31.3.10

लेह बाईक ट्रीप - पाचवा दिवस (द्रास ते लेह)

१२ ऑगस्ट २००९, आज आम्हाला काही केल्या लेहला पोह्चायचेच होते . द्रास ते लेह अंतर होते जवळ-जवळ ३०० किलो मीटर आणि जे २ दिवस वाया गेले होते ते भरून काढायचे होते. आज आम्हाला फोटू-ला पार करून बराच कच्चा रस्ता तुडवायचा होता म्हणून ६ वाजता आम्ही सर्व तयार होऊन बाहेर आलो, पण अजून अमेय म्हात्रे आणि कुलदीप तयार नव्हते. त्यांना पटकन तयार होऊन यायला सांगितले. ते येई पर्येंत आम्ही गाडी लोड करून घेतली. उमेशने एक फुटेज घेतले आणि सर्व बाईक वर लोड होऊन कारगिल कडे निघालो. पुन्हा एकदा आम्ही "द्रास वॉर मेमोरियल" च्या रस्त्याला होतो. त्या वीर जवानांना आम्ही चलते- चलते सलामी दिली आणि न थांबता पुढे सुटलो. नागमोडी वळणाचा रस्ता कापत आम्ही कारगिल कडे मार्च करत होतो.कारगिलच्या काही किलो मीटर आधीच एक मोठा राईट टर्न घेतला आणि रस्ता नदीला लागला. इकडेच आम्हाला महार रेजिमेंट च्या जवानांची वीर गळ होती. ती पाहून आम्ही थांबलो आणि रस्त्याच्या बाजूला नदीचा परिसर हा सकाळच्या कोवळ्या उन्हाने मस्त वाटत होता. मला फोटो काढावासा वाटला, साधनाने पण वीर गळी जवळ फुटेज घेतले. याच ठिकाणी २ नदीच्या पात्रांचे संगम आहे. मी फोटो काढीत असताना एक आर्मीचा जवान जवळ आला आणि मला म्हणाला "ये जो वो वाली नदी आ रही है ना, वो मालूम है कहासे आ रही है . वो पाकिस्तान से आ रही है वो सामने वाला पर्वत पाकिस्तान है ". त्या जवानाने सांगितले "ये पाकिस्तान एरियल व्हूव के हिसाब से ४ किलो मीटर है " आणि नदीच्या पलीकडच्या बाजूने एक कच्चा रस्ता जात होता. तो रस्ता दाखवून जवान म्हणाला "अगर ये रस्ते के हिसाब से १७ किलो मीटर होता है , पाकिस्तान". तो रस्ता सार्वजनिक नसून आर्मीचा आहे आणि म्हणून सर्व साधारण माणसाला जाण्यास मनाई आहे. इकडण निघालो आणि १ किलो मीटर पण पुढे गेलो नसू आम्ही, तेवढ्यात आम्हाला दुसरे स्मारक दिसले . हे रस्त्याला लागून जरा मोठे आणि मस्त वाटत होते म्हणून आम्ही पुन्हा थांबलो. ते होते "हर्का बहादुर मेमोरियल". या मेमोरियलच्या समोरच नदीवर पुल आहे. लढाईच्या वेळेला "सुबेदार हर्का बहादुर" ने पाकिस्तानी जवानांना पुलाच्या या बाजूला म्हणजे हिदुस्तानात घुसून दिले नव्हते .या पुलाला "हर्का बहादुर ब्रीज" नाव देण्यात आले आहे. या विरालाही आम्ही वंदन करून कारगिल कडे निसटलो. प्रचंड भूख लागली होती. आता आम्ही सावलीतून उन्हात आलो होतो. सावलीत जरा गारठा होता आणि उन्हात जरा बर वाटत होते.
