22.3.10

लेह बाईक ट्रीप - चौथा दिवस (सोनमर्ग ते द्रास)

११ ऑगस्ट २००९, सकाळी नेहमी पेक्षा जरा लवकर ४ वाजता उठायचे होते, पण मला जरा आळस भरला होता. खर सांगायला गेल तर तो नेहमीच असतो, पण सोनमर्गच्या त्या  पहाटेच्या  थंडीत आळस जरा जास्तच चढला होता. शेवटी रोहनने मोठ्याने फोनवर "कोंबडी पळाली... तंगडी धरून... लंगडी घालाया लागली..." गाण लावल आणि सर्वाना लाथा मारून उठवू लागला. कारण आज आम्हाला कागदी प्लान नुसार लेह पर्यंत पोहचायचे होते. रूम मध्ये एकच बाथरूम होते, म्हणून सर्व मुलांना बाहेर कॉमन बाथरूम मध्ये जावे लागे. एवढ्या थंडीत पाण्यात हात घालायला पण फाटत होती, मग पुढचा तर विचारच करवत नव्हता. कसे बसे प्रा:त विधी उरकून आम्ही सर्व सामान बांधून तयार होऊन बाहेर आलो. गाडीचा ड्रायवर रात्री झोपायला खाली गावात गेला होता तो काय ठरल्याप्रमाणे वरती आला नव्हता. मग रोहन खाली ड्रायवरला उठवायला गेला व नाश्त्याची पण ऑर्डर करायला सांगितले. आम्ही वरच गाडीची वाट पाहत राहिलो, कारण गाडीत सामान लोड करायचे होते. गाडी येई पर्यंत आम्ही सोनमर्गची पहाटेच्या वेळेची फोटोग्राफी करत होतो. काल सोनमर्गला अंधार पडत असताना आलो होतो म्हणून सौंदर्य पाहण्यास मिळाले नव्हते. पहाटेच्या वेळी सोनमर्ग फार सुंदर दिसत होते. गाडी आली आणि सामान लोड करून आम्ही खाली नाश्त्याला गेलो. मस्त गरम-गरम ऑम्लेट ब्रेड खाल्ले व पाणी भरून घेतले. नाश्ता करून बाहेर आलो आणि पाहतो तर ड्रायवर गाडी बंद करून गायब झाला होता. बराच वेळ त्याची आम्ही शोधा-शोध करीत होतो, तरी तो काय मिळेना. आता हा ड्रायवर डोक्यात जायला लागला होता, थोडीशी हुज्जत घातली त्याच्या बरोबर आणि आम्ही पुढे जाण्यास निघालो.

