21.10.12

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग पहिला - तिसरा दिवस (हरिहरेश्वर ते दापोली)

२० मे २००५, सकाळी हॉटेल वाल्यांच्या तयारीच्या आवाजाने आम्ही उठलो. आमचा सर्व संसार आवरला आणि हॉटेलच्या बेसिन मध्ये तोंड धुतले. हॉटेल चालू होई पर्येंत आम्ही आमचे प्रातविधी उरकायला गेलो. आता मात्र रावची परीक्षा होती. कारण सार्वजनिक शौचालयात कमोड संडास नसतात ना. मी रावच्या वेदना समजू शकत होते पण काय करणार सर्व त्याच्या वेदना सावरू शकत पण नव्हतो. संडासा मधली बस ऊठ  आणि त्या बरोबरच्या वेदना त्यालाच सहन कराव्या लागणार होत्या. मी त्याला शौचालया पर्येंत घेऊन गेलो. प्रातविधी आवरले आणि आलो बाहेर. बऱ्याच वेळाने राव बाहेर आला तेव्हा त्याचा चेहरा पाहण्यासारखा होता कुठून तरी युद्धा वरून परत आल्या सारखा. पण मानले पाहिजे रावला एवढ्या अनुकूल परीस्थित पण जिद्द राखून होता.

प्रत्येकाने आप-आपले प्रातविधी आटपले आणि नाष्ट्याला हॉटेल मध्ये परत आलो . मस्त गरम-गरम नाष्टा केला आणि हरिहरेश्वराचे दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो. हरिहरेश्वर पासून ५ किलो मीटर वर बागमांडला जेट्टी गाठली. जेट्टी वर होडी लागलीच होती. पटकन सुजयला पळत पाठवले बाईक चढवायच्या चौकशीला. कधी नव्हे तर आज सुजयने नखरे न करता ऐकले. वास्तविक सुजयला पण परिस्थितीचे गांभीर्य जाणतो, तसा सुजय आमचा शहाणा आहे पण बरेचदा मुद्दामून नाटक करतो. बाईक चढवून आम्ही होडीत बसलो आणि पैलतीरी बाणकोटच्या धक्क्याला उतरलो. बाईक बाहेर काढल्या आणि समोरच एस.टी.डी चे बूथ दिसले. प्रत्येकाने आप-आपल्या घरी ठरवले होते कि दिवसातून एकदा तरी फोन करायचा आणि काळाच्या करामती मधे आम्ही सर्वच विसरून गेलो. कोणी आप-आपल्या घरी फोन केले नव्हते म्हणून सर्वांच्याच घरी काळजीचे वातावरण होते आणि आमच्या सर्वांच्या पालकांनी एकमेकांना फोना-फोनी करून वातावरण अजून गंभीर करून ठेवले होते. मी जसा घरी फोन लावला तोच समोरून नुसती बडबड सुरु झाली. मग आईची समजूत घालून ठेवला फोन. माझ्या पाठोपाठ सुजय आणि रावची पण तीच अवस्था. मग पुन्हा घरी फोन करून बजावले कि काही कारणास्तव जर एक दिवस फोन आला नाही तर जग डोक्यावर घ्यायची गरज नाही. अजून पर्येंत आमच्या आक्सिडेंटचा किस्सा घरी सांगितला नव्हता. या सर्व राड्यात रावला नाहीलाजास्तव आमची करामत त्याच्या घरी सांगावी लागली. मी आणि सुजय तर हे घरी सांगूच शकत नव्हतो. नाहीतर आम्हाला तातडीचे घरी बोलावले असते नाहीतर अजून काहीतर मच-मच केली असती.