कारगिल शहरात शिरलो ८ वाजता, काही हि उघडले नव्हते. कसे बसे एक हॉटेल उघडे मिळाले. वास्तविक त्याला हॉटेल म्हणूच शकत नव्हतो, एक छोटीसी टपरी होती. पण मजबूत भूख लागली होती आणि तसेही आम्हाला याचा काय फरक पडतो कुठेही खायला मिळाल्याशी मतलब. मस्त गरम-गरम आम्लेट आणि मैद्याच्या रोट्या. हे कॉम्बिनेशन जरा वेगळे होते, पण आम्हाला काय फरक पडतो. पु.ल.देशपांडे याच्या नुसार "चवी पेक्ष्या उदर भरणं बरे". तो हॉटेलवाला रोट्या करत होता आणि त्याच्या हाथा खालचा पोरगा आम्लेट करत होता. ते दोघे करत होते आणि आम्हाला वाढत होते. पण आम्ही मात्र नुसते हाणत होतो. एका मागून एक असे किती खाल्ले त्याची गिनतीच नव्हती, ती त्याला तरी कशी राहिली त्यालाच ठाऊक. मस्त पोट भरून नाश्ता झाला होता, "आता दुपार पर्येंत निवांत बगुनाना......" असे मी म्हणायला मोकळा झालो होतो. एवढ्यात माझ्या फोन मध्ये अलार्म वाजला, पहातो तर माझ्या ऑफिस मधल्या बरोबरच्या एका मुलीचा वाढदिवस होता. तसे मला वाढदिवस कधीच लक्षात राहत नाहीत. पण माझा फोन ते काम बरोबर न चुकता करतो. तिच्याशी जरा गप्पा मारल्या आणि पुढे निघण्यास सज्ज झालो.
गेल्या २ दिवसा प्रमाणे, माझ्या बरोबर आजही दिपाली होती. आम्ही दोघे एकत्र म्हटले कि गप्पा आणि बडबड हे तर नक्कीच . आमच आता कॉम्बिनेशन व्हायला लागले होते. माझ्या बरोबर कोण म्हटले कि दिपाली, हे सर्व गृहीत धरायला लागले होते. उमेश आणि साधना यांना आर्मीच्या कॅम्पचे फुटेज हवे होते. याच प्रमाणे अमेय म्हात्रे आणि पूनम ने पुस्तक आणली होती वाटायला . साधनाला अजून आर्मी कॅम्प मध्ये शूटिंगसाठी परवानगी मिळाली नव्हती आणि मिळाली पण १० वाजणार होते. या सर्वाना काम झाल्यावर मागून गाडीने यायला सांगितले.पण कारण नसताना शोबितला पण गाडी बरोबर यावे लागणार होते. अमेय म्हात्रेला सांगितले कि जर साधनाला जास्त वेळ लागणार असेल तुम्ही आपली गाडी घेऊन पुढे निघा. साधना आणि उमेशला येऊ दे मागाहून दुसरी गाडी करून. कारण आमच्या गाडी मध्ये आपत्कालीन लागणार सर्व समान होते.या सर्वांचा निरोप घेऊन बाकी सर्व १० जण बाईक घेऊन पुढे निघालो. ब्रीज ओलांडून नदी पलीकडचा लेह्चा रस्ता पकडला. सरळ रस्ता झानस्करला जातो. बाईकस मध्ये पेट्रोल भरले आणि लेहच्या मार्गावर सुटलो. आता मी पुढे होतो , एक छोटस टेकाड चढून आम्ही सर्व पठारावर आलो. इतक्यात मागून आर्मीची एक जिप्सी येऊन माझ्या बाजूला थांबली. त्या जिप्सीतल्या ऑफिसर ने मला विचारले महाराष्ट्रातून कुठून आलात. मी उत्तर दिले मुंबईहून. मग तो ऑफिसर जिप्सी तून बाहेर आला. व्वाह! काय सुंदर पर्सनालीटी होती त्या ऑफिसरची, दिपाली तर फिदाच झाली होती आणि तो काय साधा सुधा ऑफिसर नव्हता, ब्रिगेडीयर होतो. कारगिल सारख्या ठिकाणी मराठी बोलणारे आणि ते पण इंडियन आर्मीच्या उच्च पदाधिकारी ब्रिगेडीयर गाडी तून बाहेर येऊन आम्ह्ची विचार पूस करत आहेत हे पाहून मनाला फार बरे वाटले. MH (महाराष्ट्र) पासिंगच्या गाड्या पाहून ते थांबले होते. चर्चान्ति कळाले कि ते नागपूरचे आहेत. मग त्यानी विचारले कुठे चालला आहात . मी म्हणालो मुलबेक, लामायेरू करून लेहला पोहोचायचे आहे. "अरे हा रस्ता तर बटालिक करून लेहला जातो", तुम्ही त्या रस्त्याने जायला पाहिजे होते. पलीकडच्या बाजूला एक रस्ता दाखवत ते म्हणाले. आता मुलबेकला जायचे असेल तर हा कच्चा रस्ता पकड, हा तुम्हाला मुलबेकच्या रस्त्यापर्येंत नेहील. १९९९ च्या युद्धातले सर्वात जास्त आणि घुसखोरीला सुरवात केलेले हेच ते बटालिक सेक्टर. ब्रिगेडियर साहेबांना जय हिंद म्हणत सलाम केला आणि त्यांचा निरोप घेऊन, त्यांनी सांगितलेल्या रस्त्या वर सुटलो. तेव्हा काढलेला हा सिंधू नदी आणि बाजूला वसलेल्या कारगिल शहराचा फोटो.
