१३ ऑगस्ट २००९, आज तसा आमच्या आरामाचा दिवस होता. सकाळी लवकर उठून कुठे ही जायचे नव्हते, मी तर अलार्म पण लावला नव्हता. ८ च्या दरम्यान दिपालीला माझ्या day bags मध्ये तीच काही समान होते ते तिला हवे होते म्हणून आली आणि तिच्या स्टाइल मध्ये ओरडली "मेल्यानो उठा". पटकन आंघोळ वगैरे करून आम्ही टेबलवर नाष्ट्यासाठी जमलो. नाष्ट्याला मस्त लडाखी ब्रेड, बटर, जॅम, ऑमलेट आणि चहा-कॉफी मांडले होते, ज्यांना जे हवे ते त्यांनी घ्यावे. आज बरेच दिवसांनी निवांत नाष्टा चालला होता. नाहीतर दररोज गिळा आणि पळा. आम्ही सर्व एकत्र म्हटले कि बडबड तर आलीच. इकड-तिकडच्या चर्चा , गप्पा-गोष्टी, बडबड, मस्ती आणि आता पर्यंत आलेल्या अनुभवाची देवाण-घेवाण चाली होती. एवढ्यात ऐश्वर्या बोलली, चीज असते तर किती बरे झाले असते. मी बोललो आहेना, तिनेच मला चीज आणायला सांगितले होते बहुदा विसरली असावी. चीज आहे असे कळताच आदित्य आणि ऐश्वर्याला जो आनंद झाला, जसे कि वाळवंटात पाणी मिळाले. नाष्टा एकदम आरामातच चालला होता. लेहचे वातावरण फारच छान होते, किमान हॉटेलच्या परिसरात तरी तसे वाटत होते. मस्त बागेच्या बाजूला सावलीत टेबल मांडले होते आणि हवेत जरासा थंडावा पण होता. सावली सोडली तर ऊन होते. या सर्व वातावरणात नबीची बायको आम्हाला प्रेमाने आग्रह करून वाढत होती. कसल सुंदर होते ते, मस्त आम्ही रेंगाळत बसलो होतो. प्रत्येकाने आप-आपल्या घरी फोन लावून घेतले. काल लेहला पोहोचायला उशीर झाला म्हणून घरी कोणीच फोन लावले नव्हते. मी पण आईला फोन लावला, जरा आई बरोबर गप्पा मारलाय, तेव्हा आई म्हणाली काय बरा आहेस ना धापा का लागत आहेत. लेहला हवेत ऑक्सिजनचे कमी प्रमाण असते म्हणून जोरात बोललो तरी थोडी धाप लागते असे सांगितले. नाष्ट्या नंतर सर्व जण आप-आपल्या कामाला लागले. बरेच दिवस ऐश्वर्याची तब्बेत वर खाली होत होती म्हणून तिला डॉक्टर कडे घेऊन जायचे होते.
पूनमला हि जबाबदारी सोपवली होती. आम्हाला बाईकस मेकॅनिक कडे घेऊन जायच्या होत्या म्हणून आम्ही तिकडे जाणार होतो. साधना आणि उमेशला १५ ऑगस्टच्या शो साठी फुटेज श्रीनगरला पाठवायचे होते, म्हणून ते हे काम करत रूम वर बसले. बाकी सर्व काहीना काही तरी करत होते. नाही तर आराम करत होते. नाबीचा मुलगा "असीम" त्या बरोबर पण मस्ती चालू होतीच. मी बाईक घेऊन जाण्यासाठी बाकीच्यांची वाट पाहत असताना, रेनबो हॉटेलच्या आवारात काढलेले फुलांचे हे काही फोटो.

