31.3.10

लेह बाईक ट्रीप - पाचवा दिवस (द्रास ते लेह)

१२ ऑगस्ट २००९, आज आम्हाला काही केल्या लेहला पोह्चायचेच होते . द्रास ते लेह अंतर होते जवळ-जवळ ३०० किलो मीटर आणि जे २ दिवस वाया गेले होते ते भरून काढायचे होते. आज आम्हाला फोटू-ला पार करून बराच कच्चा रस्ता तुडवायचा होता म्हणून ६ वाजता आम्ही सर्व तयार होऊन बाहेर आलो, पण अजून अमेय म्हात्रे आणि कुलदीप तयार नव्हते. त्यांना पटकन तयार होऊन यायला सांगितले. ते येई पर्येंत आम्ही गाडी लोड करून घेतली. उमेशने एक फुटेज घेतले आणि सर्व बाईक वर लोड होऊन कारगिल कडे निघालो. पुन्हा एकदा आम्ही "द्रास वॉर मेमोरियल" च्या रस्त्याला होतो. त्या वीर जवानांना आम्ही चलते- चलते सलामी दिली आणि न थांबता पुढे सुटलो. नागमोडी वळणाचा रस्ता कापत आम्ही कारगिल कडे मार्च करत होतो.कारगिलच्या काही किलो मीटर आधीच एक मोठा राईट टर्न घेतला आणि रस्ता नदीला लागला. इकडेच आम्हाला महार रेजिमेंट च्या जवानांची वीर गळ होती. ती पाहून आम्ही थांबलो आणि रस्त्याच्या बाजूला नदीचा परिसर हा सकाळच्या कोवळ्या उन्हाने मस्त वाटत होता. मला फोटो काढावासा वाटला, साधनाने पण वीर गळी जवळ फुटेज घेतले. याच ठिकाणी २ नदीच्या पात्रांचे संगम आहे. मी फोटो काढीत असताना एक आर्मीचा जवान जवळ आला आणि मला म्हणाला "ये जो वो वाली नदी आ रही है ना, वो मालूम है कहासे आ रही है . वो पाकिस्तान से आ रही है वो सामने वाला पर्वत पाकिस्तान है ". त्या जवानाने सांगितले "ये पाकिस्तान एरियल व्हूव के हिसाब से ४ किलो मीटर है " आणि नदीच्या पलीकडच्या बाजूने एक कच्चा रस्ता जात होता. तो रस्ता दाखवून जवान म्हणाला "अगर ये रस्ते के हिसाब से १७ किलो मीटर होता है , पाकिस्तान". तो रस्ता सार्वजनिक नसून आर्मीचा आहे आणि म्हणून सर्व साधारण माणसाला जाण्यास मनाई आहे. इकडण निघालो आणि १ किलो मीटर पण पुढे गेलो नसू आम्ही, तेवढ्यात आम्हाला दुसरे स्मारक दिसले . हे रस्त्याला लागून जरा मोठे आणि मस्त वाटत होते म्हणून आम्ही पुन्हा थांबलो. ते होते "हर्का बहादुर मेमोरियल". या मेमोरियलच्या समोरच नदीवर पुल आहे. लढाईच्या वेळेला "सुबेदार हर्का बहादुर" ने पाकिस्तानी जवानांना पुलाच्या या बाजूला म्हणजे हिदुस्तानात घुसून दिले नव्हते .या पुलाला "हर्का बहादुर ब्रीज" नाव देण्यात आले आहे. या विरालाही आम्ही वंदन करून कारगिल कडे निसटलो. प्रचंड भूख लागली होती. आता आम्ही सावलीतून उन्हात आलो होतो. सावलीत जरा गारठा होता आणि उन्हात जरा बर वाटत होते.
कारगिल शहरात शिरलो ८ वाजता, काही हि उघडले नव्हते. कसे बसे एक हॉटेल उघडे मिळाले. वास्तविक त्याला हॉटेल म्हणूच शकत नव्हतो, एक छोटीसी टपरी होती. पण मजबूत भूख लागली होती आणि तसेही आम्हाला याचा काय फरक पडतो कुठेही खायला मिळाल्याशी मतलब. मस्त गरम-गरम आम्लेट आणि मैद्याच्या रोट्या. हे कॉम्बिनेशन जरा वेगळे होते, पण आम्हाला काय फरक पडतो. पु.ल.देशपांडे याच्या नुसार "चवी पेक्ष्या उदर भरणं बरे". तो हॉटेलवाला रोट्या करत होता आणि त्याच्या हाथा खालचा पोरगा आम्लेट करत होता. ते दोघे करत होते आणि आम्हाला वाढत होते. पण आम्ही मात्र नुसते हाणत होतो. एका मागून एक असे किती खाल्ले त्याची गिनतीच नव्हती, ती त्याला तरी कशी राहिली त्यालाच ठाऊक. मस्त पोट भरून नाश्ता झाला होता, "आता दुपार पर्येंत निवांत बगुनाना......" असे मी म्हणायला मोकळा झालो होतो. एवढ्यात माझ्या फोन मध्ये अलार्म वाजला, पहातो तर माझ्या ऑफिस मधल्या बरोबरच्या एका मुलीचा वाढदिवस होता. तसे मला वाढदिवस कधीच लक्षात राहत नाहीत. पण माझा फोन ते काम बरोबर न चुकता करतो. तिच्याशी जरा गप्पा मारल्या आणि पुढे निघण्यास सज्ज झालो.
गेल्या २ दिवसा प्रमाणे, माझ्या बरोबर आजही दिपाली होती. आम्ही दोघे एकत्र म्हटले कि गप्पा आणि बडबड हे तर नक्कीच . आमच आता कॉम्बिनेशन व्हायला लागले होते. माझ्या बरोबर कोण म्हटले कि दिपाली, हे सर्व गृहीत धरायला लागले होते. उमेश आणि साधना यांना आर्मीच्या कॅम्पचे फुटेज हवे होते. याच प्रमाणे अमेय म्हात्रे आणि पूनम ने पुस्तक आणली होती वाटायला . साधनाला अजून आर्मी कॅम्प मध्ये शूटिंगसाठी परवानगी मिळाली नव्हती आणि मिळाली पण १० वाजणार होते. या सर्वाना काम झाल्यावर मागून गाडीने यायला सांगितले.पण कारण नसताना शोबितला पण गाडी बरोबर यावे लागणार होते. अमेय म्हात्रेला सांगितले कि जर साधनाला जास्त वेळ लागणार असेल तुम्ही आपली गाडी घेऊन पुढे निघा. साधना आणि उमेशला येऊ दे मागाहून दुसरी गाडी करून. कारण आमच्या गाडी मध्ये आपत्कालीन लागणार सर्व समान होते.