11.4.11

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग पहिला - ट्रिपचा उगम आणि पूर्वतयारी.

कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना मी मुंबई विद्यापीठाची कोकण कोस्टल साइकलिंग एक्षपीड़िशन केले होते. या मार्गाहून जाताना मला कोकण किनार पट्टीवरचे बरेच सागरी किल्ले आहेत असे कळाले. पण साइकलिंग ट्रीप मुळे एकही किल्ला पाहायला मिळाला नव्हता आणि त्याच वेळी मी हे सर्व किल्ले पाहणार असे ठरवले होते. या साइकलिंग ट्रीपच्या वेळी आमच्या बरोबर एक बाईक पण होती. मला बाईक चालवायला येत नसल्या कारणास्तव काकाने कधी सपोर्ट म्हणून मला बाईक चालवायला फार दिली नाही. त्या साइकलिंग ट्रीपच्या दरम्यानच मी ठरवले होते कि कोकणातील सर्व सागरी किल्ले पाहायचे आणि ते ही बाईक वरून. हाच खऱ्या अर्थाने आमच्या कोकण सागरी किल्ले बाईक ट्रिपचा उगम होता. याचा कालावधी मध्ये माझी अभिजित राव बरोबर मैत्री व्हायला लागली होती. आम्हा दोघांना बाईक वर फिरल्या फार आवडायचे, असे हि कळाले. मी बरेचदा रावला या ट्रीप बद्दल बोलून दाखवले होते. आम्ही दोघांनी मिळून बऱ्याच १-२ दिवसांच्या बाईक ट्रीप पण करायला लागलो होतो. शेवटी आमच्या एम.एस.सी पार्ट-१ च्या सुट्टीत काही करून आपण कोकणातील सागरी किल्ले करायचे असे माझे आणि रावचे ठरले.

आता एकदा ठरले कि मग आम्हाला कसला धीर राहतोय. आम्ही दोघे लागलो कामाला. मी या मार्गावर अगोदर साइकलिंग केल्यामुळे रत्नागिरी पर्येंतचा रूट प्लान करून घेतला. रत्नागिरी ते गोवा पर्येंतचा रूट मी आणि रावने मिळून प्लान केला. कॉलेज मध्ये असल्या कारणास्तव कमी पैश्यात ट्रीप करायची होती, म्हणून रात्री राहायचे तर देऊळ, शाळा, एस.टी स्टॅंड किंवा कोणाचे तरी मिळाले तर अंगण असे ठरले. मी आणि रावने दिवसा किती प्रवास करायचा, रस्त्यात लागणारे किती किल्ले पाहायचे आणि रात्री कुठे राहायचे सर्व कागदोपत्री प्लान करून घेतला. याच कालावधीत आमची एम.एस.सी पार्ट-१ ची परीक्षा पण होती. अभ्यासाबरोबर आम्ही या बाईक ट्रीप बद्दल पण बऱ्याच चर्चा पण करायचो.

जस-जसे बाईक ट्रीपचे दिवस जवळ यायला लागले होत तस-तसे आमची उत्सुकता वाढायला लागली होती. माझे तर अभ्यासात जरा हि मन लागत नव्हते. या बाईक ट्रीपचे ऐकून आमचे कॉलेजचे मित्र सुजय आणि राजू पण या ट्रीप वर यायला उत्सुक आहेत असे मला रावने सांगितले. किंबहुना रावने त्यांना होकार पण दिल्याचे सांगितले. वास्तविक माझी तशी काहीच हरकत नव्हती, पण राजू आणि सुजय यांनी आयुष्यात कधी खडतर प्रयोग केलेले नव्हते. सुजय ने मुंबई बाहेर बाईक चालवली नव्हती आणि मुंबई तो बाईक कसा चालवतो याची आम्हा सर्वाना पुरे-पूर जण होती. सुजय म्हणजे रावडी बाईक चालवणारा आणि राजूला तर बाईक चालवायला पण येत नव्हती. या सर्व कारणास्तव मी थोडा चिंतेत होतो. माझे आणि रावचे या विषयावर बऱ्याच चर्चा झाल्या. चार्चांती रावने मला फार काळजी करू नकोस असे सांगून खिशात टाकून घेतले.

आता आम्ही ४ जण कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप साठी सज्ज झालो होतो. आम्ही सर्वांनी बाईकस सर्विसिंग करून घेतल्या आणि आमचे एम.एस.सी पार्ट-१ चे पेपर संपायची वाट पाहात राहिलो. त्या वेळेला मी दादरला राहत होतो म्हणून कॉलेज मध्ये परीक्षेचा अभ्यास आणि बाईक ट्रीपची पूर्वतयारी करायला मिळत होते. राव पण सांताक्रुझला यूनिवर्सिटी मध्ये राहत होता. राजू आमच्या रुईया कॉलेज च्या बाजूलाच राहत होता तर सुजय बांद्रा मध्ये. सर्व रुईया नाक्या पासून जवळ राहत होते म्हणून आम्हाला पटा-पट सर्व तयारी करायला मिळत होती. खरे पाहायला गेले तर आमचे कोणाचे अभ्यासा मध्ये जास्त लक्ष नव्हतेच. तसे पाहायला गेलेतर आमचा काय फार परीक्षेसाठी जास्त अभ्यास पण झाला नव्हता.

शेवटी १८ मे २००६ हा बाईक ट्रीपचा दिवस ठरला. कसे-बसे परीक्षा द्याची आणि लगेच दुसऱ्या दिवशी बाईक ट्रीप साठी पाळायचे असे ठरले.

परीक्षेचा शेवटचा दिवस आला. आम्ही सर्वांनी पटा-पट पेपर संपवला आणि दुपारी नाक्यावर भेटलो. औषधे आणि बाकी लागणाऱ्या बऱ्याच गोष्टीची आम्ही खरेदी करून घेतली. राजू आणि सुजयला काही माहिती नसल्या कारणास्तव लागणाऱ्या सर्व गोष्टी घेऊन यायला सांगितले. शेवटी माझी टीव्हीएस विक्टर आणि रावची यामाहा एंटायसार घेऊन जायचे ठरले. २ बाईक आणि चार जण कोकण सागरी ट्रीप साठी सज्ज झाले. उद्या सकाळी ६ वाजता रुईया नाक्या वर भेटायचे ठरवून आम्ही आप-आपल्या घरी गेलो.

4 comments: