29.12.10

लेह बाईक ट्रीप - तेरावा दिवस (मनाली ते चंदीगड)

२० ऑगस्ट २००९, काल उशिरा उठायचे ठरल्या प्रमाणे तसे सर्वांनी हे काम मात्र आवडीने केले. सकाळी ८ च्या दरम्यान उठलो आणि फ्रेश होऊन अभी, मी आणि मनाली, आमच्या पुढच्या प्रवासाकरता गाडीची सोय करायला बाजारात गेलो. आज मस्त सर्व रिलॅक्स मूड मध्ये होते फार पळा-पळ नव्हती रोजच्या प्रमाणे. काल रात्री उशिरा ने आम्ही मनालीत आल्यामुळे, शहर पाहायला मिळाले नव्हते आणि आज चंदीगड गाठायचे होते म्हणूनही शहर पाहायला हि मिळणार नव्हते. या कारणास्तव आम्ही टॅक्सी स्टॅंड पर्येंत पायीच जायचे ठरवले. हॉटेल ते टॅक्सी स्टॅंड तसे काही फार अंतर नव्हते. टॅक्सी स्टॅंड वर चौकशी अंती मनाली ते चंदिगड आणि एक दिवस हॉल्ट करून दिल्ली सोडायच्या गाडीचे भाडे आमच्या बजेटच्या बाहेर आहे असे कळाले. या बद्दल अभी आणि माझ्या मध्ये चर्चा चालू झाल्या. नाश्त्यासाठी बाकी सर्वांना हॉटेल वरून मनाली शहराच्या चौकात बोलावले होते. तो पर्येंत अभी, मनाली आणि मी बाझारात फेर-फटका मारायला गेलो. थोडा वेळ बाजारात फिरून, अभिने ए.टी. एम. मधून पैसे काढले आणि आम्ही चौकात सर्वांना भेटलो. मस्त हॉटेल मध्ये पुरी-भाजीचा नाश्ता मागवला, बरेच दिवसंनी जरा चम-चमित नाश्ता करायला मिळणार होता म्हणून बरे वाटले. नाश्ता करता-करता अभी, रोहन आणि मी पुढच्या प्रवासा बद्दल चर्चा करायला लागलो. मनाली शहरातली टॅक्सी यूनियनची गाडी फार महाग पडणार होती, म्हणून बरेच दुसरे पर्याय पाहायला लागलो. अभीच्या मते वोल्वो बसने ५ जण आणि सामान पुढे पाठवायचे असे होते, पण हा पर्याय अभी सहित कोणालाही पसंत नव्हता. कारण मग ग्रूप संपूर्णपणे तुटला असता. नाईलाजास्तव जर काहीच सोय नाही झाली तर हा पर्याय शेवटचा असे गृहीत धरून आम्ही दुसरे पर्याय पाहायला लागलो. एवढ्यात मला काका जोशीचा मित्र गोकुळ मनालीत राहतो असे लक्षात आले. काकाला फोन लावून गोकुळचा फोन नंबर घेतला आणि काकाला पण त्याच्याशी बोलायला सांगितले.

नाश्ता उरकून आम्ही हॉटेल वर परतलो, बाकी सर्व बाजारात फिरून मग येणार होते. मी परत काकाशी बोललो आणि मग गोकुळला फोन लावला. काकाने गोकुळला  आमच्या अडचणी बद्दल आधीच कल्पना दिली होती. गोकुळने आम्हाला भेटायला बोलावले. मी, अभी आणि  रोहन बाईकस घेऊन इष्ट स्थळी गोकुळला भेटायला गेलो. गोकुळ बरोबर चहा झाली आणि बऱ्याच जुन्या-पुराण्या आठवणींच्या गप्पा… एवढ्यात त्याने आमच्या साठी पाहिलेल्या गाडीच कॉन्फोर्मेशॉन आले. हि गाडी चंदिगडची  होती आणि परत रिकामी जाणार त्या ऐवजी आम्हाला अर्ध्या  किमतीत  घेऊन  जाणार. मग पुढे चंदिगड ते  दिल्ली  दुसर्या  गाडीची  सोय  करून  देणार  होती. गोकुळने केलेल्या  मदती  बद्दल  त्याचे  आभार  मानले  आणि  हॉटेल  वर  परतलो. आम्ही  परत  हॉटेलवर येई  पर्येंत  बाकी  सर्व  बाजारातून  मस्त  शॉपिंग करून आले होते. अमेय  म्हात्रे , कुलदीप , ऐश्वर्या, पूनम  यांनी  त्यांच्या  मुंबईच्या  मित्रान  करता भेट द्यायला   म्हणून  लाकडावर  नावे  लिहिलेल्या   किचेन्स   करून  घेतल्या  होत्या . मला  ते  फार  आवडले   आणि  माझ्या  मित्रान  करता  पण  मला  घ्यायचे  होते . पण  काय  करणार  कामा  अभावी  आणि  त्याहून महत्वाचे   म्हणजे  वेळे  अभावी  मला  मनालीत शॉपिंग  करायला मिळालीच  नाही.

आम्ही  सर्व  सामान   आवरून  निघायच्या  तयारीला  लागलो. एवढ्यात गोकुळने  ठरवून  दिलेली  गाडी  हॉटेल  कडे  आली . सर्वांनी  सामान  गाडीत  भरून  ठेवले पण  गाडी  निघायला  दोन - एक  तास  होते. कारण  ड्रायवर  रात्रभर  गाडी  चालवून  मनालीला  आला  होता,  म्हणून  त्याला  थोडीशी  झोप  हवी  होती . गाडी  निघे  पर्येंत  गाडीतील  सर्व  टीम    मेम्बर  ओल्ड  मनाली   पाहून  येणार   होते . पण बाईक मात्र पुढे निघणार असे ठरले. ११ वाजता आम्ही हॉटेल बिआस सोडले आणि कुल्लुच्या दिशेने निघालो. आज परत मी आणि दीपाली बाईक वर एकत्र होतो, दुसर्या बाईकस वर अभी-मानली, रोहन-शमिका, आदित्य-ऐश्वर्या आणि अमेय म्हात्रे-साधना. मनाली शहराची  हद्द सोडली पण नव्हती एवढ्यात आम्हाला सकाळचा नाश्ता पचला आणि   परत भुका लागल्या आहेत असे जाणवले. मग काय पुढे कुठे हि जास्त वेळ थांबता येणार नाही असे म्हणून आम्ही लगेच हॉटेल पाहून थांबलो आणि भूकेच निरसन करायला  हॉटेल मध्ये शिरलो. मस्त शॉपिंग कॉंप्लेक्स मध्ये हॉटेल पहिल्या मजल्यावर होते. तळ मजल्याला  साडी आणि ड्रेसच्या कपड्यांची दुकाने होती. हॉटेल साठी वर  चढताना माझे, शामिकाचे आणि अमेय म्हात्रेचे डोळे फिरले आणि या बाबत चर्चा चालू झाल्या. सर्वांनी हॉटेल मध्ये मसाला डोसा ऑर्डर केला, नाश्ता येई पर्येंत मी, शमिका व अमेय म्हात्रे खाली दुकानात साड्या पाहायला गेलो. वास्तविक मीच शामिकला खाली घेऊन गेलो होतो, कारण मला आईसाठी साडी घ्यायची  होती. काल मी आई बरोबर फोन वर बोललो त्यावेळी मी तिला काही घेतले नाही म्हणून ती जरा नाराज झाली असे मला जाणवले. पण पाहिले तर साड्या मात्र एकसो-एक होत्या. शामिकाच्या मदतीने मी आणि अमेय म्हात्रेने आई साठी मनाली सिल्कच्या साड्या घेतल्या. साड्या पाहत असता शामिकला पण मोह आवरता आला नाही, तिने हि मनाली सिल्कचे ड्रेसचे कापड घेतले. शमिका मला बोलली रोहन आता शिव्या घालणार….तसे आम्ही तिघांनी पण सर्वान काढून शिव्या खाल्ल्या आणि त्या बरोबर मसाला डोसा पण खाऊन घेतला.

नाश्ता  कम जेवण उरकून आम्ही ११.३० च्या दरम्यान पुढे कुल्लुच्या दिशेने निघालो. बाईक चालवायला रस्ता मस्त होता, सुसाट बाईक पळवत होतो. रस्त्याला जरा ट्राफिक पण होते आणि वळणा-वळणाच्या रस्त्या मुळे थोड्या सावधानतेने बाईक चालवाव्या लागत होत्या. बिआस नदी रस्त्याला लागुनच आमच्या बरोबर धावत होती. आज बाईक चालवाची  मज्जा  काय औरच होती. मस्त डावीकडे बिआस नदीच्या सोबतीने आम्ही पतलीकूहल पार करत कुल्लू जवळ आलो ते कळलेच नाही आणि नेहमी प्रमाणे मी आज हि सर्वात मागे होतो. बाकी सर्व बाईकस पुढे निघून गेल्या होत्या. आज आमचे मागे राहण्याचे कारण फोटोग्राफी नव्हते गप्पा होत्या. गप्पांना पण आज काय वेगळाच रंग चढला होता, मस्त मूड मध्ये होतो दोघेही आणि एन्जॉय करत होतो. त्या गप्पा आणि निर्सगमय प्रवास या सर्व एन्जॉयमेंट मध्ये मी कुल्लू गावाला बायपास करून भून्तरला जाणारा पूल न घेता सरळ गेलो आणि कुल्लू गावातल्या अडगळीच्या रस्त्याने बऱ्याच वेळाने भून्तरला पोहोचलो. बाकी सर्व बाईकस भून्तर शहर पार करून आमच्या साठी रस्त्याला लागून असलेल्या एका सफरचंदाच्या दुकाना जवळ थांबले  होते. थांबण्याचे कारण नंतर कळाले कि ऐश्वर्याला सफरचंद हवी होती आणि मग जरा चहा घेऊन थोडे रिलॅक्स होऊया. 

आम्ही सर्व घोळका करून चहा घेऊ लागलो असता आमच्या मधूनच एक लोकल मुलगा आला आणि तो मनाली व ऐश्वर्याला धक्का मारून आत दुकानात गेला. चुकून धक्का लागला असेल असे वाटले म्हणून आम्ही दुर्लक्ष करून परत चहा घ्यायला लागलो. तोच मुलगा  दुकानातून बाहेर येताना मनालीला परत धक्का मारला. आता मात्र हा धक्का चुकून नव्हता,  एवढे कळण्या इतपत आपण सर्वच शहाणे आहोत. अभी आणि अमेय म्हात्रेने त्याला  अडवून “क्या भाई धक्का क्यों मार राहा हे लडकियों को ” असे विचारले. एवढ्या त्यांच्यात बाचा -बाची सुरु झाली, मग मी, रोहन आणि आदित्य पण बाचा-बाची मध्ये शामिल झालो. तो मुलगा आमचीच कशी चूक आहे आणि मुलीना घेऊन आम्हीच  मधेच कशी काय शाइनिंग मारतोय असे बोलायला लागला. या सर्व बाचा-बाची मध्ये आता आमचा पण पार चढायला लागला होता आणि बाचा-बाची पण वाढली. एवढ्यात त्या मुलाने अभिला जोरात धक्का मारला आणि बाचा-बाची सोडून हाणा-हाणी सुरु झाली. अभी आणि त्या मुला मध्ये मजबूत हाणा-हाणी झाली, हे पाहून मग आम्ही लगेच घुसलो मध्ये आणि त्या मुलाला दिले ढकलून अभी पासून लांब. परत मग आमच्यात आणि त्या मुलात बाचा-बाची झाली, मारा-हाण सुरु केल्या बद्दल. या बाचा-बाची मध्ये परत एकदा त्याने अभी, मला आणि अमेय म्हात्रेला धक्का-बुक्की करून मारा-मारी साठी प्रवृत्त  करत होता. किंबहुना अभी झाला सुद्धा आणि परत हाणा-मारीला सुरवात झाली. माझे तर  टाळकेच सरकले होते, पण कधी नव्हे तर मी आज संयम बाळगून होतो. सारखे माझे हात त्या मुलाला मारायला शिव-शिवत होते, पण आपण पर प्रांतात आहोत आणि तो मुलगा तिकडचा लोकल आहे याची लगेच जाण व्हायची, यामुळे मी बरेचदा मला आवरले. आम्ही अभी आणि त्या मुलाची हाणा-मारी परत एकदा सोडवली व त्या मुला बरोबर हुज्जत घालायला लागलो. एवढे सर्व पराक्रम पाहून आजू-बाजूला बरीच माणसे जमून घोळका जमला. आता बाचा-बाची मध्ये आजू-बाजूचे १-२ मंडळी पण त्याच्या बाजूने शामिल झाली होती. रोहन काही तरी बोलला आणि अचानक एका माणसाने रोहनच्या तोंडा वर हात मारला. हे पाहून साधना बोलली “ क्यों मारते हो, हमारी क्या गलती हे उस लडके कि गलती है”. रोहनला ज्याने मारले तो मुलगा साधनाला बोलला “चुप बे नाही तो तुमको भी दुंगा लगाकर एक”. या सर्वात ज्याच्याशी हाणा-मारी झालेली तो मुलगा “फोन लगाकर लोगो को बुलाता हु, अभी तुम रुको इधर” असे बोलत आणि फोन लावत घोळक्यात कुठे तरी नाहीसा झाला…….सर्व शांत झालेले पाहून तिकडच्या काही लोकल समंजस मंडळीनी आम्हाला “चलो अभी निकलो यहाँ से” असे सांगितले. लगेच आम्ही तिकडन पळ काढला.....चहाचे पैसे पण त्यांनी घेतले नाही आणि आम्ही देखील दिले नाही. तिकडन निघालो आणि माझ्या नेहमीच्या सवयी प्रमाणे मी दीपालीला विचारले सर्व सामान वगैरे घेतले ना? काही राहिले नाही ना तिकडे. एवढ्यात दिपाली ओरडली “माझी बॅग राहिली”. लगेच परत फिरलो, तिकडची ती चहावाली बॅग घेऊन बाहेर होतीच. बॅग घेतली आणि आम्ही सर्व सुसाट बाईक पळवल्या. आता मात्र माझ्या आणि दीपाली मध्ये निराळ्या चर्चा होत्या. या सर्व प्रकरणा मुळे संपूर्ण मूड बदलला होता. मजबूत राग घुसला होता डोक्यात, बराच त्या मुलावर आणि थोडासा आमच्या स्व:तावर. मी तर जास्त करून आम्हा सर्वांना जास्त दोष देत होत पण दीपालीचे मात्र थोडेसे निराळे मत होते. दुसर्याच्या प्रदेशात मारा-मारी करायचे आणि त्यातून आम्ही ५ मुलां बरोबर ५ मुली. हे सर्व समीकरण मला पटत नव्हते म्हणूनच मी मारा-मारी सोडवण्यात भाग घेत होतो आणि आपल्या लोकांना वाचवण्याचा प्रयेत्न करत होतो. किंबहुना मारा-मारी म्हटले कि माझे जास्त डोके पेटते आणि मी लगेच मारा-मारीत सहभागी ही होतो. पण या वेळेला मात्र माझ्या स्वभावाला निरसून फार निराळे वागणे झाले, ते हि त्या मुलाची चूक असताना. सहसा आपली चूक नसेल तर, मी जराही माघार घेत नाही आणि जर आपली चूक असेल तर माफी मागायला पण कमी पडणार नाही. पण यावेळेला कसा काय थांबलो ते मलाच कळाले नाही, बहुदा सर्वांनी मिळून मारा-मारी केली असती तर राडा अजून चांगलाच चीगळला असता. कसे-बसे रड्यातून पळालो होतो आणि बिलासपुर - मंडी रस्त्या वर १५ एक किलोमीटर वर एका पेट्रोल पंप जवळ थांबलो.

