6.11.12

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप- भाग पहिला- सातवा दिवस (देवरुख ते पन्हाळा)

२४ मे २००५, ठरल्या प्रमाणे सकाळी लवकर उठलो आणि सर्व प्रातविधी उरकून निघायच्या तयारीला लागलो. रावने मला पुन्हा एकदा पुढच्या ट्रीप बद्दल विचार कर असा प्रश्न टाकला. पण माझे मत आता ही तसेच होते काही निराळे नव्हते. खरोखर मी एकटा पुढच्या ट्रीपसाठी तयार नव्हतो. शेवटी रावने पण नागी टाकली. तयार होऊन देवरुखच्या नाक्यावर आम्ही नाष्ट्यासाठी आलो. नाष्टा करताना पण रावचे बर्‍याच मार्गाने माझे मन वळवायचा प्रयेत्न चालला होता. पण या वेळेला त्याचे काहीच चालले नाही. नाष्टा उरकून १०.३० च्या दरम्यान आम्ही देवरुख सोडले.

On Vishalgad
सारखरपा पार केले आणि आंबा घाट चढायला लागलो. दीड-एक तासाच्या बाइक दौड नंतर आंबा घाटतल्या गणेश मंदिराच्या जवळ थांबलो. या जागे वरुन कोकणातला परिसर फार छान दिसतो. मी आणि रावने फोटो काढून घेतले. थोडावेळ आराम करत चहा मारला आणि पुढे निघालो. संपूर्ण आंबा घाट चढून आंबा गावात आलो. विशालगडला जाणार्‍या रस्त्याची चौकशी केली आणि देवरुख-कोल्हापूर रस्त्यावरून उजवीकडे जाणारा विशालगडाच्या रस्त्याला लागलो. आंबा ते विशालगड हे अंतर २०-२२ किलोमीटरचे आहे. पण हा रस्ता फारच खराब आहे. संपूर्ण रस्ता खडकाळ आणि मातीचा. बाइक चालवण्याचा संपूर्ण कस निघाला. हे अंतर आम्ही दीड-एक तासात पार केले. मधे एकदा-दोनदा फोटो काढायला थांबलो होतो.

दोन दिवस घरात आराम केल्यामुळे आज आम्हाला फरच गरमा जाणवत होत की काय असे वाटले. विशालगडला पोहोचल्या पोहोचल्या आम्ही सर्वात पहिले हॉटेल मधे शिरलो आणि थंड गार मॅगोला ऑर्डर केला. जरा जीव शांत करून घेतला आणि निघालो गड पाहायला. रावने मी गड पाहायला येत नाही तुम्ही जा असे सांगितले. राव हॉटेल मधे सर्व समान घेऊन बसून राहिला आणि मी व राजू गड पाहायला निघालो. विशालगडाच्या वर पर्येंत रस्ता आहे आणि त्यानेच आम्ही पण आलो होतो. एक पूल ओलांडला नि शिरलो गडाच्या आत. वास्तविक गडाला दरवाजा वगैरे काही नाही आहे. गडाच्या सुरवातीला बरीच दुकाने आहेत आणि ती थेट गडात असलेल्या पिर बाबांच्या दर्ग्या पर्येंत जातात. पिर बाबांच्या दर्ग्याला बर्‍याच भाविकांची गर्दी असते आणि ती आम्हाला पण पाहायला मिळाली. Samadhi of Baji Prabhu Deshpande, Vishalgadगर्दीतून पिर बाबांना दर्ग्याच्या बाहेरूनच नमस्कार केला आणि गड पाहायला दर्ग्याच्या बाजूचा रस्ता घेतला. या पिर बाबांच्या दर्ग्याची एक पद्धत आहे, बरेचशे भाविक लोक  कोंबडीला मारुन आपला नवस फेडत. दर्ग्याच्या मागच्या बाजूला प्रचंड घाण आहे आणि वास हि येतो. सर्वत्र कोंबडीची पिसच पीस होती. हे पिसांचे जंगल पार केले आणि विशालगड पालथा  घालायला निघालो. विशालगड हे नाव या किल्ल्याला त्याच्या विशालते मुळेच पडले असावे असे मला वाटते. मला या किल्ल्याचा फार इतिहास माहीत नाही. मला फक्त बाजे प्रभू देशपांडे याची समाधी विशालगडा वर आहे एवढे माहिती होते आणि तीच पाहायची होती. विशालगड हा तटबंदी ने पाहावा असे वाटले होते पण मधेच बाजी प्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांची समाधी दिसली आणि वळलो त्या दिशेला. समाधीवर नतमस्तक झालो आणि त्या शुरांनामुजरा करून परत फिरलो किल्ला पाहायला. आम्ही नुसते चालतच होतो तटबंदी काही केल्या येईच ना. Rajendra, Vishalgadमाझ्या बरोबर राजू पण होतो आणि त्याला ट्रेकिंग ची फार सवय नव्हती. भर उनात आम्ही चललो होतो. शेवटी बरीच तंगड तोड करून तटबंदी काही गाठली नाही. जरा वेळ उनातच विश्रांती घेतली आणि पुढे निघायच्या तयारीला लागलो. पण आता राजूची संपूर्ण ताकद संपली होती. तसे त्याने मला सांगितले नाही पण त्याचा चेहरा पाहून मला जाणवले. अजुन पुढे जाण्यात काही अर्थ नव्हता आणि आम्ही मागे वळलो. परत येताना तर राजू फक्त माझ्या मागोमाग चालत होतो त्याला काही कळतही नव्हते. बरीच तंगड तोड करून आम्ही परत रावकडे हॉटेल मधे आलो.

