21.6.12

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग पहिला - दुसरा दिवस (मुरुड ते हरिहरेश्वर)

१९ मे २००५, सकाळी आरामात ९च्या दरम्यान जाग आली त्या वेळेला उठलो. सर्वांनी पटा-पट आवरून घेतले कारण १० वाजता रूम सोडायच्या होत्या. रावला आज चालायला फारच त्रास होत होता. साहजिक आहे त्याच्या गुडघ्याला फारच मार लागला होतो. पुन्हा एकदा डॉक्टरांचे काय म्हणणे आहे ते मला पाहायचे होते. सर्वांनी चहा ढोसला आणि रूम सोडून डॉक्टरांन कडे गेलो. डॉक्टरांनी रावच्या गुडघ्याची पाहाणी करून आम्हाला सांगितले कि फार काळजी करायचे काही कारण नाही, फॅक्चर नाही आहे. पण थोडीशी काळजी नक्की घेतली पाहिजे. डॉक्टरांनी आमच्या ट्रीपची सर्व सविस्तर माहिती करून घेतली. फार मस्त दिलखुलास डॉक्टर होते आणि ते ही मुरुड सारख्या खेडे गावात. ते आमच्या पाठीवर प्रोसाहानाचा हात फिरवत आम्हाला म्हणाले जा पोरांनो मज्जा करा. डॉक्टरांनी दिलेल्या हिरवा कंदिलाच्या आनंदात त्यांचा निरोप घेतला आणि पुढच्या प्रवासाच्या निर्णयाच्या तयारीला लागलो.

प्रथम सर्वांना भुका लागल्या होत्या म्हणून नाष्टा करायला हॉटेल मध्ये घुसलो. नाष्टा कसला १२ वाजले होते, पण दिवसातील पहिला घास पोटात पडत होता म्हणून नाष्टाचं म्हणूया ना ....आता परत पुढचे काय या वर आलो. राजू, सुजय आणि राव आप-आपल्या मतावर ठाम होते. मात्र माझे मत आता डॉक्टरांच्या परवानगी  नंतर, रावच्या दिशेला झुकले होते. आमची चर्चा कधी मुंबई कडे परत जायचे या दिशेला जायची तर कधी पुढे गोव्याला जायचं या दिशे कडे जायची. पण शेवटी रावच्या हट्टाला, जिद्दीला आणि सर्वात जास्त करून त्याच्या हिमतीला आम्ही सर्व झुकलो आणि पुढे गोव्या कडे जायचे असे ठरवले.

नाष्टा उरकून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो . मात्र आता आमच्या ट्रीपचे अड्वेंचरचे प्रमाण वाढले होते याची परिपूर्ण जाणीव झाली आणि रावला या पुढील वेदना दायक प्रवासाची पण. कारण सुरवात झाली ती रावला  सामानासहित बाईक वर बसवायचे कसे? मग काय आता ट्रीप पुढे नेण्याची आहे असे ठरले तर करायचे आयुष्यातील मोठ -मोठे पराक्रम. यात सुजय माझी टीवीएस विक्टर बाईक चालवणार नाही अशी नाटकं  करायला लागला. कारण त्याला अशा स्टाइलची बाईक चालवायला त्रास होतो. काहीही नाटक त्याचे ...पण आम्हाला त्याच्या अशा नाटकांची फार सवय आहे, म्हणून त्याच्याशी फार हुज्जत न घालता त्याला रावची एन्टाईसर चालवायला दिली. वास्तविक सुजय कडे स्पेनडर बाईक होती ...पण काय करणार सुजय तो आणि त्याची नेहमीची फालतू नाटकं......पण आम्हाला त्याची सवय होतीच. एकदा दोनदा मी आणि राव ने त्याला समजावण्याचा प्रयत्न सुद्धा केला पण सुजयच तो कसला ऐकणार. शेवटी आम्ही माघार घेतली. पाहिले मी बाईक वर बसलो, मग राव आपला गुडघा सांभाळत राजू आणि सुजयच्या मदतीने मागे बसला. रावच्या पाठी वर राजू ने समान दिले आणि ऑल सेट म्हणत आम्ही निघालो पुढे .