या सर्व राड्यात आम्ही रत्नागिरी जिल्हा गाठल्याचे विसरलो होते. आता आमची पुढचे ठिकाण होते बाणकोटचा किल्ला. गावात विचारले कि किल्ला कुठे आहे. बाणकोट किल्ला हा गावाच्या पाठी मागे डोंगरावर आहे असे कळाले. सुजय आज लीडरच्या रोल मध्ये आला होता. म्हणून तो पुढे आणि मागून मी. आम्ही किल्याकडे जाणारी घाटी चढायला लागलो. डांबरी रस्ता संपला आणि लाल मातीचा कोकणातला रस्ता चढत होते. बराच वेळ चढल्यावर देखील किल्याचा काही नामो-निशाण दिसेना, म्हणून मधेच एक घर दिसले तिकडे चौकशी करूया या विचाराने मी पुढे असलेल्या सुजयला मी जोरात ओरडून थांब सांगितले. तेवढ्यात राजू सुजयच्या बाईक वरून उतरला. सुजयने बाईक चालवत पुढे नेली. मला वाटले कि सुजय उतारावर बाईक उभी करायला जमणार नव्हते म्हणून त्याने बाईक पुढे नेली. पण पाहतो तर तो राजूला तिकडेच सोडून पुढे तसाच निघून गेला. मला जेव्हा हे जाणवले तेव्हा माझे असले टाळके सरकले आणि मी आई........, आई.........., .......... ........., ..........,..........., धो....., अशा असतील नसतील आणि त्या वेळी ज्या आठवल्या त्या शिव्या माझ्या कर्कश आवाजातून दिल्या, कि बाजूला ५० फुटावर असलेल्या घरातून वय वर्ष ५ ते ५० पर्यंतची असतील नसतील ती मंडळी बाहेर आली. त्यांना वाटले कि काय झाले बाहेर राडा वगैरे नाहीना. त्यांना काय माहित होते आम्हाच्या मध्ये असे नेहमीच चालते. सुजय तर पार पुढे निघून गेला होता, मी जे काही मंत्र उच्चार केला होते त्याच्या पलीकडे पोहोचला होता. एवढ्यात घोषणा देऊन घरातली माणसे जागी केली मग त्याचा परीपूर्ण वापर नको का करायला. मी त्यांना किल्ल्या कडे जाण्याचा मार्ग विचारायला गेलो. मे चा महिना आणि कोकणातील उन्हाळा. फार घामाघूम होत होते. सुजय येई पर्येंत त्याच्या अंगणात पडवीवर पाणी पीत बसलो चर्चा करीत बसलो. आम्ही कुठून आलो, कुठे जाणार आणि ते कुठले वगैरे-वगैरे. तेही मुंबईचे आहे आणि मे महिन्याच्या सुट्टीत आले होते गावी असे कळाले. थोड्या वेळाने सुजय किल्ल्या पर्येंत जाऊन आला. दुसर्याच्या घरात होते म्हणून मी त्याची थोड्या सौम्य भाषेत कान उघडणी केली.

आम्हाचे ४ जणांचे सर्व वजनदार समान त्याच्या घरात ठेवले आणि गेलो किल्ला फिरायला. रस्ता असे पर्येंत आणि बाईक नेऊ शकतो तो पर्येंत बाईक नेल्या. बाईक लावून थोडेसे चालल्यावरच किल्ल्याचा दरवाजा आला. रावला किल्ला पाहायला जमेल का हे आधीच गावात विचारून घेतले होते. पण रावला चालायला फार त्रास होत होता. बरेचदा आधारासाठी आमच्या पैकी त्याच्या बरोबर कोणी तरी असायचे. किल्ला फार मोठा नव्हताच. वास्तविक हा तर टेहाळणी किल्ला होता. फक्त ४ बुरुज आणि तटबंदि.या किल्ल्यावरून हरिहरेश्वर किनार पट्टीचा परिसर फार सुरेख दिसत होता. मुळात या किल्याच मूळ उधिष्ट हेच असाव, त्या परिसरातील देखरेख करण्यासाठी. अभिजीतला तिकडे एक वीडीओ क्लिप काढावीशी वाटली आणि ती त्याने काढली पण. सांगितले ना भाडखाव जिद्दीचा आहे. पण खरोखर समुद्र किनारा सुंदर दिसत होता. किल्ला छोटा असल्या कारणास्तव फार वेळ लागलाच नाही पाहायला. एक फेरा मारला आणि आलो बाहेर. बाईक घेऊन गेलो त्या घरी समान घ्यायला. पुन्हा एकदा सूखलेला घसा ओला करून घेतला आणि त्याला मंडळींचा निरोप घेऊन सुटलो पुढच्या प्रवासाला.