कुठे हि कॉमन ब्रेक न घेता सरळ आता मुलबेक असे ठरले. पण वैयक्तिक फोटोग्राफी साठी थांबतच होतो. पण त्याला फार वेळ लागत नाहीच, थांबलो फोटो काढला आणि निघालो. आता परिसर थोडा बदलायला लागला होता. जम्मू, श्रीनगर, सोनमर्ग मस्त हिरवळ प्रदेश, पण झोजीला पार करून हिरवळ थोडी-थोडी कमी होत चालली होती. आता सर्वत्र नुसती रक-रखात आणि उघडे- नागडे डोंगर. वाळूचे ढिगारे रचल्या सारखे वाटत होते. म्हणूनच लडाखला कोल्ड डेझर्ट असे हि म्हणतात. मला नवीन आणि निराळा प्रदेश असल्या कारणास्तव मी जरा जास्त थांबून फोटो काढत होतो. तसा कुठेही मोठा ब्रेक न घेता आम्ही लोचुम्ब या गावा जवळ आलो. वास्तविक आमचा मुलबेक सोडले तर कुठेही थांबायचा प्लान नव्हता. पण जसे आम्ही ठरवतो तसे कधीच होताच नाही. पाहतोतर ट्राफिक जाम, आम्ही बाजूने बाईकस काढल्या आणि पुढे गेलो. रस्ता फारच छोटा होता, जेमतेम एक ट्रक जाईल इतकाच. आमच्या बाजूने एक ट्रक आणि त्याच्या मागे गाड्या लागल्या होत्या. समोरच्या बाजूने २५ एक आर्मीच्या ट्रकचा कोंव्होय लागला होता. बोंबला.... आता परत अडकलो कि काय असे वाटायला लागले होते. पण नाही कसेबसे डावी-उजवी कडून एक-एक ट्रक पार करत होतो आणि एका ट्रक जवळ जेमतेम एक बाईक जाईल एवढीच जागा होती. अभिने आपली डिस्कवर घातली, आता माझी पाळी होती. मी हळू-हळू एक-एक पाय टाकत माझी जड बाईक डाव्या बाजूला पेलवत काढत होतो. एक क्षणाला मी उजवा पाय जमिनीला लावताच पायाखालची जमीन ढासळली आणि बाईक उजवीकडे पडायला लागली. मला तर असे वाटले कि आम्ही पडलो आता. एवढ्यात बाईक उजवीकडे जायची थांबली आणि मी पटकन सर्व वजन डावीकडे टाकले. मागे वळून पाहोतोतर दीपालीने डाव्या हाताने ट्रक पकडला होता. काय डोकं वापरल कार्टीने आणि म्हणूनच आम्ही पडायचे वाचलो. नाहीतर मजबूत आपटलो असतो, किमान ७-८ फुट तर होतोच खाली.व्वाह! पिलियन रायडर असावा तर असा, जो बाईकवर मागे बसून सुद्धा काय चालल आहे त्या कडे संपूर्ण लक्ष ठेवणारा. मला आश्चर्य वाटले कि दिपाली मागे बसून एवढी प्रसंगावधन असेल. बाईक ट्रिप्ससाठी पिलियन रायडर असेच प्रसंगावधन असणे गरजेचे आहे आणि दिपाली बद्दल या बाबतीत प्रश्नच नाही. दिपाली लांब पल्ल्याच्या बाईक ट्रीपसाठी परफेक्ट पिलियन रायडर आहे, हे मी माझ्या अनुभवा वरून नक्कीच सांगू शकतो. काही लोकांच्या मदतीने मी बाईक हळू-हळू पुढे काढली. मागो माग सर्वनी बाईकस काढल्या. आता पुढे जाणे काही काही शक्य नव्हते, मग २ ट्रकच्या मध्ये आम्ही बाईकस लावल्या आणि मस्ती करत ट्राफिक सुटायची वाट बघत बसलो. ट्राफिक जाम काय फार वेळ राहिले नाही. आर्मीचे ट्रक जरासा पुढे हले आणि आम्हाला जराशी जागा मिळाली. हि संधी साधून आम्ही निसटलो. मग परत डावी-उजवी करून कोंव्होयच्या मधून आम्ही एकदाचे निघालो. या ट्राफिक जाम मध्ये तास भर वेळ गेलाच आणि आता ११ वाजून गेले होते. कुठेही न थांबता (फोटोग्राफी शिवाय) थेट मुलबेकला पोहोचलो.