पूनम आणि ऐश्वर्याला हॉटेल जवळच सरकारी हॉस्पिटल मध्ये सोडले आणि मग मी, अभी, रोहन, आदित्य, कुलदीप व अमेय म्हात्रे बाईकस घेऊन मेकॅनिक शोधायला निघालो. आमचे हॉटेल लेहच्या एका टोकाला होते. बाजारातून शोधत-शोधत मुख्य चौका पर्येंत आलो. इकडेच डाव्या हाताला लेह्चा एकमेव पेट्रोल पंप आहे. कारगील सोडले तर लेह शिवाय कुठेही पेट्रोल पंप नाही. म्हणजे जवळ-जवळ ३०० किलो मीटर मध्ये कुठेही पेट्रोल मिळत नाही आणि मनाली कडून येत असाल तर केलोंग सोडले तर लेह शिवाय मध्ये कुठेही पेट्रोल मिळत नाही, म्हणजे जवळ-जवळ ३६५ किलो मीटर. चौकातूनच सरळ जरा पुढे विमानतळाच्या रस्त्यावरच मेकॅनिक आहे असे कळेल. मग एकदाचा तो मेकॅनिक भेटला. तो तर काय फारच बिझी होता, कसे-बसे त्याला पटवून आमच्या बाईक पाहायला सांगितल्या. माझ्या आणि रोहनच्या बाईकचे तसे काही मेजर काम नव्हते. जरा फक्त ओईल वगैरे टाकून डाग-डूगी करायची होती. अभिच्या पण बाईकचे तसे काही काम नव्हते, पण त्याच्या बाईकच्या साइड stand ची स्प्रिंग पडली होती. ती लावायची होती आणि आमच्या सारखी डाग-डूगी करायची होती.पण ती स्प्रिंग काही केल् या मिळाली नाही. मग तो काय करणार, पाहिजे तेव्हा stand सोडायचा आणि चालवताना बांधून ठेवायचा. मुख्य काम होते ते कुलदीप आणि आदित्यच्या बाईकचे. त्यांच्या बाईकने काल आम्हला बराच बाबा त्रास दिला. मेकॅनिकला काय होते ते सांगितले आणि तो काही न बोलता कामाला लागला. बघतोतर त्याने कॅर्बोरेटर काढला. मला यात सर्वात जास्त रस आहे, म्हणून तो काय करतोय ते पाहत बसलो. त्याने इलेक्टिक वायर घेतली आणि तिच्यातली एक बारीक तार काढली. हि तार त्याने कॅर्बोरेटरच्या जेट मध्ये घातली आणि कॅर्बोरेटर साफ करून परत लावला. एवढ्या सर्व कामात तो एकाही शब्द बोलला नव्हता. आता मात्र तो बोलला "अब टेन्शन मत लो, बाईक मस्त चलेगी". त्याने हे का केले ते माझ्या लक्षात आले. लेहच्या हवेत कमी ऑक्सिजन आहे आणि बाईकच्या जेट मधून जास्त पेट्रोल पडत असते. कमी ऑक्सिजन आणि जास्त पेट्रोल मुळे, लागणारी पॉवर जनरेट होत नाही. म्हणून जेट मध्ये तार टाकून आता पेट्रोल पण कमी पडणार. आता हवा व पेट्रोल प्रमाणात असल्या कारणास्तव व्यवस्थित पॉवर जनरेट होणार. खरोखर आणि पुढे तसेच झाले, या दोन्ही बाईकने काय मुंबई पर्यंत त्रास दिला नाही. बाईकचे सर्व काम आवरले आणि हॉटेलवर परत आलो.