बाणकोट किल्ल्याचे टेकाड उतरलो आणि रस्त्याला लागलो. बाजूला एक छोटेसे दुकान पाहून थांबलो. फारच गर्मी होती आणि असणारच मे महिन्याचे दिवस होते. वरून ते ही कोकणातले, म्हणजे घामाच्या धारा. थोडी विश्रांती घेऊ आणि थंड पेय पण पिऊ असे वाटले. सुजयला पहिल्या दिवसा पासून रावने सोडा युक्त पेयासाठी मनाई केली होती. पण सुजय कसला ऐकतोय, झाली राव आणि सुजायची सुरवात. मग वरती घडलेला किस्सा पण आला मध्ये. पुन्हा एकदा सुजयने राव आणि माझ्याकडून शिव्या खाऊन घेतल्या आणि रावच्या ताकिदि प्रमाणे मॅंगोला डोसून पुढे मंडणगडाच्या दिशेने निघालो. मध्ये कुठेहि न थांबता २५ किलोमीटरचे अंतर आम्ही एका तासात गाठले. डोक्यावर ऊन रन-रनत होते आणि सकाळचा नाश्ता कुठल्या कुठे निघून गेला होता. पोटात पण भूक रन-रनायला लागली होती. मग मंडणगडावर जायच्या रस्त्याबद्दल चौकशी करून घेतली आणि एक मत करून एस.टी.स्टॅडच्या जवळच्या हॉटेल मध्ये शिरलो.

आज तर आमची मेजवानी होती. सुजयला मस्त बिर्यानी खायची हुक्की आली होती. आज सुजयला एवढ्या शिव्या घातल्या मग आता त्याला नाराज करणे अशक्य झाले आणि बिर्याणी खाण्यात विशेष काही दुष्परिणाम दिसत नव्हता. मस्त गप्पा-टप्पा टाकत प्रत्येकी एक-एक बिर्याणी हाणली. सुजय आणि राजुला एक कमी पडली म्हणून त्यांनी अजून एक मागवली आणि अर्धी-अर्धी हाणली. तो पर्येंत मी आणि रावने आराम करून घेतला. जेवण झाल्यावर सर्वांनी गप्पा टाकत अजुन थोडा वेळ आराम केला आणि गड पाहायला निघालो. मंडणगड शहराला लागूनच डोंगरावरती किल्ला आहे, किंबहुना असे म्हणायला पाहिजे की मंडणगड शहर किल्ल्याच्या बाजूला वसलेले आहे...असो. हॉटेलच्या बाहेर किल्ल्याकडे जाणार्‍या रस्त्याची चौकशी केली आणि कळाले गडावर जायला नवीन मातीचा रस्ता झाला आहे. अजुन रस्ता बनवण्याचे काम चालू आहे पण बाइक जाऊ शकते. मग काय लागलो त्या रस्त्याला.