या सर्वांचा निरोप घेऊन बाकी सर्व १० जण बाईक घेऊन पुढे निघालो. ब्रीज ओलांडून नदी पलीकडचा लेह्चा रस्ता पकडला. सरळ रस्ता झानस्करला जातो. बाईकस मध्ये पेट्रोल भरले आणि लेहच्या मार्गावर सुटलो. आता मी पुढे होतो , एक छोटस टेकाड चढून आम्ही सर्व पठारावर आलो. इतक्यात मागून आर्मीची एक जिप्सी येऊन माझ्या बाजूला थांबली. त्या जिप्सीतल्या ऑफिसर ने मला विचारले महाराष्ट्रातून कुठून आलात. मी उत्तर दिले मुंबईहून. मग तो ऑफिसर जिप्सी तून बाहेर आला. व्वाह! काय सुंदर पर्सनालीटी होती त्या ऑफिसरची, दिपाली तर फिदाच झाली होती आणि तो काय साधा सुधा ऑफिसर नव्हता, ब्रिगेडीयर होतो. कारगिल सारख्या ठिकाणी मराठी बोलणारे आणि ते पण इंडियन आर्मीच्या उच्च पदाधिकारी ब्रिगेडीयर गाडी तून बाहेर येऊन आम्ह्ची विचार पूस करत आहेत हे पाहून मनाला फार बरे वाटले. MH (महाराष्ट्र) पासिंगच्या गाड्या पाहून ते थांबले होते. चर्चान्ति कळाले कि ते नागपूरचे आहेत. मग त्यानी विचारले कुठे चालला आहात . मी म्हणालो मुलबेक, लामायेरू करून लेहला पोहोचायचे आहे. "अरे हा रस्ता तर बटालिक करून लेहला जातो", तुम्ही त्या रस्त्याने जायला पाहिजे होते. पलीकडच्या बाजूला एक रस्ता दाखवत ते म्हणाले. आता मुलबेकला जायचे असेल तर हा कच्चा रस्ता पकड, हा तुम्हाला मुलबेकच्या रस्त्यापर्येंत नेहील. १९९९ च्या युद्धातले सर्वात जास्त आणि घुसखोरीला सुरवात केलेले हेच ते बटालिक सेक्टर. ब्रिगेडियर साहेबांना जय हिंद म्हणत सलाम केला आणि त्यांचा निरोप घेऊन, त्यांनी सांगितलेल्या रस्त्या वर सुटलो. तेव्हा काढलेला हा सिंधू नदी आणि बाजूला वसलेल्या कारगिल शहराचा फोटो.
कुठे हि कॉमन ब्रेक न घेता सरळ आता मुलबेक असे ठरले. पण वैयक्तिक फोटोग्राफी साठी थांबतच होतो. पण त्याला फार वेळ लागत नाहीच, थांबलो फोटो काढला आणि निघालो. आता परिसर थोडा बदलायला लागला होता. जम्मू, श्रीनगर, सोनमर्ग मस्त हिरवळ प्रदेश, पण झोजीला पार करून हिरवळ थोडी-थोडी कमी होत चालली होती. आता सर्वत्र नुसती रक-रखात आणि उघडे- नागडे डोंगर. वाळूचे ढिगारे रचल्या सारखे वाटत होते. म्हणूनच लडाखला कोल्ड डेझर्ट असे हि म्हणतात. मला नवीन आणि निराळा प्रदेश असल्या कारणास्तव मी जरा जास्त थांबून फोटो काढत होतो. तसा कुठेही मोठा ब्रेक न घेता आम्ही लोचुम्ब या गावा जवळ आलो. वास्तविक आमचा मुलबेक सोडले तर कुठेही थांबायचा प्लान नव्हता. पण जसे आम्ही ठरवतो तसे कधीच होताच नाही. पाहतोतर ट्राफिक जाम, आम्ही बाजूने बाईकस काढल्या आणि पुढे गेलो. रस्ता फारच छोटा होता, जेमतेम एक ट्रक जाईल इतकाच. आमच्या बाजूने एक ट्रक आणि त्याच्या मागे गाड्या लागल्या होत्या. समोरच्या बाजूने २५ एक आर्मीच्या ट्रकचा कोंव्होय लागला होता. बोंबला.... आता परत अडकलो कि काय असे वाटायला लागले होते. पण नाही कसेबसे डावी-उजवी कडून एक-एक ट्रक पार करत होतो आणि एका ट्रक जवळ जेमतेम एक बाईक जाईल एवढीच जागा होती. अभिने आपली डिस्कवर घातली, आता माझी पाळी होती. मी हळू-हळू एक-एक पाय टाकत माझी जड बाईक डाव्या बाजूला पेलवत काढत होतो. एक क्षणाला मी उजवा पाय जमिनीला लावताच पायाखालची जमीन ढासळली आणि बाईक उजवीकडे पडायला लागली. मला तर असे वाटले कि आम्ही पडलो आता. एवढ्यात बाईक उजवीकडे जायची थांबली आणि मी पटकन सर्व वजन डावीकडे टाकले. मागे वळून पाहोतोतर दीपालीने डाव्या हाताने ट्रक पकडला होता. काय डोकं वापरल कार्टीने आणि म्हणूनच आम्ही पडायचे वाचलो. नाहीतर मजबूत आपटलो असतो, किमान ७-८ फुट तर होतोच खाली.व्वाह! पिलियन रायडर असावा तर असा, जो बाईकवर मागे बसून सुद्धा काय चालल आहे त्या कडे संपूर्ण लक्ष ठेवणारा. मला आश्चर्य वाटले कि दिपाली मागे बसून एवढी प्रसंगावधन असेल. बाईक ट्रिप्ससाठी पिलियन रायडर असेच प्रसंगावधन असणे गरजेचे आहे आणि दिपाली बद्दल या बाबतीत प्रश्नच नाही. दिपाली लांब पल्ल्याच्या बाईक ट्रीपसाठी परफेक्ट पिलियन रायडर आहे, हे मी माझ्या अनुभवा वरून नक्कीच सांगू शकतो. काही लोकांच्या मदतीने मी बाईक हळू-हळू पुढे काढली. मागो माग सर्वनी बाईकस काढल्या. आता पुढे जाणे काही काही शक्य नव्हते, मग २ ट्रकच्या मध्ये आम्ही बाईकस लावल्या आणि मस्ती करत ट्राफिक सुटायची वाट बघत बसलो. ट्राफिक जाम काय फार वेळ राहिले नाही. आर्मीचे ट्रक जरासा पुढे हले आणि आम्हाला जराशी जागा मिळाली. हि संधी साधून आम्ही निसटलो. मग परत डावी-उजवी करून कोंव्होयच्या मधून आम्ही एकदाचे निघालो. या ट्राफिक जाम मध्ये तास भर वेळ गेलाच आणि आता ११ वाजून गेले होते. कुठेही न थांबता (फोटोग्राफी शिवाय) थेट मुलबेकला पोहोचलो.

