7.9.15

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग दुसरा - नऊवा दिवस (देवरुख ते मुंबई)

१३ जून २०१०, गजर लावल्या प्रमाणे ४ वाजता आम्ही उठायचा प्रयेत्न केला पण थोडा पुढे-पुढे असे करत ४.३० - ५ वाजताच्या दरम्यान उठलो आणि प्रातविधी उरकून शेवटच्या निघायच्या तयारीला लागलो. ५.३० - ६ च्या दरम्यान उजाडण्याची चिन्हे दिसायला लागली, म्हणून मी दरवाजा तून बाहेर गेलो. बाहेर पाहतो तर मला पाउसाची पण मजबूत चिन्हे दिसत होती. किंबहुना काल रात्री नक्की पाऊस येऊन गेलेला असे जाणवले. आता पुढे जर जोराचा पाऊस लागला तर एवढ्या सर्व सामाना बरोबर आमची फार वाट लागणार हे मला जाणवत होते. म्हणून मी आमचे जरा समान कमी केले आणि देवरुखच्या घरीच ठेवले.

सर्व सामान बाईक वर लावले आणि त्यावर ताडपत्री पण बांधून घेतली. आम्ही ६.३० - ७ च्या दरम्यान देवरुख सोडले.  हळू - हळू मुंबईच्या दिशेने कूच करत होतो. संगमेश्वर पार करून धामणी मध्ये बाईकला पेट्रोल पाजले आणि आम्ही पण तिकडेच टपरी वर चहा बिस्किटाचा नाश्ता केला. आम्हाला पाऊसाच्या आधी जास्तीत-जास्त पुढे  जायचे होते. म्हणून नाश्त्यासाठी जास्त वेळ नाही घेतला. धामणी वरुन निघालो ते अरवली पर्येंत पण पोहोचलो नव्हतो आणि काळे ढग दाटून आले आणि जर पुढे जातो न जातो तर जो मजबूत पाऊस कोसळला. नशीबाने आम्ही त्यावेळेला आरवलीच्या चौकात होतो. त्या वेळेला एक चहाचे दुकान उघडे होते. लगेच त्यांच्या दारातच बाईक लावली आणि आम्ही शिरलो आत. बराच वेळ पाऊस कोसळत होता. तो पर्येंत आम्ही पुन्हा एकदा चहा घेतला आणि थोडा नाश्ता पण केला.

जसा पाऊस थोडा कमी झाला, तसे मी लगेच जाऊन बाईक वर लावलेले आमचे सर्व मोल्यवान सामान बागेत प्लास्टिक मध्ये ठेवले. या मोल्यवान बॅगा आम्ही पाठी वर लावल्या आणि मग स्वतावर बॅगा सहित पॉन्चो चढवला. आता तर मी आणि बाईक दोघे हि निळ्या ताडपत्रीने झाकल्या सारखे दिसत होतो. बाईक वरच्या सर्व सामानावर निळी ताडपत्री बांधली होती आणि माझा पॉन्चो पण निळ्या ताडपत्रीचाच होता. रस्त्या वर उभे असलेला प्रत्येक व्यक्ती आमच्या कढे पाहत होते आणि मनात बोलत असावे की, काय वेडे आहेत हे,  एवढ्या पाऊसात अंगावर आणि बाईक वर ताडपत्री बांधून चालले आहेत. त्यांच्या हसण्याला आम्ही पण आमच्या हसण्याचा जोड देऊन पुढे हळू - हळू जात होतो. सावर्डयाच्या पुढे जाई पर्येंत जरा पाऊस होता आणि नंतर संपूर्ण बंद झाला. आता आम्हाला  या ताडपत्रीत गरम होऊ लागले होते. जरा रस्त्याच्या बाजूला थांबलो आणि पॉन्चो काढून घेतला. तसाच उभ्या उभ्या ने एक छोटासा ब्रेक झाला आणि पुढे निघालो. या परिसरा मधे जास्त पाऊस नव्हताच आणि पंडून पण गेला नव्हता त्यामुळे रस्ता बर्‍या पैकी सुका होता. याच संधीचा मी फायदा घेऊन थोडी बाईक पळवायला लागलो. ४० - ५० च्या  स्पीडने आता आमची चिपळूण गाठले.

पुन्हा एक छोटासा उभ्या - उभ्या चिपळूणात ब्रेक घेतला आणि पुढे निघालो आता जरा आभाळ मोकळे होऊन उन्ह पण यायला लागले होते. वातावरण मस्त झाले होते, हवेत जरा थंडावा आणि वरुन उन्ह. काय मस्त वाटत होते मला बाईक चालवायला त्या रस्त्या वरून. यातच आम्ही निसर्गाची वेग-वेगळे रूप पाहत परशुराम घाट चढू लागलो आणि पुढे खेडच्या दिशेने निघालो. घाट चढून लोटे, लावेल पार करत भरणा नाक्यावर आलो आणि आम्ही परत एक ब्रेक घेतला. आता बराच वेळ आमच्या वर पाऊसाने मेहेरबानी केली होती आणि त्यामुळेच आम्हाला जरा पटा - पट पुढे येता आले. भरणा नाक्या वरुन सुटलो आणि नातू नगर पार करून कशेडी घाटाच्या पायथ्या पर्येंत पोहोचलो. एवढ्या परत आम्हाला पाऊसाने गाठले. आता आमच्या जवळ - पास रस्त्याला कुठे हि शेड पण नव्हती. तसेच रस्त्याच्या बाजूला उभे राहू पॉन्चो घालून घेतले. या वेळेला पाऊस फार काय जास्त जोरात नव्हता. पण थोड्या सरी मध्ये मध्ये येत होत्या. हळू - हळू आम्ही या पाऊसाच्या सरीतून कशेडी घाट चढत होतो. जस - जसे घाट चढू लागलो तसे पाऊस कमी होत होता. घाट चडून वर गेल्यावर खिंडीत तर पाऊस अजिबातच नव्हता. पाऊस सरला म्हणून लगेच आम्ही महाडच्या दिशेने घाट उतरू लागलो.

