२१ मे २००६, आज अभिजित रावचा वाढदिवस. सकाळी उठलो प्रातविधी उरकून पुढच्या प्रवासासाठी सज्ज झालो. ऑलेक्सच्या परिवाराचा कालचा आश्चर्याचा अनुभव घेतल्यामुळे ते नाष्ट्याचा घाट घालतील याचा आधीच अंदाज मांडून आम्ही त्यांना नाष्टा करू नका असे सांगितले होते. त्यांच्या आम्हाला नाष्ट्याबद्दल फारच आग्रह चालू होता. आलेक्सच्या परिवाराचा या प्रेमाचा आम्ही चहा-बिस्किटा वर त्यांचे मन राखले आणि त्याच्या अंगणात सर्व परिवाराबरोबर एक फोटो काढला आणि त्यांचा निरोप घेतला.
वास्तविक ह्या परिवाराशी आमचा काय संबंध होता, काय नाते होते, कोण ऑलेक्स, कोण आम्ही, कोण कुठचे आणि कुठून आलेले. तरी हि माणुसकी, या धर्माचा वारसा जोपासणारी काही माणसे अजूनही आहेत याची जाणीव करून देणारा असा हा परिवार होता. ऑलेक्सच्या घरातून निघालो आणि दापोली-दाभोळ फाट्यावर नाष्ट्याला थांबलो. वास्तविक सर्वांना फार भूक लागली होती पण ऑलेक्सच्या परिवाराला त्रास नको म्हणून आम्ही संकोच बाळगत होतो. मस्त गरम-गरम मिसळ हाणत गप्पा टाकत होता. आज सर्वच मस्त मूड मध्ये होते. अभिजीतचा वाढदिवस होता ना, मूड मस्त असणार. अभिजीतला थोडावेळ फोना-फोनी करायची होती तो पर्येंत मी माझ्या बाईकचा तुटलेला आरसा नवीन बसवून आलो.
दापोली शहरातच दाभोळ, अंजनवेल, हेदवी, जयगड मार्गे गणपतीपुळे रस्त्याची विचारपूस करून घेतली कारण हा रस्ता मला फारसा लक्षात नव्हता. गेल्या २ दिवसान पेक्षा आज रावचा पाय बरा वाटत होता आणि वाढदिवसामुळे तो उत्साहात पण होता. आज त्याने बाईक चालवायचे पण ठरवले. थोडीशी त्याच्या पायाबद्दल विचारपूस करून सुजयने बाईकची चावी त्याच्याकडे दिली. आज राव आणि राजू एण्टाइसर वर आणि सुजय व मी विक्टर वर. पण रावला चढ-उतरायला आणि उठ बस करायला लागणारा वेळ मात्र तेवढाच होता. राव फक्त बाईक चालवण्या इतपतच बरा झाला होता. मुळात त्याचे दुखणे तेवढेच होते पण बाईक चालवायची दांगट इच्छाशक्ती मुळे त्याला त्याच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करायला सहज जमत होते.
आरामात मिसळ, पोहे, चहा, गप्पा, चहा असा नाष्टा उरकून १०.३०च्या दरम्यान आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. दापोली ते दाभोळ अंतर सुमारे ३० किलो-मीटरचे आहे. आमच्या सारख्या टवाळखोर भटक्यांना एवढे अंतर पार करायला एक-दीड तास लागायचा. आम्ही आरामात रेंगाळत टंगळ-मंगळ करत चालायचो. मधेच काही फोटो काढण्यासारखे वाटले तर बराच वेळ थांबून फोटो काढायचो. मग मधेच ह्याची खेच त्याची खेच असे हि व्हायचे आणि त्यावरून मस्ती. अशा प्रकारे आमचा प्रवास चालायचा.