लड़ाख हा "लामा" लोकांचा प्रदेश आहे आणि लामांच अध्यात्मिक अभ्यास स्थान म्हणजे "गुम्पा". मुलबेकला पण अशीच गुम्पा आहे. मुलबेकला पोहोचे पर्येंत आम्हाला १२ वाजून गेले होते. गुम्पा बघून मग जेवायचे असे ठरले. गुम्पा तशी काय फार मोठी नव्हती. गुम्पाच्या अंगणात दगडावरती एक भली मोठी उभी मूर्ती कोरली होती, बहुदा गौतम बुद्धांची असावी. शिरलो तर खोली मध्ये अंधुक प्रकाश होता. समोरच काचे मध्ये गौतम बुद्धांची आणि त्याच्या अधिकारी शिक्षांच्या प्रतिमा होत्या. भिंतीन वर प्रसंग चित्र आणि सुंदर नक्षी काढली होती. आम्ही सर्व गुम्पा न्याहाळून पहिली आणि गौतम बुद्धांना वंदन करून बाहेर अंगणात आलो. अंगणातच एका बाजूला एक मोठी घुमती घंटा होती. वास्तविक त्याला घुमती घंटा नाही बोलू शकत कारण मध्य भागी एक मोठा लाकडाचा ठोकळा असतो आणि घंटा बाजूला बांधलेली असते. ठोकळ्यालाच वरच्या बाजूला आडवी दांडी असते आणि खाली धरून फिरवायला रिंगण असते. ठोकळ्याच्या मध्य भागी छान रंगेबिरंगी नक्षी काम केले असते. या ठोकळ्याला धरून एक प्रदक्षिणा मारली कि घंटा वाजते. बहुदा एक प्रदक्षिणा मारली कि एक नामस्मरण होते अशी प्रथा असेल. म्हणूनच जास्तीच-जास्त प्रदक्षिणा मारल्या म्हणजे जास्तीच-जास्त नामस्मरण झाले अशी समजूत असावी. मग आम्ही पण थोड्याशा प्रदक्षिणा मारल्या आणि फोटो काढले. गुम्पाच्या समोरच एक हॉटेल सारखे काही तरी होते, पण आता जाऊन पहिले तर काहीच खायला मिळणार नव्हते. मग काय कुलदीप बिस्कीट घेऊन आला आणि आम्ही चहा-बिस्कीट ढोसले. अमेय म्हात्रेला फोन लावला आणि कळाले कि साधनाला परवानगी मिळाली नव्हती म्हणून ते गाडी घेऊन पुढे निघाले. साधना आणि उमेश दुसरी गाडी घेऊन माघाहून येऊन रात्री पर्यंत लेह गाठतील . सर्व आवरून आम्ही मुलबेक सोडे पर्येंत १ वाजत आला होता. या हॉटेलच्या बाहेरच मला हे कॉको-कोलाचे धूळ खात असलेले क्रेट दिसले. हे पाहून आपण अंदाज लाऊ शकतो कि किती कमी रहदारी आहे इकडे. बहुदा म्हणूनच काही खायला नसावे.
आमच पुढचे लक्ष होते "नामिके-ला" आणि "फोटू-ला". आता निसर्ग संपूर्ण बदललेला होता. नीळ भोर आभाळ, सोनेरी रेतीचे डोंगर आणि याच डोंगरातून कोरलेले रस्ते. नामिके-ला चा रस्ता पण मातीचाच होता. मला हा प्रदेश फार आवडला होता. शाम मंचर यांच्या लडाख फोटोग्राफी मध्ये बहुदा हेच पाहून मी लडाखला यायचा विचार केला असेन. पण परिसर मस्त होता मला खूप आवडला होता. रख-रखित वाळवंट पण निसर्गाची सुरेख निर्मिती. सर्व बाईकस आता माझ्या पेक्षा पुढे होत्या आणि मी फोटो काढत माघाहून येत होतो. पण या बाबतीत मला बाईकने फार साथ दिली. मी फोटो काढायला थांबलो कि बाकी सर्व पुढे जायचे आणि मागून मी त्यांना गाठत होतो. भल्या-भल्या चढाला सुद्धा बाईकने दगा नाही दिला. अशा वेळी मला माझ्या विक्टरची आठवण येऊन जायची. विक्टर असती तर नसती चढली. नामिके-ला टोपं च्या काही किलो मीटर अलीकडेच बघतोतर कुलदीपची "यामाहा एफझी" भग-भगायला लागली. बघितले तर गाडी गरम झाली होते. मी थोडी चालवून पाहिली तरी तेच. रोहन आणि अभी पुढे निघून गेले होते. तेवढ्यात माघाहून एक ट्रक आला, त्याला सांगितले कि "आगे २ बाईकवाले दिखे तो उनको रुकने को बोलो और कहना तुम्हारे दोस्त की बाईक बंद पड़ी है ". मग बाईक थंड होण्याची वाट पाहत राहिलो. दुसरा तसा काय पर्याय हि नव्हता, उन्हात तापण्या शिवाय. तेवढ्यात एक मारुती ८०० आली. कुलदीपला सांगितले कि तू यांच्या बरोबर निघ, आम्ही बाईक सिंगल सीट घेऊन येतो. माघाहून आम्ही कसे-बसे बाईक घेऊन रोहन-अभी पर्येंत पोहचलो. तिकडे सर्व आमची वाटच पाहत होते. पुन्हा बाईक थंड करायला ठेवली आणि फोटोग्राफी करीत बसलो. तेव्हा हा काढलेला फोटो......