जम्मू ते सोनमर्ग रस्ता संपूर्ण डांबरी आणि चांगला होता. आम्ही सोनमर्ग सोडले आणि लगेचच झोजीला चढायला सुरवात केली. हा रस्ता आता पर्यंतच्या रस्त्यान पेक्षा एकदम विरुद्ध होता, मातीचा आणि खडतर. रस्त्याच्या मध्ये काही वाहते नाले हि होते. ऑगस्ट महिना म्हणजे हिमालयातला उन्हाळा, म्हणून या नाल्यांना पाणी कमी होते आणि म्हणूनच सहजच पार करता येत होते. झोजीला आम्ही टप्या-टप्याने पार करत हळू-हळू उंचीही गाठत होतो. झोजीला हा आमच्या  प्रवासातला पहिला पास होता आणि तसाही तो प्रसिद्ध आहे त्या परिसरात. रस्ता फारच खराब होता, म्हणून मला बाईक चालवण्याकडे जास्त लक्ष द्यावे लागत होते. मधून-मधून मी बाईक थांबवून फोटो काढत हि होतो. परिसर फार सुंदर होता. उंच-उंच डोंगर आणि डोंगरांच्या मधून वाहणारी सिंधू नदी. याच नदीच्या बाजूने एक वाट अमरनाथला जाते असे हि कळाले. तेवढ्यातच आम्ही घुमरी चेकपोस्टला येऊन पोहचलो. हा आमच्या प्रवासातला पहिला चेकपोस्ट होता आणि पुढे भरपूर चेकपोस्ट पाहायला मिळणार होते. इकडे सर्वांचे नाव, बाईकचे नंबर, लायसन्स नंबर द्यावे लागते कारण आता आम्ही "हाय सेनसिटीव झोन" मध्ये प्रवेश करणार होतो. १९९९ साली जी कारगिलची लढाई झाली, ती याच  प्रदेशात. घुमरी, द्रास, कारगिल, बटालिक या सर्व परिसरात पाकिस्तानी शत्रूंनी घुसखोरी केली होती. आर्मीची सर्व फोर्मलीटी करून आम्ही पुढे निसटलो. झोजीलाची सर्वोच्च उंची ११,५७५ फुट आहे आणि आता सर्व उतरण होती, जेवढे चढलो तेवढच जवळ-जवळ उतरायचे होते. पण रस्ता मात्र तसाच. हळू-हळू आम्ही उतरत होतो आणि अधून-मधून  फोटोग्राफी हि करत होतो. १०,३०० फुटावर असलेल्या मेणामार्ग चेकपोस्ट जवळ आलो. चार चाकी गाड्या एका रांगेत उभ्या होत्या. आम्ही एकदम पुढे जाऊन बाईकस लावल्या आणि आर्मीच्या फोर्मलीटी करायला लागलो. एवढ्यात एक व्यक्ती आली आणि आम्हाला म्हणाली "कुठून आला, मुंबई वरून का?". ती व्यक्ती होती आपल्या मराठी रंगभूमीचे कलाकार "प्रदीप वेलणकर". मग भरपूर गप्पा झाल्या. वास्तविक ते आमच्या MH-02, MH-04 च्या बाईकस बघून आमच्या कडे आले होते. त्यांच्या बरोबर आम्ही फोटो काढले आणि पुढे निघालो. इकडेच आम्हाला कळाले कि ब्रिज अजून चालू नाही झाला आहे. ब्रिजच काम चालू आहे आणि बहुदा दुपार पर्यंत सुरु होईल असे हि कळाले. शेवटी पर्याय नाही म्हणून आम्ही रस्ता जिथ पर्यंत चालू आहे तीथ पर्यंत जायचे ठरवले. थोडा वेळच बाईकस चालवून माताइन गावा जवळ पोहचलो आणि पाहतोतर काय भली मोठी गाड्यांची रांग लागली होती. आमच्या ड्रायवरला रांगेत गाडी लावायला सांगितली आणि आम्ही बाईक घेऊन एकदम पुढे गेलो. आर्मीचे जवान आणि काही कामगार ब्रिज दुरुस्त करायचे काम करीत होते.  तासा भरात ब्रिज चालू होईल असे हि कळाले. साधना आणि उमेशला इकडे फुटेज घ्यायचे होते. मला, कुलदीप आणि अमेय म्हात्रेला पण फोटो घ्यायचे होते. पण आर्मीचे पोस्ट आणि आर्मी संदर्भात कुठले हि फोटो त्यांच्या परवानगी  शिवाय काढू नका असे काही अनुभवी व्यक्तींनी आम्हाला सांगितले होते. मग साधना, उमेश आणि कुलदीप प्रेसवाले आहेत म्हणून पुढे आणि मागे मी असे सर्व परवानगीसाठी आर्मीच्या जवानाकडे. त्या जवानाने त्याच्या  सीओ कर्नलला विचारले. त्या कर्नलने तर नाकावरून माशी झटकावी तसे आम्हाला उडून लावले. परत थोड्या वेळेने त्याने च आम्हाला परवानगी दिली. थोडे फोटो काढून इकडे-तिकडे मी टाइमपास करत बसलो. मग काटला आला म्हणून मी मागे गाडी कडे आलो. बराच वेळ आम्ही इकडे-तिकडे काहीना काही तरी करत बसलो. आता कंटाळा यायला लागला होता आणि डोक्यावर ऊन ही रण-रणत होत. मग मी, अभी, दिपाली, शोबित आणि आदित्यने २ बाईकच्या मध्ये अंतर ठेऊन, बाईकच्या वर चादर पसरली आणि त्या सावलीत आम्ही आमची पथारी पसरली. येत जाता लोक आमच्या कडे पाहून हसत होते, पण आम्हाल कसला काय फरक पडतो. दीपालीच्या भाषेतच बोलायचे झाले तर "निर्लजच मेली कार्टी आपण". पण आता इथे हि कंटाळा यायला लागला होता आणि सर्वांनाच सावलीत बसायचे होते. गावच्या शाळेच्या अंगणात जाऊन आम्ही सर्व बसलो. नुसत ताटकळत बसायला कंटाळा येत होता. आशिषने तर तिकडेच बसल्या-बसल्या झोप काढायला सुरवात केली. मी  त्याला साथ द्यावी म्हणून त्याच्याच मागे आडवा पडलो आणि  निवांत  झोपी  गेलो. तेव्हा दीपालीने काढलेला हा माझा फोटो.........