आम्ह्चा पुढचा पल्ला होता खाडी पार करून दिघीला जायचे आणि पुढे बाईकने. पुन्हा एकदा आम्ही मुरुड जेट्टी गाठली. दिघीचे आमचे आणि बाईकचे तिकीट काढले आणि लौंच यायची वाट पाहत बसलो. आम्ही एकीकडे सावलीत बसलो असताना बाजूने काही फिरंग आले. फिरंग पाहताच सुजयने आपली इज्जत काढून घेतली. त्यांना तो बोलला 'हॅलो....' पण नाकावरची माशी जशी झटकावी तसे त्यांनी काहीही न बोलता, आमच्या पासून लांब उभे राहिले. सर्व खडा-खडा हसायला लागलो.....

थोड्या वेळाने लौंच आली आणि सर्व माणसांच्या पाठून लौंच वाल्यांनी बाईक चढवल्या. राव माझ्या मदतीने बाईकच्या बाजूला बसला आणि बाईक धरायची जबाबदारी घेतली .....वास्तविक त्याच्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. कारण आम्ही मस्त लौंचच्या टपावर जाऊन बसलो आणि रावला जळवायला लागलो . विशेष करून सुजय. मग राव कसला गप्प बसतोय, झाला सुरु सुजयला आणि मला चिडवायला. एक हिप्पी आणि दुसरा निग्रोला पाहून पळाले फिरंग. मात्र आम्ही मस्त मज्जा करत होते. छान वारा लागत होता लौंचच्या वर. पण ऊनाचे चटके हि लागत होते तसे ते बाईक वर पण लागणार होते. अधून-मधून सुजय वीडियो शूटिंग करत होता आणि मी फोटो काढत होते. मस्ती-मस्ती च्या अर्ध्या तासाच्या फेरी प्रवासाने आम्ही दिघी जेट्टी गाठली. लौंच वाल्यांनी बाईक उतरवल्या आणि आम्ही रावला उतरवले. मघास सारखे परत पराक्रम करून रावला बाईक वर चढवले आणि आम्ही जेट्टीच्या बाहेर आलो.

आमच्या प्लान नुसार पुढे पाहायचे ठिकाण दिवेआगर होते आणि आम्ही गावकऱ्यांना विचारून निघालो पुढे. आक्सिडेंट मुळे बराच वेळ निघून गेला होता. अधून-मधून फोटोग्राफिचे ब्रेंक घेत २ तासाने आम्ही दिवेआगर गाठले. जशा पराक्रमाने रावला बाईक वर चढवायचो तसेच पराक्रम त्याला उतरवण्यासाठी पण करावे लागत होते. पहिले समान, मग राव आणि शेवटी बाईक लावून मी उतरायचो. रावचे समान आणि राव ला उतरवायला राजूचा आणि सुजयचा फार मदतीचा हात होताच. तसे पाहायला गेले तर आमच्या आक्सिडेंट नंतर आम्ही सर्वच रावला जास्त त्रास होऊ नये याची काळजी घेत होते .


मंदिरात तशी फारशी गर्दी नव्हती. किंबहुना चार-पाच गावकरी सोडले तर कोणीच विशेषता पर्यटक नव्हते, फार बरे वाटले शांत पर्यटक स्थळ पाहून. आरामात सुवर्ण गणेश मूर्तीचे दर्शन घेतले आणि आलो बाहेर. आम्ह्चे मस्त आरामात रमत गमत व्यवहार चालले होते. आता सूर्याचा मारा जरा कमी झाला होता आणि मस्त वारा हि सुटला होता. थोडा वेळ टंगळ-मंगळ करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आम्हाला हरिहरेश्वर गाठायचे होते.