लड़ाख हा "लामा" लोकांचा प्रदेश आहे आणि लामांच अध्यात्मिक अभ्यास स्थान म्हणजे "गुम्पा". मुलबेकला पण अशीच गुम्पा आहे. मुलबेकला पोहोचे पर्येंत आम्हाला १२ वाजून गेले होते. गुम्पा बघून मग जेवायचे असे ठरले. गुम्पा तशी काय फार मोठी नव्हती. गुम्पाच्या अंगणात दगडावरती एक भली मोठी उभी मूर्ती कोरली होती, बहुदा गौतम बुद्धांची असावी. शिरलो तर खोली मध्ये अंधुक प्रकाश होता. समोरच काचे मध्ये गौतम बुद्धांची आणि त्याच्या अधिकारी शिक्षांच्या प्रतिमा होत्या. भिंतीन वर प्रसंग चित्र आणि सुंदर नक्षी काढली होती. आम्ही सर्व गुम्पा न्याहाळून पहिली आणि गौतम बुद्धांना वंदन करून बाहेर अंगणात आलो. अंगणातच एका बाजूला एक मोठी घुमती घंटा होती. वास्तविक त्याला घुमती घंटा नाही बोलू शकत कारण मध्य भागी एक मोठा लाकडाचा ठोकळा असतो आणि घंटा बाजूला बांधलेली असते. ठोकळ्यालाच वरच्या बाजूला आडवी दांडी असते आणि खाली धरून फिरवायला रिंगण असते. ठोकळ्याच्या मध्य भागी छान रंगेबिरंगी नक्षी काम केले असते. या ठोकळ्याला धरून एक प्रदक्षिणा मारली कि घंटा वाजते. बहुदा एक प्रदक्षिणा मारली कि एक नामस्मरण होते अशी प्रथा असेल. म्हणूनच जास्तीच-जास्त प्रदक्षिणा मारल्या म्हणजे जास्तीच-जास्त नामस्मरण झाले अशी समजूत असावी. मग आम्ही पण थोड्याशा प्रदक्षिणा मारल्या आणि फोटो काढले. गुम्पाच्या समोरच एक हॉटेल सारखे काही तरी होते, पण आता जाऊन पहिले तर काहीच खायला मिळणार नव्हते. मग काय कुलदीप बिस्कीट घेऊन आला आणि आम्ही चहा-बिस्कीट ढोसले. अमेय म्हात्रेला फोन लावला आणि कळाले कि साधनाला परवानगी मिळाली नव्हती म्हणून ते गाडी घेऊन पुढे निघाले. साधना आणि उमेश दुसरी गाडी घेऊन माघाहून येऊन रात्री पर्यंत लेह गाठतील . सर्व आवरून आम्ही मुलबेक सोडे पर्येंत १ वाजत आला होता. या हॉटेलच्या बाहेरच मला हे कॉको-कोलाचे धूळ खात असलेले क्रेट दिसले. हे पाहून आपण अंदाज लाऊ शकतो कि किती कमी रहदारी आहे इकडे. बहुदा म्हणूनच काही खायला नसावे.
आमच पुढचे लक्ष होते "नामिके-ला" आणि "फोटू-ला". आता निसर्ग संपूर्ण बदललेला होता. नीळ भोर आभाळ, सोनेरी रेतीचे डोंगर आणि याच डोंगरातून कोरलेले रस्ते. नामिके-ला चा रस्ता पण मातीचाच होता. मला हा प्रदेश फार आवडला होता. शाम मंचर यांच्या लडाख फोटोग्राफी मध्ये बहुदा हेच पाहून मी लडाखला यायचा विचार केला असेन. पण परिसर मस्त होता मला खूप आवडला होता. रख-रखित वाळवंट पण निसर्गाची सुरेख निर्मिती. सर्व बाईकस आता माझ्या पेक्षा पुढे होत्या आणि मी फोटो काढत माघाहून येत होतो. पण या बाबतीत मला बाईकने फार साथ दिली. मी फोटो काढायला थांबलो कि बाकी सर्व पुढे जायचे आणि मागून मी त्यांना गाठत होतो. भल्या-भल्या चढाला सुद्धा बाईकने दगा नाही दिला. अशा वेळी मला माझ्या विक्टरची आठवण येऊन जायची. विक्टर असती तर नसती चढली. नामिके-ला टोपं च्या काही किलो मीटर अलीकडेच बघतोतर कुलदीपची "यामाहा एफझी" भग-भगायला लागली. बघितले तर गाडी गरम झाली होते. मी थोडी चालवून पाहिली तरी तेच. रोहन आणि अभी पुढे निघून गेले होते. तेवढ्यात माघाहून एक ट्रक आला, त्याला सांगितले कि "आगे २ बाईकवाले दिखे तो उनको रुकने को बोलो और कहना तुम्हारे दोस्त की बाईक बंद पड़ी है ". मग बाईक थंड होण्याची वाट पाहत राहिलो. दुसरा तसा काय पर्याय हि नव्हता, उन्हात तापण्या शिवाय. तेवढ्यात एक मारुती ८०० आली. कुलदीपला सांगितले कि तू यांच्या बरोबर निघ, आम्ही बाईक सिंगल सीट घेऊन येतो. माघाहून आम्ही कसे-बसे बाईक घेऊन रोहन-अभी पर्येंत पोहचलो. तिकडे सर्व आमची वाटच पाहत होते. पुन्हा बाईक थंड करायला ठेवली आणि फोटोग्राफी करीत बसलो. तेव्हा हा काढलेला फोटो......