उन्हातच थोडासा आराम केला आणि पुढे जाण्यास निघालो. दूर-दूर पर्येंत झाड नाही म्हणून कुठे सावली हि नाही, नुसत रख-रखित ऊन . इथून निघालो आणि लगेचच नमिके-लाच्या "वाखा" पोस्टला पोहोचलो. सर्व फोर्मालीटी करून लगेच आम्ही पुढे निघालो. आता जरा उतरण होती आणि लक्ष होते फोटू-ला. अधून-मधून फोटोग्राफी करती आम्ही रस्ता कापत होतो. अभी पहिला, मग रोहन आणि मागे मी. असे आम्ही तिघे एकत्र होतो. कुलदीप आणि आदित्य बरेच मागे होते. आता आदित्याची पल्सर पण भुग-भूगायला लागली होती आणि कुलदीपची बाईक तर त्रास देतच होती. ते मध्ये-मध्ये बाईक थांबून थंड करून मग निघायचे, म्हणून आम्ह्च्या आणि त्यांच्यात अंतर पडले. मधेच एका वळणावर समोरून आर्मीचा ट्रक आला. तो ट्रक तर संपूर्ण रस्ताच वापरत होता, म्हणून आम्ही रस्ता सोडून बाजूने बाईक हळू घेतली. बघतो तर काय ट्रक वर बोफोर्स तोफा लाधल्या होत्या, ५-६ ट्रक होते. मला फोटो काढायची इच्छा झाली होती, पण काय वेळच नहीं मिळाला.
आता पुन्हा चढण लागले. आम्ही फोटू-ला चढत होतो. रस्ता सुंदर होता , नवीन करकरीत डांबरी आणि मोठा रस्ता होता. जरा फोटो काढले आणि बाईक पळवायला लागलो, कारण रस्ता चांगला असल्या मुळे वेळ घालवायचा नव्हता. अजूनही कुलदीप आणि आदित्य मागेच होते, पण आता फोटू-ला च्या टॉपला जाऊनच थांबायचे असे ठरले. रोहन आणि अभी पुढे निघून गेले होते, मी मस्त फोटो काढत चाललो होतो. रोहन आणि अभी नंतर थोड्या वेळाने मी पण फोटू-ला टॉपला पोहोचलो. फोटू-ला च्या बोर्डच्या सावलीतच आम्ही कुलदीप आणि आदित्यची वाट पाहत बसलो. आता ३ वाजून गेले होते, भूख लागली होती म्हणून बरोबर आणलेले ड्र्यफ्रुट्स खायला लागलो. फोटू-ला हा श्रीनगर ते लेह ह्या मार्गावरचा सर्वोच्च उंच पॉइंट आहे. फोटू-ला ची उंची १३,४७९ फुट आहे आणि आमची या ट्रीप वर अजून पर्येंत गाठलेली सर्वोच जास्त उंची आहे. बसून बसून कंटाळा आला म्हणून मी फोटो काढायला लागलो. तेवढ्यात एक ट्रक आला, त्या ट्रकवाल्याला विचारले "आपने कोई बाईकस देखी क्या पीछे" तो ट्रकवाला म्हणाला "आपका आदमी लेकर आया हु मे" आणि बघतोतर काय ट्रक मधून आशिष उतरत होता. मी आशिषचा फोटो काढला आणि बाईकस बद्दल विचार-पूस चालु केली. आशिष बोलला चामायला कुलदीपची एफझी डबल सीट चढतच नव्हती. सारखी बंद पडायची आणि अधून मधून आदित्यची पल्सर पण, म्हणून मी ट्रकने आलो. थोड्या वेळाने आदित्य आणि कुलदीप पण आले. आम्ही त्याचं फोटोग्राफी आणि टाळ्यांनी स्वागत केले. पाठो-पाठ आमची गाडी पण आली, तसा जास्त वेळ न घालवता आम्ही फोटू-ला टॉप वरून सुटलो. या सर्वांत ४ वाजले होते आणि आता आम्हाला लेह गाठायला रात्र हे नक्कीच असे वाटत होते. आम्ह्च पुढच लक्ष होते "लामायेरू".