एक-सव्वा तासाचा रस्ता कापून आम्ही श्रीवर्धन गाठले. पण या सव्वा तासा मध्ये आम्ही आमच्या या ट्रीप मधला सर्वोत्तम रस्त्यावरून आलो होते. आहा-हा!! काय तो निसर्ग रम्य प्रवास आज हि माझ्या लक्षात आहे. डोंगराच्या कडेने जाणारा कोकणातला नागमोडी रस्ता, उजवी कडे खाली खडकांवर समुद्राच्या लाटा येऊन आधळत होत्या. मला तर असे वाटले होते कि आम्ही ऑस्ट्रेलीयाच्या कुठल्या तरी किनार पट्टी वरून बाईक चालवत श्रीवर्धनला आलो आहोत. थोडा वेळ स्वप्नातल्या ऑस्ट्रेलीया वरून फिरून अस्तीतवातल्या श्रीवर्धन हरिहरेश्वरच्या फाट्यावर उभे असल्याची जाण झाली. मग काय ५-१० मिनटे टंगळ-मंगळ आणि पुढे निघण्याच्या तयारीला लागलो. आता अंधार पडायच्या आधी आम्हाला हरिहरेश्वर गाठायचे होते. एकदां जे सुटलो ते थेट हरिहरेश्वराचे मंदिर गाठले. रावला उतरवायची कसरत करून बाईक लावल्या आणि शिरलो मंदिरात. मंदिरातही तशी फार गर्दी नव्हती. शांतपणे मनोसोक्त हरिहरेश्वराचे दर्शन घेतले आणि बाहेर आलो. जरा वेळ शांत बसून मग लागलो मंदिराचा परिसर पाहायला. मी आणि रावने तेवढ्यात मंदिराला लागून असलेल्या समुद्र किनाऱ्याचा फोटो काढू लागलो. मंदिराचा फेरफटका मारून झाल्यावर आम्ही रात्र काढायची जागा पहायच्या मार्गाला लागलो. मी मंदिराच्या कार्यालयात जाऊन विचारले आम्ही जर मंदिराच्या अंगणात झोपलो तर काही हरकत आहे का? त्यांची ना हरकत घेऊन आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. मंदिराचे आवर म्हंटले तर लगेच तसे काय झोपायला मिळणार नव्हतेच आणि शिवाय आम्हांला अजून जेवायचे पण होते . मग काय आलो बाईक जवळ आणि मस्ती करायला लागलो  इतक्यात रावचे लक्ष माझ्या बाईकचे काल झालेल्या आक्सिडेंट मुळे सैल झालेल्या चैन कडे गेले. मग मी पाहायला लागलो काय झाले ते. एवढ्यात बाजूला असलेले दोन इसामांनी पट-पट चैन टाइट करून दिली. मग आमच्या आणि त्यांच्या थोड्या गप्पा-गोष्टी सुरू झाल्या. चर्चान्ति कळाले कि त्यांच्यातला एक मेकॅनिक आहे आणि नेहमी मुंबई ते मंडणगड बाईकने जात असतात. आमच्या साठी जे अड्वेंचर होते तो त्याच्यासाठी नेहमीचा रस्ता होता. च्यामारी! हे तर आमच्या सारखेच भटके निघाले. मस्त बराच वेळ आमच्या मध्ये गप्पा चालल्या. ते कुठे कुठे फिरले आम्ही कुठे कुठे फिरलो, वगैरे-वगैरे. अंधार पडला आणि अजून त्यांना बरेच पुढे जायचे होते म्हणून ते आमचा निरोप घ्यायला लागले. आठवण म्हणून सर्वांचा मिळून एक फोटो काढला आणि एकमेकांचा निरोप घेऊन आप-आपल्या मार्गाला वळलो. ते निघाले मंडणगडाच्या मार्गाला आणि आम्ही ५० फुट वर असलेल्या हॉटेल मध्ये.