दाभोळ जेट्टी गाठली आणि कळाले कि ट्रॉलर बिघडला आहे. पण नावे ने पैलतीरी घेऊन जात होते. आम्हाला प्रश्न पडला नावेत बाईक घेतील का? विचारपूस केल्या वर कळले कि बाईक पण नावेतून नेत आहे पैलतीरी. जीवात जीव आला हे ऐकून, नाही तर मजबूत फिरून जावे लागले असते. नाव येई पर्येंत आम्ही तिकडेच रन-रन त्या ऊनात बसलो होतो सावली पण नव्हती. बाईक वर काय सावली असते काय असे म्हणत एकमेकांना शिव्या घालत होतो, पण बाईक वरती ऊनाचा त्रास जरा कमी होतो कारण वारा लागत असतो म्हणा किंवा बाईक चालवायला आवडते म्हणून या त्रास कडे लक्ष जात नसावे म्हणूया ना. पण नुसते ऊनात बसायचे म्हंटले कि कंटाळा यायचा.

गुहागर पार करून वेळणेश्वर मार्गे आम्ही हेदवी गाठले. हेदवी गावात शिरताच काही घरांच्या बाहेर "येथे घरगुती शाकाहारी जेवण मिळेल" अश्या पाट्या दिसल्या. ३ वाजले होते भूख फार रान-रणायला लागली होती. पहिले मंदिरात जाऊन दर्शन घेऊया आणि मग निवंत जेवण असे ठरले. मंदिर बंद होत होते असे कळले, पटा-पट हेदवीच्या दश-भूजा गणेश मूर्तीचे दर्शन घेऊन बाहेर आलो. मंदिराच्या आवारात फोटो काढले आणि निघालो जेवायला.

५ चा ट्रॉलर होता म्हणून जरा बाईक जोरात हाकत होतो. सुजय माझी विक्टर चालवत होता आणि मी मागे. सुजयला जरा बाईक पळवायची परवानगी दिली तर तो रेमटवायला लागला. रस्ता खराब होता सुजय जराही इकडे-तिकडे पाहत नव्हता नुसती बाईक रेमटवत होता. एकदा-दोनदा तर त्याने खड्यात आपटले पण. तवसाळे जेट्टी ला जाणारा रस्ता मातीचा होता आणि मी सुजयला सांगत होतो जरा सांभाळून चालव वगैरे-वगैरे पण सुजय काय ऐकणार का. सुजयने बाईक अशी रेमटवली कि आम्ही बराच वेळ आधी येऊन पोहोचलो.

अंधार पडायच्या आत आम्हाला गणपतीपुळे गाठायचे होते. आता मी पण जरा बाईक रेमटवत होतो आणि आता सुजय मला सांगत होता बघ तू बाईक खड्यात टाकलीस आणि आता बघ कशी चालावलीस आणि आता बघ तू कशी पळवतो आहेस वगैरे-वगैरे. सुरवातीला मी त्याचे ऐकून घेत होतो कारण तवसाळेच्या वेळेला मी त्याला बोललो होतो ना म्हणून. किबहुना त्यामुळे आता तो मला मुदामून बोलून दाखवत होता. बराच वेळ सारखी त्याची बड-बड चालूच होती आणि थोड्या वेळाने माझे जे डोके फिरले. मी बाईक अचानक रस्त्याच्या बाजूला थांबवली. पटा-पट राव ने बाईक माझ्या बाजूला थांबवताच, मी सुजयला बोललो उतर आणि राजूला सांगितले तू इधर आजा. सुजयने डोक्याची भाजी करून टाकली. थोडा वेळ ठीक होते सारखीच तीच-तीच बड-बड. थोडीशी बाचा-बाची झाली आणि राजू माझ्या बरोबर बसला आणि सुजय रावच्या पाठी. या वेळेला मात्र सुजयला हा घाव जरा जास्त लागला असावा असे वाटले, कारण चौफे फाट्यावर पोहचलो आणि ब्रेंक साठी थांबलो असताना सुजयने अनपेक्षित असे वागणे दाखवले. सुजयने मुंबईला आमचा नाक्यावरचा