फोटू-ला टॉप सोडला आणि सर्व उतरण लागले. उतरण म्हटले की आमच्या बाईक जरा जास्त वेग घेतात पण सावधपणाने. ३०-४० मिनटातच आम्ही "लामायेरू" च्या वरच्या रस्त्याला पोहोचलो. इकडन उजवी कडचा रस्ता लामायेरू गुम्पा कडे जातो, पण हा रस्ता पूर्ण झाला नाही म्हणून बंद होता आणि डावी कडून लेहचा रस्ता. आमच्या गाडीच्या ड्रायवरने सांगितले की " आगे से एक रस्ता है , चलके जा सकते हो". मग आम्ही डावीकडचा लेहचा रस्ता पकडला. लगेच लामायेरूचा पायी जाण्याच्या रस्त्याला थांबलो. अभी आणि रोहन जरा पायी खाली जाऊन रस्ता पाहून आले, तर त्यांना मजबूत धापा लागल्या होत्या. जरासे उतरून चढल्यावर एवढ्या धापा लागल्या होत्या मग संपूर्ण लामयेरू पर्येंत जाऊन परत वरती येणे म्हणजे वाट लागली असती. हवेतल ऑक्सिजनचे कमी प्रमाण बाईक वरती फार काय जाणवत नव्हते, पण जराशी चढ उतार रोहन आणि अभिने केल्याची पाहून आम्हा सर्वाना जाणवायला लागले होते. वास्तविक लामायेरू गुम्पाला जायचा मुख्य रस्ता आहे पण हा घाट संपूर्ण खाली उतरून मग परत वरती लामायेरू पर्येंत दुसर्या बाजूने चढायचे , म्हणजे २५-३० किलो मीटरचा वळसा. या डोंगरात २५-३० किलो मीटर म्हणजे भरपूर अंतर होते आणि शिवाय ५ वाजत हि आले होते.आमचे उधिष्ट आता लेह होते आणि त्याला हि रात्र होणार हे माहित होते. शेवटी पर्याय नाही म्हणून लामायेरू गुम्पा बघायची नाही असे ठरले. माझ्या सहित बरेच जण नाराज झाले होते, कारण लामायेरू गुम्पा हि लडाख परिसरातली सर्वांत श्रीमंत गुम्पा आणि पाहण्या सारखी होती. पण आमच्या ग्रुपचे पूर्वानुभव मला, अभी आणि रोहनला माहित होते म्हणून मी पण लामायेरू गुम्पा पाहण्यास जास्त भीड घातली नाही. लामायेरू गुम्पा फोटो स्वरूपातच पहिली आणि आम्ही लेहसाठी प्रस्थान केले. थकल्या मुळे दीपाली गाडीत गेली होती आणि शोबित माझ्या बरोबर होता. आता पुन्हा उतरण होते आणि रस्ता थोडा खराब होता. वरून रस्त्यावर बारीक खडी पण होती, त्यामुळे बाईक जरा हळू चालवावी लागत होती. थोड्या वेळाने मधेच आर्मीच्या जवानाने आम्हाला थांबवले आणि म्हणाला "आगे नहीं जा सकते आपको रुकना पड़ेगा, सुरुंग लगा रहे है ". मग काय थांबलो, अभिजीतने तर लगेच रस्त्यावर पथारी पसरली आणि मस्त एक १५-२० मींटानची झोप काढली. आमची गाडी पुढे निघून गेली होती आणि वरून आम्हाला दिसत होती. सुरुंग लागला आणि आम्ही निघालो, नुसता उतारच होता. बरच खाली उतरून आल्यावर मधेच एक रस्ता लामायेरू गुम्पा कडे फुटतो , हीच ती लामायेरू गुम्पा कडे जाण्याची मुख्य वाट. पण आम्ही लेहच्या दिशेने निघालो. संपूर्ण घाट उतरून ९६०० फुट उंचीवर खालत्से गावा मध्ये लेहच्या पठारावर उतरलो तेव्हा ६ वाजले होते. उजवी कडे एक छोटासा ढाबा दिसला. कोणासही काही न विचारता सर्वच बाईकस लगेच थांबल्या , तशी सर्वानाच भूख लागली होती आणि ते साहाजिक आहे. सकाळी नाष्ट्या नंतर चहा-बिस्कीट, ड्र्यफ्रुट्स आणि पाणी सोडले तर तसे काहीच पडले नव्हते. विचित्र असलो तरी शेवटी माणूसच आहोत आम्ही, उपाशी पोटी तरी किती गाडी चालवणार.
तसे सर्वच थकले होते, तोंड-हात धुऊन जेवणाची ऑर्डर केली. जेवायला मस्त चपाती-भाजी, दाल-चावल, मॅगी, ऑमलेट असे भरपूर खायला होत. आप-आपल्या आवडी नुसार सर्वांनी ऑर्डर सांगितली, पण जे पहिले येत होते त्याच्यावर सर्व मिळून ताव मारत होते. जवळ-जवळ अर्ध-पाऊण तास जेवण करून आम्ही बाहेर निघालो. दिवस भरात पाणी संपले होते म्हणून ते हि भरून घेतले. तेवढ्यात माझे लक्ष गेले अभिच्या बाईकला अडकलेल्या तारे कडे. मी आणि अभिने तार काढली तेव्हा कळले कि किमान २-२.५ मीटर तार चैन स्पोकेत आणि टायरच्या मध्ये अडकली होती. ७ वाजत आले होते आणि आता अंधारातच आम्हाला पुढेचे ९० किलो मीटर बाईक चालवायची आहे, म्हणून मी हेल्मेटच वायझर धुऊन घेतल आणि निघालो. आम्ह्ची गाडी सुद्धा पुढे खालत्से गावातच खायला थांबले होते. नुसरा-उलेटोप अशी एकामागुन एक गावे अंधारात पार करत आम्ही लेहकडे सरकत होतो. खालत्से सोडल्या पासून आता पर्येंत आणि पुढचा सर्व लेह पर्येंतचा रस्ता मस्त होता. सर्वात पुढे गाडी, मध्ये कुलदीप आणि मागे रोहन असे होते. थोड्या अंतरावर मी, आदित्य आणि अभी असे होतो. मिन्नूच्या जवळ माझ्या बाईक मधले पेट्रोल जरा कमी झाल्याचे मला जाणवले. बाईक बाजूला थांबली आणि अभिच्या डिकीत असलेले स्पेयर पेट्रोल जे घेतले होते, ते मी बाईक मध्ये टाकले आणि इकडनंच अभिने लेह मध्ये राहण्यासाठी बुक केलेल्या रेनबो हॉटेलला फोन लावला. त्याला सांगितले कि आम्ही ११ वाजे पर्येंत लेहला पोहोचतो. आता ९ वाजले होते, जरा पाणी पिऊन आम्ही पुढे निघालो. थोडेसेच किलो मीटर पुढे गेलो आणि रोहन-शमिका एका गुरुद्वार्याच्या दारात थांबलेले दिसले. आम्ही थांबलो आणि विचारले काय झाले बाबा.... मनात उगाचच दुर्विचार येऊन गेले, पण तसे काही नव्हते. रोहन म्हणाला अरे तुमचीच वाट पाहत हळू-हळू चालवत होतो आणि लाईट दिसली म्हणून थांबलो. गाडी आणि कुलदीप तर पुढे निघून गेले सुसाट. आम्ही म्हणालो च्यामायला दिवस भर त्याच्या बाईकने रडून रस दिला आणि आता साला बाईक पळवतोय. तोडस हास्य पुक्ले आणि आम्ही पुढे लेह साठी पारायण केले.
आता शेवटचे ३०-३५ किलो मीटर राहिले होते. मधेच थोड्या वेळाने, मी ५०-६० ला पळवत असलेले बाईक एकदम खेचल्या-खेचल्या सारखी वाटायला लागली आणि माझा वेग ३०-४० ला आला. बाईक रेमटोतोय तरी ३०-४० च्या पुढे जाइच ना, मला काय त्यावेळेला कळालेच नाही. मग नंतर असे वाटले कि, आपण "मॅगनेटिक हिल" च्या मधून गेलो तर नाही ना. खरोखरच आम्ही "मॅगनेटिक हिल"च्या मधून चाललो होतो. २-३ किलो मीटरचा पट्टा गेला आणि पुन्हा बाईक ५०-६० च्या स्पीडला आली. पट-पट आम्ही लेहच्या जवळ-जवळ चाललो होतो. आता लेहच्या हद्दीत शिरलो, हे रस्त्यावरच्या उजेडा वरून जाणवत होते. लेह शहराच्या ८-१० किलो मीटर अलीकडे लेह विमानतळ आहे. तिकडन आम्ही पास झालो आणि थेट लेहच्या मुख्य चौकात येऊन पोहोचलो. या चौकातच मनाली कडून लेह कडे येणारा रस्ता पण मिळतो. लेह शहर पाहून एवडे मोठे शहर असले असे वाटले नव्हते. मला तर हादरलो होतो, कारण नाही म्हटले तरी तसे बरेच मोठे शहर वाटत होते. गाडी, कुलदीप आणि अमेय म्हात्रे हॉटेल वर पोहोचले होते. मग अमेय म्हात्रेला फोन लावला आणि आम्हाला हॉटेलचा रस्ता दाखवण्यासाठी येण्यास सांगितले. अमेय म्हात्रे आला आणि मग आम्ही सर्व रेनबो हॉटेल वर पोहोचलो. हॉटेल वर बाईक उभ्या केल्या आणि सर्वांनी आरडा-ओरड सुरु केली, एकदाच लेह गाठले म्हणून असेल बहुदा. ११ वाजले होते आणि सर्वच फार थकले होतो आता. हॉटेलचा मालक नबी आणि त्याची बायको आमची वाट बघतच होते. त्यांनी आम्हाला आप-आपल्या रूम दाखवल्या आणि बोलले "फ्रेश होकर जल्दी खाना खाने के लिये आ जाना", "बिना खाना खाए सोना नहीं हा" वरून असे हि म्हणाले. आता मात्र माझे रूम पाटनर बदले होते. मी, आदित्य आणि शोबित. हॉटेलच्या तळ मजल्याला मधली खोली होती. बाजूलाच दिपाली आणि साधला रूम मिळाली. म्हणजे सर्व मस्ती करणारे एकत्र. पटा-पाट सर्व फ्रेश होऊन जेवयला, अंगणात मांडलेल्या टेबल वर आले. लेहला पोहोचल्याच जशन म्हणा किंवा आमच्या नेहमीच्या सवई ने म्हणा ना, आमची जेवताना मस्ती चालू होती. तेवढ्यात माझ्या बाजूच्या रूम मधून एक फिरंग बाहेर आला आणि नबीच्या बायकोला उदेशून म्हणाला "I have paid for this night, I want to sleep. I have a flight early morning". मग त्याने आम्हाला राग दिला आणि पुन्हा आत गेला. आम्ही तर हा सर्व प्रकार पाहून जोरात त्याच्या पुढ्यातच हसायला लागलो आणि आम्ही आता कसले ऐकतोय. आम्ही अजून मोठ्या आवाजात मस्ती करायला लागलो, "असे नाटक इंडियात चालणार नाही.......... आपण त्याला त्याच्या बायको बरोबर तो मस्ती करत असताना तर नाही ना त्रास दिला.........." आणि वगरे-वगरे. आम्ही कसले सोडतोय त्याला राग देतो काय आम्हाला. वास्तविक पहिल्यांदा त्याला त्रास दयाचां असे आम्ह्चे काही नव्हते , पण राग दिल्यावर मात्र मुदामून . शेवटी नबीच्या बायकोने आम्हाला सांगितले "Please, फिर वो मुझे चिल्लाएगा और उसका सुबह जल्दी फ्लाईट है ". मग मात्र आम्ही गप्प बसलो. संपूर्ण गप्प बसलो असे हि नाही, पण आवाज मात्र हळू चालला होता. कारण कशाला उगाचच तिच्या होटेलच नाव खराब करा. जेवणा नंतर हळू आवाजातच आम्ही मीटिंग घेतली. तेवढ्यात १२ वाजे पर्यंत उमेश आणि साधना पण आले. मी इकडे-तिकडे काहीना काही तरी करत बसलो. उद्या आम्हाला तसे काय लवकर उठायचे नव्हते. थोडा वेळ आरामात रेगाळत बसलो आणि मग झोपायला गेलो.