मस्त पैकी पोट भरून जेवलो आणि गेलो परत मंदिराच्या अंगणात. अजून पर्येंत मंदिर बंद नाही झाल्यामुळे थोड्या फार लोकांची ये-जा चालू होतीच. म्हणून तो पर्येंत एका बाजूला समान ठेवून बसलो होते. मंदिर परिसरामुळे जास्त मस्ती हि करायला मिळत नव्हती. थोड्या वेळाने आम्ही पथारी पसरली आणि पडलो आडवे, कंटाळा आला होता बसून-बसून. आता माणसे येणे कमी झाले होते, पण काही केल्या झोप येत नव्हती. फार गरम होत होते. थोडा वेळ पाहिले झोप येते का नंतर सर्वच वैतागलो आणि सर्व संसार आवरून बाहेर आलो. ज्या हॉटेल मध्ये आम्ही जेवलो होतो त्या हॉटेलच्या मालकाला विचारले कि त्याच्या हॉटेलच्या अंगणात झोपलो तर चालेल का. पहिला तो नाही बोलला पण नंतर थोडा वेळ विचार करून हो बोलला, मात्र हॉटेल बंद होऊन साफ-सफाई झाल्या वर. काय करणार नाहीलाजास्तव ठीक आहे असे म्हणून आम्ही बाईकवर बसून राहिलो. त्यातल्या त्यात हीच जागा बरी वाटत होती मंदिरा पेक्षा. समुद्राला लागून हॉटेल होते म्हणून वर फार छान वारा येत होता.

एक दीड तास आमच्या गप्पा, मस्ती, चर्चा चालू होत्या. मस्ती जास्त नव्हतो करत, कारण जास्त आवाज करून चालणार नाही. दुसर्याच्या आवारात होतो ना......असे फक्त बोलायला. खरे आम्ही फार थकलो होतो कधी झोपतोय असे झाले होते. आमच्या पैकी राजू, राव आणि सुजय हे जास्त करून इंग्लिश मधे संभाषण करणारे आणि जर मी असलो तर मराठी किंवा हिंदी त. या मुळे तिथल्या माणसांना ऐकायला अर्धे संभाषण इंग्लिश मध्ये तर उर्वरित मराठी-हिंदी मध्ये. मला हे, त्या हॉटेलचा मालक आणि त्याच्या काहीश्या कर्मचाऱ्यांच्या आमच्याकडे पाहण्याच्या दृष्टीकोनातूनच जाणवले होते. मला तर असे वाटत होते कि त्याच्या मनात असे चालले असेल कि "हि फार इंग्लिश बोलणारी, दिसायला पण चांगल्या घरातली दिसतात, पण हे काय विचित्र किंवा घाणेरडे कपडे घातले आहेत आणि इकडे रस्त्यावर झोपायची काय गरज भासली. हरिहरेश्वर मध्ये कितीतरी हॉटेल चांगले आहेत, घ्यायची होती एक रूम हॉटेल मध्ये आणि राहायचे होते तिकडे". बहुदा त्यांनी आमच्या बद्दल असा विचार केलेला पाहून मी मनातल्या मनात मिश्कील पणे हसलो आणि परत मिसळलो मित्रांबरोबर. आता सर्वांनाचा थोडी-थोडी पेंग यायला लागली होती टेबल वर बसल्या बसल्या. शेवटी त्या मालकाला आमची दया आली असावी. त्याने टेबल बाजूला करून आम्हाला एका बाजूला झोपायला जागा दिली. पटा-पट स्लीपिंग बॅगा पसरल्या आणि पडलो आडवे.

मला रावच्या बाईक च्या डिक्की तून एक समान काढायचे होते आणि राव च्या बाईकची चावी सुजय कडे होती. पण नेहमीच्या सवयी प्रमाणे सुजय बरीच नाटके करत होता. काही केल्या सुजय चावी देतच नव्हता मग मी पण सुजयच्या पाठला सोडतच नव्हतो. तो नाटकी तर मी चिवट बनलो आणि मग त्याला पण बराच त्रास दिला आणि रावच्या बाईकची चावी घेतली. मला हवे असलेले समान घेतले आणि सुजयला चावी देऊन झोपी गेलो.