20.2.11

लेह बाईक ट्रीप - चौदावा दिवस (चंदिगड ते दिल्ली)

२१ ऑगस्ट २००९, काल एवढे थकलो होतो कि अंथरुणात पडल्या-पडल्या झोप लागली. सकाळी ८.३० ला मला दीपालीने कमरेत लाथ घालून उठवले, “मेल्या उठ, सगळे आंघोळ करून सामान आवरायला लागले आणि तू अजून झोपला आहेस”. अरे मला कोणी उठवलेच नाही असे बोलत मी उठलो आणि सामान आवरून आंघोळीला शिरलो. कालचा थकवा तसा जाणवतच होता. आंघोळ होताच सामान आवरले आणि बाहेर गाडीकडे घेऊन आलो. गाडीत सर्वांचे सामान ठेवून झाले होते मीच बाकी होतो. कुणाल आम्हाला सोडायला हॉटेल वर आलाच होता, त्याचा पाहुणचार अगदी अप्रतिम होता. वास्तविक त्याच्या मते आम्ही चंदीगडला आलो आहोत तर रॉक गार्डन तर कमीत कमीत पाहून जायला पाहिजे होते, पण काय करणार वेळेची आमच्या कडे बोम्बाबोम होती आणि दिल्लीत वेळेत पोहचून बाईकस ट्रेन मध्ये लोड करायच्या होत्या. गाडीच्या ड्रायवर मी चंदिगड ते दिल्लीचे अंतर विचारले आणि किती वेळ लागेल असे हि विचारले. त्याने हे अंतर २४० किलोमीटर आणि अंदाजे "७-७.३० घंटा बाईक को" असे सांगितले. आज पण मी आणि दीपाली एकत्र आता यात काय नविन नव्हते. आज आमच्या ट्रीपचा बाईक वर शेवटचा दिवस होता, मग दुसरया कोणाला हि संधी दीपालीने दिलीच नसती. कुणालने प्रेमाने केलेल्या पाहुणचाराबद्दल सर्वांनी त्याचे आभार मानून ९ वाजताच्या दरम्यान हॉटेल सोडले. मला चंदिगड शहर फार आवडले. मस्त स्वच्छ आणि सुनियोजित. त्यातून हवामान पण छान आहे आणि तिकडच्या माणसांची तर बातच काही और. याचा अनुभव काल घेतलाच होता आणि पुढे जाणवेल असे वाटले. हॉटेलवरून निघाल्या वर पुढे दिल्ली हायवे चा रस्ता मी मधेच एका माणसाला विचारला तर त्याने मला उजवीकडून न जाता सरळ जा असे सांगितले, कारण “राईट लेकर जाओगे तो देखो ट्राफिक हे, आप सीधे जाओ” असे सांगितले. मी आणि दीपालीने उजवीकडे पाहीले आणि धक्काच लागला. त्या इसमाला धन्यवाद म्हणत, त्याने सांगितलेल्या सरळ रस्त्याने निघालो. आता धक्का लागण्याचे कारण सांगितले पाहिजे, आपल्याकडे मुंबईत शनिवार-रविवारी जेवढे  ट्राफिक असते तेवढे होते आणि त्याला चंदिगडची लोक फार ट्राफिक म्हणतात. या विषयवर मी आणि दीपाली थट्टा करताना कधी दिल्ली  हायवेला लागलो ते समजले देखिल नाहीं. हा चंदिगड-दिल्ली हायवे काय मस्त आहे असेच उद्दगार माझ्याकडून निघाले. खरोखरच मस्त रस्ता होता, डिवाइडेड हायवे. बाईक व्यवस्थित पळवायला मिळत होती आणि आम्ही सर्व पळवत हि होतो. बाईक पळवण्यात मी आज सर्वनपेक्षा पुढे होतो. बाईक पळवण्यापाठी माझी दोन करणे होती. एक असे कि मला माझ्या नवीन अवेंजर १०० च्या हाय स्पीड वर चालवून पहायची होती आणि दुसरे कारण असे कि आम्ही कोणीच सकाळी नाष्टा साधा चहा पण घेतला नव्हता. आमचे अंबाला ला नाष्टा करण्याचे ठरले होते, पण मला फार भूक लागल्या मुळे मी रोहनच्या पाठी लागलो  होतो कि मधेच कुठे तरी चांगले हॉटेल पाहून नाष्टा करूया. कारण चंदिगड ते अंबाला हे अंतर ४० किलोमीटर  आहे. मग मी