इकडे कळले कि ऐश्वर्याला दुसर्या सरकारी हॉस्पिटल मध्ये घेउन जायचे आहे, कारण जिथे सोडले होते तिकडे काही होणार नव्हते. अभी आणि रोहनला हॉटेलवर काहीतरी काम होते. म्हणून मी, आदित्य, अमेय म्हात्रे, पूनम आणि ऐश्वर्या असे मोठ्या सरकारी हॉस्पिटलला गेलो. हे हॉस्पिटल मुख्य चौकाच्या जवळच होते, पेट्रोल पंपाच्या एकदम समोर. च्यामारी परत तीत पर्यंतच आलो होतो. केस-पेपर काढला आणि डॉक्टर कडे गेलो. डॉक्टर मस्त जेवायला गेला होता, हे ऐकून मला पण भूख लागली आणि खरोखरच लागलीच होती १२.३० होऊन गेले होते. डॉक्टर येई पर्येंत आमचे टवाळ काम चालू होते. थोड्या वेळाने डॉक्टर आला आणि ऐश्वर्याला तपासून गोळ्या दिल्या. हॉस्पिटलच सर्व आवरून आम्ही परत हॉटेलवर आलो. आम्ही येई पर्येंत जेवणाची सर्व सोय रोहनने करून ठेवली होती आणि ते काय रोहनला सांगायची गरज नाही, हुशार आहे तो यात......मग फ्रेश होऊन परत कामाला लागलो, म्हणजे "खादडायला" लागलो. आज आम्हाला हेच तर काम होते. इकड-तिकडचे थोडेसे काम आणि फिरण सोडले तर खाण्या शिवाय दुसरे काय काम होते. मस्त निवांत जेवण झाले होते. जेवण आवरले आणि इकड-तिकडची थोडीशी आवरा-आवर करत बसलो. एवढ सर्व सुरळीत चालले होते, असे आमच्या बरोबर कधी होईल का?. मुंबई वरून त्याच मन्सूर एजंट कडून लेह युनियनच्या ज्या माणसा कडून गाडी बुक केली होती त्याला अभिने फोन लावला. त्याच्या कडून कळले कि मन्सूरने बुकिंग साठी काही सांगितलेच नव्हते. हरामखोर मन्सूर आता मजबूत डोक्यात गेला होता आणि त्याला फोन लावला तर तो फोनही उचलत नव्हता. सर्वंनी ठरवले कि मारा त्याला फाट्यावर आता, मुंबईला गेल्यावर बघू कसे त्याच्या कडून पैसे वसूल करायचे ते. कारण पुन्हा त्याच्याशी हुज्जत घालून वेळ वाया घालवायचा नव्हता. मग हे सर्व नाबिला सांगितले आणि त्याने त्याच्या मेहुण्याची गाडी देतो असे सांगितले. मन्सूरच्या गाडीवर काय भरवसा ठेवण्यात आता काय अर्थ नव्हता, कारण येतो म्हणून कधी वेळेवर नाही आला तर आम्ही बोंबललो. पण नवीन गाडी करायची म्हणजे पैश्यांची तडजोड करावी लागणार होती. मग सर्व मताने तेल लावत गेला मन्सूर असे म्हणून आम्ही नाबिला होकार दिला. नाबीचा ड्रायवर ३ वाजे पर्येंत येईल असे सांगितले.
ठरल्या प्रमाणे आम्ही ३ वाजता लेहच्या जवळ पास असलेली काही स्थळे पाहायाचे ठरवले होते. गाडीचा ड्रायवर लोकल असल्या मुळे तो आम्हाला आता फिरवणार होता, म्हणून गाडी सर्वात पुढे आणि मागे आम्ही सर्व बाईक स्वार असे निघालो. मुख्य चौकातून बाईक मध्ये पेट्रोल घातले आणि मनालीचा रस्ता पकडला. नेहमी प्रमाणे मी आणि दिपाली एकत्रच होतो आणि मी अधून-मधून फोटोसाठी थांबत पण होतो. पण सकाळी जसे मस्त प्लेझंट वातावण होते तसे आता नव्हते, ज्याम चटके लागत होते. जेमतेम १८ किलो मिटरच अंतर होते, म्हणून लगेचच आम्ही "थिकसे गुम्पा" च्या फाट्या वर पोहचलो. फाट्यावरून डावीकडे वळलो आणि रस्त्या वरूनच थिकसेच दर्शन झाले.
मी थांबून फोटो काढला आणि पुढे निघालो. पार्किंग मध्ये बाईकस लावल्या आणि थिकसे गुम्पाच्या पायऱ्या चढायला लागलो. पहिल्या टप्याच्या पायऱ्या चढतोन-चढतो तर आम्हाला धापा लागल्या. जरा मजला भर पायऱ्या चढलो तर मजबूत धापा लागत होत्या. अजून आम्ही अक्लेमेटाइज झालो नव्हतो. काही कठड्यावर बसले तर काही पायर्यावरच बसेल, तेव्हा काढलेला हा फोटो.......