जस-जसे वरती चढत होतो तस-तसा रस्ता खडतर होत होता आणि चढण पण फार होते. मधे एक घर दिसले आणि पोरे फिरत होती. सुजयला या ठिकाणी बाइक चढवायला फार त्रास होत होता. राव आणि सुजयने घराकडे थांबायचे ठरवले आणि मला व राजुला पुढे जा असे सांगितले. आमच्या कडचे सर्व समान त्यांच्या कडे ठेवले आणि निघालो पुढे गड पाहायला. समान नसल्यामुळे या रस्त्यावर बाइक चढायला फार त्रास होत नव्हता. एवढे चढण होते की एकदा-दोनदा बाइकचे पुढचे चाक वर झाल्यासारखे पण वाटे. त्यामुळे धडपडल्या सारखे झाले. मग मी आणि राजूने पुढे सरकून आमचे वजन पुढे टाकायचे ठरवले. मी थोडासा टाकिवर आलो आणि राजू मला चिटकून बसला. अशा पस्थितीत कसा-बसा रस्ता होता तिथ पर्येंत आलो, या पुढे बाइक चालवणे अशक्य होते. थोडासा प्रयेत्न केला पण कशाला नको तिकडे धाडस असे म्हणून सोडला विषय. आधीच आमचे एक आक्सिडेंट झाले होते ते काय पुरे नव्हते का? एका बाजूला बाइक लावली आणि निघालो पायी गड पाहायला. चार ढेंगा चाललो आणि गडाचे पठार आले, तसा एकदम मोठा गड नव्हता. एक पाण्याचे तळे आणि मंदिर सोडले तर गडाचे अस्थित्व काहीच नव्हते. जरा आजूबाजूला फेर-फटका मारला आणि मंदिराच्या सावलीत जाऊन बसलो. फारच ऊन होते आणि घामाने माखलो होतो, पाणी पिऊन थोडा वेळ आराम करत तिथेच बसलो. सावलीत जरा बरे वाटत होतो आणि मस्त वारा पण सुटला होता. म्हणून अजुन थोडा वेळ आराम करून घेतला. अधून-मधून एखाद-दुसरा फोटो पण काढून घेतले. छान रिलॅक्स झाल्यावर निघालो गड उतरायला.

बाइक घेऊन पुन्हा त्याच प्रकारे वजन सांभाळत निघालो. आता मात्र फारच जास्त त्रास होत होता. एक तर उतरण आणि ते ही मातीचा खडतर रस्ता. मी आणि राजू बाइक वरचा आमचा तोल कसा-बसा सांभाळून खाली येत होतो. एकदा-दोनदा आम्ही माती खाता-खाता वाचलो पण. सुजय आणि रावच्या जवळ आलो आणि पाहतो तर दोघेही सर्व समान घेऊन रस्त्याच्या मधे ऊनात उभे होते. त्यांनी आम्हाला जसे पाहिले, तसे लगेच या! असे हातवारे करू लागले आणि मजबूत शिव्या घालायला लागले. हरामखोर.....कुठे होतात...किती वेळ लावलात आणि वगैरे-वगैरे. मनसोक्त शिव्या देऊन, सर्व भडास काढली आणि मग सर्व हकिकत सांगितली. मंडणगड या परिसरात जमिनीत एक विशिष्ट प्रकारच्या मुंग्या आहेत. मुंग्या कसल्या लाल मुंगळे होते ते. कुठल्या ही सावलीत राहायची नौबत नव्हती, असे तिकडच्या आदिवासी पोरांनी सांगितले. म्हणून सुजय आणि अभिजीत ऊनात येऊन उभे होते. जसे मी आणि राजू गड पाहायला निघालो तेव्हाच सावलीत यांना मुंग्या चावायला लागल्या होत्या आणि जवळ-जवळ एक तास भर त्यांना ऊनात उभे राहायची शिक्षा झाली होती. अरे..रे..बिचारे....म्हणूनच खवसले होते माझ्यावर आणि साहजिक आहे. त्या आदिवासी मुलं कडून कळले की त्यांच्या घरात पण हे लोक जमिनीवर नाही झोपत. ४ एक फुटा वरती कापडाचा पाळणा करून झोपतात. तरी ही त्या पोरांच्या अंगावर मुंग्या चावल्याचे निशाण दिसत होते. हा वेगळा निराळा असा अनुभव मिळाला आम्हाला या ट्रीप वर. आम्हाला म्हणजे विशेष करून सुजय आणि अभिजीत रावला. मंडणगडाचा, मुंग्यांचा आणि त्या आदिवासी पोरांचा आम्ही निरोप घेऊन खाली मंडणगड शहरात आलो.

