक रस्त्याच्या बाजूला इंडिकेटर चालू ठेवून उभे होतो. आज आम्ही वेळेत देवरुखात पोहोचू असे वाटत नव्हते आणि तो पर्येंत देवरुखात हॉटेल पण बंद होणार. त्यामुळे आम्ही हातखांब्याला जेवायला थांबूया असे ठरवले.

जास्त वेळ न थांबता परत आम्ही बाईक वर स्वार झालो आणि निघालो पुढे. रात्रीच्या वेळी मुंबई - गोवा हाइवे वर आम्ही जरा सावध पणे हळू-हळू बाईक चालवत होतो. पुन्हा दीड-दोन तासांची बाईक चालवून आम्ही हातखांब्याला हॉटेल अलंकारला थांबलो. आता रात्रीचे ११ वाजले होते आणि जर आम्ही हॉटेल वर बसून जेवलो तर अजुन एक तास भर जाईल असे म्हणून आम्ही इकडून जेवण पार्सल घेऊ असे ठरले. कारण आता देवरुख फक्त ३५ एक किलोमीटर वर होते. तासा भरत घरी पोहोचू आणि मग निवांत जेऊ. राजू आणि उन्मेष ने पटकन पार्सल ऑर्डर केली आणि ऑर्डर जरा लवकर देण्यास सांगितली. आम्ही सर्व तो पर्येंत फ्रेश होऊन घेतले. लगेच ऑर्डर आली आणि ती घेऊन सर्व निघालो. पांगेरी मार्गे आम्ही तासा भरात देवरुखला पोहोचलो होतो. आजचा आमचा दिवस जरा जास्त मोठा झाला होता. आता मात्र सर्व जरा थकले होते. सर्वांनी पटा - पट फ्रेश होऊन घेतले आणि तो पर्येंत अक्षताने जेवणाची तयारी केली. १२.३० च्या दरम्यान जेवण करून घेतले आणि सर्वच आराम करत गप्पा मारत बसलो. सर्व फार थकलो होतो तरी पण बाईक ट्रिप पूर्ण झाल्याच्या आनंद पण सर्वंच्या थकलेल्या चेहऱ्यावर झळकत होता. बाईक ट्रीपच्या सर्व आठवणींची उजळणी करत आम्ही सर्व १.३० च्या दरम्यान झोपी गेलो.

No comments:

Post a Comment