जरा रिलॅक्स होऊन पुन्हा मारा-मारीच्या च चर्चा करत आम्ही पुढे निघालो. सारा मूड मारा-मारी मधेच होता, पण आता आम्ही बाईकस मगास सारख्या पळवत नव्हतो. मस्त नेहमी प्रमाणे आरामात बाईक चालवत आजू-बाजूचा आनंद लुटत पुढे मंडीच्या दिशेने चाललो होतो. आता बर्याच पैकी रड्याच्या मूड मधून बाहेर निघलो होता आणि मी व दिपाली परत साधारण गप्पान मध्ये घुसलो.  थोड्या वेळाने मधेच एक भोगदा लागला. भोगदा बघितल्या-बघीतल्या मी थांबलो. कारण नंबरचा गोगल काढायला, नाहीतर भोगद्यात सर्व काळ-काळ दिसायचे आणि नको तिकडे घुसायचो. गोगल काढला आणि चष्मा घालून भोगद्यात शिरलो. भोगदा संपता संपत नव्हता. दिवसा-ढवळ्या फुल काळोकातून ३ किलोमीटरचा भोगदा पार करून बाहेर आलो. चष्मा काढ-घाल मुळे मी मागे पडलो होता म्हणून सर्व बाईकस भोगद्याच्या बाहेर माझी वाट पाहत होत्या. आता परत चष्मा काढून गोगल चढवला आणि पुढे निघालो. लगेच मंडी शहर लागले, ४ वाजले होते आणि सर्वांना मजबूत भुका लागल्या होत्या. साहाजिक आहे ४ वाजता सर्व साधारण पणे कोणालाही भूक लागतेच किंबहुना नाष्टा १२ वाजता केला असेल तरीही आणि यातून आम्ही काही अपवाद नव्हतो.  मंडी शहरा जवळ रस्त्याला लागूनच हॉटेल पाहिले आणि घुसलो आत. छान हॉटेल पण शांत, दुसरे कोणीही गिराईक हॉटेल मध्ये नव्हते. आज तसे आम्ही पण झाल्या प्रकारा मुळे शांत होतो. जेवण उरकून संपवायच्या मार्गवर असे पर्येंत मागाहून येणारी आमची गाडी पण याच हॉटेल वर येऊन धडकली. मग त्यांचे पण जेवण ऑर्डर झाले, आता मात्र आमचा शांतपणा विस्कटला आणि झाल्या प्रकारणा बद्दल त्यांना माहिती द्यायला लागलो. पुन्हा त्या विषया वर चर्चा सुरु झाल्या. चर्चेयन्ति असे कळाले की उमेश आमच्या त्या राड्यात नव्हता म्हणून बरे झाले, कारण उमेश आमच्या सर्वान मध्ये सर्वात जास्त तापट डोक्याचा आहे. जर तो रड्या मध्ये असता तर मजबूत फोडा-फोडी झाली असती, पहिली त्यांची आणि मग आमची….

याच चर्चांन मध्ये सर्वांचे जेवण झाले आणि पुढे निघलो. आता आमची गाडी बाईकस साठी न थांबता पुढे सुटणार होती, कारण ड्रायवर थकल्या मुळे त्याला पटा-पट चंदीगडला पोहोचायचे होते. गाडी सुटली आणि पाटो-पाट आम्ही पण निघालो. ५ वाजून गेले होते आणि आता रस्त्याला ट्रकची रहदारी पण जास्त होती. आजचा राडा सोडला तर बाईक चालवायला आणि आजू-बाजूच्या परिसरामुळे फार मजा आली होती. तसा मूड फारच छान होता आज. परत मी आणि दीपाली गप्पान मध्ये घुसलो, रस्त्याला रहदारी फार होती तरीही आम्ही मज्जा करत होतो. रस्ता चढ-उतारांचा होता, आपल्या पुण्या-मुंबई जवळचे घाट आहेत तसे. याच ट्राफिक मधून आम्ही पुढे चललो होतो. आज काय मज्जा निराळीच होती. मी आणि दीपाली ती वेळ, तो प्रवास फार एन्जॉय करत होतो. मला तो प्रसंग अजूनही आठवतो आहे, दीपालीने तिच्या सासू बाईंना खुशाली विचारण्याकरता फोन लावलेला. ती बाईक वर बसूनच त्यांच्याशी गप्पा मारत आणि ट्रीप बद्दलच्या गोष्टी सांगत होती. नंतर अमोल बरोबर पण ती गप्पा मारायला लागली. अधून-मधून मी पण तिच्या त्या गप्पांन मध्ये मस्ती करायला म्हणून सहभागी होत होतो. माझ्या कॉमेंट्स पण ती सासू बाईन कडे आणि अमोल पर्यंत पोहचवत होती. आमच्या फार निराळ्या गप्पा चालल्या होत्या, वेगळ्या विश्वातच मी आहे असे मला वाटत होते. किंबहुना मला दीपालीच्या फॅमिलीच्या विश्वात आहे असे वाटत होते.

आता अंधार पडायला लागला होता, मधेच रोहनच्या बाईकच्या टायर मध्ये हवा कमी झाली असे त्याला जाणवले म्हणून आम्ही सर्व थांबलो आणि थोडा ब्रेक हि घेतला. तो पर्येंत त्याने टायर मध्ये हवा चेक करून घेतली आणि पुढे निघालो. परत जरा बाईक चालवून थोड्या वेळाने सर्वांचेच बुड दुखायला लागले म्हणून एका हॉटेल जवळ आम्ही चहाला थांबलो. फ्रेश होऊन चहा घेत १५-२० मिनटांचा ब्रेक घेऊन पुढे चंदिगडच्या दिशेने निघालो. पुढचा प्रवास अजून अंदाजे १०० किलोमीटरचा होता. घाटातला रस्ता आणि ट्राफिक मुळे समोरून येणाऱ्या गाड्यांच्या लाइट्सचा फार त्रास होत-होता. अशाच परीस्थीतीतून बराच वेळ बाईक चालवून सर्व थकलो होतो आणि १०.३० च्या दरम्यान पुन्हा भुका लागल्या म्हणून किरतपूर साहेब जवळ-पास एका हॉटेल जवळ थांबलो. वास्तविक आमच्या गाडीच्या ड्रायवरने इकडे चांगले जेवण मिळते असे सांगून थांबवले होते. पण हॉटेलचा परिसर पण तसा हि मला आवडला होता. मस्त उतरत्या घाटात वळणावर होते ते हॉटेल. वरून थंड वारा पण छान लागत होता, हॉटेलच्या दारात. पटा-पट जेवण हाणले आणि पुढे निघलो. आता सारा रस्ता उतरणाचा होता. घाट उतरून जसे खाली पठाराला लागलो तर सर्वीकडे रस्त्याचे काम चालू होते.  कच्च्या रस्त्यावरून, ट्रक मुळे धुरळा उडत होता आणि त्यांच्या पाठोपाठ जाताना आम्हाला फार त्रास होत-होता. यातून आज अभीला बाईक वर भलतीच झोप येत होती, त्यामुळे आता तो जरा हळू झाला होता. रोहन, अमेय म्हात्रे आणि आदित्य जरा पुढे निघून गेले होते व अभी आणि मी त्यांच्या थोडेसे पाठी होतो. मध्ये जरा कुठेही थांबायला मिळाले कि पुढचा ग्रूप थांबायचा आणि मागून आम्ही आलो कि मग सर्व एकत्र निघायचो पुढे. पण लगेच २ ग्रूप मध्ये ग्याप पडायचा. अभी जरा फारच हळू झाला होता आणि ते साहाजिक आहे. १३ दिवस बाईक चालवायचे म्हणजे काय खायचे काम नाही आहे आणि ते हि एकही दिवस आराम न करता. वरून अभी वर एक्सपीडीशनची सर्वात जास्त जबाबदारी होती, एक्सपीडीशन लीडर होता ना..हरकत नाही होते असे एवढ्या कठीण परिस्थिती मध्ये. मधेच एका ठिकाणी गाड्यांची लाईन लागलेली होती, रेलवे क्रॉसिंग साठी थांबले होते. आम्ही पण थांबलो रोहन आणि ग्रूप रेलवे क्रॉसिंग पार करून जरा पुढे एका पेट्रोल पंपच्या बाहेर आमची वाट पाहत उभे होते.

आम्ही क्रॉसिंग साठी जेव्हा थांबलो, तेव्हा पण अभी बाईक वर बसल्या-बसल्या हॅंडल वर डोके ठेवून झोप काढायला लागला. ट्रेन क्रॉस होई पर्येंत त्याने मस्त थोडीशी झोप काढली आणि फाटक उघडताच आम्ही पुढे निघालो. पुढे आमची सर्व वाट पाहताच होते, त्यांना भेटताच रोहन ने  विचार-पूस सुरु केली अभिच्या झोपे  बद्दल. अभी, मी आणि रोहन मध्ये चर्चा झाली. रोहन ने आमची गाडी चंदीगडला हॉटेल वर आताच पोहचल्याचे पण सांगितले. आता सर्व थकले होते, साहाजिक आहे १२ वाजत आले होते. १२ तास बाईक चालवून किंवा मागे बसून पण थकायला होतेच. मग मीच रोहनला बोललो चंदिगड अजून ७०-८० किलोमीटर आहे तुम्ही सर्व पुढे व्हा, मी आणि अभी मागून येतो हळू-हळू. उगीचच सर्वंना त्रास कशाला असे म्हणून रोहन, आदित्य आणि अमेय म्हात्रे सुटले पुढे, मागाहून अभी आणि मी निघालो. आता सर्व टीमशी आणि अभिच्या झोपेशी काहीही संबंध राहिला नव्हता. सर्व टीम स्वतंत्ररीत्या विभागल्या गेल्या होत्या. मला आणि दीपालीला तर फारच मज्जा  येत होती, मस्त मूड मध्ये होतो आम्ही. अभी बिचारा थकल्या मुळे झोपेच्या आहारी जात होता आणि मनाली त्याला काहीना-काही तरी करून जागे ठेवण्याचा प्रयेत्न करत होती. मी मनालीला सांगून ठेवले होते, अभिच्या मागे सारखी बक-बक चालू ठेव. जशी माझी आणि दीपालीची चालू असते तशी.

आज गप्पांनी तर वरचाच स्तर गाठला होता. जस-जसे ट्रिपचे दिवस जात होते तस-तशी आमची मैत्री पण घट्ट होत गेली आणि आज तर त्याचा उचांकच गाठला, आम्ही दोघे गहन मित्र होऊन गेलो होतो. पण गप्पा मारत असताना देखील माझे आणि दीपाली, दोघांचेही मागून अभी कडे लक्ष होतेच. कधी ५ तर कधी १० किलोमीटर पुढे जायचो आणि मला मागून अभिची बाईक आजू-बाजूला गेल्या सारखे जाणवायचे. मग मी पुढे जाऊन अभीला ब्रेक साठी विचारायचो. कधी अभी ब्रेक घ्यायचा, तर कधी जरा पुढे जाऊन ब्रेक घेऊ असे म्हणायचा. असे करत कर आम्ही पुढे चाललो होतो. बरेचदा मी त्याला अर्धा-एक तास रस्त्या लागत कुठे तरी शिस्तीत झोप काढ असे हि सांगितले, पण आमच्या दये खातर तो चला पुढे हळू-हळू जाऊ असा म्हणायचा. तसे पाहायला गेले तर मनाली पण थकली होती पण अभिची हि अवस्था पाहून आणि त्याला सांभाळण्यामुळे ती स्व:ताचा थकवा विसरत होती. माझी आणि दीपालीची तर मज्जा चालू होती. अभी ब्रेक साठी थांबला कि आम्ही काही ना काही तरी कारण काढून मस्ती करायचो आणि मनालीला पण मस्तीत शामिल करायचो. असे करत-करत आम्ही बरेच पुढे आलो आणि चंदिगड पासून २५ एक किलोमीटर अलीकडे अभी एका पेट्रोल पंपाच्या बाजूला थांबला. त्या वेळेला मात्र अभिची संपूर्ण शक्तीच संपली होती. तो फक्त अडवा व्हायचाच राहिला होता, पण माझ्या मते तो थोडा वेळ अडवा पडला असता तर जरा फ्रेश झाला असता. त्याने तसेच जामिनावर बसल्या बसल्या १०-१५ मिनट एक झोप काढली. जरा तोंडावर पाणी मारून सर्वांनीच फ्रेश होऊन घेतले आणि पुढे निघालो. आता जरा गप्पा कमी होऊन माझे जास्त लक्ष अभीच्या बाईक चालवण्याच्या पद्धती कडे होते, तसे मी दीपालीला पण सांगितले. जरा बड-बड कमी करूया आता,मला अभी कडे लक्ष देऊ दे. असे करत आम्ही १०-१२ किलोमीटर गाठले आणि २.३० च्या दरम्यान रोहनचा आम्हाला हॉटेल वर पोहोचल्याचा फोन आला. आम्ही अजून चंदिगड पासून १३ किलोमीटर अलीकडे आहोत असे सांगितले आणि जवळच रस्त्याच्या बाजूला एक चहावाल्या कडे चहा घेतला. या वेळेला मात्र आम्ही पण थकलो असे जाणवले. चहा मी, मनाली आणि दिपालीनेच घेतली. अभीने चहा न घेता इकडे हि टेबल वर डोके ठेवून झोप काढून घेतली. इकडून निघताना अभिने मला विचारले अजून चंदिगड किती लांब आहे. मी १३ किलोमीटर असे सांगताच अभीच बोलला चल आता कुठे हि न थांबता एका फटक्यात जाऊया आणि तसेच आम्ही केले. ३ च्या दरम्यान आम्ही चंदिगड शहरा कडे जाणाऱ्या रस्त्या जवळ पोहोचलो. मी रोहनला फोन केला आणि हॉटेल वर कसे यायचे विचारून घेतले. रोहन ने हॉटेलचे नाव पार्क व्यू, सेक्टर आणि पंजाब यूनिवर्सिटीचा बोर्ड पाहात ये असे सांगीतले. रोहनच्या सुचने प्रमाणे निघालो. ३ च्या दरम्यान चंदिगड शहरा मध्ये एकही माणूस रस्त्याला नसताना, हि न चुकता आम्ही बरोबर ३.१५ वाजता हॉटेल वर पोहचलो. काय मस्त सुनियोजित शहर आहे चंदिगड याची जाणीव झाली.