मस्त झोप झाल्यावर मी ब्रीज बद्दल चौकशी करायला लागलो. कळाले कि अजून काम चालू आहे थोडा वेळ लागेल. आता दुपार उलटून गेली होती. डोक्यावर रण-रणत ऊन आणि भूख हि लागली  होती . मी गावात कुठे काय खायला मिळते काय पाहून आलो, पण कुठेच काय खायला मिळण्यासारखी सोय नव्हती. ताटकळत बसण्यापलीकडे काही पर्याय नव्हता. मला यावेळी पु. ल. देशपांडे यांच्या "म्हैस" या कथा-कथनाची आठवण झाली. कसे प्रवासात अडकलेल्या माणसांचे हाल होतात आणि त्यातील मजा मस्ती याची आठवण झाली. कंटाळा आला म्हणून सारखे इकडे तिकडे ये-जा चालू होती. तेव्हा काढलेले कही फोटो.......................

 
 

शेवटी वैतागून मी परत ब्रीज जवळ गेलो. पाहतोतर ब्रिजच काम संपले होते आणि आवरा-आवरी चालू होती. पळत मागे येऊन आम्ही सर्वाना तयार राहायला सांगितले. अमेय म्हात्रे, कुलदीप, आदित्य, ऐश्वर्या, पूनम हे सर्व शेतातून नदी किनारी मजा करायला गेले होते. त्यांना ही बोलवून आम्ही सुटलो. माझ्या बरोबर आता उमेश होता कारण दीपालीला कंटाळा आला होता म्हणून ती गाडीत बसली होती. भलतीच मोठी रांग होती म्हणून बाईकस आम्ही शेतातून काढली आणि एकदम पुढे जाऊन पोहचलो. आर्मीच्या जवानाने बाईकस पाहिल्या आणि "ये बाईकस को पेहेले जाने दो" आणि आम्हाला पुढे घेऊन पहिले पाठवले. ब्रीज वरून निसटलो आणि पाहिले तर पलीकडच्या बाजूला पण तेवढीच मोठी रांग लागली होती. आमची गाडी बरीच मागे होती आणि त्यांना सर्व लोच्यातून सुटायला वेळ लागणार होता, म्हणून आम्ही थेट द्रासला भेटायचे ठरवले. मी आणि उमेश एकत्र होतो म्हणून अधून मधून फोटोग्राफीसाठी थांबायचो. पण रस्ता छान होता म्हणून कवर पण करत होतो. मध्येच द्रासच्या थोड अलीकडे "Tiger Hill"चा बोर्ड पाहून आम्ही सर्वच थांबलो. फोटो काढले आणि तिकडे शहीद झालेल्या जवानांना वंदन करून आम्ही निघालो. बऱ्याच गाड्या आम्हाला ओवर टेक करून पुढे गेल्या होत्या. द्रासला पोहचलो आणि सर्वीकडे गर्दीच गर्दी. कारण सर्व जण द्रासला खायला थांबले होते. तसे सर्वच दिवस भर उपाशी होते. आम्हाला पण प्रचंड भूख लागली होती. पण ठरलेल्या प्लान नुसार आज आम्ही लेहला पाहिजे होतो. आम्ही लेह मध्ये जे बुकिंग केले होते त्याला कळवायचे होते. पण त्याला काही फोन लागेचना, तेवढ्यात सर्वानी आपल्या घरीही फोन करून घेतले. मी आणि अभी सारखे त्याला फोन लावायचा प्रयत्न करीत होतो. बाकी सर्वाना जेवणाची सोय करायला पाठवले. मग गाडी आल्यावर सर्वानी मजबूत जेवण हाणले. तसे सर्व दिवस भर उपाशीच होते म्हणून साहजिक होते ते.ऐश्वर्याची तब्बेत काही बरी होताच नव्हती, म्हणून तिला आदित्य डॉक्टर कडे घेऊन गेला. मी आणि अमेय म्हात्रे १०० मीटर वर असलेल्या सरकारी (J&KTDC) च्या  रेस्ट हाउस मध्ये राहण्याची सोय होऊ शकते काय म्हणून पाहायला गेलो. एकमत करून आम्ही आज द्रासलाच राहायचे ठरवले, कारण आज दिवसा उजेडी फार फार तर आम्ही कारगील पर्यंत जाऊ शकलो असतो आणि आज बाकी सर्व लोक पण कारगीललाच राहतील अशी आम्ही शक्यता मांडली होती. त्याहून द्रासमध्ये राहण्याच महत्त्वाचे  कारण कि आम्हाला "द्रास मेमोरियल" पाहायचे होते. ऐश्वर्या आणि आदित्य आल्यावर आम्ही सर्व रेस्ट हाउस वर गेलो. रेस्ट हाउसच्या बाहेरच हा बोर्ड पाहायला मिळतो. द्रास हे "जगातली दुसऱ्या क्रमांकाचे लोकवस्ती असलेले थंड ठिकाण". द्रासची उंची फार काही नाही आहे फक्त १०,००० फुटावर आहे, तरी सुद्धा एवढे थंड? का कुणाच ठाऊक.  सर्वाना पटापट फ्रेश होऊन तयार होण्यास सांगितले. कारण अंधार होण्याआधी "द्रास मेमोरियल" पाहायचे होते. 
उमेश आणि साधना लगेच बाईक घेऊन "द्रास मेमोरियल" ला गेले. कारण त्यांना उजेडात काही फुटेज हवे होते. मागाहून थोड्या वेळाने आम्ही पण निघालो. 

