१८ ऑगस्ट २००९ , काल रात्री काही केल्या एक तर झोप लागत नव्हती आणि लागायची तर सारखी उडत होती , काय झाले होते ते कळलेच नाही. जरा झोप लागायची आणि जाग यायची , असे बरेच वेळा झाले. तसे पहायला गेले तर मला एकदा झोप लागली कि , सकाळी कोणीही उठवत नाही तो पर्येंत कधीच जाग येत नाही. पण त्या दिवशी काय झाले होते ते कळेच ना. मला जरा थंडी पण वाजत होती. शेवटच्या वेळी उठलो तेव्हा खिडकितून पाहिले तर उजाडण्या पूर्वीचे निळे आकाश आणि त्यामध्ये चंद्र-तारे. मी पटकन उठून खिडकितून बाहेर पाहायला लागलो. थोड्या वेळाने सूर्योदय होणार हे जाणवायला लागले. त्सो-मोरीरीच्या काठी डोंगरांच्या मागून होणाऱ्या सूर्योदय अनुभवायला मिळणार आणि त्या क्षणाचे फोटो काढावेत म्हणून मी कॅमेरा काढायला लागलो. कॅमेरा काढायच्या आवाजात अमेय म्हात्रे आणि कुलदीप पण उठले. त्यांनी मला विचारले काय झाले , मी बोललो सूर्योदय होणार आहे मस्त वाटते बघ. म्हणून मी फोटो काढायला गच्चीवर चाललो आहे. मी कॅमेरा आणि ट्रायपॉट घेऊन गच्ची वर जाणारी बांबूची शिडी चढत होतो , एवढ्यात माझ्या मागे अमेय म्हात्रे आणि कुलदीप आप-आपला कॅमेरा घेऊन उभे होते. मी बोललो व्हा! आता मज्जा येईल फोटोग्राफिला. आम्ही गच्ची वर चढलो तेव्हा हे जाणवले कि त्या घराचे संपूर्ण छत मातीचे होते. लाकडांवर माती पसरवून बनवलेले ते छत होते , त्यामुळे आम्ही हळू हळू पुढे जाऊन ट्रायपॉट लावून फ़ोटोग्राफी करायला लागलो. वर मस्त वारा होता त्यामुळे मला फारच थंडी वाजत होती. सूर्योदय होण्याची मी वाट पाहत होतो आणि बराच वेळ फोटोग्राफी करून मग मी खाली आलो.
अमेय म्हात्रे आणि कुलदीप मात्र थोडा वेळ फोटोग्राफी करत होते. आम्ही गच्ची वरती चढलो म्हणून खाली झोपलेल्या लोकांच्या अंगावर थोडी-थोडी माती पडायला लागली आणि आवाज यायला लागला म्हणून ते घाबरून उठले. पुनमला पण वर जायचे होते , तिला आम्ही सर्वानी वरती चढवले आणि मी दात घासायला गेलो. परत येतो आणि पाहतो तर अमेय म्हात्रे आणि कुलदीप खाली आले होते , पण खाली येताना त्यांनी गच्ची वर जायची शिडी बाजूला काढून ठेवली होती. सर्व आपल्या कामाला लागले तरी पूनम बोंबलतच होती. १५ मिनिट तिला गच्चीवर बोंबलत ठेवले आणि मग शिडी लावली.

७ च्या दरम्यान सर्व तयार होऊन चाह-नाश्त्यासाठी खाली आलो. मस्त थंडीत गरम-गरम चहा घेतली आणि आमच्या कड़े असलेल्या बिस्किट व फरसाणचा नाश्ता केला. बाईक गरम करून सर्व सामान बाईक वर आणि गाडीत टाकले. पाणी भरून घेतले , आज मी आणि शोबित एकत्र होतो. दिपलिला जरा आराम हवा होता. तसा आज मला ही आरामाची गरज वाटत होती पण माझी अवेंजेर बाईक कोण चालवणार. उमेश बोलला मी चालविण पण हा पहिला कच्चा रस्ता तू चालव मग पुढे मी चालवतो असे म्हणून ८ च्या दरम्यान त्सो-मोरिरी वरून आम्ही निघालो.