उन्हातच थोडासा आराम केला आणि पुढे जाण्यास निघालो. दूर-दूर पर्येंत झाड नाही म्हणून कुठे सावली हि नाही, नुसत रख-रखित ऊन . इथून निघालो आणि लगेचच नमिके-लाच्या "वाखा" पोस्टला पोहोचलो. सर्व फोर्मालीटी करून लगेच आम्ही पुढे निघालो. आता जरा उतरण होती आणि लक्ष होते फोटू-ला. अधून-मधून फोटोग्राफी करती आम्ही रस्ता कापत होतो. अभी पहिला, मग रोहन आणि मागे मी. असे आम्ही तिघे एकत्र होतो. कुलदीप आणि आदित्य बरेच मागे होते. आता आदित्याची पल्सर पण भुग-भूगायला लागली होती आणि कुलदीपची बाईक तर त्रास देतच होती. ते मध्ये-मध्ये बाईक थांबून थंड करून मग निघायचे, म्हणून आम्ह्च्या आणि त्यांच्यात अंतर पडले. मधेच एका वळणावर समोरून आर्मीचा ट्रक आला. तो ट्रक तर संपूर्ण रस्ताच वापरत होता, म्हणून आम्ही रस्ता सोडून बाजूने बाईक हळू घेतली. बघतो तर काय ट्रक वर बोफोर्स तोफा लाधल्या होत्या, ५-६ ट्रक होते. मला फोटो काढायची इच्छा झाली होती, पण काय वेळच नहीं मिळाला.
आता पुन्हा चढण लागले. आम्ही फोटू-ला चढत होतो. रस्ता सुंदर होता , नवीन करकरीत डांबरी आणि मोठा रस्ता होता. जरा फोटो काढले आणि बाईक पळवायला लागलो, कारण रस्ता चांगला असल्या मुळे वेळ घालवायचा नव्हता. अजूनही कुलदीप आणि आदित्य मागेच होते, पण आता फोटू-ला च्या टॉपला जाऊनच थांबायचे असे ठरले. रोहन आणि अभी पुढे निघून गेले होते, मी मस्त फोटो काढत चाललो होतो. रोहन आणि अभी नंतर थोड्या वेळाने मी पण फोटू-ला टॉपला पोहोचलो. फोटू-ला च्या बोर्डच्या सावलीतच आम्ही कुलदीप आणि आदित्यची वाट पाहत बसलो. आता ३ वाजून गेले होते, भूख लागली होती म्हणून बरोबर आणलेले ड्र्यफ्रुट्स खायला लागलो. फोटू-ला हा श्रीनगर ते लेह ह्या मार्गावरचा सर्वोच्च उंच पॉइंट आहे. फोटू-ला ची उंची १३,४७९ फुट आहे आणि आमची या ट्रीप वर अजून पर्येंत गाठलेली सर्वोच जास्त उंची आहे. बसून बसून कंटाळा आला म्हणून मी फोटो काढायला लागलो. तेवढ्यात एक ट्रक आला, त्या ट्रकवाल्याला विचारले "आपने कोई बाईकस देखी क्या पीछे" तो ट्रकवाला म्हणाला "आपका आदमी लेकर आया हु मे" आणि बघतोतर काय ट्रक मधून आशिष उतरत होता. मी आशिषचा फोटो काढला आणि बाईकस बद्दल विचार-पूस चालु केली. आशिष बोलला चामायला कुलदीपची एफझी डबल सीट चढतच नव्हती. सारखी बंद पडायची आणि अधून मधून आदित्यची पल्सर पण, म्हणून मी ट्रकने आलो. थोड्या वेळाने आदित्य आणि कुलदीप पण आले. आम्ही त्याचं फोटोग्राफी आणि टाळ्यांनी स्वागत केले. पाठो-पाठ आमची गाडी पण आली, तसा जास्त वेळ न घालवता आम्ही फोटू-ला टॉप वरून सुटलो. या सर्वांत ४ वाजले होते आणि आता आम्हाला लेह गाठायला रात्र हे नक्कीच असे वाटत होते. आम्ह्च पुढच लक्ष होते "लामायेरू".