जरा दम खालला आणि परत पायर्या चढायला लागलो. पण आता पायर्यांच्या बाजूला असलेल्या भिंती मध्ये लाकडाचे फिरते ठोकळे (छोट्या फिरत्या घंटा ) होते. या सर्व हाताने फिरवत आम्ही पायर्या चढू लागलो. गुम्पाच्या गेट वर एक लामा बसला होता. तसा तर तो पारंपारिक लढाकी वेशातच होता, पण डोळ्यावर स्टायलिश ग्लेयर्स, पायात sport शूज आणि एमपी3 प्लेयर वर गाणी ऐकत होता. त्याच्या कडे पाहिले आणि गेट मधून आत निघालो. तेवढ्यात त्याने आम्हाला अडवले आणि बोलला "तिकीट". थिकसे गुम्पा पहायची असेल तर ३० रुपये प्रत्येकी तिकीट आहे. आम्ही तिकीट काढले आणि गुम्पाच्या आत शिरलो. 

आत शिरल्या-शिरल्या बरच मोठ अंगण आहे आणि अंगणाच्या भिंतींवर चित्र काढलेली आहेत. गुम्पा मध्ये एकदम शांतता होती. गुम्पा एवढी सुंदर होती कि हे पाहू कि ते पाहू, हा फोटो काढू कि तो फोटो काढू. असे माझे आणि बहुतेकांचे होत होते. एक १०-१२ पायऱ्या चढलो आणि त्याच्या प्रार्थना स्थळात शिरलो. अंधुक प्रकाशात १५ एक लामा मध्य भागी बसून, बुद्ध धर्माच्या ग्रंथाचे एका सुरात पारायण करत होते. कसले प्रसन्न वाटत होते तिकडे. आम्ही आवाज न करता आत शिरलो. इतक्यात त्यांची ती प्रार्थना संपली. आम्ही त्या लामाशी बोलायचा प्रयत्न हि केला पण कोणीही आमच्याशी बोलायला तयारच नव्हते. आमच्याशी एकही शब्द न बोलता ते लामा बाहेर निघून गेले.
आतमध्ये खांबांवर , भिंतींवर, छतावर सुंदर चित्रे आणि नक्षी काढली होती. खांबांवर काही मुखवटे पण अडकवले होते. थोडे आत गेलो, एका खोलीत गौतम बुद्ध आणि काही देवतांचे पुतळे व तसबिरी काचेच्या आत मांडल्या होत्या. जमिनिसाहित सर्व बांधकाम लाकडी होते. फोटो काढले आणि मी बाहेर आलो. आणि बाजूलाच असलेल्या एका खोलीच्या गच्चीवर चढलो. काय तो परिसर दिसत होता. अर्ध्या भागात रेती, अर्ध्या भागात हिरवळ आणि सभवताली डोंगर. मी पानारोनिक फोटो काढला आणि गुम्पाचा दुसरा भाग पहायला गेलो.


आम्ह्च आता दुसर पाहायाचे ठिकाण होते "शे पॅलेस ". १० एक किलोमीटर मध्येच आम्ही "शे पॅलेस"ला पोहोचलो. दारात बाईक लावल्या आणि चढायला लागलो. तसे फार काय वरती चढायचे नव्हते पण धापा मात्र लागत होत्या. आत शिरलो, पण मला पॅलेस सारख असे विशेष काही वाटले नाही. जवळ-जवळ बांधलेली घर आणि ती हि ओबड-धोबड अवस्थेत. जरा पुढे गेलो तोच तिकड रोहन, शमिका, उमेश आणि मला एकावर-एक असे रचलेले गोटे दिसले. आपण लगोरी साठी रचतो ना तसे. ते पाहून रोहन-शमिका लागले तसेच रचायला लागले. मी पण थोडासा प्रयत्न केला पण माझ्या मध्ये काय त्याच्या एवढा संयम नव्हता. मी २-४ वेळा हात मारला, पण शेवटी वैतागलो आणि मरू दे बोलून पुढचा भाग पाहायला निघालो.

शे पॅलेस मध्ये हि एक छोटीशी गुम्पा आहे. मग आम्ही ती पाहायला घेतली. हि थिकसे एवढी काही सुरेख नव्हती, पण ठीक-ठाक होती. इकडे पण थिकसे सारखीच गौतम बुद्धांची अर्धी खाली आणि अर्धी वरती अशी मूर्ती होती.