22.3.10

लेह बाईक ट्रीप - चौथा दिवस (सोनमर्ग ते द्रास)

११ ऑगस्ट २००९, सकाळी नेहमी पेक्षा जरा लवकर ४ वाजता उठायचे होते, पण मला जरा आळस भरला होता. खर सांगायला गेल तर तो नेहमीच असतो, पण सोनमर्गच्या त्या  पहाटेच्या  थंडीत आळस जरा जास्तच चढला होता. शेवटी रोहनने मोठ्याने फोनवर "कोंबडी पळाली... तंगडी धरून... लंगडी घालाया लागली..." गाण लावल आणि सर्वाना लाथा मारून उठवू लागला. कारण आज आम्हाला कागदी प्लान नुसार लेह पर्यंत पोहचायचे होते. रूम मध्ये एकच बाथरूम होते, म्हणून सर्व मुलांना बाहेर कॉमन बाथरूम मध्ये जावे लागे. एवढ्या थंडीत पाण्यात हात घालायला पण फाटत होती, मग पुढचा तर विचारच करवत नव्हता. कसे बसे प्रा:त विधी उरकून आम्ही सर्व सामान बांधून तयार होऊन बाहेर आलो. गाडीचा ड्रायवर रात्री झोपायला खाली गावात गेला होता तो काय ठरल्याप्रमाणे वरती आला नव्हता. मग रोहन खाली ड्रायवरला उठवायला गेला व नाश्त्याची पण ऑर्डर करायला सांगितले. आम्ही वरच गाडीची वाट पाहत राहिलो, कारण गाडीत सामान लोड करायचे होते. गाडी येई पर्यंत आम्ही सोनमर्गची पहाटेच्या वेळेची फोटोग्राफी करत होतो. काल सोनमर्गला अंधार पडत असताना आलो होतो म्हणून सौंदर्य पाहण्यास मिळाले नव्हते. पहाटेच्या वेळी सोनमर्ग फार सुंदर दिसत होते. गाडी आली आणि सामान लोड करून आम्ही खाली नाश्त्याला गेलो. मस्त गरम-गरम ऑम्लेट ब्रेड खाल्ले व पाणी भरून घेतले. नाश्ता करून बाहेर आलो आणि पाहतो तर ड्रायवर गाडी बंद करून गायब झाला होता. बराच वेळ त्याची आम्ही शोधा-शोध करीत होतो, तरी तो काय मिळेना. आता हा ड्रायवर डोक्यात जायला लागला होता, थोडीशी हुज्जत घातली त्याच्या बरोबर आणि आम्ही पुढे जाण्यास निघालो.

जम्मू ते सोनमर्ग रस्ता संपूर्ण डांबरी आणि चांगला होता. आम्ही सोनमर्ग सोडले आणि लगेचच झोजीला चढायला सुरवात केली. हा रस्ता आता पर्यंतच्या रस्त्यान पेक्षा एकदम विरुद्ध होता, मातीचा आणि खडतर. रस्त्याच्या मध्ये काही वाहते नाले हि होते. ऑगस्ट महिना म्हणजे हिमालयातला उन्हाळा, म्हणून या नाल्यांना पाणी कमी होते आणि म्हणूनच सहजच पार करता येत होते. झोजीला आम्ही टप्या-टप्याने पार करत हळू-हळू उंचीही गाठत होतो. झोजीला हा आमच्या  प्रवासातला पहिला पास होता आणि तसाही तो प्रसिद्ध आहे त्या परिसरात. रस्ता फारच खराब होता, म्हणून मला बाईक चालवण्याकडे जास्त लक्ष द्यावे लागत होते. मधून-मधून मी बाईक थांबवून फोटो काढत हि होतो. परिसर फार सुंदर होता. उंच-उंच डोंगर आणि डोंगरांच्या मधून वाहणारी सिंधू नदी. याच नदीच्या बाजूने एक वाट अमरनाथला जाते असे हि कळाले. तेवढ्यातच आम्ही घुमरी चेकपोस्टला येऊन पोहचलो. हा आमच्या प्रवासातला पहिला चेकपोस्ट होता आणि पुढे भरपूर चेकपोस्ट पाहायला मिळणार होते. इकडे सर्वांचे नाव, बाईकचे नंबर, लायसन्स नंबर द्यावे लागते कारण आता आम्ही "हाय सेनसिटीव झोन" मध्ये प्रवेश करणार होतो. १९९९ साली जी कारगिलची लढाई झाली, ती याच  प्रदेशात. घुमरी, द्रास, कारगिल, बटालिक या सर्व परिसरात पाकिस्तानी शत्रूंनी घुसखोरी केली होती. आर्मीची सर्व फोर्मलीटी करून आम्ही पुढे निसटलो. झोजीलाची सर्वोच्च उंची ११,५७५ फुट आहे आणि आता सर्व उतरण होती, जेवढे चढलो तेवढच जवळ-जवळ उतरायचे होते. पण रस्ता मात्र तसाच. हळू-हळू आम्ही उतरत होतो आणि अधून-मधून  फोटोग्राफी हि करत होतो. १०,३०० फुटावर असलेल्या मेणामार्ग चेकपोस्ट जवळ आलो. चार चाकी गाड्या एका रांगेत उभ्या होत्या. आम्ही एकदम पुढे जाऊन बाईकस लावल्या आणि आर्मीच्या फोर्मलीटी करायला लागलो. एवढ्यात एक व्यक्ती आली आणि आम्हाला म्हणाली "कुठून आला, मुंबई वरून का?". ती व्यक्ती होती आपल्या मराठी रंगभूमीचे कलाकार "प्रदीप वेलणकर". मग भरपूर गप्पा झाल्या. वास्तविक ते आमच्या MH-02, MH-04 च्या बाईकस बघून आमच्या कडे आले होते. त्यांच्या बरोबर आम्ही फोटो काढले आणि पुढे निघालो. इकडेच आम्हाला कळाले कि ब्रिज अजून चालू नाही झाला आहे. ब्रिजच काम चालू आहे आणि बहुदा दुपार पर्यंत सुरु होईल असे हि कळाले. शेवटी पर्याय नाही म्हणून आम्ही रस्ता जिथ पर्यंत चालू आहे तीथ पर्यंत जायचे ठरवले. थोडा वेळच बाईकस चालवून माताइन गावा जवळ पोहचलो आणि पाहतोतर काय भली मोठी गाड्यांची रांग लागली होती. आमच्या ड्रायवरला रांगेत गाडी लावायला सांगितली आणि आम्ही बाईक घेऊन एकदम पुढे गेलो. आर्मीचे जवान आणि काही कामगार ब्रिज दुरुस्त करायचे काम करीत होते.  तासा भरात ब्रिज चालू होईल असे हि कळाले. साधना आणि उमेशला इकडे फुटेज घ्यायचे होते. मला, कुलदीप आणि अमेय म्हात्रेला पण फोटो घ्यायचे होते. पण आर्मीचे पोस्ट आणि आर्मी संदर्भात कुठले हि फोटो त्यांच्या परवानगी  शिवाय काढू नका असे काही अनुभवी व्यक्तींनी आम्हाला सांगितले होते. मग साधना, उमेश आणि कुलदीप प्रेसवाले आहेत म्हणून पुढे आणि मागे मी असे सर्व परवानगीसाठी आर्मीच्या जवानाकडे. त्या जवानाने त्याच्या  सीओ कर्नलला विचारले. त्या कर्नलने तर नाकावरून माशी झटकावी तसे आम्हाला उडून लावले. परत थोड्या वेळेने त्याने च आम्हाला परवानगी दिली. थोडे फोटो काढून इकडे-तिकडे मी टाइमपास करत बसलो. मग काटला आला म्हणून मी मागे गाडी कडे आलो. बराच वेळ आम्ही इकडे-तिकडे काहीना काही तरी करत बसलो. आता कंटाळा यायला लागला होता आणि डोक्यावर ऊन ही रण-रणत होत. मग मी, अभी, दिपाली, शोबित आणि आदित्यने २ बाईकच्या मध्ये अंतर ठेऊन, बाईकच्या वर चादर पसरली आणि त्या सावलीत आम्ही आमची पथारी पसरली. येत जाता लोक आमच्या कडे पाहून हसत होते, पण आम्हाल कसला काय फरक पडतो. दीपालीच्या भाषेतच बोलायचे झाले तर "निर्लजच मेली कार्टी आपण". पण आता इथे हि कंटाळा यायला लागला होता आणि सर्वांनाच सावलीत बसायचे होते. गावच्या शाळेच्या अंगणात जाऊन आम्ही सर्व बसलो. नुसत ताटकळत बसायला कंटाळा येत होता. आशिषने तर तिकडेच बसल्या-बसल्या झोप काढायला सुरवात केली. मी  त्याला साथ द्यावी म्हणून त्याच्याच मागे आडवा पडलो आणि  निवांत  झोपी  गेलो. तेव्हा दीपालीने काढलेला हा माझा फोटो.........