हॉटेलच्या दारात उमेश आणि रोहनचा मित्र कुणाल, फोन केल्या मुळे बाहेरच आमची वाट पाहात होता. बाईक लावली आणि कुणाल आम्हाला रूम मध्ये घेऊन गेला. अभी तर रूम वर जाताच झोपी गेला. आमचा पिक्चर अजून बाकी होता. कुणाल काही केल्या आम्हाला जेवल्या शिवाय झोपून देतच नव्हता. तो बोलला “आप हम चंदिगड वालो कि खातीरदारी देखो तो. आप बस क्या चाहिये बोलो, हम लाके देंगे”. मग मी बोललो “जाने दो ना, ३.१५ बजे क्या मिलेगा”. एवढ्यात त्याने आत्ताच आणलेले बटर चिकन – रोटी आणि बिर्यानी बाहेर काढून “ये दोनो मै अभी लेकर आया हु” असे बोलला. पुढ्यात जेवण पाहून मी त्याला बोललो “फिर बस हो गया, हम अड्जस्ट कर लेंगे” हे बोलताच, तो बोलला “किऊ अड्जस्ट करेंगे, हम ला नही सकते क्या तुम्हारे लिये. अड्जस्ट करने कि जरा भी जरुरत नही हे. ये लाया हुआ पहेले वाले खालो, मै पीछे वालो के लिये अभी लेकर आता हु” असे बोलून तो उमेशला घेऊन निसटला. कुणाल आमच्या करता जेवण आने पर्येंत मी फ्रेश होऊन पहिले आणलेल्या जेवना मध्ये हात मारायला सुरवात केली. अभी सोडला तर सर्वच रात्री ३.३० वाजता जेवण हाणायला लागले. एवढ्यात कुणाल परत जेवण घेऊन आला. जोर-जोरात मस्ती आणि अभिचे किस्से एन्जॉय करत आम्ही जेवत होतो. एकदा-दोनदा आरडा-ओरडा नको, आवाज जरा कमी करा अशा हि आरोळ्या ऐकायला मिळाल्या. आज परत मी, आदित्य आणि शोबित एकत्र रूम मध्ये होतो. जेवण आमच्याच रूम मध्ये चालले होते. जेवण उरकून, रूम साफ केला आणि सर्व रूम मध्येच गप्पा मारत बसलो. शेवटी ४ वाजता कुणाल बोलला “अभी ४ बाज गये आप सो जाओ, बहुत थक गये हो”. मी आणि दीपाली तर अजून मजा करायच्या मूड मध्ये होतो. पण परत उद्या दिल्ली सर करायची होती आणि परवा मुंबई असे बोलून सर्व आप-आपल्या रूम मध्ये झोपी गेलो.

17.12.10

लेह बाईक ट्रीप - बारावा दिवस (सरचू ते मनाली)

१९ ऑगस्ट २००९, काल मला मस्त झोप लागली होती, रोजच्या प्रमाणे सकाळी ६ वाजता उठलो. हल्ले-डूल्ले बेड वर मस्त झोप लागली पण काल रात्री पेक्षा हि आता जास्त थंडी वाजत होती. स्लीपिंग बॅगच्या बाहेर आल्यावर तर जास्तच थंडी वाजत होती आणि टेन्टच्या बाहेर आल्यावर तर त्या हून मजबूत थंडी वाजायला लागली. एवढ्या थंडीत दात घासणे आणि उर्वरित प्रात:विधी कसे उरकायचे या विचारातच होतो, एवढ्यात कुणी तरी कळवले कि या सर्व कामांसाठी कॅम्पवाल्यांनी गरम पाण्याची सोय केली आहे. मग काय सोन्याहून पिवळे, लगेच गेलो प्रात:विधी उरकायला. सर्व प्रात:विधी उरकून आम्ही नाश्त्याला आलो. मस्त गरम-गरम नाश्ता केला व पाणी वगैरे भरायला लागलो. सर्व आवरून बाईक पण गरम करायला ठेवल्या. एवढ्यात कळले कि आमच्या बाईक्सला पण भूख लागली आहे. विशेष करून माझ्या आणि कुलदीपच्या, पण यावेळी मात्र आदित्यच्या पण बाईकला भूख लागली होती. मग आदित्यला आमच्या गाडीच्या ड्राइवरला घेऊन परत १० किलो मीटर मागे पेट्रोलच्या शोधात पाठवले. त्याला यायला बराच वेळ लागणार म्हणून काही जण थोडे रिलॅक्स झाले. काल कॅम्प साईट वर रात्री उशिरा काळोखात आलो होतो म्हणून आम्हाला कॅम्प साईटचा परिसर पाहायला मिळाला नव्हता. तो पर्येंत मी कॅम्प साईट न्याहाळायला लागलो. काय मस्त परिसर होता, डोंगराच्या कुशीत तयार केलेली हि मस्त कॅम्प साईट होती. आदित्य येई पर्येंत मी तिकडचे काही फोटो काढत रहिलो. 

थोड्या वेळाने आदित्य पेट्रोल घेऊन आला. माझ्या आणि कुलदीपच्या बाईकला जास्त पेट्रोल पाजले व बाकी सर्व बाईक्सला थोडे थोडे पेट्रोल पाजून आम्ही निघायच्या तयारीला लागलो. या कॅम्प साईट वर एक ग्रुप फोटो काढावा असे वाटले म्हणून सर्व फोटो साठी उभे राहिले. पण आज सर्वच रिलॅक्स झाले होते म्हणून मस्त मूड मध्ये होतो. फोटो काढायचा तर स्पेशल साधना स्टाइल मध्ये "चाल तर मग" अशा पोझ मध्ये. सर्वांचे एक मत करून "चला तर मग" पोझ मध्ये काढलेला हा फोटो.


सकाळी उठल्या पासून सारखे कॅम्प साईटच्या कामगारान कडून किंवा बाकीच्या ड्राइवर कडून आम्हाला "आगे बारालाच्छा को आपको बारिश मिलेगा" असे सांगणे होते. त्यात आता आमचा ड्राइवर पण तेच सांगायला लागला. मग जास्त वेळ वाया न घालवता आम्ही ७.३० च्या दरम्यान सरचू सोडून मनालीच्या दिशेने बारालाच्छा-ला कडे निघालो. 

आज नेहमी प्रमाणे मी आणि दिपाली एकत्र होतो. आज मी फ्रेश होतो म्हणून फोटो काढायचे वाटत होते आणि त्या प्रमाणे मी काढत पण होतो. जस-जसे मला फोटो काढावेसे वाटत होते तस-तसे मी आता काढत होतो. असे करत करत कधी आम्ही १३,२८९ फुटावरच्या बारालाच्छा-ला (ला म्हणजे लधाकी भाषेत खिंड) गाठले कळलेच नाही. याचे कारण माझ्या आणि दीपालीच्या गप्पा असाव्यात किंवा मस्त निसर्गात फोटोग्राफीत गुंतलो होतो म्हणून म्हणाना. ८.३० च्या दरम्यान आम्ही बारालाच्छा-ला पार करून पुढे निघालो. आता आमचे पुढचे लक्ष होते झिंग-झिंग बारचा घाट. जस-जसे आम्ही पुढे चढायला लागलो तसे कधी नव्हे तर अभीची बाईक त्रास द्यायला लागली. आज अभी बरोबर शोबित होता, मनालीला जरा आराम हवा होता.पण शोबितच वजन घेऊन अभिची डिस्कवर घाट चढतच नव्हती. अभी मला बोलला दिपालीला त्याच्या बाईकवर बसु दे आणि शोबितला माझ्या बाईकवर, म्हणजे घाट चढताना फार त्रास होणार नाही. आता शोबित माझ्या बरोबर होता. मस्त फोटोग्राफी करत आम्ही पुढे चाललो होतो. हवेत अजूनही थंडावा होताच. जॅकेट घातल्या मुळे मला तशी फार थंडी वाजत नव्हती, पण माझ्या हाताला मात्र नेहमी प्रमाणे हात मोजे घालून सुद्धा फारच थंडी वाजत होती. थोड्या वेळेने तर कल्च पण दाबायला जमेना एवढे माझे हात गारठले. शेवटी आम्ही थांबलो आणि शोबित ने माझ्या हातांना, त्याच्या हातांने घर्षणाच्या द्वारे थोडी ऊब द्याचा प्रयेत्न करत होतो. बराच वेळाने हातात थोडा जीव आला. अजून थोडा वेळ तिकडेच हातात जीव आणण्याचा प्रयेत्न करत होतो. बाईकचा क्लच दाबण्या इतपत हातात जीव आला आणि मग आम्ही पुढे निघालो. आता आम्ही बाकीच्या बाईक्स पेक्षा बरेच मागे राहिलो होतो म्हणून पटा-पट पुढे पळू लागलो. 

थोड्या वेळातच आम्ही झिंग-झिंग बार पार करून पुढे गेलो आणि बाकी सर्व बाईक टेन्ट स्वरुपात असलेल्या होटेल जवळ थांबले होते. सर्वांना असे काही दिसले कि लगेच भूख लागते आणि त्या प्रमाणे ती आम्ही मिटवली सुध्दा. कॅम्पचा नाश्ता आज कोणाला आवडला नव्हता म्हणून इकडे भूख मिटवून आम्ही सर्व रिलॅक्स करत बसलो होतो, एवढ्यात आमच्या गाडीचा ड्राइवर आला आणि आरडा-ओरड करयला लागला "चलो आगे बारिश होने से पहिले हमे निकालना होगा". नाश्ता करून आम्ही ९.३०च्या दरम्यान तिकडन निघालो. आता सारे उतरण होते आणि रस्ता हि चांगला होता. पटा-पट घाट  उतरत आम्ही जिस्पा गाव मागे टाकले आणि थोड्या वेळातच दारचा-ला गाठला. इकडे तर असे वाटले कि आता पाऊस आम्हाला भिजवणार. थोडासा चिरी-मिरी पाऊस चालू झाला पण. रस्ता ओला आणि तोही वळणा-वळणांचा म्हणून बाईक्स आरामात चालल्या होत्या, त्यात मी सर्वात पाठी नेहमी प्रमाणे. एवढ्यात मागाहून आमची गाडी आली आणि मला रोहनने थांबवले. मनालीला या वळणा-वळणांच्या रस्त्यामुळे गाडीत मळ-मळल्या सारखे होत होते, म्हणून शोबित आता गाडी गेला आणि माझ्या बरोबर मनाली होती. या ट्रीप मध्ये दिपाली प्रमाणे मनाली बरोबर पण माझी थोडी-थोडी मैत्री व्हायला लागली होती. माझ्यात आणि मनालीत पण आता मस्त गप्पा रंगायला लागल्या होत्या. मला काय कोणाबरोबर पण चर्चा करायला आवडते. या माझ्या सवयी प्रमाणे मस्त गप्पा मारत आम्ही पुढे चललो होतो. पुढे गेलेल्या सर्व बाईकस मधेच एका होटेल मध्ये थांबले होते. मी पण सर्वां बरोबर थांबलो आणि मस्त गरम चहा-बिस्कीट घेतले. लधाक परिसरात जास्त करून प्रत्येक होटेल मध्ये मॅग्गीच मिळायची आणि तेच मला तरी खाण्या सारखे वाटायचे. मला तर मॅग्गीचा प्रचंड कंटाळा आला होता आणि मॅग्गी खाल्या नंतर लगेच थोड्या वेळाने भूख लागायची. जास्त वेळ न दवडता आम्ही पुढे केलोंगच्या दिशेने निघालो.


आता मनाली परत अभी बरोबर होती आणि दिपाली माझ्या बरोबर. म्हणजे परत मस्ती वाल्या गप्पा.....यातच
लगेच केलोंग गाठले. लेह सोडल्या नंतर केलोंग शिवाय मध्ये कुठेही पेट्रोल पंप नाही आहे. या ३६५ किलोमीटर मध्ये कुठेही पेट्रोल सरकारी भावाने मिळत नाही, पण सध्या तिकडचे काही लोकल लोग वाढीव भावाने पेट्रोल विकतात. सर्वानी आप-आपल्या बाईकला पेट्रोल पाजून घेतले आणि पुढे निघालो. आमची गाडी आधीच  पुढे निघून गेली होती. जस-जसे केलोंग सोडले तस पावसाने आम्हाला घेरायला सुरवात केली होती. मनात फार भीती वाटत होती, जर पाऊस जोरात कोसळला तर मेलो. आता सर्व उतरण होते आणि आम्ही हिमाचल मध्ये प्रवेश केला असे जाणवत होते. रस्त्या बाजूचे सर्व डोंगर आता थोडेसे हिरवे वाटत होते आणि हे पाहून दिपाली बोलली "आता जरा बर वाटायला लागले हे हिरवे डोंगर पाहून". दिपालीला गेले बरेच दिवस लेह-लधाक परिसरातले वाळवंटी उगडे-नागडे डोंगर पाहून फार कंटाळा आला होता, यावर बरेचदा आमची चर्चा पण झाली होती. पण आता मात्र हि हिरवळ पाहून दिपालीला झालेला आनंद मला तिच्या शब्दातून जाणवत होता. जस-जसे पुढे जात होतो तस-तसे पावसाच्या आगमनाची आम्हाला जाणीव व्हायला लागली होती. पण संपूर्ण चिंब भिजू असे वाटत नव्हते, म्हणून आम्ही रेनकोट नाही काढला. घाट उतरून आम्ही जेव्हा संपूर्ण खाली आलो तेव्हा आपल्या कडे सह्याद्रीत जसे पावसाळ्यात वातावरण असते तसे वाटले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवे डोंगर, डोंगरांचे माथे ढगात लपून गेले होते. काय मस्त दृश होते ते आणि त्यात भर घालायला म्हणून डोंगरातून येणारा हा धब-धबा. वरचा भाग बर्फाचा आणि मधून येणारे हे पाणी. हा परिसर पाहून मला स्वर्ग असे तर नाही का? असा माझ्या मनाला प्रश्न चाटून गेला. मी जेव्हा दिपालीला हे सांगितले तेव्हा मला दिपालीला झालेला आनंद पाहायला मिळाला, काही तिच्या शब्दाने आणि जेव्हा मी फोटो काढायला थांबायचो त्यावेळेला तिच्या आचरट चाळ्यांने. अशीच मस्ती करत-करत आणि अद्भूत आनंद लुटत आम्ही गोंधला, सिस्सू कधी पार करत काकसर गाठले ते कळलेच नाही. आम्ही बरेच मागे राहिलो होतो, सर्व एका छोट्या होटेल जवळ आमची वाट पाहत थांबले होतो. २ वाजत आले होते आणि सर्वांना तशी फार भूख लागतेच या वेळेला...असो. पावसात सर्व भिझल्या मुळे म्हणा किंवा आमच्या खादाडी सवयीला निरसून सर्वांनी रोटी आणि भाजी हाणायला सुरवात केली. त्या हॉटेलचा मालक काय मस्त होता. डोक्यावर हिमाचली टोपी, अंगात जॅकेट आणि दिल खुलास मनाचा. तो मालक मस्त आमच्या बरोबर मस्तीच्या मूड मध्ये होता आणि तसा हि तो मस्ती करत जेवण वाढत होता. त्याच्या त्या लडिवाळ मस्ती मुळे आम्ही किती रोट्या हाणल्या ते कळलेच नाही.