फोटू-ला टॉप सोडला आणि सर्व उतरण लागले. उतरण म्हटले की आमच्या बाईक जरा जास्त वेग घेतात पण सावधपणाने. ३०-४० मिनटातच आम्ही "लामायेरू" च्या वरच्या रस्त्याला पोहोचलो. इकडन उजवी कडचा रस्ता लामायेरू गुम्पा कडे जातो, पण हा रस्ता पूर्ण झाला नाही म्हणून बंद होता आणि डावी कडून लेहचा रस्ता. आमच्या गाडीच्या ड्रायवरने सांगितले की " आगे से एक रस्ता है , चलके जा सकते हो". मग आम्ही डावीकडचा लेहचा रस्ता पकडला. लगेच लामायेरूचा पायी जाण्याच्या रस्त्याला थांबलो. अभी आणि रोहन जरा पायी खाली जाऊन रस्ता पाहून आले, तर त्यांना मजबूत धापा लागल्या होत्या. जरासे उतरून चढल्यावर एवढ्या धापा लागल्या होत्या मग संपूर्ण लामयेरू पर्येंत जाऊन परत वरती येणे म्हणजे वाट लागली असती. हवेतल ऑक्सिजनचे कमी प्रमाण बाईक वरती फार काय जाणवत नव्हते, पण जराशी चढ उतार रोहन आणि अभिने केल्याची पाहून आम्हा सर्वाना जाणवायला लागले होते. वास्तविक लामायेरू गुम्पाला जायचा मुख्य रस्ता आहे पण हा घाट संपूर्ण खाली उतरून मग परत वरती लामायेरू पर्येंत दुसर्या बाजूने चढायचे , म्हणजे २५-३० किलो मीटरचा वळसा. या डोंगरात २५-३० किलो मीटर म्हणजे भरपूर अंतर होते आणि शिवाय ५ वाजत हि आले होते.आमचे उधिष्ट आता लेह होते आणि त्याला हि रात्र होणार हे माहित होते. शेवटी पर्याय नाही म्हणून लामायेरू गुम्पा बघायची नाही असे ठरले. माझ्या सहित बरेच जण नाराज झाले होते, कारण लामायेरू गुम्पा हि लडाख परिसरातली सर्वांत श्रीमंत गुम्पा आणि पाहण्या सारखी होती. पण आमच्या ग्रुपचे पूर्वानुभव मला, अभी आणि रोहनला माहित होते म्हणून मी पण लामायेरू गुम्पा पाहण्यास जास्त भीड घातली नाही. लामायेरू गुम्पा फोटो स्वरूपातच पहिली आणि आम्ही लेहसाठी प्रस्थान केले. थकल्या मुळे दीपाली गाडीत गेली होती आणि शोबित माझ्या बरोबर होता. आता पुन्हा उतरण होते आणि रस्ता थोडा खराब होता. वरून रस्त्यावर बारीक खडी पण होती, त्यामुळे बाईक जरा हळू चालवावी लागत होती. थोड्या वेळाने मधेच आर्मीच्या जवानाने आम्हाला थांबवले आणि म्हणाला "आगे नहीं जा सकते आपको रुकना पड़ेगा, सुरुंग लगा रहे है ". मग काय थांबलो, अभिजीतने तर लगेच रस्त्यावर पथारी पसरली आणि मस्त एक १५-२० मींटानची झोप काढली. आमची गाडी पुढे निघून गेली होती आणि वरून आम्हाला दिसत होती. सुरुंग लागला आणि आम्ही निघालो, नुसता उतारच होता. बरच खाली उतरून आल्यावर मधेच एक रस्ता लामायेरू गुम्पा कडे फुटतो , हीच ती लामायेरू गुम्पा कडे जाण्याची मुख्य वाट. पण आम्ही लेहच्या दिशेने निघालो. संपूर्ण घाट उतरून ९६०० फुट उंचीवर खालत्से गावा मध्ये लेहच्या पठारावर उतरलो तेव्हा ६ वाजले होते. उजवी कडे एक छोटासा ढाबा दिसला. कोणासही काही न विचारता सर्वच बाईकस लगेच थांबल्या , तशी सर्वानाच भूख लागली होती आणि ते साहाजिक आहे. सकाळी नाष्ट्या नंतर चहा-बिस्कीट, ड्र्यफ्रुट्स आणि पाणी सोडले तर तसे काहीच पडले नव्हते. विचित्र असलो तरी शेवटी माणूसच आहोत आम्ही, उपाशी पोटी तरी किती गाडी चालवणार.