मित्र पावतीला फोन लावून गणपतीपुळ्या वरून मुंबई साठी रात्रीच्या बसचे तिकीट काढायला सांगितले आणि आम्हाला बोलला मी चललो मुंबईला. ह्या सुजयच्या वागण्यामुळे आता रावचे टाळके सरकले. हे काय वागणे झाले काय आणि वगैरे-वगैरे. यावेळेला सुजय पण पेटला होता. मग मी आणि राजू पण कधी नव्हे तर बोलला सुजयला. वास्तविक सुजय आणि राजू या ट्रीपवर फक्त रत्नागिरी पर्येंतच येणार होते. उद्या तसे हि आपण रत्नागिरीला जाणार आहोतच आणि तिकडे तुमच्या ट्रीपचा शेवट होणारच आहे, मग आत कशाला नाटक करतो आहे असे सुजयला आप-आपल्या परीने सर्वांनी समजावण्याचा प्रयेत्न केला. पण सुजय आज काहीही ऐकण्याच्या मूड मध्ये नव्हता. आता राव आणि मी पण पेटलो. रावने तर कानपडत मारेन अशीच सुरवात केली तर आणि माझ्या कडे सुजयच्या बाबाचा नंबर होता, मी सुजयला बोललो तुझ्या बाबांशी बोलतो आणि त्यांनी परवानगी दिली तर मग तू खुशाल जा, तुला कुठून जायचे असेल तिकडन. आता मात्र सुजायचा सूर जरा नरम झाला आणि ठरल्या प्रमाणे रत्नागिरी वरून जायचे ठरले.
या राड्यात राजू मात्र आता आमच्या बरोबर पुढे ट्रीपला येणार असे ठरले. राजूला बाईक ट्रीप आवडली होती. मग सुजयला अजून थोडे शांत केला आणि निघालो गणपतीपुळ्याला. या सर्व राड्यात अंधार पडला. या ट्रीप वरचा आमचा पहिला नाइट ड्राइव होता. आरामात सांभाळत आम्ही गणपतीपुळे गाठले. सर्वात पहिले राहाण्याची काय सोय होते का पाहायला लागलो. मंदिराची धर्मशाळा वगैरे काही आहे का पाहायला लागलो. असे काही नसल्याचे कळाले आणि भक्त निवास पण फुल आहे. मग आम्ही मंदिराच्या अंगणात झोपलो तर चालेल का असे विचारले. त्यांची नाहरकत घेऊन आम्ही जेवायला निघालो. बांबु हट मधे शिरलो. आम्ही एका टेबल वर जाऊन बसलो. आमच्या बाजूच्या टेबल वर अगोदर पासून एक फॅमिली बसली होती. त्यानी आमच्या कडे पहिले आणि टेबल बदलून लांब बसले. ४ दिवस बाइक वर ते ही आंघोळ न करता आणि मे महिन्याचे दिवस. आमच्या वासने बहुदा पळून गेले असतील असे आमच्या मधे हस्या पिकायला लागल्या. राजू, सुजय आणि रावच्या इंग्लीश गप्पा ऐकून त्याना प्रश्न पडला असावा. हे बर्या पैकी चांगले इंग्लीश बोलणारी माणसे पण राहणीमान का येवढे घाणेरडे. असो आम्हाला काय फरक पडतो. जेवण उरकून मंदिराकडे आलो. मंदिर बंद झाले होते आम्ही परत एकदा शिपायांची परवानगी घेतली आणि आमचे सामान मंदिराच्या आवारात असलेल्या दीपमाळाना लागून लावले आणि राजू गिटार घेऊन बीच वर गेला. पाठोपाठ आम्ही पण गेलो. मस्त बीच वर वाळूत बसून हेड लाईटच्या प्रकाशात तासभर राजू गिटार वाजवत होता आणि आम्ही गाणी म्हणत होतो. तासाभराच्या मैफिली नंतर श्रम परिहार झाला आणि परत मंदिराकडे आलो. दीपस्तंभाला लागूनच अंथरून पसरली आणि झोपलो.
No comments:
Post a Comment