पोट भरून जेवण झाले आणि आम्ही पुढच्या प्रवासाच्या तयारीला लागलो. पावसामुळे सर्वांनी आप-आपले महत्वाचे समान गाडीत ठेवले, कारण आता पुढे जास्त पाऊस लागणार होता असे सर्वच लोकल लोक बोलत होते. मी कॅमेरा आत गाडीत दिला आणि आम्ही सर्वांनी रेनकोट घालून घेतले होते. ३ वाजता आम्ही काकसर सोडले आणि मनालीच्या दिशेने प्रयाण केले. इकडून मनाली हे अंतर ७० किलोमीटर आहे. मनात असे वाटले कि, बस ७० किलोमीटरच ना? पण अस्तिवात तसे काही नव्हते. प्रत्येक्षात मात्र अनुभव काही फारच निराळा होता. या परिसरात पाऊस मजबूत पडून गेला होता आणि पडणे पण चालू होतेच. त्यामुळे रस्त्याची वाट लागली होती. रस्त्याला लागल्या-लागल्या काही मिनिटातच आता आमचा पुढचा प्रवास खडतर होणार असे जाणवायला लागले होते. रस्ता  फार घाणेरडा होते असे म्हणणे बरे, किंबहुना तिकडे रस्ताच नव्हता नुसता चिखल...... रस्त्यावर किमान फुट भर तरी चिखल होता. यातून बाईक चालवणे फार कठीण जात होते. बाईक चालवायला फार कॉन्सेंट्रेट करायला लागत होते, म्हणून आता  माझी आणि दिपलिची बक-बक संपूर्ण बंद झाली होती. काकसर ते रोहतांग टोप १४ किलोमीटर आणि पुढे रोहतांग टोप ते मोहरी ८ किलोमीटर असा साराच रस्ता चिखलमय झाला होता. या चिखलातून कशी-बशी आम्ही सर्वच बाईक हाकत होतो. ट्रक गेलेला असेल तर त्याच्या टायर मुळे चिखल बाजूला व्हायचा आणि मी बरीचशी मधून बाईक चालवण्याचा प्रयेत्न करत होतो. पण हे-हि काही सोपे नव्हते, जरा बॅलेन्स इकडे-तिकडे झाला कि परत चिखलात. सारखे बाईक वरून पडायची मनात भीती होतीच आणि यातून घाटातली वळणे पण होतीच. मधेच आम्हाला काही पडलेले ट्रक दिसले. असे कधी चिखलात आणि कधी बाजूला सरलेल्या चिखलातून आम्ही घाट चढत दीड एक तासाच्या करामतीने रोहतांग टोप गाठले . माझी बाईक बसकी असल्या मुळे बरच हळू-हळू येणे झाले. बाकी सर्व बाईकस पुढे निघून गेले होतो. जरा ५ मिनिटान करता मी आणि दिपाली रिलॅक्स झालो आणि रोहतांग टोप वरून घाट उतरायला लागलो. आता या चिखलातून घाट उतरणे तर जास्तच कठीण जात होते. बाईकला ब्रेक मारला तर बाईक इकडे-तिकडे सरकायची, त्यातून बॅलेन्स पण पाय खाली न टेकता सांभाळायचा. जर पाय खाली गेला तर फुट भर चिखलात जाईल याची भीती. काय ते सर्कशीचे खेळ करत आम्ही मोहरीला पोहोचलो. जवळ-जवळ दोन अडीच तासाच्या करामतीतून आमची सुटका झाली. माझ्या आयुष्यातल्या बाईक चालवायचा सर्वात थ्रिलिंग एक्सपीरिअन्स होता हा. 

मोहरी हे तर मनाली जवळचे पर्यटक स्थळ आहे. खर तर मनालीतले सर्व टूर ऑपरेटर हेच ठिकाण  रोहतांग म्हणून घेऊन येतात. इकडेच सर्वांनी चहा ऑर्डर केली.चहा येई पर्येंत आमच्या या थ्रिलिंग एक्सपीरिअन्स वर साधनाला फुटेज हवे होते. साधना आणि उमेशने फुटेज घेतले आणि सर्व चहा घेत रिलॅक्स करत बसलो होतो. एवढ्यात एश्वर्या आणि पूनमने पावभाजी ऑर्डर केल्याचे कळले. हे पाहून रोहन तर खावासला. जरा रिलॅक्स होऊन चहा घेऊन पुढे जायचे होते. ५ वाजून गेले होते आणि मनाली अजून ५० किलोमीटर वर होते, अंधार व्हायच्या आत पोहोचायचे होते. चहा व पावभाजी आवरून सर्व मनालीच्या दिशेने निघालो. आता रस्ता मस्त होता. परत माझ्या आणि दिपालीच्या गप्पा सुरु झाल्या, पण या वेळेला मात्र फक्त गेल्या २ तासान बद्दलच्याच चर्चा चालू होत्या. या गप्पांन मध्ये गुलाबा, केठी, पालचन अशी गावे मागे टाकून पुढे निघालो होतो आणि मधेच आम्हाला ट्राफिक जाम लागले. आता आम्ही सर्व बाईकस आणि गाडी पुढे पाठी होतो. गाडी रांगेत थांबली आणि मागे आम्ही पण थांबलो. आजू-बाजूला असलेले सर्व देशी-विदेशी पर्यटकांनी आम्हाला पाहून टाळ्या वाजवायला लागले. पहिले तर मला काही कळेचना, मग कळाले कि रोहतांगच्या चिखलातून बाईक्स पार केल्या बद्दल आमच हे स्वागत होते. फार बरे वाटले हे पाहून, आयुष्यात काही तरी केल्याचा आनंद होता. ट्राफिकचे कारण पाहायला लागलो आणि कळाले कि अक्षरशा १० टनचा ट्रकने विली मारले होते. ट्रक मध्ये शिगा भरल्या होत्या आणि घाट चढताना ओवरलोड मुळे टांगा पलटी पुढून उलटी असे झाली होते. पहाहा फोटो...
 
सर्वांचे धन्यवाद मनात आम्ही बाईकसने त्यांचा निरोप घेला आणि गाडीला रांगेत ठेवून पुढे गेलो. ट्रक जवळ गेलो आणि एका बाजूला थांबलो होतो. एवढ्यात सर्वात पुढे असलेल्या अमेय म्हात्रेने कुलदीपच्या मार्गदर्शना वरून, ट्रकच्या डोंगराच्या बाजूने बाईक वरती चढवून काढली. मागो-मग आशिष, आदित्य, मी आणि अभी पण कुलदीपच्या आइडियाने बाईकस काढल्या. पण गाडी मध्ये मात्र बाकी सर्व अडकले होते. होटेल वर भेटायचे असे ठरवून गाडीतल्या सर्वांचा निरोप घेतला आणि सर्व बाईकस पुढे मनालीच्या दिशेने निघालो. लगेचच मनाली शहर समोर दिसायला लागले होते. आता सर्व उतरण पण होते. मस्त गप्पा-गोष्टी करत कधी अंधार पडायला लागला आणि बिआस नदीच्या काठी येऊन पोहोचलो हे कळलेच नाही. बिआस नदीचा पुल ओलांडला आणि मनाली शहरात प्रवेश केला. पुल ओलांडल्या-ओलांडल्या डावीकडेच आमचे बुकिंग  असलेले हॉटेल बियास होते. हॉटेल मुख्य रहदारीच्या रस्त्या वर असल्या कारणास्तव बाईक्स जरा लांब त्यांच्याच पार्किंग एरिया मध्ये लावल्या आणि हॉटेल वर आलो. रोहतांग पास मध्ये अडकलेल्या गाडीची चौकशी करायला फोन लावला तर कळाले कि ते पण ट्राफिक जाम मधून निघाले आहेत, थोड्याच वेळात पोहोचतील. सर्व रूमस ताब्यात  घेतल्या आणि गाडीची वाट पाहत बसलो कारण सर्व सामान मात्र गाडीत होते. ९ च्या दरम्यान गाडी आली आणि सर्व सामान काढून रूम मध्ये फ्रेश व्हायला गेलो. फ्रेश होणे तर आज गरजेचे होते, सर्व अंगावर चिखल माखला होता. तत पूर्वी रोहन आणि अभीने जेवणाची ऑर्डर करून ठेवली. लगेच फ्रेश होऊन सर्व हॉटेल चंद्रताल मध्ये जेवायला गेलो. आज फारच थकलो होतो सर्व, जास्त मस्ती न करता जेवलो आणि हॉटेलवर परतलो. उद्या नेहमी प्रमाणे लवकर न उठता जरा उशिरा उठायचे असे ठरले. आज पण मी,आदित्य आणि शोबित एका रूम मध्ये होतो. आमचे हॉटेल बिआस नदीच्या काठी होते, खिडकी उघडताच खळ-खळणाऱ्या पाण्याचा आवाज. किंबहुना पाण्याच्या आवाजानेच मी खिडकी उघडली. थोडा वेळ हवेतील थंडावा आणि खळ-खळणाऱ्या पाण्याच्या आवाजाची मजा घेत मी खिडकी काठी उभा राहिलो आणि ११ च्या दरम्यान सर्व झोपी गेलो.

11.8.10

लेह बाईक ट्रीप - अकरावा दिवस (त्सो-मोरिरी ते सरचू)

१८ ऑगस्ट २००९ , काल रात्री काही केल्या एक तर झोप लागत नव्हती आणि लागायची तर सारखी उडत होती , काय झाले होते ते कळलेच नाही. जरा झोप लागायची आणि जाग यायची , असे बरेच वेळा झाले. तसे पहायला गेले तर मला एकदा झोप लागली कि , सकाळी कोणीही उठवत नाही तो पर्येंत कधीच जाग येत नाही. पण त्या दिवशी काय झाले होते ते कळेच ना. मला जरा थंडी पण वाजत होती. शेवटच्या वेळी उठलो तेव्हा खिडकितून पाहिले तर उजाडण्या पूर्वीचे निळे आकाश आणि त्यामध्ये चंद्र-तारे. मी पटकन उठून खिडकितून बाहेर पाहायला लागलो. थोड्या वेळाने सूर्योदय होणार हे जाणवायला लागले. त्सो-मोरीरीच्या काठी डोंगरांच्या मागून होणाऱ्या सूर्योदय अनुभवायला मिळणार आणि त्या क्षणाचे फोटो काढावेत म्हणून मी कॅमेरा काढायला लागलो. कॅमेरा काढायच्या आवाजात अमेय म्हात्रे आणि कुलदीप पण उठले. त्यांनी मला विचारले काय झाले , मी बोललो सूर्योदय होणार आहे मस्त वाटते बघ. म्हणून मी फोटो काढायला गच्चीवर चाललो आहे. मी कॅमेरा आणि ट्रायपॉट घेऊन गच्ची वर जाणारी बांबूची शिडी चढत होतो , एवढ्यात माझ्या मागे अमेय म्हात्रे आणि कुलदीप आप-आपला कॅमेरा घेऊन उभे होते. मी बोललो व्हा! आता मज्जा येईल फोटोग्राफिला. आम्ही गच्ची वर चढलो तेव्हा हे जाणवले कि त्या घराचे संपूर्ण छत मातीचे होते. लाकडांवर माती पसरवून बनवलेले ते छत होते , त्यामुळे आम्ही हळू हळू पुढे जाऊन ट्रायपॉट लावून फ़ोटोग्राफी करायला लागलो. वर मस्त वारा होता त्यामुळे मला फारच थंडी वाजत होती. सूर्योदय होण्याची मी वाट पाहत होतो आणि बराच वेळ फोटोग्राफी करून मग मी खाली आलो. अमेय म्हात्रे आणि कुलदीप मात्र थोडा वेळ फोटोग्राफी करत होते. आम्ही गच्ची वरती चढलो म्हणून खाली झोपलेल्या लोकांच्या अंगावर थोडी-थोडी माती पडायला लागली आणि आवाज यायला लागला म्हणून ते घाबरून उठले. पुनमला पण वर जायचे होते , तिला आम्ही सर्वानी वरती चढवले आणि मी दात घासायला गेलो. परत येतो आणि पाहतो तर अमेय म्हात्रे आणि कुलदीप खाली आले होते , पण खाली येताना त्यांनी गच्ची वर जायची शिडी बाजूला काढून ठेवली होती. सर्व आपल्या कामाला लागले तरी पूनम बोंबलतच होती. १५ मिनिट तिला गच्चीवर बोंबलत ठेवले आणि मग शिडी लावली.