आमच्या गाडीच्या पाठो-पाठ १०० च्या स्पीडला बाईक पळवू लागलो आणि सारखे रोहनला भूक लागली म्हणून हाताने खुणवत होतो. तरी हि रोहन पण अंबालालाच नाष्टा करायचा यावर ठाम होता. शेवटी माझे निष्फळ पर्येत्न सोडले आणि चल आता पटकन अंबाल्याला असे स्व:ताशी म्हणून गाडी बरोबर बाईक पळवायला लागलो. आज मी बाईक पळवण्याचा आनंद लुटत होतो. एकदा-दोनदा मी गाडीला पण  ऑवर टेक करून ११० चा स्पीड गाठून मनाला आवरले. या सर्व पळापळी मध्ये आज माझ्या व दीपालीमध्ये एकदा ही गप्पांना सुरवात झाली नव्हती. दीपाली मागे गपचूप बसून राहिली होती. आता शिस्तीत गाडीच्या पाठी राहून ८०-९० ला बाईक पळवत अंबाला गाठले. आमच्या गाडीच्या ड्रायवरनेच हायवेला लागून सागररत्न हॉटेलजवळ थांबवले. पाठोपाठ मी हि थांबलो, लगेच मागाहून बाकी सर्व बाईक्स पण आल्या. याचा अर्थ आज सर्व बाईक्स सुसाट पळत होते. या हॉटेलमध्ये  साऊथ इंडियन पदार्थ मिळतात असे कळताच, एका मागोमाग एक ऑर्डर सुरु झाल्या. आज ट्रिपचा शेवटचा दिवस असल्या कारणास्तव सर्वच जास्तीत-जास्त मस्ती करत होतो. आरामात तासा भरात नाश्ता आवरला. आज आमचे नास्त्याचे बिल जवळ-जवळ ३५०० रुपये झाले होते. या वरून आपण अंदाज मांडू शकतो, कि  आम्ही काय नाष्टा हाणला असेल. 


नाश्ता करून हॉटेलच्या बाहेर आलो तेव्हा आमचे स्वागत एका फायटर जेट विमानाने केले. काय आवाज होता तो भिनभिनणारा, आमच्या डोक्यावरून पास झाल्यामुळे. मस्त अनुभव होता तो. थोडा वेळ बाहेर मस्ती करत आम्ही दिल्लीच्या दिशेने निघालो. आता माझे पोट भरल्या मुळे मी काय फार बाईक पळवत नव्हतो. बाकी सर्व बाईक्स आता पण सुसाट पळवत पुढे निघून गेले होते. मी आणि अभी मात्र मस्त आरामात मागाहून चाललो होतो. आता जसे-जसे दिल्लीच्या जवळ चाललो होतो तस-तसे आमची बाईक ट्रीप समाप्तीला येत आहे याची जाणीव होत होती. थोडेसे निराशादायक मूड मध्ये आम्ही शिरकाव करत होतो असे जाणवले. बाईक जास्त जोरात न पळवण्याचे कारण मूड तर होता, मला तर दिल्ली गाठूच नये असे वाटत होते. पण बाईक जास्त न पळवण्याचे मुख्य कारण असे होते कि, अंबाला पार करून जसे हरयाणा मध्ये घुसलो तेव्हा रस्त्या मध्ये सारखे “Speed Limit 70 km/Hr. You Are Under Vigilance. Haryana Police” असे बोर्ड दिसायला लागले होते. काल रात्रीच्या प्रसंगामुळे आता मी, अभी, मनाली आणि दीपाली एक ग्रुप झालो होतो. मस्त हळू-हळू गप्पा मारत कुरुकक्षेत्र पार केले. हळू-हळू म्हटले तरी ६०-७० च्या स्पीडने चाललो होतो. मस्त सरळ आणि चांगला रस्ता असल्यामुळे सलग  एक लय मिळत होती बाईक चालवायला.पुढे एका पेट्रोल पंप वर थांबलो. अभीच्या आणि माझ्या बाईकला थोडेसे पेट्रोल पाजून घेतले आणि पेट्रोल पंपाच्या दारातच एका झाडाखाली असलेल्या टपरी वर चहा ओर्डर केला. चहा बने पर्येंत टपरीच्या बाजूला असलेल्या खाटे वर चौघे हि निवांत आडवे पडून राहिलो. इकडेच गप्पा मारत असता सर्वाना आज ट्रिपचा शेवटचा दिवस आहे म्हणून फार वाईट वाटत होते हे जाणवले. 