Road to Vishalgadया वेळेला तर राजू पूर्णपणे गाळुन पडला होता. सर्व प्रथम रावने आम्हाला मॅगोला पाजला आणि मग माझी जी काही कान उघडणी केली, मजबूत शिव्या घातल्या. एकतर यायला बराच वेळ लावला आणि राजूची हे हाल करून आणले म्हणून. रावने मला बऱ्याच शिव्या घातल्या आणि शांत झालो. बराच वेळ आराम करून घेतला आणि त्यातच जेवून पण घेतले. रावच्या घरातले पन्हाळ्यावर आले होते. पुन्हा आम्ही पुढच्या प्रवसासाठी सज्ज झालो. अधून-मधून फोटोग्राफी किंवा कंटाळा आला तर माधेच कुठही ब्रेक घेत आणि आम्ही पन्हाळा जोतीबा फाट्यावर आलो. गरम्याचा तर फारच त्रास होत होता आणि माझ्या विशालगडाच्या टंगड तोडी मुळे राजुला पण त्रास होत होता. फाट्यावर मस्त मोरणा लस्सी प्यायलो आणि पुढे लागलो पन्हाळा चढायला. चढायला म्हणजे बाइक ने....पन्हाळ्यावर गाडी जाते आणि सर्वत्र गाडीने फिरता पण येते पन्हाळा कोल्हापूरकरांचे हिल स्टेशन आहे. संध्याकाळी ४ च्या दरम्यान आम्ही पन्हाळ्यावर रावच्या घरातल्यांनी बुक केलेल्या हॉटेलमध्ये पोहोचलो.सर्वांनी आमची विचारपूस केली आणि शिव्या पण घातल्या. रावच्या आई-वडिलांनी रावला त्यांच्या ताब्यात घेतले आणि मजबूत झाडणी केली आम्हा सर्वांची. रावच्या घरची बरीच मंडळी होती. त्याचे आई-बाबा, भाऊ-वाहिनी, मामा-मामी, २ मामेभाऊ. आम्ही सर्व पटा-पट फ्रेश होऊन पन्हाळा गड पाहायला गेलो. रावचा मामा कोल्हापूरातच रहतात त्यामुळे संपूर्ण गड तेच आम्हाला फिरवू लागले. अंधार होई प्रयेंत मस्त गड फिरत होतो आणि मग पुन्हा हॉटेल वर आलो. जेवणाची सोय रावच्या मामांनी हॉटेल वरच केली होती. फ्रेश होऊन सर्व थोडा वेळ आराम करत बसलो. बसल्या-बसल्या राजू आणि रश्मी यांची मैफिल जमली आणि मग काय मस्त गाण्यांचा कार्यक्रम सुरु झाला. बराच वेळ मैफिल रंगली आणि कईक गाण्यांच्या फर्माईश पण पूर्ण झाल्या. रावचे मामा तर फारच दिलखुलास आहेत. त्यांच्या मते जेवणा आधी थोडी मस्ती करूया असे होते, मग काय आम्ही झालो त्यांच्या मस्तीत शामिल. कोल्हापूरकरच ते ऐकणार काय कोणाला. सर्वांना गाडीत घालून हॉटेलच्या बाहेर एका पठारावर घेऊन गेले आणि गाडीच्या डेक वर गाणी लावून आम्ही धिंगाणा घालायला लागलो. पौर्णिमेच्या जवळ पासचे दिवस होते त्यामुळे मस्त चांदणे पडले होते. काय धमाल केली आम्ही, पन्हाळ्याच्या पठारावर भर रात्री मस्त चांदण्यात नाच गाणे चालले होते आमचे. दीड-दोन तास लहान मोठ्यांचा धिंगाणा आवरून आम्ही हॉटेल वर परत आलो आणि मस्त जेवून झोपी गेलो.