७ च्या दरम्यान सर्व तयार होऊन चाह-नाश्त्यासाठी खाली आलो. मस्त थंडीत गरम-गरम चहा घेतली आणि आमच्या कड़े असलेल्या बिस्किट व फरसाणचा नाश्ता केला. बाईक गरम करून सर्व सामान बाईक वर आणि गाडीत टाकले. पाणी भरून घेतले , आज मी आणि शोबित एकत्र होतो. दिपलिला जरा आराम हवा होता. तसा आज मला ही आरामाची गरज वाटत होती पण माझी अवेंजेर बाईक कोण चालवणार. उमेश बोलला मी चालविण पण हा पहिला कच्चा रस्ता तू चालव मग पुढे मी चालवतो असे म्हणून ८ च्या दरम्यान त्सो-मोरिरी वरून आम्ही निघालो.
सकाळच्या वेळी त्सो-मोरिरी मस्त दिसत होता आणि काल संध्याकाळच्या पेक्षा फारच निराळे . गाव सोडले आणि परत आलो त्याच रस्त्याने जायला लागलो. कार्झोक चेक पोस्ट मागे टाकुन आम्ही त्सो-कर च्या दिशेने त्याच वाळूच्या रस्त्याने पुढे निघालो. मागे डोंगरावर वसलेल्या गावाचा मी हा शेवटचा काढलेला फोटो. वाळू एवढी भुस-भूषित होती की टायरला ग्रिप बरेचदा भेटत नव्हती. २-३ वेळा आम्ही पड़ता-पड़ता वाचलो. त्यानंतर एकदा-दोनदा मी शोबितला उतरवले पण होते. याच भागात काल मी आणि दीपाली पण पडताना वाचलो होतो , म्हणून मी तिला ही एकदा-दोनदा उतरवले होते. पाय खाली सोडून हळू-हळू आम्ही पुढे चललो होतो. मधे एकदा आमचा एक बाजूला तोल गेलाच अणि आम्ही थोडीशी रेती खाल्लीच. थोडेसे सावरून परत आम्ही मार्गस्त झालो. आता त्सो-मोरीरीचा परिसर मस्त दिसत होता , मी परत फोटोग्राफी करायला लागलो. आज फारच थकलो होतो आणि कालची झोप पूर्ण झाली नव्हती म्हणून तसा काय फार फोटो काढायचा मूड नव्हता. तरी मी अधून मधून एखाद दुसरा फोटो काढत होतो.
आमच्या गाडीचा ड्राइवर तेनसिंग , या गाडीने आम्हाला आज पांग पर्येंतच सोडणार होता आणि तिकडन आम्हाला पुढे दुसरी गाडी घेऊन जाणार होती. आम्हाला पांग पर्येंत सोडून तेनसिंगला लेहला पोहोचायचे होते म्हणून आज तो जरा घाईत पळवत होता. त्याला काय घाई लागली होती , तो कुठूनही गाडी काढत होतो. रस्ता सोडून अधून-मधून तो बरेच शॉर्टकट मारत होता. आधीच रस्ता भुस-भूषित आणि हा पट्ट्या मस्त रस्ता सोडून बाजूच्या रेतीतून गाडी चालवत होतो . मला पण जर वाटले कि जाऊया त्याच्या मागो-माग , पण लगेच मन आवरले आणि मनातच बोललो तो बाबा इकडचा लोकल आहे. बहुदा त्याला सर्व माहिती असेल असे बोलून आम्ही मात्र शिस्तीत रस्त्याने पुढे चाललो होतो. जरा पुढे गेलो आणि पाहतो तर आमची गाडी थांबून सर्व बाहेर उभे होते. आम्ही सर्वांनी बाईक रस्त्याच्या बाजूला लावल्या आणि गाडी कडे गेलो. पाहतोतर गाडी वाळूत रुतली होती आणि तेनसिंग गाडी पुढे काढण्याच्या प्रयेत्नात अजून रुतवत होता. आम्ही जरा त्याला थांबवले. सर्व मागून धक्का मारत मग त्याला गाडी बाहेर काढायला सांगितले. गाडी काढायचा बराच प्रयेत्न आम्ही करायला लागलो पण काही केल्या गाडी निघेना. गाडीला धक्का मारून सर्वांची वाट लागली होती , त्या उंचीवर गाडीला धक्का मारणे किंवा उचलणे काय सोपे नव्हते. एवढ्यात मागाहून ४-५ दुसऱ्या गाड्या आल्या. मग त्या गाडीचे ड्राइवर आणि काही फिरंग प्रवाशी आमच्या मदतीला आले. सर्वानी एक जोर लावून धक्का मारला आणि गाडी बाहेर काढून रस्त्यावर आणली. सर्वाना धन्यवाद म्हणत आम्ही वाळूतच दम खायला बसलो . डोक्यावर ऊन पण रण-रणत होते , दम खाऊन पाणी पिऊन आम्ही सर्व पुढे निघालो. आता मात्र तेनसिंगला आम्ही ताकीद दिली होती , कि तू इकडे तिकडे कुठे हि गाडी घालू नकोस शिस्तीत सरळ रस्त्याने गाडी चालव.
मग पुन्हा तोच वाळूचा रस्ता आम्ही पार करायला लागलो. थोड्या वेळाने पक्का रस्ता लागला. पक्का रस्ता पण पार करत आम्ही सुमधोला पोहोचलो. १० च्या दरम्यान आम्ही त्सो-कार च्या फाट्यावर होतो. तेनसिंग आमच्या साठी फाट्यावर थांबला होतों. उमेश नि मला विचारले चालवू का बाईक. मी तर एका पायावर तयार झालो. मला जरा आराम हवाच होता. आता माझी बाईक उमेश चालवणार होता आणि मी मस्त गाडी आराम करणार होतो. एक छोटासा ब्रेक घेऊन आम्ही पुढे निघालो. बाईक पुढे निघाल्या आणि मागाहून गाडी. मी गाडीत बसल्या पासून तेनसिंगच्या मागे लागलो कि मला त्या रस्त्यावर झायलो चालवायची आहे. पहिला रस्ता थोडा चांगला होता पण लगेचच कच्चा रस्ता सुरु झाला म्हणून तेनसिंग मला गाडी चालवायला देईना. मी तर चिवट बनून त्याच्या पाठी लागलो , तरीही तो काही केल्या मला गाडी चालवायला देईना. तो फक्त एक वाक्य बोलायचा "आगे अच्छा रास्ता आने पर देता हु". मी तर त्याच्या पाठी लागलोच होतो , यात मला झोप लागली. मी झोपलो आणि मधेच थोड्या वेळाने मला परत जाग आली . मी परत तेनसिंगच्या पाठी लागलो. तरी तो तेच बोलत होता.थोड्या वेळाने परत चांगला रस्ता लागला आणि मी त्या कडे परत गाडी चालवायला मागितली. पण समोरच तेनसिंगचा मालक दुसरी गाडी घेऊन आमची वाट पाहत उभा होता. आमचे सर्व समान दुसऱ्या गाडीत लोड केले आणि आमच्या बाईकसची वाट पाहत उभे होतो. मी यात सुद्धा तेनसिंगला सतवत होतो , " देखा ना तुमने मुझे गाडी चलाने नही दी". तो तर एकदम निरागस होऊन मला बोलला "मे तो आपको गाडी चलाने के लीये देने वाला था , पर मेरा मलिक दुसरी गाडी लेकर पांग के बदले यहां ही आ गया". बराच वेळ बाईकसची आम्ही वाट पाहिली , मग तेनसिंग आणि त्याचा मालक आम्हाला बोलला "तुम अभी आगे निकलो , हम बाईकस को देखते है ” . तरी थोडा वेळ बाईकसची वाट पाहिली आणि मग आम्ही पुढे निघालो.
रस्ता मस्त नवीन बनवलेला होता , मला वाटले आता जरा वेवस्थित झोपता येईल. कारण मगाशी सारखी गाडी हलत होती रस्ता खराब असल्यामुळे. असे बोलून मी मस्त झोपी गेलो , पण झोप लागते न लागते तेवढ्यात परत गाडी उडालीच आणि पहातोतर परत कच्चा रस्ता. नुसती भूस-भूषित मातीचा रस्ता आणि पुढची गाडी मजबूत धुरळा उडवत चालली होती. पण मला आज फार थकायला झाले होते आणि झोप पण येत होती , म्हणून मी तसाच झोपलो. अधून मधून गाडीने दचके मारले कि मी झोपेतून उठायचो. बाहेर फोटो काढण्यासारखे असेल तर एखाद-दुसरा फोटो पण काढायचो आणि परत झोपायचो.
पण मी बराच वेळ गाडीत झोप काढली आणि कधी पांग च्या जवळ पोहचलो ते कळलेच नाही. पांग च्या शेवटच्या उतरणावर मला जाग आली आणि ५-१० मिनटात आम्ही पांगला पोहोचलो. पांग मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला बरीच लोकल लोक टेन्ट लावून , राहण्याची आणि खाण्याची सोय करतात. आम्हाला पण तशी फार भूख लागली होती आणि मागे असलेल्या बाईक यायची पण वाट पाहायची होती. लधाक परिसरात कुठेही खायला काय असे विचारले तर एकाच उत्तर मॅगी , अंडा आणि राजमा चावल. मला तर मॅगी आणि राजमा चावल खाऊन-खाऊन कंटाळा आला होता , पण काय करणार त्या परिसरात दुसरे काहीही मिळत नाही. भूखे अभावी जे मिळेल ते खायला लागत होते पण आता वीट आला होता. नुसती मॅगी खाऊन मला कंटाळा आला म्हणून मी अंडा मॅगी मागवली , जरा चव बदलेल या आशेने. पण कसले काय साध्या मॅगी पेक्षा जास्त बेकार लागत होती , झक मारली आणि अंडा मॅगी मागवली असे वाटले होते. कशी-बशी खाल्ली आणि बाईकस ची वाट पाहत निद्रेच्या अधीन गेलो. अधून-मधून जाग यायची आणि मी विचारायचो आले का ?
२-३ वेळा असे झाले आणि शेवटी मला दीपाली ने उठवून बाईकस आल्या असे सांगितले. टेन्टच्या बाहेर आलो आणि सर्वन कडे पाहिले तर , सर्वच मातीने माखले होते. अभी आणि रोहन नि तर माझ्यावर बॉम्-बार्डिंग सुरवात केली. “ काय तुम्ही मध्ये कुठे हि का थांबला नाहीत ” . तुमची मध्ये गरज लागली असती तर … आणि बरीच बड-बड. मागाहून मनाली , अमेय म्हात्रे , आशिष सर्वच फाइरिंग करायला लागले. मला बोलायची संधी पण देत नव्हते. जरा शांत झाल्यावर मग मी बोललो , अरे मध्ये थांबण्यासारखे काही नव्हते रे आणि मला अधून-मधून सारखी झोप लागत होती. तसे हि आम्ही फाट्यावर बराच वेळ थांबलो होतो. मग तेनसिंग आणि त्याचा मालक हि आम्हाला बोलला “ तुम निकालो आगे में बाईकस को देखता हु और भेज देता हु ”. तरी पण माझ्या वर थोडीशी फाइरिंग झालीच , पण त्यांची ती अवस्था पाहून मला कळाले होते कि त्यांचे काय हाल झाले असतील. म्हणून मी मुकाट्याने सर्व ऐकून घेत होतो. त्यांचे फ्रस्टेशन मला कळत होते. या सर्व पॅच मध्ये एका पाठून एक अशा सर्वच बाईकस पडल्या होत्या असे कळाले. म्हणजे लवकिक अर्थाने प्रतेकाने एकदा तरी माती खाललीच होती. तेवड्यात उमेश माझ्या कडे आला आणि बाईकची चावी माझ्या हातात देत तो मला फक्त सॉरी बोल्ला . मला फार वाईट वाटले कि त्याने मला सॉरी म्हणावे लागले , वास्तविक मी त्याला सॉरी आणि थॅंकयू म्हणायला पाहिजे होतो. कारण मी थकलो म्हणून त्याला विनाकारण बाईक चालवयला लागली. तो आमच्या ट्रिपचा टीम मेंबर होता पण त्याच बरोबर तो IBN लोकमतचा कॅमेरामन पण होता. मी माझ्या बाईकचे परीक्षण केले आणि बाकी सर्व फ्रेश होण्यास गेले. मग सर्व परत खायला गेलो आणि सर्व बाईक स्वार आम्हाला त्याची कहाणी सांगायला लागले.
आम्ही फार वेळ वाया न घालवता सर्वांनी थोडा आराम करून पुढे निघायच्या तयारीला लागलो. माझी आणि कुलदीपची बाईक नेहमी प्रमाणे फार जास्त पेट्रोल खात होती. आम्ही ज्या टेन्ट स्वरुपात असलेल्या हॉटेल मध्ये जेवण केले होते त्यांच्या कडे असलेले ५ लिटर पेट्रोल घेतले. अशाप्रकरे तिकडचे लोक पेट्रोल ब्लॅकचा पण धंदा करतात , कारण लेह सोडल्या नंतर केलोंग पर्येंत कुठेही पेट्रोल मिळत नाही. आम्ही ब्लॅकने १०० रुपये लिटरने पेट्रोल बाईक मध्ये भरून घेतले. आता परत मी आणि दिपाली बाईक वर , बराच झाला आराम आणि तसे हि काही जण थकले होते. मस्त आराम करून परत बाईक वर स्वार झालो आणि पुढे सरचुच्या दिशेने निघालो.

४ वाजून गेले होते आणि अजून सरचू बरेच लांब होते . पटा-पट आम्ही सरचूच्या दिशेने चललो होतो. माझ्या आणि दिपाली मध्ये आता परत मस्त गप्पा रंगल्या होत्या. मी जरा पश्याताप भावनेने बोलत होतो तिच्याशी. मला थोडासा आराम हवा होता म्हणून उमेशला बाईक चालवावी लागली आणि मग पुढे त्याचे आक्सिडेंट झाले. मला हे फार लागून-लागून राहत होते. बाईक वर सर्व वेळ मी माझ्या कडून दर वेळा अशा होणाऱ्या गोष्टींची आणि सर्व प्रकारच्या पश्याताप भावनांवर चर्चा चालली होती. या गंभीर चर्चा करत-करत आम्ही १६६१६ फुट उंचीवरच्या " लाचूलुंग-ला" पार करत १००० फुट खाली उतरून परत "नकी-ला" चढायला लागलो. थोड्या वेळातच आम्ही १५५४७ फुट उंचीवर " नकी-ला" ला पोहोचलो. आता ६ वाजत आले होते आणि हवेत मस्त थंडी वाढायला लागली होती. आता मी थंडी मस्त बोलतोय कारण आज आम्ही कालच्या सारखा अति शहाणपणा केला नव्हता , कारण आज आम्ही पांग पासुनच जॅकेट घालून होती. पण आज पूनमने अति शहाणपणा केला होता. पांगवरून गाडीतून बाईक वर आली तेव्हा ती चप्पल वर आली होती आणि ते हि पायात मोजे न घालता. व्हा! काय हुशार आहे पूनम , तिला पायाला फार थंडी वाजत होती. मग तिचा मफलर एका पायाला बांधून कवर केला आणि माझ्या कडे असलेला माझ्या आजीच्या साडीचा बनवलेला तोंडाला बांधायचा कपडा दिला दुसऱ्या पायासाठी. त्याने तिच्या पायाला जरा आधार मिळाला.
आम्ही नकी-ला उतरायला लागलो आणि पहातोतर २१ लुप्स समोर दिसले . हा पुढचा रस्ता २१ छोट्या-मोठ्या वळणांचा होता , मस्त वाटत होते . काय सुंदर दृश्य होते ते. २१ लहान मोठी वळणे घेऊन आम्ही ८-१० किलोमीटरचा रस्ता पार करून १३७८० फुटावर आलो. म्हणजे अवघ्या काही मिनटात आम्ही जवळ-जवळ १५०० फुट खाली आलो होतो. इकडन सरचू अंदाजे २० एक किलोमीटर आहे. तसेच आम्ही पुढे निघालो. ७.३० च्या दरम्यान आम्ही सरचू ला पोहोचलो आणि अंधार हि पडायला लागला होता. सरचू मध्ये पण पांग सारखेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोकल लोकांनी टेन्ट लावून राहण्याची आणि खाण्याची सोय केली आहे. विचारले तर १०० रुपये प्रत्येकी राहण्याचे , पण तिथे राहण्यासारखी तशी ती व्यवस्थीत जागा नव्हती आणि आमची गाडी पण पुढे निघून गेली होती. मागो-माग आम्ही पण पुढे निघून गेलो. जवळ-जवळ ७-८ किलोमीटर आम्ही पुढे आलो तरी गाडी दिसेना. शेवटी आम्हला आर्मीचा चेक पोस्ट लागला. सर्व तिकडे थांबलो आणि चेक पोस्टच्या बाहेर असलेल्या जवानांना विचारले , पुढे कुठे राहायची सोय आहे का ? व कुठली गाडी पुढे गेली आहे का ? . त्यांनी ' हा ' असे उत्तर दिले. पण आमचीच गाडी पुढे गेली आहे का हे पाहायला अभी-रोहन पुढे गेले आणि बाकी आम्ही सर्व तिकडेच थांबलो. पण उभ्या-उभ्या आम्हा सर्वांनाच फारच थंडी वाजत होती म्हणून त्या जवानांनी आम्हला त्यांच्या पोस्ट मध्ये बसायला सांगितले. म्हणून त्यांचे आतले काही जवान बाहेर येताना बियरची बाटली फुटली. हे पाहून आमच्यात हास्य पिकले या मुळे जवानांच्या आणि आमच्या मध्ये दुरावा एकदम कमी झाला. मग गप्पान्ति आम्हाला त्यांच्या कडूनच कळाले कि , १३००० फुट नंतर आर्मीच्या जवानांना दारू मनाई आहे. मस्त गप्पा चालल्या होत्या , पण जेव्हा आम्ही त्यांना त्यांच्या कडच्या रायफल बद्दल विचारले तेव्हा मात्र त्यांनी काही सांगण्यास मनाई केली. ते बोलले "आप प्रेस वालो के सामने कुछ भी बोला तो , आप छाप देंगे और फिर हमारी नौकरी मुश्कील मै होगी". त्यांनी बर्याच गप्पान नंतर इन्सास रायफल असल्याचे सांगितले पण रायफल बद्दल काहीही माहिती मात्र नाही सांगितली. बर्याच वेळाने अभी-रोहन आले आणि आम्ही जवानांनचा निरोप घेऊन पुढे कॅम्पसाईट वर गेलो. ९ वाजले होते आणि काय मस्त थंडी होती तिकडे. सर्वाना आप-आपले टेन्ट दाखवले आणि फ्रेश होण्या करता गेलो. फ्रेश होई पर्येंत जेवण लागले होते. जेवायला गेलो तर जेवण पण थंड झाले होते. जेवताना सर्व जन आप-आपले दिवस भारतले किस्से सांगत होते. त्यावेळी मला असे वाटले कि मी आजच्या दिवसाची मज्जा मिस केली . जेवण उरकून सर्व आप-आपल्या टेन्ट मध्ये गेलो. आज मी , अभी आणि रोहन एका टेन्ट मध्ये होतो. २ बेड वर तिघे , आमच्या स्लीपिंग बॅग घेतल्या आणि मारल्या उड्या बेड वर. कसला नाजूक बेड होता , वाकला आमच्या वजनाने मध्ये. कसे-बसे स्वःताला अड्जस्ट करून घेतले आणि झोपी गेलो.