चहा घेता घेता अभिने रोहन बरोबर फोन करून गाडी कुठे पोहोचल्याचे जाणून घेतले. ज्याने मुंबई वरून आमच्या बाईक लोड केल्या होत्या त्याला अभीने फोन लावून, दिल्लीच्या एका लोडचा फोन नंबर घेतला. अभीची फोना-फोनि चालू असे पर्येंत मी पण माझी दिल्लीची मैत्रीण शर्वरीला फोन लावून घेतला. तिने तर मला दिल्लीला आल्यावर आज भेटच असा आग्रह धरला आणि तिचा आग्रह मी  तोडू शकलो नाही. पाहू दिल्लीत पोहोचल्या वर कसे काय जमते ते, असे बोलुन मी तिचे मन राखले. आता मला दिल्लीला जायचे  काही तरी कारण मिळाले होते, नाहीतर मगास पर्येंत का चाललोय दिल्लीला असेच वाटत होते. चहा, फोना-फोनी आणि थोडावेळ निवांत आराम करून आम्ही पुढे निघालो. आता मला दिल्लीला लवकरात लवकर जायचे आहे हे जेव्हा दीपालीला कळाले तेव्हा, एक सारखी ती मला चिडवा-चिडवी करून त्रास देऊ लागली होती. आता गप्पा-मस्ती परत चालू झाली आणि मूड थोडा चांगला झाला होता. अशा गप्पान मध्ये एकदा-दोनदा रस्त्याच्या बाजूला पाणी पिण्यासाठी ब्रेक घ्यायचो आणि सटा-सट रस्ता कपात कर्नाल पार करून पानिपत गाठले.
बरेच अंतर पार केले म्हणून एक ब्रेक घेऊया आणि परत जरा भूक लागली म्हणून धाब्याजवळ थांबलो. वास्तविक तो फॅमिली हॉटेल सारखा मोठा ढाबा होता. फॅमिली ढाबा म्हंटला तर, ६०-७०  एक टेबल मांडले असतील. फार खपाटीला पोट लागले अशी भूक नव्हती लागली, म्हणून आम्ही एक-एक आलू परोठा  मागितला. जेवण येई पर्येंत फ्रेश होऊन घेतले आणि गप्पा मारत बसलो. अभी ने परत एकदा फोन करून  घेतला. मस्त गरम-गरम परोठा घेऊन आला, तेव्हा आमचे सर्वांचे डोळे भिर-भिरले. दीपाली आणि मनाली  जोरातच ओरडल्या “ एवढा मोठा परोठा”. मस्त परोठ्या वर २ चमचे लोणी घातले होते. मी तर मस्त  एन्जोय करत परोठा खाल्ला, पण दीपाली मात्र जास्त लोण्यामुळे तोंड वाकडे करून खात होती. कसे-बसे परोठे संपवले आणि मस्त दुधाची चहा पिऊन दिल्लीच्या दिशेने निघलो. दिल्ली अजून ७० एक किलोमीटर  वर होते. जसे पानिपत सोडले आणि दिल्लीच्या जवळ जायला लागलो तसे निसर्गाचे