संध्याकाळ होण्याच्या आत आम्हाला हरणे बंदर गाठायचे होते, म्हणून जास्त वेळ न लावता एक-एक मँगोला गट्कला आणि सुटलो दापोलीच्या दिशेने. आक्सिडेंट मुळे बाइक वरुन चढ उतर करायला त्रास होयचा म्हणून बाइक वर बसल्या-बसल्या फोटो काढून घायचो आणि फारच गरज वाटली तर करामत करून उतरायचो. आरामात एक-दीड तासात आम्ही दापोली शहर गाठले. शहरात आल्याबरोबर सुजयला ऊत आला. दापोली हे बर्‍यापैकी मोठे शहर आहे. अलिबाग नंतर 3 दिवसांनी मोठ्या शहरात आल्या बरोबर सुजय सुटला होता. शहरात बाइक वेडी-वाकडी चालवणे हा तर सुजयचा हात खंडच. ३दिवस अरुंद रस्ते आणि ते ही कोकणातले वेडेवाकडे, सुजय एकदम कोंबडी होऊन बाइक चालवत होता. शहरात आल्या-आल्या शेर झाला आणि आपले रंग दाखवायला लागला. इकडन-तिकडन, ह्याच्या मधून-त्याच्या मधून, ह्याला दाब-त्याला दाब असे करत सुजय चालला होता आणि एवढ्यात सुजय एका मुलीला ठोकता-ठोकता वाचला. तसा सुजय कसला ठोकतोय त्याला अशा पद्धतीने बाईक चालवायची फार सराव आहे. पण हे पाहून आता रावचे टाळके सरकले. आज सुजयचा दिवसच फार खराब होता. रावने मला बाइक सुजयच्या जवळ घ्यायला सांगितली आणि मी तसे करताच. रावने सुजयच्या हेल्मेट वर जी जोरात टापली मारली आणि भो.....अशी सलकावून शिवी घालत सुजय विचित्र प्रकारे बाइक चालवत असल्या मुळे त्याला बड-बडायला सुरवात केली. लगेच आम्ही बाइक बाजूला थांबवली आणि आमच्या व सुजय मधे जी बाचा-बाची सुरू झाली. मी मात्र आता काही जास्त बोललो नाही. माझा सुजयला बोलायचा कोटा सकाळी संपला होता. तरी एक-दोनदा मधे बोललोच. भर शहरात रस्त्यावर एवढी मच-मच पाहून आजुबाजूचे लोक पण पाहायला लागले. मग जरा आम्ही आवरते घेतले. थोडीशी मांडवली करून निघालो हरणे बंदराच्या दिशेने. दापोली ते हरणे हे अंतर सुमारे १८ किलो मीटर आहे. पटापट हे अंतर कापून आम्ही हरणे एस.टी स्टॅंड गाठले. हरणे बंदर आणि सुवर्णदुर्गा बद्दल चौकशी करून त्या दिशेने निघालो. एस.टी स्टॅंड पासून हे अंतर २-३ किलो मीटर आहे. जस-जसे हरणे बंदराच्या जवळ जायला लागलो.तस-तसे सुक्या माशांचा फार वास यायला लागला आणि अचानक सुवर्णदुर्गाचे दर्शन झाले. बंदरावर तर मासळीचा फारच जास्त वास येत होता. सुजयला तर 2 मिनिटे पण उभे राहता येत नव्हते. या वास मुळे सुजयला तर उलटी झाल्यासारखे होत होते. तो बाइक वरुन उतरला पण नाही आणि राजुला घेऊन तसेच परत हरणे एस.टी स्टॅंड कडे गेला.  मी आणि राव बंदरावरूनच सुवर्णदुर्गाला मनसोक्त पाहत होतो आणि फोटो काढत होतो. हा किल्ला संपूर्ण पणे पाण्यात आहे. किल्ल्याकडे जाण्यास एकाही बोटीची सोय नाही आहे. जर हा किल्ला पाहायचा असेल तर खाजगीरित्या मच्छीमारांना घेऊन त्यांच्या बोटीतून जाऊ शकतो. पण पर्याय त्या वेळेला आमच्या कडे उपलब्ध नव्हता. वेळे अभावी पण आणि आर्थिकदृष्ट्या आम्हाला परवडणार नव्हते. सुवर्णदुर्गाला मनात आणि कॅमेऱ्यात भरून आम्ही त्याचा निरोप घेतला आणि हरणे एस.टी स्टॅंड जवळ आलो.