26.6.10

लेह बाईक ट्रीप - दहावा दिवस (लेह ते त्सो-मोरिरी)

१७ ऑगस्ट २००९, आज आमचा लेह मधला शेवटचा दिवस. मस्त ४ दिवस लेह मध्ये मज्जा केली, ती जागा आता  सोडून आम्ही परतीच्या प्रवासाला निघणार होतो.  काल जरा थकायला झाले होते, म्हणून सकाळी ७ वाजता सर्व उठलो आणि सर्व आवरून आप-आपले सामान घेऊन बाहेर आलो. मस्त नाश्ता चालला होता, एवढ्यात ऐश्वर्या बोलली चीझचा  डबा  कुठे गेला. आमची इकडे तिकडे शोधा-शोध चाललेली पाहून नबीची बायको बोलली “क्या  धुंड रहे हो तुम”. मी तिला हाताने चौकोनी असे दाखवत होतो आणि तोंडाने  त्रिकोनी डबा  असे बोलत होतो, वास्तविक तो  डबा चौकोनीच होता. सर्व माझ्या वर हसायला लागले आणि रोहन बोलला याला "अल्टीटूड सिकनेस”चा त्रास झाला वाटते. छान ४ दिवस लेह मध्ये राहून काही नाही झाल आणि आता लेह सोडताना त्रास झाला असे वाटते. बहुदा लेह सोडतोय म्हणून माझे मन भरून आले होते आणि बहुदा म्हणून असे झाले असावे कोण जाने. नाश्ता उरकून बाईक लोड  केल्या. आज रोहन, शमिका, पूनम, साधना आणि शोबित असे गाडीत होते. गाडी आज उशिरा येणार होती.कारण जरा गाडी मध्ये काम होते आणि आम्ही जे लेह ट्रीपचे टी-शर्ट करायला दिले होतो ते हि उशिरानेच मिळणार होत. पण आम्ही बाईक स्वार मात्र लवकर निघणार होतो. निघताना नाबिच्या परिवारा बरोबर आम्ही एक फोटो काढला.  ज्यांनी  आम्हाला घरा पासून एवढ्या लांब एकदम घरा सारखे प्रेमाने राहायला दिले,  त्यांना आणि लेहच्या सौंदर्याला सोडून आम्ही चललो होतो म्हणून  आम्हच्या  सर्वांचे मन भरून आले होते.

गाडीत ठेवायचं समान रोहनच्या ताब्यात दिले आणि आम्ही बाईक वर स्वार झालो. ८.३० च्या  दरम्यान आम्ही जड अंतकरणाने लेह सोडले. पेट्रोल भरून परत लेहच्या चौकातून मनाली कडचा रस्ता पकडला. शे, थिकसे पार करत आम्ही करुला पोहोचलो. नबी कडे तसा विशेष काय दाबून नाश्ता केला नव्हता, कारण सारखे तेच-तेच खाऊन कंटाळा आला होता. करुला आम्हाला एक छोटीसी टपरी  उघडताना  दिसली. चहा घ्यायच्या उधिष्टाने आम्ही आत शिरलो आणि मस्त गरम-गरम आलू पराठे खायला लागलो. पराठे हानले आणि चहा घेत बसलो होतो इतक्यात मी जिकडे बाईक लावली होती तिकडेच जरा पुढे एक मारुती ओम्नी लावली होती. त्याने  रिवरस घेताना माझ्या बाइकला ठोकले. इतक्यात सर्वच ओरडलो  “अरे काय कर रहे हो” आणि मी जाऊन बाईक पकडली. मी त्याला शिव्या घालणार तेवढ्यात तो बोलला “सॉरी, साहेब आपका बाईक दिखा नही”. अशा  वेळी मला मजबूत राग येतो आणि भरमसाट शिव्या घालाव्याशा वाटतात, पण समोरून सॉरी बोलल्या बरोबर सर्व राग शांत झाला. बाकी सर्वांचा नाश्ता होई पर्येंत मी एक-दोन फोटो काढून घेतले. मस्त पोट भरले होते. आता परत बाईक वर स्वार झालो आणि पुढे निघालो. मध्ये कुठे हि न थांबता आम्ही थेट १५ किलो मीटर  पार  करून उपशीला पोहोचलो. उपशीला आर्मीच चेक  पोस्ट  आहे. बाईक लावल्या आणि अभी परवानगी व सर्व बाईकच्या माहिती द्यायला  गेला,  तो पर्यंत  मी परत फोटो काढायला लागलो. 


उपशी वरून २ रस्ते फुटतात, एक तांगलांग-ला करून मनाली कड़े जातो आणि दूसरा रस्ता सुमधो करून त्सो-मोरिरी कड़े जातो. आम्ही याच रस्त्याने निघालो. आज मी मस्त फोटोग्राफीच्या मूड मध्ये होतो आणि वातावरण पण मस्त समर्पक होते. छान निळ्या भोर आकाशात तुरळक पांढरे ढग आले होते. इकडनच आता परत आम्हाला सिंधू नदी हि लागली. पण नेहमी आमच्या बरोबर वाहणारी सिंधू नदी आज मात्र उलट्या दिशेने वाहत होती. मस्त डोंगरांच्या मधून वळसे घेत वाहत येणारी नदी आणि डोंगरांच्या एका बाजूने वळण घेत जाणारा रस्ता. रस्ता पण मस्त होता, मध्ये थोडी-थोडी रेती होती पण बाईक चालवायला मजा येत होती. डोंगर भुस-भूशीत मातीचा आहे असे वाटत होते आणि कधी हि आपली जागा सोडेल असे हि वाटत होते. मस्त बाईकिंगचा आनंद लुटत आणि फोटोग्राफी करत आम्ही पुढे सरकत होतो. या परीसरात आम्हाला निसर्गाचे नीर-निराळे रूप पाहायला मिळत होते. मधेच तपकिरी रंगाच्या डोंगरान मध्ये हिरवळ, निळे आभाळ आणि पांढरे ढग पाहायला मिळाले. काय मस्त दृश्य होते ते. आवर्जून थांबून फोटो काढला मी. तिकडन हलवेसे असे वाटतच नव्हते, पण सर्वात मागे मीच राहिले होतो. म्हणून थोडा वेळ नेत्र सुख घेतले आणि पुढे निघलो. तरी अधून मधून मी फोटोग्राफी साठी थांबतच होतो. आता मी आणि अभी मागे एकत्र होतो. एवढ्या सर्व रस्त्यात आम्हाला एके ठिकाणी मोठ्या दगडांचा  आडोसा दिसला, दीपालीच्या भाषेत "सु-सु का मुरंबा" साठी थांबलो. कारण पुढे कुठे हि आडोसा मिळेल याची खात्री नव्हती. या सर्वात मी फोटोग्राफी मात्र करत होतोच, काय मस्त वातावरण होते आज. इकडन पुढे निघालो, तरी निसर्ग आपले नीर-निराळे रूप दाखवतच होता. मधेच डोंगराचा रंग जांभळा हि झालेला जाणवत होता. असे डोंगराचे नीर-निराळे रंग पाहत, त्याच डोंगरांच्या मधून आम्ही पुढे जात-जात कियारी चेक पोस्टला पोहोचलो.  

१२ वाजत आले होते, थोड्या थोड्या भूखा लागल्या होत्याच. आता नेहमीच्या रीती प्रमाने अभी सर्व परवाने काढून  दाखवायला लागला. आर्मिच्या सुबेदारने रितसर एंट्री करायला घेतली आणि विचारले “किधार से आये हो तुम”, आम्ही बोललो "मुंबई-बम्बई से...…". मुंबई ऐकताच तो सूबेदार आमच्या वर खवसला आणि शब्दांचा भडीमार सुरु केला. “किस लिए यह तक इतना लंबा आये हो”, मी बोललो  “ये अच्छा निसर्ग और ये पहाडिया देखने आये है ”. तर तो अजूनच खवसल आणि बोलला "क्या हे इधर देखने के लीऐ, खुले-नंगे पहाड, रेत-पत्थर और सर्दीयो मे सिर्फ बर्फ हि बर्फ. हमारी मजबुरी कि वजह से हमे यह पे रहना पडता है, आप किस लिये यह पे मरने आते हो. क्या हे यह पे, बहुत सारा पैसा खर्च करते हो आप." या सर्वात मला त्यांच्यात आलेल्या नैराशाची  जाण होत होती.पण मुळेचे ते तसे नाही आहेत हेही माहित होते. म्हणून मी जरा त्यांना प्रेमाच बोट लावाव, अशा उदेशाने "हम आपको मिलने आये है" असे बोललो. हे ऐकताच जो काय त्यांच्यातला राग, नैराश होत, ते गळून पडल. त्याने आम्हाला त्याच्या ऑफिस मध्ये बसायला दिले आणि त्याच्या बरोबरच्या एका जवानाला घेऊन तो आत गेला. आम्ही त्याच्या ऑफिस मधल्या मस्त माठातले गार पाणी पीत होतो. तो जो बाहेर आला तो ओंजळी भरून  बदाम  आणि बरोबरच्या जवानाच्या ओंजळीत काजू असे घेऊन. सर्व त्यांनी आमच्या पुढ्यात टेबल वर पसरले आणि म्हणाला "खाओ पहले फिर पानी पिना" आणि परत आत गेले. हे सर्व पाहून तर आम्ही थक्क झालो आणि ते परत ओंजळी भर पिस्ता व नाइसच्या बिस्कीटचे पुडे घेऊन आले. सर्व पुढ्यात ठेवले आणि बोलले "खाओ अब पेट भरके". बराच वेळ आम्हाला काय करावे असे सुचेचना. ते परत बोलले "खाओ आराम से", मग मात्र आम्ही सर्व तुटून पडलो आणि त्यांच्या बरोबर गप्पा मारायला लागलो होतो. मात्र आता आमचे  संवाद थोडे प्रेमळ ढंगात होत होते. थोडा वेळ गप्पा झाल्या आणि  आम्ही  निघायच्या तयारीला लागलो. तो आम्हला बोलला "ये सब खतम करके जाओ", आम्ही बोललो "नही-नही बस हो गया" तरी तो आग्रह करतच होता आणि आम्ही नाही-नाही करत होतो. शेवटी तो बोलला "ये सब मैने  आपके लिये निकले है, खतम करो नही तो लेकर जाओ". त्या त्याच्या रागात पण आम्हाला एक निराळे प्रेम दिसत होते. त्यांचा मान राखून मी, दिपाली, कुलदीप आणि अमेय म्हात्रेने उरलेले सर्व काजू, बदाम आणि पिस्ते खिशात टाकले. तरी त्याने आम्हाला उरलेली बिस्कीट पण दिलीच. हे सर्व पाहून मला असे वाटले कि, काय हे रख-राखीत पण खर प्रेम. वास्तविक आम्ही त्यांचे कोण होतो, काय आम्हचा  आणि त्यांचा संबंध. तसे पाहायला गेल्यास आम्ही त्यांच्या साठी फक्त वाट सरूच, रीतसर नोंदणी करायची आणि द्याच आम्हला पाठवून पुढे. एवढीच त्यांची जवाबदारी होती, तरीही त्यांनी आमच्या वर एवढा प्रेमाचा वर्षाव का करावा. या सर्व प्रश्नाचे उत्तर बहुदा "माणुसकी आणि प्रेम" असावे असे त्यावेळी  मला वाटले. हा क्षण माझ्या या ट्रीपचा सर्वात जास्त भाव पूर्ण होता. या सर्वाना प्रेम वंदना देऊन आम्ही पुढे निघालो. 

मागे गाड़ीशी संपर्क साधून आम्ही पुढे निघालो. आता जरा डोंगरांचे रंग बदलायला लागले होते. मधेच जांभळ्या रंगाचे तर मधेच राखाडी रंगाचे. आमच्या उजव्या हाताला सिंधु नदी आणि डाव्या हाताला रंग बदलणारे डोंगर. या मधून आम्ही आरामात पुढे चाललो होतो. आज काय आम्ही बाईकस पळवत नव्हतो मी तर  मस्त फोटो काढत-काढत आरामात मागुन येत होतो. आज मूड,  निसर्ग, वेळ सर्वच मस्त होते, म्हणून मज्जा येत होती.हळू-हळू आरामात केशर, नुर्नीस, किदमांग अशी गावे पार करत आम्ही चूमाथांगला पोहोचलो. सकाळी लेह सोडून आता पर्येंत रस्त्यात आम्हाला लागलेले पहिले हॉटेल. हे छोटेसे गाव आहे, रस्त्या लागत असलेल्या घरातच त्यांनी हॉटेल बनवले आहे. आम्हाला परत भुका लागल्याच होत्या, म्हणून खायला काय असे विचारले तर एकाच उत्तर “मॅगी और राजमा-चावल”. या  पलीकडे त्या परिसरात आणि काय अपेक्षा करू शकतो. तसे पाहिले तर त्या ठिकाणी एवढ खायला मिळाले यातच आम्ह्चे नशीब असे आम्ही मानून काहींनी मॅगी आणि काहींनी राजमा-चावल मागवले. मस्त गरम जेवण जेवलो आणि परत रोहनशी संपर्क साधायचा प्रयेंत करायला लागलो, पण काही केल्या त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. मग काय करणार ३.४५ वाजत आले होते, पर्याय नाही म्हणून आम्ही पुढे निघालो. 



४  च्या  दरम्यान  आम्ही माहे चेक पोस्टला पोहचलो. रिती प्रमाणे एन्ट्री केली आणि पुढे निघालो. थोड्या वेळातच सुमधो ला  पोहचलो. सुमधो वरून २ रस्ते फुटतात, एक त्सो-कार करून पांग मार्गे मनालीला जाणाऱ्या रस्त्याला  मिळतो आणि दुसरा डावीकडे आतल्या बाजूला कार्झोकला जातो. आम्हाला कार्झोकलाच जायचे होते, कारण त्सो-मोरीरी कार्झोक गावच्याच पायथ्याशी आहे आणि ते अंतर जवळ-जवळ ६० किलोमीटर होते. पहिले २५ किलोमीटर रस्ता चांगला आहे आणि मग पुढचा रस्ता  कच्चा  होता. वातावरणात पण आता जरा थंडावा जाणवायला लागला होता आणि निसर्ग पण मस्त वाटत होता. छान लॅंडस्केप्स दिसत होते, निळ्या आभाळात पांढरे ढग खाली उतरले होते. मला तर  प्रत्येक  वळणावर एक नवीन लॅंडस्केप्स दिसत होता आणि सारखे थांबून फोटो काढावेसे वाटत होते, तसे मी करतही होतो. आज मी आणि अभी सर्वात पाठी होतो, जरा आरामातच. मी फोटो साठी थांबायचो आणि अभिला कवर करायचो. असे करत करत आम्ही रस्ता कापत होतो. काही केल्या रस्ता संपतच नव्हता आणि रस्त्याला पण बारीक खडी होती, त्यामुळे हळू हळू जावे लागत होते. पण आम्ही हि आरामातच  चाललो  होतो, फोटो  काढत  आणि आराम करत कच्च्या रस्त्या पर्येंत आलो. हवेत थंडावा वाढायला लागला होता आता बाईक वर जरा थंडी लागत होती. तरी पण मी नुसते फोटोच काढत होतो. काय सुरेख लॅंडस्केप्स होते सारखे पॅनोरमा काढावेसे वाटत होते, म्हणून मी काढत हि होतो.यामुळे आता माझ्यात आणि अभी मध्ये  अंतर वाढायला लागले होते. अभी पण पुढे निघून गेला होता आणि मी मागे शेवटी होतो. अधून मधून माझ्या आणि दीपालीच्या गप्पा तर चालूच होत्या, गप्पा नाही असे कधी  होणार  का. गप्पा आणि फोटोग्राफी करत आम्ही पुढे चाललो  होतो. रस्ता आता तर पूर्ण वाळू आणि भूस-भुशित मातीचा होता.