आमच्या गाडीचा ड्राइवर तेनसिंग , या गाडीने आम्हाला आज पांग पर्येंतच सोडणार होता आणि तिकडन आम्हाला पुढे दुसरी गाडी घेऊन जाणार होती. आम्हाला पांग पर्येंत सोडून तेनसिंगला लेहला पोहोचायचे होते म्हणून आज तो जरा घाईत पळवत होता. त्याला काय घाई लागली होती , तो कुठूनही गाडी काढत होतो. रस्ता सोडून अधून-मधून तो बरेच शॉर्टकट मारत होता. आधीच रस्ता भुस-भूषित आणि हा पट्ट्या मस्त रस्ता सोडून बाजूच्या रेतीतून गाडी चालवत होतो . मला पण जर वाटले कि जाऊया त्याच्या मागो-माग , पण लगेच मन आवरले आणि मनातच बोललो तो बाबा इकडचा लोकल आहे. बहुदा त्याला सर्व माहिती असेल असे बोलून आम्ही मात्र शिस्तीत रस्त्याने पुढे चाललो होतो.
जरा पुढे गेलो आणि पाहतो तर आमची गाडी थांबून सर्व बाहेर उभे होते. आम्ही सर्वांनी बाईक रस्त्याच्या बाजूला लावल्या आणि गाडी कडे गेलो. पाहतोतर गाडी वाळूत रुतली होती आणि तेनसिंग गाडी पुढे काढण्याच्या प्रयेत्नात अजून रुतवत होता. आम्ही जरा त्याला थांबवले. सर्व मागून धक्का मारत मग त्याला गाडी बाहेर काढायला सांगितले. गाडी काढायचा बराच प्रयेत्न आम्ही करायला लागलो पण काही केल्या गाडी निघेना. गाडीला धक्का मारून सर्वांची वाट लागली होती , त्या उंचीवर गाडीला धक्का मारणे किंवा उचलणे काय सोपे नव्हते. एवढ्यात मागाहून ४-५ दुसऱ्या गाड्या आल्या.
मग त्या गाडीचे ड्राइवर आणि काही फिरंग प्रवाशी आमच्या मदतीला आले. सर्वानी एक जोर लावून धक्का मारला आणि गाडी बाहेर काढून रस्त्यावर आणली. सर्वाना धन्यवाद म्हणत आम्ही वाळूतच दम खायला बसलो . डोक्यावर ऊन पण रण-रणत होते , दम खाऊन पाणी पिऊन आम्ही सर्व पुढे निघालो. आता मात्र तेनसिंगला आम्ही ताकीद दिली होती , कि तू इकडे तिकडे कुठे हि गाडी घालू नकोस शिस्तीत सरळ रस्त्याने गाडी चालव.



पण मी बराच वेळ गाडीत झोप काढली आणि कधी पांग च्या जवळ पोहचलो ते कळलेच नाही. पांग च्या शेवटच्या उतरणावर मला जाग आली आणि ५-१० मिनटात आम्ही पांगला पोहोचलो. पांग मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला बरीच लोकल लोक टेन्ट लावून , राहण्याची आणि खाण्याची सोय करतात. आम्हाला पण तशी फार भूख लागली होती आणि मागे असलेल्या बाईक यायची पण वाट पाहायची होती. लधाक परिसरात कुठेही खायला काय असे विचारले तर एकाच उत्तर मॅगी , अंडा आणि राजमा चावल. मला तर मॅगी आणि राजमा चावल खाऊन-खाऊन कंटाळा आला होता , पण काय करणार त्या परिसरात दुसरे काहीही मिळत नाही. भूखे अभावी जे मिळेल ते खायला लागत होते पण आता वीट आला होता. नुसती मॅगी खाऊन मला कंटाळा आला म्हणून मी अंडा मॅगी मागवली , जरा चव बदलेल या आशेने. पण कसले काय साध्या मॅगी पेक्षा जास्त बेकार लागत होती , झक मारली आणि अंडा मॅगी मागवली असे वाटले होते. कशी-बशी खाल्ली आणि बाईकस ची वाट पाहत निद्रेच्या अधीन गेलो. अधून-मधून जाग यायची आणि मी विचारायचो आले का ?

आम्ही फार वेळ वाया न घालवता सर्वांनी थोडा आराम करून पुढे निघायच्या तयारीला लागलो. माझी आणि कुलदीपची बाईक नेहमी प्रमाणे फार जास्त पेट्रोल खात होती. आम्ही ज्या टेन्ट स्वरुपात असलेल्या हॉटेल मध्ये जेवण केले होते त्यांच्या कडे असलेले ५ लिटर पेट्रोल घेतले. अशाप्रकरे तिकडचे लोक पेट्रोल ब्लॅकचा पण धंदा करतात , कारण लेह सोडल्या नंतर केलोंग पर्येंत कुठेही पेट्रोल मिळत नाही. आम्ही ब्लॅकने १०० रुपये लिटरने पेट्रोल बाईक मध्ये भरून घेतले. आता परत मी आणि दिपाली बाईक वर , बराच झाला आराम आणि तसे हि काही जण थकले होते. मस्त आराम करून परत बाईक वर स्वार झालो आणि पुढे सरचुच्या दिशेने निघालो.