 "द्रास मेमोरियल" द्रास-कारगील रस्त्यावर द्रास पासून फक्त ७ किलो मीटर वरच आहे. बाईकस पार्किंग मध्ये लावल्या आणि बाजूच्या ५-६ बाईकस पाहिल्या तर MH-12 च्या होत्या. मी पटकन म्हणालो, अरे वाह! पुण्यावरूनही काही लोक आले आहेत. तेवढ्यात ती मुल आली आणि थोडीशी चर्चा केली आणि ते म्हणाले मेमोरियल बंद होणार आहे, पटकन पाहून घ्या. त्यांचा निरोप घेऊन आम्ही मेमोरियल पाहायला लागलो. सर्व मेमोरियल मी मनोभावे पाहून घेतल. १९९९ सालच्या लढाईची सर्व प्रकारची माहिती "द्रास वॉर मेमोरियल" मध्ये आहे. मी सर्व माहिती घेतली आणि अजूनही ती जाणवत आहे. पण त्या वीर भूमी बद्दल आणि तिकडे स्व:ताच्या  जीवाची आहुती दिलेल्या वीर जवानाची गाथा मी पामर काय वर्णन करणार. त्या वीर जवानाची गाथा सांगायला माझी वाणी अपुरी आहे. ज्या कोणाला माहिती हि हवी असल्यास माझा मित्र आणि या ट्रीपचा आमच्या बरोबरचा सहभागी रोहनने त्याच्या ब्लोग मध्ये फार छान मांडली आहे. १९९९च्या या लढाईला "ऑपरेशन विजय" नावाने प्रसिद्धी मिळाली आहे. आम्ही इकडे भेट दिली त्याच्या  १ महिन्या आधीच या विजयाला १०वर्षे पूर्ण झाली होती. आम्ही याच कालावधीत इकडे भेट द्यायचा विचार केला होता, पण काही सुट्ट्यांच्या अडचणी मुळे येऊ शकलो नाही. मी आणि अभीने तिकडची आठवण म्हणून "ऑपरेशन विजय" च टी-शर्ट विकत घेतल. अखेर आम्ही त्या वीरांच्या चरणाशी बसून एक फोटो काढला आणि परत रेस्ट हाउस कडे निघालो.
हे मी काही त्या वीर भूमीत काढलेली  छायाचित्र......पहा हे काय बोलू शकतात का.....मी तर काहीच बोलू शकत नाही, या वीरान बद्दल.