इकडन जे निघालो ते २-३ किलोमीटरवर असलेल्या "सिंधूघाट" येथे. सिंधू नदी वर बांधलेले एक छोटासा आणि साधा-सुधा घाट आहे. या पेक्षा कैक सुंदर असे घाट हरिद्वारला पहायला मिळतात आणि इकडच्या पेक्षा फार छान सिंधू नदीचे दर्शन आम्ही गेल्या काही दिवसात घेतले होते. मला तर काहीच आवडले नव्हते इकडे.
एखाद-दुसरा फोटो काढला आणि ड्रायवरला मनातल्या-मनात शिव्या घातल्या "कशाला आणलेस इकडे, उगाचच वेळ वाया घालवला". बाकी काही जन मात्र मस्त पाण्यात पाय घालून मध्येच हाताने पाणी उडवत निवांत आराम करत बसले होते. मला तर पाण्याला पाय लावावासा पण वाटत नव्हता, म्हणून मी सावलीत जवळील कठड्यावर बसून सर्वांची वाट पहात होते. थोड्या वेळेने सर्वच निघालो. बाहेर आलो आणि काही मराठी माणस भेटली, त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या आणि पुढे निघालो.

आता आमचे पुढचे ठिकाण होते "शांतीस्तूप", जे लेह शहराच्याच बाजूला एका टेकडीवर होते. मधेच रस्त्यात मला रेतीच्या डोंगरावर मावळती सूर्य किरण पडलेली आवडली म्हणून मी हा काढलेला फोटो.
सिंधूघाट वरून जे निघालो ते थेट मुख्य चौकात आणि चौकातून शांतीस्तूपा कडे. वरती पोहचलो तेव्हा बाईक लावायला पण जागा नव्हती. एक छोटासा रस्ता आणि भरपूर गाड्या होत्या. ड्रायवरला बोललो लाव तुला जागा मिळेल तिकडे. आम्ही बाईक रस्त्याच्या बाजूला सरळ उभ्या केल्या आणि वर स्तूपा कडे गेलो. सुरवातीलाच आम्हाला काही लोक चहा-नाष्टा करताना दिसली. आम्ही पण तिकडेच वळलो. जागा पकडून आप-आपली ऑर्डर करायला सुरवात केली आणि आता आम्ही काय वरती येत नाही, इकडनच स्तूप फार छान दिसतोय असे हि बोलून मोकळे झाले.




बाईक मध्ये पेट्रोल भरले, इकडे आम्हाला पुण्याचे पण काही लोक बाईक वर आले होते ते भेटले. यातले काही लोक रोहन, अमेय म्हात्रे आणि कुलदीपच्या ओळखीचे होते. यांच्याशी पण थोड्याश्य गप्पा मारल्या आणि आम्ही हॉटेलवर गेलो. दुपारी नाबिच्या बायकोने आम्हाला विचारले होते "रात को खाना इधर खाओगे कि बाहेर, मुझे मालूम है कि आपको हमारा खाना पसंद नाही आयेगा". आम्ही बोललो "हा बाहर खायेंगे". मग तिनेच आम्हाला "ड्रिमलँड हॉटेल" ला जा असे सांगितले होते. काही जणांना रोहन ने हॉटेल शोधायला सांगितले आणि आम्हाला तयार होण्यास सांगितले. हॉटेल मिळाले आणि आम्ही सर्व जेवायला गेलो. मस्त आपल्याला मुंबईत मिळते ना तसे जेवण मिळाले. नाबीची बायको बरोबर बोलली होती. आमच्या कडून भरमसाट जेवणाची ऑर्डर झाली. जरा उशिरा का होईना पण जेवण आले. मस्त तव मारला. जेवण झाल्यावर आम्ही बाईक वरून रेनबो हॉटेल कडे आलो. बाकी सर्वांना चालत हॉटेल पर्येंत यायचे होते. सर्वे हॉटेल वर आल्यावर अभिने मीटिंग घेऊन उद्या बद्दल सर्व माहिती सांगितली. उद्या साठी सज्ज होऊन आम्ही सर्व झोपी गेलो.
या दिवसाचे मी काढलेले सर्व फोटो पहायचे असल्यास टिचकी मारा: सहाव्या दिवसाचे सर्व फोटो
या दिवसाचे मी काढलेले सर्व फोटो पहायचे असल्यास टिचकी मारा: सहाव्या दिवसाचे सर्व फोटो
No comments:
Post a Comment