रूप पालटायला  लागले होते. कडक उन जाऊन ढगाळ वातावरण झाले होते आणि जोरात वाराही सुटला होता. मजबूत धुरळा पण उडत होता हवे मध्ये, वादळी वाऱ्यामुळे. वादळी वाऱ्यातून आणि धुरळ्यातून आम्ही पुढे निघालो. दिल्ली पासून ३० एक किलोमीटर वर पावसाने आम्हाला गाठले. लगेच आम्ही बाईक बाजूला घेऊन रेनकोट घालून घेतले. मला तर स्व:ता पेक्षा कॅमेऱ्याची जास्त काळजी होती.जस-जसे आमची दिल्लीच्या आत शिरत होतो तसे आम्हाला ट्राफिक लागले. आम्ही दिल्लीत प्रवेश करे पर्येंत बराच पाउस पडून गेला होता आणि त्यामुळे हे सर्व ट्राफिक जाम झाले होते. आमच्या बाईक ट्रीपचा शेवट इंडिया गेट जवळ करायचा असे ठरले होते. साधना आणि उमेशला पण ट्रिपचा क्लोजर फुटेज घ्यायचा होता. पण पावसाने संपूर्ण वाट लावली होती दिल्ली शहरात. मग अभीने इंडिया गेटचा बेत रद्द करून, रोहनला गाडीतले सर्व सामान दिल्लीच्या यूथ हॉस्टेल मध्ये आमचे बुकिंग होते तिकडे सोडायला सांगितले आणि बाकी सर्व बाईकसला कुठे हि न जाता सरळ दिल्ली रेल्वे स्टेशनला भेटायला सांगितले. मजबूत ट्राफिक जाम मध्ये आम्ही अडकलो होतो. कसे-बसे ट्राफिक जाम मधून पार होत ५ च्या दरम्यान आम्ही दिल्ली रेल्वे स्टेशनला पोहोचलो आणि अभीने पहिला लोडरला फोन लावला. त्याने आम्हाला पार्सल ऑफिस जवळ यायला सांगितले.

लोडरच्या सुचने प्रमाणे आम्ही सर्व पार्सल ऑफिस जवळ त्याची वाट पाहात राहिलो. आता फावल्या वेळे मध्ये आम्ही काय गप्प बसतो. चालू झाली आमची मस्ती. आता जास्त करून सर्वच मस्ती मध्ये शामिल झाली होते. पूनम, ऐश्वर्या, आदित्य, अमेय म्हात्रे, कुलदीप, आशिष, दीपाली, मनाली आणि मी जास्त करून मस्ती करत होतो. अभी मात्र संपूर्ण पणे बाईक लवकरात-लवकर लोड करायच्या म्हणून फोना-फोनी मध्ये घुसला होता. अधून- मधून मी ही त्याला मदत करत होतो. थोडा वेळ मस्ती आणि मधेच गरज लागली कि अभिला मदत. लोडर बरोबर झालेल्या शेवटच्या फोना-फोनी तून कळाले कि आम्ही चुकीच्या पार्सल ऑफिस जवळ आहोत. दिल्ली रेल्वे स्टेशनला ४ पार्सल ऑफिस आहेत.