तसे सर्वच थकले होते, तोंड-हात धुऊन जेवणाची ऑर्डर केली. जेवायला मस्त चपाती-भाजी, दाल-चावल, मॅगी, ऑमलेट असे भरपूर खायला होत. आप-आपल्या आवडी नुसार सर्वांनी ऑर्डर सांगितली, पण जे पहिले येत होते त्याच्यावर सर्व मिळून ताव मारत होते. जवळ-जवळ अर्ध-पाऊण तास जेवण करून आम्ही बाहेर निघालो. दिवस भरात पाणी संपले होते म्हणून ते हि भरून घेतले. तेवढ्यात माझे लक्ष गेले अभिच्या बाईकला अडकलेल्या तारे कडे. मी आणि अभिने तार काढली तेव्हा कळले कि किमान २-२.५ मीटर तार चैन स्पोकेत आणि टायरच्या मध्ये अडकली होती. ७ वाजत आले होते आणि आता अंधारातच आम्हाला पुढेचे ९० किलो मीटर बाईक चालवायची आहे, म्हणून मी हेल्मेटच वायझर धुऊन घेतल आणि निघालो. आम्ह्ची गाडी सुद्धा पुढे खालत्से गावातच खायला थांबले होते. नुसरा-उलेटोप अशी एकामागुन एक गावे अंधारात पार करत आम्ही लेहकडे सरकत होतो. खालत्से सोडल्या पासून आता पर्येंत आणि पुढचा सर्व लेह पर्येंतचा रस्ता मस्त होता. सर्वात पुढे गाडी, मध्ये कुलदीप आणि मागे रोहन असे होते. थोड्या अंतरावर मी, आदित्य आणि अभी असे होतो. मिन्नूच्या जवळ माझ्या बाईक मधले पेट्रोल जरा कमी झाल्याचे मला जाणवले. बाईक बाजूला थांबली आणि अभिच्या डिकीत असलेले स्पेयर पेट्रोल जे घेतले होते, ते मी बाईक मध्ये टाकले आणि इकडनंच अभिने लेह मध्ये राहण्यासाठी बुक केलेल्या रेनबो हॉटेलला फोन लावला. त्याला सांगितले कि आम्ही ११ वाजे पर्येंत लेहला पोहोचतो. आता ९ वाजले होते, जरा पाणी पिऊन आम्ही पुढे निघालो. थोडेसेच किलो मीटर पुढे गेलो आणि रोहन-शमिका एका गुरुद्वार्याच्या दारात थांबलेले दिसले. आम्ही थांबलो आणि विचारले काय झाले बाबा.... मनात उगाचच दुर्विचार येऊन गेले, पण तसे काही नव्हते. रोहन म्हणाला अरे तुमचीच वाट पाहत हळू-हळू चालवत होतो आणि लाईट दिसली म्हणून थांबलो. गाडी आणि कुलदीप तर पुढे निघून गेले सुसाट. आम्ही म्हणालो च्यामायला दिवस भर त्याच्या बाईकने रडून रस दिला आणि आता साला बाईक पळवतोय. तोडस हास्य पुक्ले आणि आम्ही पुढे लेह साठी पारायण केले.