कशेडी घाट उतरून पोलादपूरला आलो. घाटाच्या या बाजूला तर अजिबातच पाऊस नव्हता. या परिसरात तर पाऊस जराही आला नव्हता, त्या मुळे पुन्हा या संधीचा फायदा घेत आम्ही सुसाट सुटलो ते लगेच महाडला कामत कडे थांबलो. आता जरा भूख लागली म्हणून थोडेसे पोठ भरून घेतले आणि फ्रेश होऊन पुढे निघालो. महाड सोडले आणि गोरेगाव, माणगाव, कोलाड पार करून नागोठण्याला आलो. नागोठण्याला पण गोविंदा कामत कडे थांबलो. हे आमचे नेहमीचे थांबायचे ठिकाण आहे. फ्रेश होऊन थोडा आराम केला आणि चहा घेऊन निघालो पुढे. आता या पुढचा रस्ता फार रहदारीचा असतो म्हणून जरा बाईक हळू - हळू जाऊदे असे म्हणत आम्ही पुढे चाललो होतो. पण आज आमच्या सुदैवाने आम्हाला या ठिकाणी फार जास्त ट्रॅफिक नाही लागले आणि सुसाट बाईक पळावत आम्ही वडखळ, कर्नाळा पार करून पळस्पे फाट्यावर आलो.

आता मात्र आम्ही दोघे पण फारच थकलो होतो. सकाळ पासून नुसती बाईक चालवत होतो आणि लवकर घरी पोहोचण्यासाठी नुसती पळ-पळ चालली होती. मुंबईच्या जवळ आल्यावर जरा बरे वाटले आता २ - ३ तासात घरी पोहोचू असे वाटले. पळस्पे फाट्यावर दत्त स्नॅक्स कढे मिसळ पाव खाऊन घेतली आणि मस्त गरम-गरम चहा मारला आणि घराकडे निघालो. २ एक तासात ऐरोली मार्गे पवई पार करून गोरेगाव महानंदाच्या जवळ आलो होतो. आता परत आभाळ गडगडायला लागले आणि पुन्हा जोराचा पाऊस कोसळायला चालू झाला. लगेच बस स्टॉपच्या जवळ बाईक लावली आणि बस स्टॉपच्या आडोश्याला उभे राहिलो. आता पॉन्चो बॅगेतून काढायचा आणि घालायचा दोघांनाही कंटाळा आला होता. वास्तविक आम्ही आता फारच थकलो होतो आणि घर पण तसे जवळ आले होते. साहजिकच आहे ना? एवढी बाईक चालवून आणि मागे बसून सुधा थकायला होणारच ना. अक्षताची तर हि पहिलीच मोठी बाईक ट्रिप होती. तरी पण ती ने फारच छान पेलली हि बाईक ट्रीप. थोड्या वेळाने पाऊसाची सर थोडी सरली आणि आम्ही परत बाईक वर स्वार होऊन घरी कांदिवलीला आलो.

अश्या प्रकारे आमच्या मनातली आणि आम्ही जशी करायची ठरवली होती तशी कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप २ भागात का होईना पण आम्ही पूर्ण केली. फक्त मला दुसऱ्या बाईक ट्रीप वर सुजय नसल्याचे फार वाईट वाटले. कालांतराने मला सुजय अक्षता होती म्हणून नाही आला हे मुळ कारण कळाल्यावर तर फारच वाईट वाटले. असो पण जर मला कोकण बाईक ट्रीप बद्दलच्या आठवणी विचारल्या तर सर्वात जास्त पहिली कोकण बाईक ट्रिपच जास्त आठवते. दुसरी बाईक ट्रीप आमचे उरलेले किल्ले पूर्ण करायचे म्हणून केली होती असे मला वाटते.

दुसऱ्या बाईक ट्रीप वरचे आमचे पहिला आणि शेवटचा दिवस फारच लांबचा होता. हेच दिवस पहिल्यांदा बाईक ट्रीप करणार्‍याला फारच कठीण जातात. पण अभिजीत रावच्या मते या बाईक ट्रीप वर अक्षताने कधीही प्रवासाचा त्रास होतो आहे असे चेहऱ्यावर सुद्धा दाखवले नाही. किंबहूना त्याच्या मते तर दुसरी बाईक ट्रीप सर्वात जास्त अक्षतानेच एंजॉय केली, कारण या संपूर्ण त्रासच्या बाईक ट्रीप वर आम्हाला कितीही त्रास झाला तरी अक्षता हसतच होती. वास्तविक हे अभीजीतचे मत खरे होते . अक्षताने हि बाईक ट्रीप फारच एंजॉय केली होती

ही होती माझी, अभिजित राव, सुजय, राजू, उन्मेष आणि अक्षताची कोकणातील सागरी किल्ले पाहण्यची  बाईक वरची भटकंती.

No comments:

Post a Comment