तोलोलिंग पर्वत, इथ पर्यंत पाकिस्तानी घुसखोर आले होते.


तोलोलिंग च्या पायथ्याशी बनवलेले हे मेमोरियल.


हि सर्व पर्वत रांग पाकिस्तानी घुसखोरांनी त्यांच्या ताब्यात घेतली होती.

हे ते मुख्य स्मारक



१९९९ च्या लढाईचे काही क्षण, सुवर्ण अक्षरात.....



संपूर्ण भिंत शहीद जवानांच्या नावांनी, हे हि सुवर्ण अक्षरात... आणि हवंच...


एकूण शहीद जवानांची संख्या.


याच मेमोरियलच्या अंगणात ऑपरेशन विजय एक्सिबिट.





शहीद ले.मनोज पांडे यांचा डोक्यावर काळी कफन बांधलेला आणि कारगील शहीद कलश एक्सिबिटच्या सुरवातीला.






पाकिस्तानी घुसखोरांकडून जप्त केलेल्या काही गोष्टी.



मिशनचा एक्शन प्लान.


परत  रेस्ट हाउस कडे येताना अभीला माझी बाईक चालवायची हुक्की आली. अभी मला म्हणाला पाहू तुझी बाईक कशी वाटते चालवायला. मग अभी व मनाली माझी बाईक घेऊन निघाले आणि मी गाडीत बसलो. रेस्ट हाउस वर येऊन सर्व फ्रेश होऊन जेवायला भेटलो. आज जेवताना फार मस्ती झाली नाही, बहुदा त्या शूर वीरांची गाथा  ऐकून सर्व थोडे शांत झाले होते. पण अंगात असलेल्या सवयी मुळे थोडीशी मस्ती केलीच. जेवणा नंतर तिकडेच मिटींग घेतली आणि सर्व आप-आपल्या रूम मध्ये गेले. मी, शोबित आणि दादा नेहमी प्रमाणे एकाच रूम मध्ये. मला बराच वेळ झोप येतच नव्हती, बहुदा त्या शूर वीरांच्या पराक्रमामुळे माझी झोप हरपली होती. बराच वेळ मी त्या वरांड्यात गिरक्य मारत विचार करीत होतो. थोड्या वेळाने मी झोपी गेलो. पण त्या रात्री मला शहीद जवानांनी विचारांनी अस्थाव्यस्थ करून सोडले होते. माझ्या मनात सारखे विचार चक्र चालू होते. पण खर सांगू माझ्या त्या भावना मला शब्दात नाही मांडता येत आहेत.

माझी प्रत्येक भारतीय माणसाला विनंती आहे कि त्यांनी या वीर भूमीला आयुष्यात एकदा तरी भेट द्यावी. हीच त्या वीर जवानांना आपल्या कडून फुल नाही फुलाच्या पाकळी एवढी श्रद्धांजली.

या दिवसाचे मी काढलेले सर्व फोटो पाहायचे असल्यास टिचकी मारा:  चौथ्या दिवसाचे सर्व फोटो.

2 comments:

  1. अमेय ... लिखाण मस्त होतय. पण सलगता येऊ दे. पुढचे भाग लवकर टाक. वाट बघतोय. 'द्रास'चा तो अनुभव कधीच विसरु शकणार नाहे असाच होता. बघुया आता पुन्हा कधी जमतय ते!!!

    ReplyDelete
  2. अमेय साळवी - फटका माणूस22/3/10 04:40

    हा रे प्रयेंत चालू आहेत, पण वेळच मिळत नाही. त्या वरून तुला माहित आहे कि मी किती आळशी आहे. तुझ्या येवडा पटकन मी ब्लोग नाही लिहू शकत रे. पाहू कसे होते. नाकी परत एकदा हि तरीप करायची आहे, बघू कसे होतेय.

    ReplyDelete