आम्ही नकी-ला उतरायला लागलो आणि पहातोतर २१ लुप्स समोर दिसले . हा पुढचा रस्ता २१ छोट्या-मोठ्या वळणांचा होता , मस्त वाटत होते . काय सुंदर दृश्य होते ते. २१ लहान मोठी वळणे घेऊन आम्ही ८-१० किलोमीटरचा रस्ता पार करून १३७८० फुटावर आलो. म्हणजे अवघ्या काही मिनटात आम्ही जवळ-जवळ १५०० फुट खाली आलो होतो. इकडन सरचू अंदाजे २० एक किलोमीटर आहे. तसेच आम्ही पुढे निघालो. ७.३० च्या दरम्यान आम्ही सरचू ला पोहोचलो आणि अंधार हि पडायला लागला होता. सरचू मध्ये पण पांग सारखेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोकल लोकांनी टेन्ट लावून राहण्याची आणि खाण्याची सोय केली आहे. विचारले तर १०० रुपये प्रत्येकी राहण्याचे , पण तिथे राहण्यासारखी तशी ती व्यवस्थीत जागा नव्हती आणि आमची गाडी पण पुढे निघून गेली होती. मागो-माग आम्ही पण पुढे निघून गेलो. जवळ-जवळ ७-८ किलोमीटर आम्ही पुढे आलो तरी गाडी दिसेना. शेवटी आम्हला आर्मीचा चेक पोस्ट लागला. सर्व तिकडे थांबलो आणि चेक पोस्टच्या बाहेर असलेल्या जवानांना विचारले , पुढे कुठे राहायची सोय आहे का ? व कुठली गाडी पुढे गेली आहे का ? . त्यांनी ' हा ' असे उत्तर दिले. पण आमचीच गाडी पुढे गेली आहे का हे पाहायला अभी-रोहन पुढे गेले आणि बाकी आम्ही सर्व तिकडेच थांबलो. पण उभ्या-उभ्या आम्हा सर्वांनाच फारच थंडी वाजत होती म्हणून त्या जवानांनी आम्हला त्यांच्या पोस्ट मध्ये बसायला सांगितले. म्हणून त्यांचे आतले काही जवान बाहेर येताना बियरची बाटली फुटली. हे पाहून आमच्यात हास्य पिकले या मुळे जवानांच्या आणि आमच्या मध्ये दुरावा एकदम कमी झाला. मग गप्पान्ति आम्हाला त्यांच्या कडूनच कळाले कि , १३००० फुट नंतर आर्मीच्या जवानांना दारू मनाई आहे. मस्त गप्पा चालल्या होत्या , पण जेव्हा आम्ही त्यांना त्यांच्या कडच्या रायफल बद्दल विचारले तेव्हा मात्र त्यांनी काही सांगण्यास मनाई केली. ते बोलले "आप प्रेस वालो के सामने कुछ भी बोला तो , आप छाप देंगे और फिर हमारी नौकरी मुश्कील मै होगी". त्यांनी बर्याच गप्पान नंतर इन्सास रायफल असल्याचे सांगितले पण रायफल बद्दल काहीही माहिती मात्र नाही सांगितली. बर्याच वेळाने अभी-रोहन आले आणि आम्ही जवानांनचा निरोप घेऊन पुढे कॅम्पसाईट वर गेलो. ९ वाजले होते आणि काय मस्त थंडी होती तिकडे. सर्वाना आप-आपले टेन्ट दाखवले आणि फ्रेश होण्या करता गेलो. फ्रेश होई पर्येंत जेवण लागले होते. जेवायला गेलो तर जेवण पण थंड झाले होते. जेवताना सर्व जन आप-आपले दिवस भारतले किस्से सांगत होते. त्यावेळी मला असे वाटले कि मी आजच्या दिवसाची मज्जा मिस केली . जेवण उरकून सर्व आप-आपल्या टेन्ट मध्ये गेलो. आज मी , अभी आणि रोहन एका टेन्ट मध्ये होतो. २ बेड वर तिघे , आमच्या स्लीपिंग बॅग घेतल्या आणि मारल्या उड्या बेड वर. कसला नाजूक बेड होता , वाकला आमच्या वजनाने मध्ये. कसे-बसे स्वःताला अड्जस्ट करून घेतले आणि झोपी गेलो.