मस्त झोप झाल्यावर मी ब्रीज बद्दल चौकशी करायला लागलो. कळाले कि अजून काम चालू आहे थोडा वेळ लागेल. आता दुपार उलटून गेली होती. डोक्यावर रण-रणत ऊन आणि भूख हि लागली  होती . मी गावात कुठे काय खायला मिळते काय पाहून आलो, पण कुठेच काय खायला मिळण्यासारखी सोय नव्हती. ताटकळत बसण्यापलीकडे काही पर्याय नव्हता. मला यावेळी पु. ल. देशपांडे यांच्या "म्हैस" या कथा-कथनाची आठवण झाली. कसे प्रवासात अडकलेल्या माणसांचे हाल होतात आणि त्यातील मजा मस्ती याची आठवण झाली. कंटाळा आला म्हणून सारखे इकडे तिकडे ये-जा चालू होती. तेव्हा काढलेले कही फोटो.......................

 
 

शेवटी वैतागून मी परत ब्रीज जवळ गेलो. पाहतोतर ब्रिजच काम संपले होते आणि आवरा-आवरी चालू होती. पळत मागे येऊन आम्ही सर्वाना तयार राहायला सांगितले. अमेय म्हात्रे, कुलदीप, आदित्य, ऐश्वर्या, पूनम हे सर्व शेतातून नदी किनारी मजा करायला गेले होते. त्यांना ही बोलवून आम्ही सुटलो. माझ्या बरोबर आता उमेश होता कारण दीपालीला कंटाळा आला होता म्हणून ती गाडीत बसली होती. भलतीच मोठी रांग होती म्हणून बाईकस आम्ही शेतातून काढली आणि एकदम पुढे जाऊन पोहचलो. आर्मीच्या जवानाने बाईकस पाहिल्या आणि "ये बाईकस को पेहेले जाने दो" आणि आम्हाला पुढे घेऊन पहिले पाठवले. ब्रीज वरून निसटलो आणि पाहिले तर पलीकडच्या बाजूला पण तेवढीच मोठी रांग लागली होती. आमची गाडी बरीच मागे होती आणि त्यांना सर्व लोच्यातून सुटायला वेळ लागणार होता, म्हणून आम्ही थेट द्रासला भेटायचे ठरवले. मी आणि उमेश एकत्र होतो म्हणून अधून मधून फोटोग्राफीसाठी थांबायचो. पण रस्ता छान होता म्हणून कवर पण करत होतो. मध्येच द्रासच्या थोड अलीकडे "Tiger Hill"चा बोर्ड पाहून आम्ही सर्वच थांबलो. फोटो काढले आणि तिकडे शहीद झालेल्या जवानांना वंदन करून आम्ही निघालो. बऱ्याच गाड्या आम्हाला ओवर टेक करून पुढे गेल्या होत्या. द्रासला पोहचलो आणि सर्वीकडे गर्दीच गर्दी. कारण सर्व जण द्रासला खायला थांबले होते. तसे सर्वच दिवस भर उपाशी होते. आम्हाला पण प्रचंड भूख लागली होती. पण ठरलेल्या प्लान नुसार आज आम्ही लेहला पाहिजे होतो. आम्ही लेह मध्ये जे बुकिंग केले होते त्याला कळवायचे होते. पण त्याला काही फोन लागेचना, तेवढ्यात सर्वानी आपल्या घरीही फोन करून घेतले. मी आणि अभी सारखे त्याला फोन लावायचा प्रयत्न करीत होतो. बाकी सर्वाना जेवणाची सोय करायला पाठवले. मग गाडी आल्यावर सर्वानी मजबूत जेवण हाणले. तसे सर्व दिवस भर उपाशीच होते म्हणून साहजिक होते ते.ऐश्वर्याची तब्बेत काही बरी होताच नव्हती, म्हणून तिला आदित्य डॉक्टर कडे घेऊन गेला. मी आणि अमेय म्हात्रे १०० मीटर वर असलेल्या सरकारी (J&KTDC) च्या  रेस्ट हाउस मध्ये राहण्याची सोय होऊ शकते काय म्हणून पाहायला गेलो. एकमत करून आम्ही आज द्रासलाच राहायचे ठरवले, कारण आज दिवसा उजेडी फार फार तर आम्ही कारगील पर्यंत जाऊ शकलो असतो आणि आज बाकी सर्व लोक पण कारगीललाच राहतील अशी आम्ही शक्यता मांडली होती. त्याहून द्रासमध्ये राहण्याच महत्त्वाचे  कारण कि आम्हाला "द्रास मेमोरियल" पाहायचे होते. ऐश्वर्या आणि आदित्य आल्यावर आम्ही सर्व रेस्ट हाउस वर गेलो. रेस्ट हाउसच्या बाहेरच हा बोर्ड पाहायला मिळतो. द्रास हे "जगातली दुसऱ्या क्रमांकाचे लोकवस्ती असलेले थंड ठिकाण". द्रासची उंची फार काही नाही आहे फक्त १०,००० फुटावर आहे, तरी सुद्धा एवढे थंड? का कुणाच ठाऊक.  सर्वाना पटापट फ्रेश होऊन तयार होण्यास सांगितले. कारण अंधार होण्याआधी "द्रास मेमोरियल" पाहायचे होते. 
उमेश आणि साधना लगेच बाईक घेऊन "द्रास मेमोरियल" ला गेले. कारण त्यांना उजेडात काही फुटेज हवे होते. मागाहून थोड्या वेळाने आम्ही पण निघालो. 