मला आता फारच थंडी वाजत होती आणि दीपालीला पण थोडीशी थंडी वाटत होती. वास्तविक थंडी नव्हती पण वारा गार होता आणि बाईक वर तर थंड वारा मजबूत  लागत  होता, जास्त करून छातीला, हाताला आणि हातांच्या बोटांना. माझ्या हातांची बोटे तर सुन्न व्हायला लागली होती, साधा क्लच दाबायला जमत नव्हता. मधेच बाईक थांबवून दीपालीने मला ग्लव्स काढायला लावले आणि माझे दोन्ही हात तिच्या हाताने चोळायला लागली. घर्षणाने हाताच्या बोटांचा रक्त प्रवाह वाढवण्याचा प्रयेत्न करत होती. बराच वेळ  हात चोळल्या नंतर तिला यात यश आले. आम्हाला थंडी लागण्यात माझा अति शहाणपणा आणि पूनमचा अति प्रेमळ पण कारणीभूत होता. सकाळी हॉटेल सोडताना मी आणि दीपालीने जॅकेट घातले होते, पण पूनमच्या प्रेमळ स्वभावाला अनुसरून तिने आम्हाला दिवसा गर्मीत जॅकेट कशाला असे सांगून आमचे जॅकेट गाडीत ठेवून घेतले आणि गाडी मध्ये  बंद  पडल्या मुळे अजूनही आमच्या मागे होती. थंडी लागण्याचे मुख्य कारण म्हणजे आम्ही एका  टी-शर्ट वर होतो आणि जॅकेट मागे गाडीत. म्हणून आपल्याला दिवस भर लागणारे समान बाईक वर आपल्या बरोबर ठेवावे असे अनुभवी लोक सांगतात आणि हे मला माहित असून मी हे केले नाही म्हणून अति शहाणपणा केला असे मी म्हणतो. काय करणार आता पर्याय नाही म्हणून आम्ही तसेच कुड-कुडत पुढे निघालो.

आता सूर्य मावळायला लागला होता, त्यामुळे सारा परिसर सोनेरी किरणांनी माखला होता. यातच आम्हाला त्सो-मोरीरीचे लांबून पहिले दर्शन झाले. 
 ते पाहून डोळे दिपुनच गेले आणि मला सारखे फोटो काढावे से वाटत होते, पण हात गारठले होते म्हणून म्हणा किंवा अजून थंडी वाढायच्या आत आम्हाला इच्छित स्थळी पोहचायचे होते म्हणून जास्त फोटो न काढत आम्ही पुढे चाललो होतो. सारखे वाटत होते कधी येणार कार्झोक गाव, तेवढ्यात थोड्या वेळाने मागून आमची गाडी आली. गाडी तून जॅकेट घेतले आणि मग गाडीच्या पाटोपाट आम्ही निघालो. आता जरा फोटो काढायला हातात जीव आला होता. रस्ता कच्चा आणि खडकाळ होता, त्यामुळे सर्वच हळू चालले होते. आता परत सर्व एकत्र आलो होतो.रस्त्याच्या  डाव्या हाताला त्सो-मोरीरी आणि त्याच्या  पलीकडे डोंगरच्या वर मघाशी दिसलेला एक मोठा ढग आता सूर्याच्या मावळत्या किरणाने मस्त सोनेरी दिसत होता. मला तर सारखे त्याचे  फोटो काढावे असे वाटत होते. दर वेळेला डाव्या बाजूला पहिले तर मी वाह काय मस्त आहे असे म्हणून थांबायचो आणि फोटो काढायचो. दर ५-५ मिनटांनी मी फोटो काढायला थांबत होतो, या खेपेला मी दिपाली कडे पाहिलं तर तिची मला दया आली  आणि तिला मी बोललो आता पुढे लगेच थांबणार नाही.पण मी दिपाली जे बोललो ते फार वेळ काय पाळू शकलो नाही, जरा पुढे गेलो आणि लगेचच डाव्या बाजूला पाहिल्या बरोबर वाह असे बोलून फोटो साठी थांबलो. पण या सर्वात दीपालीला फार मानले पाहिजे सारखे-सारखे मी फोटोग्राफी साठी थांबत होतो आणि या साठी तिला पण सारखे बाईक वरून उतरावे लागत होते, तरी पण तिची जराही चीड-चीड किंवा कच्च-कच्च नव्हती. या वेळेला मात्र मला तिची फारच दया आली. म्हणून मी फोटो काढायचा काय थांबलो नव्हतो, पण आता मात्र बाईक वरून न उतरता फोटो काढत होतो.

असे करत-करत आम्ही सर्वात मागाहून ७ च्या  दरम्यान कार्झोक चेक पोस्टला पोहोचलो. मी एन्ट्री  करायला गेलो तर कळले कि आताच तुमची एन्ट्री झाली. मग मी पुढे निघलो डावीकडच्या बाजूला सारखे माझे लक्ष होतेच. चेक  पोस्टच्या मागच्या बाजूला एक कॅम्प साईट दिसली. मला वाटले बहुदा आज आम्हाला टेन्ट मध्ये राहायचे आहे कि काय, या विचाराने मन मस्त उत्साही झाले. पण आमचे बाकी सर्व पुढे गावाकडे जाणाऱ्या दिशेने दिसत होते, मी पण त्यांच्या  पाठो-पाठ गेलो. जसे मला गावाचे संपूर्ण दर्शन घडले, तेव्हा या ट्रीप वरचा सर्वात  मोठा आश्चर्याचा धक्का मला बसला. तो म्हणजे १५०७५ फुटावर, त्सो-मोरीरीच्या काठावर १००० च्या  आस -पास लोकसंख्या असलेले कार्झोक गाव. मला तर एवढे  मोठे गाव असेल अशी अपेक्षा नव्हती. माझ्या सहित आमच्या पैकी बरेच जणांना असाच  धक्का  लागला. एका घरा कडे आम्ही सर्व थांबलो. आजचा आमचा मुक्काम इकडे असे कळले. मग मी विचारले आपण मागच्या कॅम्प मध्ये का नाही राहत आहोत. तेव्हा मला कळले एका डबल बेड टेन्टच भाड होत ३५०० रुपये आणि जे काय आमच्या आवाक्यात नव्हते. म्हणून सर्व तिकडे का नाही थांबले ते कळले आणि आता आम्ही राहणार होतो तिकडे फक्त ४०० रुपये प्रत्येक रूमचे होते.
अजूनही मला तशी थंडी वाजतच होती. गावातून त्सो-मोरीरी मस्त दिसत होतो, मी एक-दोन फोटो काढले आणि मी पटकन घरात शिरलो. आज मी, अमेय म्हात्रे आणि कुलदीप रूम मध्ये एकत्र होतो. फ्रेश होऊन सर्व आप-आपली कामे करायला लागलो. आज शमिका आणि पूनमला जेवण बनवायचा मूड आला होता, म्हणून त्यांनी किचनचा ताबा घेतला. जेवण होई पर्येंत आम्ही काही जण उमेश, शोबित, आदित्य, दादाच्या रूम मध्ये टाइम पास करत बसलो. तर काही फोटो ट्रान्स्फरच काम करत होते. १०च्या  दरम्यान जेवण तयार आहे, चला जेवायला अशी आरोळी आली . तरी पण आम्ही सर्व रूम मध्ये गप्पा मारतच होतो, पण शेवटच दम आला तेव्हा मात्र सर्व उतरलो जेवायला. शमिका आणि पूनमने बनवलेले सुंदर जेवण खालले आणि झोपायची तयारी करायला  लागलो. ११ वाजता सर्व झोपी गेलो, पण आज मला काही केल्या झोप येतच नव्हती. तरी मी थोडा वेळ  वळवळतच राहिलो आणि कधी झोपी गेलो ते कळलेच नाही.

10.5.10

लेह बाईक ट्रीप - नववा दिवस (लेह ते खार्दुंग-ला पार करून नुम्ब्रा वॅली)


१६ ऑगस्ट २००९, आज आमच्या ट्रिपचा सर्वात महत्त्वाचा  दिवस होता. कितेक वर्षान पासून मनात बाळगलेले स्वप्न पूर्ण होणार या उत्साहात आम्ही सर्व उठलो. आज आमचे लक्ष होते खर्दुंग-ला पार करून नुम्ब्रा वॅलीत जाऊन राहायचे. नुम्ब्रा वॅलीत नाबिच्या ओळखीने १ दिवसा करता राहायची सोय केली होती. सर्वांचे समान आमच्या रूम मध्ये टाकले आणि बाकी सर्व रूम रिकाम्या केल्या. नाष्टा करून, बाईक्स आणि गाडी लोड केली. ७.०० च्या आस-पास उत्साहित मनाने आम्ही सर्व निघालो. लेह मार्केट कडे न जाता मागच्या बाजूनेच आम्ही लगेच घाट चढायला लागलो. ३० एक मिनटातच आम्ही १३२०० फुटावर "गंग्लोक" ला पोहोचलो. मी एखाद दुसरा फोटो काढला आणि पुढे निघालो. बाकी सर्व न थांबता पुढे निघून गेले होते. वळण-वळण घेत आम्ही घाट चढत होतो. मला तर चंग-ला चढतोय असेच वाटत होते. तसाच रस्ता आणि तशीच वळणे. थोडाफार फरक होता, पण मला तसे वाटले होते. चंग-ला सारखच सरळ चढण मग यु टर्न, परत चढण मग यु टर्न होते. मात्र इकडे हवामान फारच निराळे होते. जसजसे वर चढत होतो तसतसे वातावरण बदलत चालले होते. निळे भोर खुले आभाळ नव्हते आज. खार्दुंग-ला च्या दिशेने पाहिले तर आभाळ दाटून आले होते. बहुदा आम्ही खार्दुंग-ला सर करणार म्हणून असेल कि काय कोण जाणे....  पण मनात असे वाटत होते कि पाऊस पडला तर मेलो, मी दीपालीला हे बोलून सुद्धा दाखवले. आज अजून एक निराळा अनुभव येत होता, म्हणजे जस-जसे वर चढत होतो तसे वारा जाणवत होता. दक्षिणे कडे (लेहच्या दिशेने) तोंड करून चढताना मजबूत समोरून वर यायचा आणि बाईक २०-२५च्या स्पीडला पण रडत चढायची. पण यु टर्न घेऊन उत्तरे कडे (खार्दुंग-लाच्या दिशेने) तोंड करून चढताना व्यवस्थित ४०च्या स्पीडला बाईक चढायची. पण खार्दुंग-ला सर करायच्या उस्फुर्तीत या सर्व अडचणींवर सहजच मात होत होती. ८ च्या सुमारास आम्ही १७००० फूटावरील "साऊथ पुल्लू", खर्दुंग-लाच्या दक्षिणेकडच्या चेकपोस्टला पोहोचलो. आता इथून सर्व रस्ता कच्चा होता आणि वेडी-वाकडी वळणे घेत आम्ही खार्दुंग-ला च्या दिशेने चढत होतो. अखेर ९ च्या सुमारास आम्ही खार्दुंग-ला च्या माथ्यावर पोहोचलो. अवघ्या २ तासात ३९ किलोमीटर अंतर पार करून सुमारे ७००० फुटांची उंची गाठली होती. लेहच्या १३५०० फुट वरून आम्ही १८३८० फुटावर खार्दुंग-ला च्या  माथ्यावर होतो.

१८३८० फुटावर जगातील सर्वोच्च वाहतुकीच्या रस्ता "खार्दुंग-ला टॉप" आम्ही सर केला होता. काय तो प्रत्येकाच्या  चेहऱ्यावर आनंद झळकत होता. जगातील सर्वोच्च वाहतुकीच्या रस्ता सर केल्याचा, कितेक वर्षान पासूनचे स्वप्न पूर्ण झाल्याच, आम्ही सर्व सुखरूप इथ पर्येंत आलेल्याचा, हि बाईक ट्रीप सार्थकी झालेल्याचा कोण जाणे पण सर्व आनंदात होते. इकडे एका बोर्ड वर "Top of the World" असे लिहिले होते आणि सर्वाना तसे वाटत ही होते. रोहनने तर घेऊन आलेला तिरंगा काढला आणि फडकवला. मी रोहन-शामिकाचा फोटो काढला. प्रत्येक जण खर्दुंग-ला टॉप वर पोहोचलो म्हणून आप-आपल्या परीने  फोटोग्राफी करत होते. "Khargund-La Highest Motorable Road In The World" पार्किंगच्या बोर्ड जवळ अभिने  त्याची बाईक लावली आणि मी अभी-मनालीच्या फोटो काढला. मग मी माझी बाईक लावली आणि त्याने माझा फोटो काढला, नंतर माझा-दीपालीचा हि फोटो  काढला. साधनाला पण खर्दुंग-ला चा फुटेज हवा होतो, पण बाईक चालवताना. मग अभी-उमेश आणि मी-साधना थोडेसे लेहच्या दिशेने मागे गेलो. उमेश अभिच्या बाईक वर उलटा बसून शुटींग करत होता आणि साधना माझ्या बाईक वर बसून खर्दुंग-ला बद्दल संचालन करत होती. पण चामारी एका टेक मध्ये तिचे संपूर्ण संचालन होताच नव्हते. काही ना काही आणि कुठे तरी ती चुकायचीच. मग परत मागे फिरून पुन्हा एक टेक, परत चुकली कि पुन्हा मागे आणि टेक. टेक वर टेक, टेक वर टेक असे करत १० टेक झाले तरी पण पाहिजे तसा काय टेक मिळत नव्हता. आता मला कंटाळा यायला लागला होता. ऐकून-ऐकून मला ते संचालन पाठ झाले होते. अभी पण वैतागला  होता, उमेश अभिच्या बाईक वरून उतरला आणि मग उलटा पळत शूट करत होता. शेवटी १५ एक टेक नंतर हवा तसा टेक मिळाला. आम्ही परत येई पर्येंत सर्वानी आर्मी पोस्ट मध्ये मिळत असलेले खर्दुग-लाचे टी-शर्ट्स विकत घेतले होते. इकडे कळले कि सोमवारी खर्दुग-ला बंद असतो. अरेच्या म्हणजे उद्याच रे....असे आम्ही बोललो. बोंबला...लागली आमच्या प्लानची परत वाट. जर आम्हाला नुम्ब्रा वॅलीत रहायचे असे तर मग उद्या परत येऊन खर्दुंग-ला पार करता येणार नाही म्हणजे परवा यावे लागणार आणि हे काय आम्हाला जमण्या सारखे नव्हते. आमचे आधीचं २ दिवस वाया गेले होते. पुढच्या प्लानची वाट लागली असती, मग काय पर्याय नाही म्हणून हुंडर पर्येंत जायचे आणि आजच खर्दुंग-ला परत पार करायचा. बाकी सर्व ठिकाण वगळायचे असे ठरले. तशी आर्मीच्या पोस्ट वर नोंदणी केली कि आजच परत येणार. इकडे हि आम्हाला काही मराठी मंडळी भेटली. त्यांच्याशी फार वेळ गप्पा न मारता आम्ही पुढे निघालो.

