24.3.13

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग पहिला - आठवा दिवस (पन्हाळा ते कोल्हापूर)

२५ मे २००५, कालच्या धांगड-धिंगाण्यामुळे बराच उशीर झोपायला झाला होता आणि त्यामुळे सकाळी उठायला पण. सर्व घरची मंडळी उठून तयार झाली तरी आम्ही लोळतच पडलो होतो. रावच्या मामांने कोल्हापूरी खाक्याने जो जोरात आवाज मारला आणि सर्व खडबडून जागे झालो. पटा-पट सर्वानी प्रातविधी उरकून निघण्याच्या तयारीला लागलो. रावच्या मामाने नाष्ट्याची पण सोय केली होती. पटा-पट नाष्टा गिळून आम्ही निघालो कोल्हापुरच्या दिशेने. आज माझ्या बरोबर बाईक वर रश्मी होती. राव बंधू एका बाइक वर तर रावच्या मामे भाऊ पिट्ट्या बरोबर राजू आणि बाकी सर्व गाडीत पन्हाळा ते कोल्हापूर हे अंतर सुमारे २५ किलोमीटर आहे. पण हा एक-दीड तासाचा प्रवास काय सुरेख होता. पन्हाळा सोडल्या पासून ते रावच्या मामाच्या घरा पर्यत  नॉन-स्टॉप रश्मी मराठी गाणी गात होती. मला एकही गाण्याची फर्माइशीची गरजच नव्हती. एका-पाठोपाट एक तीच मराठी गाणी गात सुटली. बाइक चालवताना पाठून मस्त मधुर मंजुळ गाणी ऐकायला मिळत होती. तो अनुभव मी आजही विसरू शकत नाही आणि रश्मी फार सुंदर गाते यात काय वादच नाही.

तास-दीड तासाच्या सुरेल प्रवासाने आम्ही रावच्या मामाच्या घरी पोहोचलो.  थोडा वेळ आराम करून जेवण केले आणि पुन्हा आराम करायला लागलो. मस्त दुपारची झोप काढली आणि ऊन थोडे सरल्या वर ४ च्या दरम्यान तयार होऊन मी, विवेक, रश्मी, राजू, अभिजित, पिट्ट्या आणि योगेश सर्व निघालो कोल्हापूर सहाराच्या फेरफटका मारायला. सर्व प्रथम महालक्ष्मीच्या मंदिरात गेलो. अंबाबाईचे दर्शन घेऊन बाहेर आलो आणि महालक्ष्मी मंदिराच्या जवळच असलेल्या तुळजा भवानीच्या मंदिरात पण गेलो. दर्शन घेऊन बाहेर आलो आणि निघालो रंकाळ्याच्या दिशेने. आज खऱ्या अर्थाने कोल्हापुरकरांचा पाहुणचार काय असतो तो पाहिला. अभिजित रावच्या मामा आणि परिवाराने केलेल्या पाहुणचाराला नक्कीच दाद दिली पाहिजे. काल पासून त्यांनी आम्हाला कुठे आणि कसलीही कमी पडून दिली नाही. किंबहुना बर्‍याच ठिकाणी त्यांनी आम्हाला पैसे पण खर्च करायला देत नव्हते. कोल्हापूर कडे असे बोलतात "काय यार आम्हाला जरा सुद्धा पाहुणचार करायला देत नाहीत". वास्तविक भरपूर पाहुणचार करूनच मग हे कोल्हापूर कडची मंडळी असे बोलत असतात आणि यांनी आमचा केलेला पाहुणचार काय जरा नव्हता भरमसाठ होता आणि अजून बराच बाकी होता.

रंकाळ्या जवळ आलो आणि तलावाच्या बाजूलाच बराच वेळ टंगळ-मंगळ करत फिरत होतो. अंधार पडला आणि पिट्ट्या आम्हाला रंकाळ्याची प्रसिद्ध भेळ खायला घेऊन गेला. आपल्या मुंबई चौपाटीला कशी भेळ खायची पद्धत आहे तशीच आम्ही कोल्हापुरात रंकाळ्याच्या काठावर झण-झणीत कोल्हापुरी भेळ खाल्ली. इकडे पण आम्हाला पिट्ट्यानी पैसे देऊ दिले नाही. भेळ खाऊन अजून थोडा वेळ रंकाळा फिरून कोल्हापुरात फेरफटका मारत आम्हाला पिट्ट्याने एका आईस्क्रीम, फालुदा आणि ज्युस सेंटर मध्ये घेऊन गेला. जबरदस्तीने फालुदा खायला भाग पाडले. हा फालुदा ही कोल्हापुरतला जग प्रसिद्ध आहे. पिट्ट्याने आम्हाला फार आग्रह करून का होईना पण प्रेमाने कोल्हापूर दर्शन करावले होते. कसला मावळ आहे पिट्ट्या वास्तविक आम्ही त्याचे कोण, तरी पण भावंडासारखे त्याने आमच्या वर प्रेम लावले होते.

रात्री परत घरी आलो तर आमच्या साठी निराळ्या मेजवानीचा प्लान होता. पण आजच्या एकंदर खादाडी मुळे आम्ही आता फार काही खायला नको असे सांगितले. म्हणून आजचा मेजवानीचा प्लान उद्यावर गेला आणि राजूची पण तब्बेत बरी नव्हती, त्याला आता ताप आला होता. राजुला गोळ्या देऊन झोपावले आणि आम्ही सर्व थोडा वेळ गप्पा-गोष्टी करून झोपी गेलो.

No comments:

Post a Comment