 "द्रास मेमोरियल" द्रास-कारगील रस्त्यावर द्रास पासून फक्त ७ किलो मीटर वरच आहे. बाईकस पार्किंग मध्ये लावल्या आणि बाजूच्या ५-६ बाईकस पाहिल्या तर MH-12 च्या होत्या. मी पटकन म्हणालो, अरे वाह! पुण्यावरूनही काही लोक आले आहेत. तेवढ्यात ती मुल आली आणि थोडीशी चर्चा केली आणि ते म्हणाले मेमोरियल बंद होणार आहे, पटकन पाहून घ्या. त्यांचा निरोप घेऊन आम्ही मेमोरियल पाहायला लागलो. सर्व मेमोरियल मी मनोभावे पाहून घेतल. १९९९ सालच्या लढाईची सर्व प्रकारची माहिती "द्रास वॉर मेमोरियल" मध्ये आहे. मी सर्व माहिती घेतली आणि अजूनही ती जाणवत आहे. पण त्या वीर भूमी बद्दल आणि तिकडे स्व:ताच्या  जीवाची आहुती दिलेल्या वीर जवानाची गाथा मी पामर काय वर्णन करणार. त्या वीर जवानाची गाथा सांगायला माझी वाणी अपुरी आहे. ज्या कोणाला माहिती हि हवी असल्यास माझा मित्र आणि या ट्रीपचा आमच्या बरोबरचा सहभागी रोहनने त्याच्या ब्लोग मध्ये फार छान मांडली आहे. १९९९च्या या लढाईला "ऑपरेशन विजय" नावाने प्रसिद्धी मिळाली आहे. आम्ही इकडे भेट दिली त्याच्या  १ महिन्या आधीच या विजयाला १०वर्षे पूर्ण झाली होती. आम्ही याच कालावधीत इकडे भेट द्यायचा विचार केला होता, पण काही सुट्ट्यांच्या अडचणी मुळे येऊ शकलो नाही. मी आणि अभीने तिकडची आठवण म्हणून "ऑपरेशन विजय" च टी-शर्ट विकत घेतल. अखेर आम्ही त्या वीरांच्या चरणाशी बसून एक फोटो काढला आणि परत रेस्ट हाउस कडे निघालो.
हे मी काही त्या वीर भूमीत काढलेली  छायाचित्र......पहा हे काय बोलू शकतात का.....मी तर काहीच बोलू शकत नाही, या वीरान बद्दल.


तोलोलिंग पर्वत, इथ पर्यंत पाकिस्तानी घुसखोर आले होते.


तोलोलिंग च्या पायथ्याशी बनवलेले हे मेमोरियल.


हि सर्व पर्वत रांग पाकिस्तानी घुसखोरांनी त्यांच्या ताब्यात घेतली होती.

हे ते मुख्य स्मारक



१९९९ च्या लढाईचे काही क्षण, सुवर्ण अक्षरात.....



संपूर्ण भिंत शहीद जवानांच्या नावांनी, हे हि सुवर्ण अक्षरात... आणि हवंच...


एकूण शहीद जवानांची संख्या.


याच मेमोरियलच्या अंगणात ऑपरेशन विजय एक्सिबिट.





शहीद ले.मनोज पांडे यांचा डोक्यावर काळी कफन बांधलेला आणि कारगील शहीद कलश एक्सिबिटच्या सुरवातीला.






पाकिस्तानी घुसखोरांकडून जप्त केलेल्या काही गोष्टी.



मिशनचा एक्शन प्लान.


परत  रेस्ट हाउस कडे येताना अभीला माझी बाईक चालवायची हुक्की आली. अभी मला म्हणाला पाहू तुझी बाईक कशी वाटते चालवायला. मग अभी व मनाली माझी बाईक घेऊन निघाले आणि मी गाडीत बसलो. रेस्ट हाउस वर येऊन सर्व फ्रेश होऊन जेवायला भेटलो. आज जेवताना फार मस्ती झाली नाही, बहुदा त्या शूर वीरांची गाथा  ऐकून सर्व थोडे शांत झाले होते. पण अंगात असलेल्या सवयी मुळे थोडीशी मस्ती केलीच. जेवणा नंतर तिकडेच मिटींग घेतली आणि सर्व आप-आपल्या रूम मध्ये गेले. मी, शोबित आणि दादा नेहमी प्रमाणे एकाच रूम मध्ये. मला बराच वेळ झोप येतच नव्हती, बहुदा त्या शूर वीरांच्या पराक्रमामुळे माझी झोप हरपली होती. बराच वेळ मी त्या वरांड्यात गिरक्य मारत विचार करीत होतो. थोड्या वेळाने मी झोपी गेलो. पण त्या रात्री मला शहीद जवानांनी विचारांनी अस्थाव्यस्थ करून सोडले होते. माझ्या मनात सारखे विचार चक्र चालू होते. पण खर सांगू माझ्या त्या भावना मला शब्दात नाही मांडता येत आहेत.

माझी प्रत्येक भारतीय माणसाला विनंती आहे कि त्यांनी या वीर भूमीला आयुष्यात एकदा तरी भेट द्यावी. हीच त्या वीर जवानांना आपल्या कडून फुल नाही फुलाच्या पाकळी एवढी श्रद्धांजली.

या दिवसाचे मी काढलेले सर्व फोटो पाहायचे असल्यास टिचकी मारा:  चौथ्या दिवसाचे सर्व फोटो.