खर्दुंग-लाची  दुसरी  बाजू आम्ही उतरत होतो. हवेत जराशी थंडी होती, फार तशी नाही. वारा जोराचा होता पण, बहुदा त्यामुळे थंडी जाणवत होती. अधून-मधून माझी मात्र फोटोग्राफी चालूच होती. जस-जसे खाली उतरत पुढे जात होतो तसे खर्दुंग-ला वरून येणारे ढग आमच्याच वरून मागे येत आहेत असे मला आणि दिपाली वाटले. या विषयावर माझी आणि तिची चर्चा सुरु झाली. तसे आम्हाला चर्चेसाठी  कुठलाही विषय चालतो, आता हा विषय होता. गप्पा मारत आणि फोटोग्राफी करत १८ किलोमीटर अंतर पार करून १६००० फुटावर "नॉर्थ पुल्लू" चेकपोस्टला पोहोचलो. आता ११ वाजत आले होते म्हणून जास्त वेळ न घालवता आम्ही पुढे तसेच निघालो. कारण आम्हला अजून अंदाजे ६० किलोमीटर अंतर गाठायचे होते. आता रस्ता मस्त होता. जरा बाईक पळवल्या आणि खर्दुग गावा कडे पोहोचलो. इकडे आम्ही गाडी थांबली होती. भुका लागल्या होत्या म्हणून चहा-बिस्कीट खाल्ले. रोहन आज जरा सुटलाच होता, जबरदस्त गाडी पळवत तो  आधीचं पुढे निघून गेला, त्यामुळे तो इकडे थांबला नव्हता. जास्त वेळ न दवडता पुढे निघालो. बऱ्याच वेळाने तो आम्हला भेटला. खूप वेळ झाला आणि मागे कोणीही दिसत नाही म्हणून तो थांबला होता. पण आम्ही तर चहा घेत बसलो होतो. १२ वाजलेत आता पुढे कुठ पर्येंत जायचे आणि कुठून मागे फिरायचे याच्या वर आमच्यात चर्चा सुरु झाली. मग २ च्या जवळ-पास जिकडे असू तिकडून परत फिरायचे असे ठरले आणि पुढे निघालो. परत रोहन पुढे सुटला होता.

वेडी-वाकडी वळण सावध पणे घेत, सरळ रस्त्यावर सुसाट बाईक पळवत होतो. आता माझी आणि दीपालीची बडबड जरा कमी झाली होती, कारण लक्ष जास्त बाईक वेगात पळवण्यात होते. पण नक्कीच सावध पणे. रस्ता छान होता बाईक चालवायला मजा येत होती. आता आम्हाला सिंधू नदीने पण साथ दिली होती. पण जस-जसे आम्ही पुढे चललो होतो तस-तसे नदीचे पात्र मोठ-मोठे होत होते. एके ठिकाणी नदी एवढी रुद्र झाली कि समोर दिसणाऱ्या डोंगरान पर्येंत नदीचे पात्र वाढले होते. म्हणजे आमच्या या रस्त्याच्या बाजूने ते पलीकडच्या डोंगर रांगान पर्येंत, एवढी मोठी झाली होती. पहा हा फोटो......खाल्सर, डिस्किट अशी गावे पार करत आम्ही पुढे निघालो. डिस्किट हे नुम्ब्रा वॅलीचे डिस्ट्रिक मुख्यालय आहे. इकडून पुढे गेलो आणि २ रस्ते फुटताना दिसले. एक रस्ता "सुमुर" कडे आणि दुसरा "हुंडर" कडे जातो. "सुमुर" हे "सियाचीन बेस" परिसरातले बॉर्डर कडचे गाव आहे. तिकडे जाण्यासाठी वेगळी परवानगी घ्यावी लागते, जी आमच्या कडे नव्हती आणि वेळ पण नव्हता. बघू पुन्हा कधी आलो तर जाऊ असे म्हणून आम्ही "हुंडर"च्या दिशेने निघालो. आत तर रस्ता अजूनच चांगला होता आणि नदी पासून लांब जात चालला होता. आता परिसर हि बदलला होता. लांब-लांब नजर जाई पर्येंत वाळवंट दिसत होते. नुसत रख-रखीत वाळवंट आणि मधून जाणारा सरळ रस्ता. आम्ही या वाळवंटातून पुढे सरकत होतो. इकडे हि रोहन सुटलाच, मी त्याला पकडायचा प्रयत्न करत राहिलो पण काय भाड्या बाईक पळवत होता. स्पीडो मीटर कडे लक्ष गेले तेव्हा कळले कि मी ९०-९५ ला बाईक पळवत होते. मनाला जरा आवरले, कारण जर मध्येच अचानक खड्डा  किंवा रस्ता खराब झाला तर बाईक आवरता नाही येणार. क्षणभरात मोह आवरला आणि परत ६०-७० च्या स्पीडला बाईक पळवायला लागलो. एवढ्यात रोहन बराच पुढे निघून गेला. अभी, आदित्य माझ्या मागो-मग आता आले होते. अमेय म्हात्रे मात्र बराच मागे होता.


थोड्या वेळात आम्ही "हुंडर"ला पोहोचलो. रस्त्याच्या मध्ये उभा राहून रोहन आम्हाला बाईक इकडे लाव असे हाताने इशारा करत होता. जवळ गेलो आणि रोहनच्या बाईकच्या बाजूला आम्ही बाईक लावल्या. समोर दिसत होता एक बोर्ड आणि रोहन हाच बोर्ड उत्साहाने आम्हाला दाखवत होता. कसला असेल तो बोर्ड, कॅफे १२५ आणि मेनू पण याच बोर्ड वर लिहिला होता. काय असेल मेनू? जे कधी या वाळवंटात खायला मिळले असे वाटले पण नव्हते आम्हाला, असे होते मेनू. पहाच तुम्ही ना........
डोसा हा प्रकार इकडे वाह काय बात हे असे म्हणत आश्चर्य मुद्रा घेऊन आम्ही आत शिरलो. मागाहून अमेय म्हात्रे आणि आमची गाडी पण आली. मसाला डोसा, साधा डोसा, समोसा आणि जिलेबी ऑर्डर केली. जस-जशी ऑर्डर येत होती तस-तसे  सर्वच तुटून पडत होते. मनोसोप्त जेवून घेतले आणि मी बाहेर आलो. हा कॅफे "खर्दुंग-ला टायगर्स ५४ RCC (GREF)" रेजिमेंटच्या गेटला लागूनच आहे. रेजिमेंटच्या गेट वर कमान करून बोर्ड लावला आहे "KHARDUNGLA TIGERS 54 RCC (GREF) WE MAINTAIN WORLDS HIGHEST MOTORABLE ROAD". खर्दुंग-ला आणि नुंबर वॅली परिसरातले सर्व रस्ते हि रेजिमेंट संभाळते. मानले पाहिजे या लोकांना, एवढ्या प्रतिकूल वातावरणात रस्ता चांगला सांभाळतात.
 

आता आम्हाला पाहायला जायचे होते ते "डबल हंप कॅमल" आणि "हुंडर सॅन्ड ड्यून्स", जे हुंडरचे आकर्षण आहे. "सॅन्ड ड्यून्स" रस्त्याने येताना दिसतच होते, पण आम्हाला पाहायाचे होते "डबल हंप कॅमल". फार लांब नव्हते तसे जरा एक किलोमीटर भरच जावे लागले. छोटासा ओढा आला म्हणून बाईक लावल्या आणि पुढे पाई चालत गेलो. झाडीत उंटाचे  मालक आराम करत बसले होते. यांनी १५ मिनटांच्या राइडचे २५० रुपये सांगितले. तसे आमच्या पैकी कोणाला हि राइड करायची इच्छा नव्हती, फक्त पहायचा होता. त्यांनी उंट अजून पुढे कुठे तरी झाडीत लपवून ठेवले होते. मग ऐश्वर्याला बकरा बनवून उंटा वर बसवायची ठरले. त्यांना सांगितले आणा एक उंट १५ मिनटांसाठी. ते बोलले "सब करेंगी तो हि लेकर आयेंगे एक के लिये नही". कसा-बसा एक बकरा तयार केला होता, बाकी कोणालाच राइड करायची इच्छा नव्हती. आम्हाला तर फक्त पहायचा होता. कसला माज होता त्यांना. शेवटी नाही करायचे म्हणून आम्ही परत फिरलो. आता परत ओढा ओलांडताना पूनम धडपडली, तसे काही लागले नाही. पण आमची मस्ती चालू झाली. वेळे अभावी आणि उंट मालकांच्या मस्ती मुळे आम्हाला उंट न पाहता परत निघावे लागले होते. मनात असेही वाटत होते कि जर उद्या खार्दुंग-ला बंद नसता तर आज आपण इकडे राहून सर्व परिसर पाहायला मिळाला असता. पण काय करणार जसे वाटते तसे होत नाही. हेही मनातच म्हणत मी बाईक काढली आणि सर्व ३.३० वाजता लेहच्या दिशेने निघालो.


इथून परत सुसाट निघालो लवकरात-लवकर आम्हाला खार्दुंग-ला पार करायचे होते. तोच वाळवंटातला मस्त रस्ता सुसाट तुडवायला लागलो. अधून-मधून मी फोटोग्राफी साठी मात्र थांबत होतो, पण ह्याच्या शिवाय मध्ये कुठेही न थांबता ४.३० ला आम्ही खार्दुंग गावात पोहोचलो. आमची गाडी परत तिकडेच थांबली होती जिकडे आम्ही सकाळी चहा-बिस्कीट खालले होते. आता परत चहा-बिस्कीटचा एक राउंड झाला आणि आमची मस्ती तर चालूच होती. माझी आणि कुलदीपची बाईक सर्वात जास्त पेट्रोल पीयायची म्हणून बरोबर एक्सट्रा घेतलेलं पेट्रोल बाईकला पण दिले प्यायला आणि निघण्याची तयारी करायला लागलो. एवढ्यात पूनम ओरडली माझा कॅमेरा मिळत नाही आहे, मग शोधा-शोध. कॅमेरा कुलदीपने लपवला होता. थोडी मस्ती झाली आणि मग सर्व खार्दुंग-लाच्या दिशेने निघालो. जस-जसे खार्दुंग-ला चढत होतो तस-तसे वातावरण पावसाळी होत होते. परत मला आणि दीपालीला वाटले कि पाऊस पडला तर मेलो. आभाळा कडे लक्ष देत आम्ही घाट चढत होतो. काही वेळातच १४७३८ फुट वरून १८३८० फुटावर होतो. सर्वच फार आनंदात होतो आणि का नसणार, एका दिवसात दोनदा खार्दुंग-ला टॉप सर केला होता. सकाळी साधनाच्या फुटेज  मुळे मला आणि अभीला इकडे काही खरेदी करायला मिळाली नव्हती. मग मी, दिपाली, अभी आणि मनाली आर्मीच्या खार्दुंग-लाच्या पोस्ट मध्ये गेलो आणि खार्दुंग-ला संदर्भातल्या टी-शर्ट, मग, ग्लास वगैरे-वगैरे अशा बर्याच गोष्टी विकत घेतल्या. बाहेर वातावरण फारच गार होत आणि वारा ही मजबूत सुटला होता. जास्त वेळ  तिकडे उभे राहावे असे वाटच नव्हते. मी अभिजित रावच "प्रो-ट्रेक" घड्याळ ट्रीपसाठी घेतले होते, त्यात मी बाहेरच तापमान पहिले तर ते ५ डीग्री होते. 
पटकन मी आणि उमेशने सर्व बाईक्स एकत्र  लावल्या आणि त्या भवती सर्वांना उभे करून एक एकत्र फोटो काढला. खार्दुंग-ला वर मनोसोक्त आनंद लुटून ६ वाजता लेहच्या दिशेने खार्दुंग-ला उतरायला लागलो.


आता जरा मी निवांत बाईक चालवत होतो, कारण दिवस भराच्या धावपळी मुळे थकलो होतो आणि जरा शांतता हवी होती. मी फोटो काढीत आरामात बाईक चालवत सर्वात मागे राहिलो होतो आणि मागे काय म्हणतात माझ्या व दीपालीच्या गप्पा नेहमी प्रमाणे चालू झाल्या होत्या. पण या गप्पान मध्ये नेहमी पेक्षा जरा फरक होता. आमच्या आता वैयक्तिक आयुषावर चर्चा चालू झाल्या होत्या. नेहमी मस्ती करणारे आम्ही दोघे आज गंभीर झालो होतो...... तुम्हाला वाटत असेलना अरे हे कसे काय झाले. पण शेवटी आम्ही पण माणूसच आहोत, जवळच्या मित्रान कडे मन मोकळे करतोच. या सर्वांत कधी अंधार पडायला लागला हे जाणवलेच नाही, एवढ्या गहन चर्चेत आम्ही शिरलो होतो. मस्त छान आभाळ पहिले तेव्हा जाणवले, अरेच्या अंधार पडायला लागला आणि लेहच्या पण जवळ यायला लागलो आहोत. मागच्याच बाजूने आम्ही लेह मध्ये शिरलो आणि ७.३० नंतर हॉटेल रेनबो वर गेलो. पोहोचल्यावर कळले मी खार्दुंग-ला उत्तरताना आशिष-साधना बाईक वरून पडले होते. पण फारसे तसे काय त्यांना लागले नव्हते. सकाळी सर्वांनी रूम खाली केल्या होत्या, परत नाबीने सर्वांची राहण्याची  व्यवस्थित सोय करून दिली. तसे आम्हाला एकच रात्र काढायची होती तिकडे. सर्वच फार थकलो होतो महणून आज कुठे हि उपद्याप करायला न जाता हॉटेल रेनबो मधेच जेवायचे असे ठरले आणि तसे नाबिला सांगितले. जेवणं नंतर उद्या बद्दल सर्व माहिती दिली आणि सर्व आवरायला घेतले. आमची खोली तर गोडाऊन वाटत होती आधीच आमचा सर्व पसारा आणि त्यात भर म्हणून सर्वांचे समान. दिपाली बोलली "मेल्यानो कसे तुम्ही राहतात रे, आवर आता". मग काय लागलो आम्ही आवरायला. उद्या लेह सोडायची म्हणून सर्व पॅकिंग करायला लागलो. सर्व आवरून इतके दिवस लेह मध्ये जी मजा केली आणि उद्या लेह  सोडायचे अशी मनाशी खंत बाळगून मी झोपी गेलो.