सुजय आणि राजू एस.टी स्टॅंडच्या समोरच उभे होते. सुजयचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. सुजय कोकणस्थ मराठा असल्याचे कळाले होते, माश्याच्या वासने उलटी होते. कोकणातल्या मराठ्याला किमान पानावर वासा करता तरी मासा लागतो आणि हा वासा ने उलटी करतो. अरे रे रे...वास्तविक आमचे आज रात्र काढण्याचे ठिकाण हरणे होते. पण सुजयच्या या परिस्थिती मुळे आणि तसे पाहायला गेले तर हरणे पण फार राहण्यासारखे ठिकाण वाटत नव्हते. म्हणून आम्ही दापोलीत राहायचे ठरवले. दापोली बर्‍यापैकी मोठे शहर असल्या कारणास्तव रस्त्यावर कुठेही राहायला मिळणे कठीण वाटत होते. म्हणून दापोलीच्या आधी कुठे तरी मंदिर किंवा शाळा पाहु असे एकमत झाले आणि दापोलीच्या दिशेने निघालो. जस-जसे दापोली जवळ यायला लागले तसे आम्ही मंदिर-शाळा पाहायला लागलो, पण काही दिसेचना. दापोलीच्या ५ किलोमीटर आधी माझ्या बाईकचा टायर पंचर झाला. आता काळोख पडत होता, अजुन राहण्याची ही काहीच सोय नव्हती. सुजयला पुढे दापोली शहरात पंचर काढणारा पाहायला सांगितले आणि जर तो यायला तयार झाला तर येताना घेऊन ये असेही बजावले. अशा पळापळीच्या कामासाठी सुजय मस्त कामाला येतो, किंबहुना त्याची हि आवडती कामे आहे. फक्त कधी कधी मात्र एकदम विचित्र वागतो. तो पर्येंत आजूबाजूला राहाण्यासारखे काही दिसते का असे पाहायला लागलो. एवढ्यात सुजय पंचरवाला घेउनच आला. भलताच पटा-पट होता. पंचरवाल्याने टायर काढून, सुजय परत घेऊन गेला त्याला. आता रावला बाईकच्या जवळ सर्व सामानाची रखवाली करायला बसवले आणि मी व राजू राहायची सोय पाहायला निघालो. रस्त्याला काळोख असल्या कारणास्तव मी हेडलॅंप लावून चाललो होतो. जरा पुढे गेलो आणि रस्त्या लागत असलेल्या टपरी कडून एक इसम आमच्या जवळ आला आणि बोलला "वॉट हॅपन सर" दापोली पासून ५ किलोमीटर अलीकडे अस्लीखीत इंग्लीश शब्द कानावर पडले हे ऐकून मी आणि राजू तीन ताड उडालो. मग आम्ही त्यांना सर्व हकिकत सांगायला लागलो. बाइक पंचर झाली आहे, मित्र पंचर काढायला टायर घेऊन गेला आहे, रात्र काढायला मंदिर, शाळा, अंगण मिळेल का वगैरे-वगैरे, आम्ही प्रवासी आहोत. चर्चेअंती तो इसम गोव्याचा आहे असे कळले आणि कामानिमित्त दापोली मधे राहतो. आम्ही प्रवासी आहोत हे त्याला माझ्या हेडलॅंप मुळे कळाले, कारण गोव्यात बरेच प्रवासी पाहिलेले होते त्याने. बर्याच चर्चा करून त्यांनी आम्हाला त्यांच्या अंगणात झोपा असे काबुल केले. हे ऐकून जीवात जीव आला. मग आम्ही त्यांच्या बरोबर बाइक कडे आलो. बराच वेळ रावला सामनापाशी बसवून ठेवले होते. त्याने बसल्या बसल्या ट्रायपॉट नसल्या कारणास्तव हेल्मेण्ट मधे कॅमरा ठेवून नाईटशॉट फोटो काढत होता. त्याने काढलेला तो हा फोटो. एवढ्यात सुजय पंचर काढून घेऊन आला. मग एकमेकांची ओळख परेड झाली. त्यात कळले की त्या इसमचे नाव ऑलेक्स आहे. ऑलेक्स हा मुळात गोव्याचा आणि कामानिमित्त दापोलीत येऊन परिवारासाहित राहत होता. टायर लावून सुजय परत पंचर वाल्याला सोडायला गेला आणि ऑलेक्स आम्हाला त्याच्या घरी घेऊन गेला.