4.11.12

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप- भाग पहिला- सहावा दिवस (देवरुख)

२३ मे २००६, १०च्या दरम्यान खिडकीतून ऊन घरात यायला लागले आणि गरम व्हायला लागले तेव्हा आम्हाला जाग आली. बराच वेळ इकडे तिकडे अंगणात बसलो आणि फ्रेश होऊन नाक्यावर टापरी सारखे छोटेसे हॉटेल आहे तिकडे चहा साठी गेलो. मग बराच वेळ चहा, गप्पा, मिसळ, चहा आणि गप्पा असे चलले होते. आज आमचा आरामाचा दिवस होता. १२ वाजे पर्येंत तिकडेच टाइम पास करत बसलो. माझे देवरुख आणि परीसरच्या गावात बरेच नातेवाईक आहेत. काही जणांना भेटायचे होते आणि थोडीशी इकड-तिकडची कामे पण होती. राजू आणि रावला घरी सोडले आणि निघालो माझ्या कामाला. ४च्या दरम्यान मी परत देवरुखला घरी आलो. राजू आणि रावचा काहींना-काही टाइम पास चालू होताच मधेच हरीलाल बरोबर त्यांनी गप्पान मधे मैत्री पण केली. हरीलाल कढून मला घराचे २-३ महिन्याचे भाडे घ्यायचे होते, व्यवहार क्लियर झाला आणि मी पण घुसलो गप्पान मधे. अंधार पडे पर्येंत गप्पा चालू होत्या.

मात्र आता आमच्या गप्पा चर्चांमध्ये बदलल्या होत्या. विषय होता पुढच्या ट्रीप बद्दल. करम... उद्या रात्री पर्येंत आम्हाला पन्हाळ्याला पोहचायचे होते. रावच्या घरातले सर्व पन्हाळ्याला येणार होते. म्हणून देवरुख सोडण्याआधी आमच्या पुढच्या ट्रीपचा निर्णय घेणे जरुरीचे होते. या वेळेला माझे मत रावच्या पेक्षा पूर्ण निराळे होते. राजू कोल्हापूर वरुन परत मुंबईला रावच्या घरातल्यान बरोबर जाणार होता आणि पुढची ट्रीप आम्ही दोघेच करणार होतो. रावचा पाय अजुन ठीक झाला नव्हता आणि त्याची बाइक वर चढ-उतार, कुठे उठता बसताना लागणारी मदत अजूनही लागत होती. पुढच्या ट्रीप साठी आम्ही दोघेच असणार आणि मदतीला माझ्या शिवाय कोणी नाही. मी एकटा तरी कुठे-कुठे धावपळ करणार, रावची काळजी आणि त्याला लागेल तिथे मदत, सामानाची चढ-उतार, हे आण ते आण, किल्ले फिरायचे अशा बर्‍याच गोष्टी होत्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रत्नागिरी पुढचे एक-दोन किल्ले डोंगरावर होते आणि ते चढून जावे लागणार होते. आम्ही दोघे असल्या कारणास्तव रावला सोडून कुठे ही जाता येणार नव्हते आणि राव जास्त चढ-उतार करू शकत नव्हता.