आता शेवटचे ३०-३५ किलो मीटर राहिले होते. मधेच थोड्या वेळाने, मी ५०-६० ला पळवत असलेले बाईक एकदम खेचल्या-खेचल्या सारखी वाटायला लागली आणि माझा वेग ३०-४० ला आला. बाईक रेमटोतोय तरी ३०-४० च्या पुढे जाइच ना, मला काय त्यावेळेला कळालेच नाही. मग नंतर असे वाटले कि, आपण "मॅगनेटिक हिल" च्या मधून गेलो तर नाही ना. खरोखरच आम्ही "मॅगनेटिक हिल"च्या मधून चाललो होतो. २-३ किलो मीटरचा पट्टा गेला आणि पुन्हा बाईक ५०-६० च्या स्पीडला आली. पट-पट आम्ही लेहच्या जवळ-जवळ चाललो होतो. आता लेहच्या हद्दीत शिरलो, हे रस्त्यावरच्या उजेडा वरून जाणवत होते. लेह शहराच्या ८-१० किलो मीटर अलीकडे लेह विमानतळ आहे. तिकडन आम्ही पास झालो आणि थेट लेहच्या मुख्य चौकात येऊन पोहोचलो. या चौकातच मनाली कडून लेह कडे येणारा रस्ता पण मिळतो. लेह शहर पाहून एवडे मोठे शहर असले असे वाटले नव्हते. मला तर हादरलो होतो, कारण नाही म्हटले तरी तसे बरेच मोठे शहर वाटत होते. गाडी, कुलदीप आणि अमेय म्हात्रे हॉटेल वर पोहोचले होते. मग अमेय म्हात्रेला फोन लावला आणि आम्हाला हॉटेलचा रस्ता दाखवण्यासाठी येण्यास सांगितले. अमेय म्हात्रे आला आणि मग आम्ही सर्व रेनबो हॉटेल वर पोहोचलो. हॉटेल वर बाईक उभ्या केल्या आणि सर्वांनी आरडा-ओरड सुरु केली, एकदाच लेह गाठले म्हणून असेल बहुदा. ११ वाजले होते आणि सर्वच फार थकले होतो आता. हॉटेलचा मालक नबी आणि त्याची बायको आमची वाट बघतच होते. त्यांनी आम्हाला आप-आपल्या रूम दाखवल्या आणि बोलले "फ्रेश होकर जल्दी खाना खाने के लिये आ जाना", "बिना खाना खाए सोना नहीं हा" वरून असे हि म्हणाले. आता मात्र माझे रूम पाटनर बदले होते. मी, आदित्य आणि शोबित. हॉटेलच्या तळ मजल्याला मधली खोली होती. बाजूलाच दिपाली आणि साधला रूम मिळाली. म्हणजे सर्व मस्ती करणारे एकत्र. पटा-पाट सर्व फ्रेश होऊन जेवयला, अंगणात मांडलेल्या टेबल वर आले. लेहला पोहोचल्याच जशन म्हणा किंवा आमच्या नेहमीच्या सवई ने म्हणा ना, आमची जेवताना मस्ती चालू होती. तेवढ्यात माझ्या बाजूच्या रूम मधून एक फिरंग बाहेर आला आणि नबीच्या बायकोला उदेशून म्हणाला "I have paid for this night, I want to sleep. I have a flight early morning". मग त्याने आम्हाला राग दिला आणि पुन्हा आत गेला. आम्ही तर हा सर्व प्रकार पाहून जोरात त्याच्या पुढ्यातच हसायला लागलो आणि आम्ही आता कसले ऐकतोय. आम्ही अजून मोठ्या आवाजात मस्ती करायला लागलो, "असे नाटक इंडियात चालणार नाही.......... आपण त्याला त्याच्या बायको बरोबर तो मस्ती करत असताना तर नाही ना त्रास दिला.........." आणि वगरे-वगरे. आम्ही कसले सोडतोय त्याला राग देतो काय आम्हाला. वास्तविक पहिल्यांदा त्याला त्रास दयाचां असे आम्ह्चे काही नव्हते , पण राग दिल्यावर मात्र मुदामून . शेवटी नबीच्या बायकोने आम्हाला सांगितले "Please, फिर वो मुझे चिल्लाएगा और उसका सुबह जल्दी फ्लाईट है ". मग मात्र आम्ही गप्प बसलो. संपूर्ण गप्प बसलो असे हि नाही, पण आवाज मात्र हळू चालला होता. कारण कशाला उगाचच तिच्या होटेलच नाव खराब करा. जेवणा नंतर हळू आवाजातच आम्ही मीटिंग घेतली. तेवढ्यात १२ वाजे पर्यंत उमेश आणि साधना पण आले. मी इकडे-तिकडे काहीना काही तरी करत बसलो. उद्या आम्हाला तसे काय लवकर उठायचे नव्हते. थोडा वेळ आरामात रेगाळत बसलो आणि मग झोपायला गेलो.

3 comments:

  1. Kharch Khoopach adventurous pravas hota ani jo shabdtha vyakt kela to tar apratimch.

    ReplyDelete
  2. अमेय साळवी - फटका माणूस31/3/10 23:25

    धन्यवाद निलेश.....

    ReplyDelete
  3. तू तुझा ब्लॉग मराठी ब्लोग्स.नेट वर का जोडलेला नाही आहेस अजून ??? लिखाण जबरया होतय ... :) पुन्हा एकदा आठवणी जाग्या होत आहेत... :)

    ReplyDelete