मग सर्वांना कुठे हि जाऊ नका, इकडेच थांबा असे सांगून अभी,मी आणि अमेय म्हात्रे त्या लोडरला शोधायला गेलो. या सर्वात बराच वेळ निघून गेला. कसे बसे त्या लोडरला गाठले आणि पुढच्या प्रक्रियेला लागलो. दिल्लीतून मुंबईला ट्रेनने बाईक पाठवायचे सरसकट ३००० रुपये त्याने सांगितले. दिल्ली मध्ये प्रचंड बाबूगिरी चालते एक रुपया हि त्याने कमी केला नाही. या लोडरला शोधत असताना एक किस्सा घडला, तो म्हणजे पार्सल ऑफिस २ शोधत असताना एक इसमाला विचारले. त्याने रीतसर पार्सल ऑफिस दाखवले आणि लोडर कुठे असतात ते ही दाखवले. त्याला धन्यवाद म्हणताच तो आमच्या पाठी लागला आणि १०० रुपये प्रत्येक बाईक पाठी मागे. कशा बद्दल विचारले तर "आपको पार्सल ऑफिस दिखाया और लोडर से मिलवा दिया, उसका कमिशन". माझे आणि अमेय म्हात्रेचे तर टाळकेच सरकले हे ऐकून. चल भग...असे म्हणत त्याला पळवले आणि लागलो आपल्या कामाला. लोडर करून सर्व माहिती घेऊन परत बाईक कडे आलो. आता काळोख पडायला लागला होता आणि भूक पण लागली होती. बाईक कडे आलो आणि पाहतो तर सर्वांनी आपल्या कडे असलेले खाणे व ड्रायफूड  हाणायला सुरवात केली होती. मग आम्ही पण त्यात शामिल झालो. लोडरने सांगितल्या प्रमाणे बाईकच्या पेपरची जमवा-जमवी करून घेतली आणि त्या लोडरला सर्व पेपर व पैसे दिले. लगेच त्याने त्याची माणसे पाठवली आमच्या बरोबर बाईक प्याकिंग करायला. आमचे बरेचसे सामान बाईक वरच होते. पटा-पट सामान काढले आणि बाईक त्यांच्या ताब्यात दिल्या. या सर्व कामात ८.३० वाजून गेले होते. 

आता आम्ही थोडे रिलॅक्स झालो होतो. बाईक लोड करणे फारच महत्वाचे होते. या बाईक लोडिंगच्या कामामध्ये बराच वेळ निघून गेला आणि भूक पण लागली होती. आता आमचे पुढे लक्ष होते ते जेवण आणि मग चाणक्यपुरी मधल्या युथ हॉस्टेल वर जायचे. आमच्या पैकी दिल्लीची कोणालाही काहीच  माहिती नव्हती. मग मी शर्वरीला फोन लावून विचारून घेतले. चाणक्यपुरी युथ हॉस्टेल वर कसे जायचे आणि हॉस्टेल वर जायच्या आधी दिल्लीतले चम-चामित जेवण कुठे मिळेल हे हि विचारून घेतले. शर्वरीने दिल्ली मेट्रोने चाणक्यपुरीला जा आणि त्याच लाईने वर मध्ये राजीव चौकला उतरून कोनट प्लेस मध्ये जेवून घ्या असे सांगितले, पण जे काय करायचे आहे ते ११च्या आत. कारण ११ नंतर दिल्ली मेट्रो बंद होतात असे हि सांगितले. आता ९ च वाजले आहे आणि जेवण जेवून मग युथ हॉस्टेल वर जायचे सोडले तर दुसरे  आमच्या कडे काहीच काम नव्हते असे बोलून आम्ही १० जन शर्वरीने सांगितलेल्या मार्गावर चालायला लागलो. दिल्ली रेल्वे स्टेशन वरून मेट्रो पकडली आणि राजीव चौक मेट्रो स्टेशन वर उतरलो. राजीव चौक वरून कोनट प्लेस हे फार लांब नसल्या मुळे पायीच गेलो. मस्त चालत मस्ती करत आणि दिल्ली शहराचे नीर-निराळे रूप पाहात आम्ही कोनट प्लेस मध्ये एक हॉटेल शोधून काढले. हॉटेल मध्ये बरीच गर्दी होती म्हणून  बाहेरच मस्ती करत आमचा नंबर यायची वाट पाहात होतो. नंबर येई पर्येंत सर्वांनी आप-आपली फोना-फोनी करून घेतली. नंबर आल्यावर हॉटेल मध्ये शिरलो आणि पटा-पट  जेवण ओर्डर करायला घेतले. पण आता मात्र सकाळच्या नाष्ट्या प्रमाणे अभी ने प्रत्येकाला स्वतंत्र ओर्डर करून नाही दिली. अभिने सर्वांच्या सहमतीने सामुहिक आणि सर्वांना पुरेल अशी व्यवस्थित ओर्डर केली. लगेचच जेवण आले आणि आम्ही पण लगेच हाणायला लागलो. सर्व फारच भुकेले होते. मस्त जेवून १० च्या दरम्यान आम्ही परत राजीव चौक मेट्रो स्टेशन वर होतो. आमचे आता पोट भरले होते म्हणून म्हणा ना किंवा मेट्रो स्टेशन वर गर्दी पण कमी होती म्हणून आम्ही जरा मस्तीच्या मूड मध्ये होतो. आम्ही सर्वच मेट्रो चा प्रवास पहिल्यांदा करत होतो म्हणून फार कुतूहल होते. कुतूहल दायक मेट्रोचा प्रवास करत आम्ही चाणक्यपुरी स्टेशन वर उतरलो आणि ऑटो रिक्षा पकडली युथ हॉस्टेल साठी. युथ हॉस्टेल वर रोहन आणि टीमने सर्वांचे गाडीतले सामान रूम वर ठेवून घेतले होते.