ऑलेक्स ने त्याच्या घरच्या सर्व मंडळी बरोबर ओळख करून दिली आणि फ्रेश व्हायला सांगितले. एक-एक करून सर्व फ्रेश झालो आणि त्यांनी आम्हाला घरात बोलावून चहा दिला. जसे ओळखीचे पाहुणे घरी आल्यावर आपण जसे आदरतिथ्य करतो ना तसे ते आम्हाचे आदरतिथ्य करत होते. आम्हाला चहा बरोबर बिस्कीट आणि फरसाण पण दिले होते. वरुन खा-खा असे आग्रह पण चालला होता. हा परिवार वेगळाच होता, आमची त्यांची काय ओळख. थोड्या गप्पा मारत बसलो आणि मी सुजयला जेवणाची सोय पाहायला पाठवले. सुजय आणि राजू जाऊन कुठून तरी झणझणीत भुर्जी पाव घेऊन आले. ऑलेक्स ने आपण सर्व एकत्र जेऊ असे आम्हाला सांगितले. त्यांचे पण जेवण तयार झाले. पाने मांडली आणि घरात जाऊन पाहतो तर आमच्यासाठी पण पाने होती. भात, आमटी, भाजी, लोणचे, पापड आणि सर्वात आश्चर्याचा धक्का देणारा होते म्हणजे कुरवड्या आणि फेण्या तळल्या होत्या. त्यांना सांगितले आम्ही भुर्जी पाव आणला आहे. पण ते काही केल्या ऐकेना. ते बोलले ठेवा भुर्जी पाव आपण सर्व मिळून खाऊ हे. आम्हाला अजिबात अपेक्षित नव्हते. सर्वांनी सोबत जेवण आवरले आणि बाहेर अंगणात आलो. ऑलेक्स बरोबर अंगणात शतपावली घालत गप्पा मारत बसलो. ऑलेक्सच्या पोरांनी आमच्यासाठी चटई, रजई, चादरी आणि उश्या आणून टाकल्या. आम्ही त्यांना बोललो अंथरून नको आम्ही आमचे अंथरून आणले आहे. तरी काही केल्या ते एकेनाच . थोडावेळ ऑलेक्स परिवाराबरोबर गप्पा मारल्या आणि मस्त अंगणात झोपी गेलो.

No comments:

Post a Comment