दिल्ली युथ हॉस्टेल खरो-खरच हॉस्टेल सारखे आहे, डबल बेडचे. प्रत्येकाला एक-एक बेड अलॉट करून रोहन ने ते आमचे बेड आधीच ताब्यात घेऊन ठेवले होते. आमच्या बरोबर हॉस्टेल मध्ये बाकी प्रवासी पण होते. आम्ही सर्व लगेच सामानाची आवरा-आवर करायला लागलो. आमच्या आवरा-आवरी मुळे बाकी सर्वाना फार त्रास होत होता. इतके दिवस आम्ही सर्व एकत्र होतो म्हणून आमच्या पैकी कोणा-कोणाचे तरी सामान इकडे-तिकडे कोणा ना कोणा कडे तरी होतेच. सामानाच्या आवरा-आवरीच्या आवाज मुळे बाकी सर्वांची चीर-चीर चालू झाली होती. पटा-पट आम्ही सामान आवरून घेतली. विमानात खाली टाकायच्या आणि वरती आपल्या बरोबर घायच्या बॅग्स वेगळ्या करून ठेवल्या. सामान आवरून सर्व झोपी गेले, फक्त रोहन, अभी आणि मी मात्र जागे होतो. वास्तविक बाईक ट्रीप संपली होती म्हणून ट्रीप संदर्भात कुठल्याही कामा साठी आम्ही जागे नव्हतो. रोहन आणि अभी, रोहनच्या विमानाचे तिकीटची वेळ बदलण्यासाठी लागले होते कॉल सेंटरच्या फोन वर आणि मी लागलो होतो शार्वारीशी फोन वर. मी तिला दिल्लीत आल्यावर नक्की भेटेन असे प्रॉमिस केले होते. किंबहुना शर्वरीच्या आईने मी घरी जाणार म्हणून स्वयंपाक पण केला होता. काही कर आणि तू ये असे तिचे मत होते. कितीही उशीर झाला तरी आमचे भेटायचे असे ठरले. मला दिल्लीतले काहीही माहित नाही म्हणून, शर्वरीने मेरू टॅक्सीचे नंबर देवून ठेवले होते. पण या बाईक लोड करण्याच्या कामात फारच उशीर झाला आणि मग सामानाची आवरा-आवर यात १२ वाजले. मी तिला आता भेटू शकत नाही म्हणून मी तिची समजूत घालायला लागलो. बराच वेळ तिची समजूत घालत आणि मग इकड-तिकडच्या गप्पा मारत २.३० वाजले ते कळलेच नाही. शेवटी शर्वरीचे समाधान करून तिचा निरोप घेतला आणि तसाच झोपली गेलो. 

1 comment:

  1. छान :-)
    माझ्या ब्लॉगचा पत्ता:http://prashantredkarsobat.blogspot.com/

    ReplyDelete