बराच वेळ आमच्या या विषया वर चर्चा झाल्या, पुढे जायचे की नाही. शेवटी माझ्या मतावर रावच्या मना विरुद्ध एकमत झाले. ठरले मग पुढचे किल्ले करायचे नाही. रावचा पाय बरा झाला की पुन्हा केव्हा तरी येऊ परत. राव आणि राजू कोल्हापुरातून पुणामार्गे मुंबईला जाणार आणि मी परत देवरुखला. कारण आईची बरीच कामे देवरुखला होती आणि म्हणून मी आईला पण देवरुखला बोलवायचे ठरवले होते. माझ्या या निर्णयामुळे राव नाराज झाला होता, हे मी जाणून होते आणि चर्चा सुरू करण्याआधी राव नाराज होणार हे ही मला माहीत होते. पण माझा ही नाईलाज होता, मी काय पुढच्या ट्रीप साठी आणि रावची एवढी मोठी जबाबदारी पेलायला तयार नव्हतो आणि ती ही एकट्याने बरोबरीला एक तरी असता तर गोष्ट निराळी होती. या सर्व चर्चा करून पुढच्या ट्रीपचा निर्णय घेतला आणि ७च्या दरम्यान निघालो जेवायला.

पुन्हा तिकडेच स्टॅंडच्या समोर दीपक हॉटेल मधे शिरलो आणि त्याच टेबल वर जाऊन बसलो. विशेष करून आमचा अवतार ही काल सारखाच, तीचं मोरपिसी ट्रेक पॅंट, तेच फाटके टी-शर्ट आणि तसाच त्यातल्या-त्यात बरा असलेला राजू. आज तर त्या हॉटेलचा वेटर, काही कर्मचारी आणि मालकाने पण आश्चर्य मुद्रेने पाहिले. आज त्यांच्या ही मनात हाच प्रश्न असावा "कोण आहेत ही आणि कुठून आलेत?". काल प्रमाणेच कमी अधिक फरकाने तशीच जेवणाची ऑर्डर आणि तशाच गप्पा. जेवण उरकून १०च्या दरम्यान निघालो, घरी आलो आणि थोडासा वेळ टंगळ-मंगळ करून झोपी गेलो.

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप- भाग पहिला- पाचवा दिवस (गणपतीपुळे ते देवरुख)

२२ मे २००६, सकाळी ८च्या दरम्यान मंदिरात येणार्‍या जाणार्‍या भक्तांच्या गर्दीच्या आवाजाने आम्ही उठलो. उठून पाहतो तर माझ्या स्लीपिंग बॅग वर बरीचशी वाळू साचली होती. आजूबाजूचे येणारे जाणारे आमच्याकडे पाहून हसत होते. थोडेसे हसलेल्या सारखे वाटले म्हणून पटा-पट उठलो आणि समान आवरून हात पाय तोंड धुवून घेतले. शौचाला गेलो तर फार मोठी लाईन होती आणि मला व राजूला जोरात लागली होती. राव आणि सुजयला मंदिराकडे सामनासहित सोडले आणि मी व राजू मंदिराच्या बराच पुढे बीच वर सुरूच्या बनाच्या आडोशाला जाऊन बसलो काम फत्ते करायला. आमचे विधी उरकून परत मंदिराकडे आलो तर आता सुजय बोलला मला पण लागली आहे मग तो गेला. सर्व प्रातविधी उरकून आम्ही पुन्हा गणपतीचे दर्शन घेतले आणि मंदिराच्या बाहेरच नाष्टा करून १० च्या दरम्यान रत्नागिरीच्या दिशेने निघालो.

Ratnadurg, Ratnagiri गणपतीपुळे ते रत्नागिरी हे अंतर सुमारे ३० किलोमीटरचे आहे. निवळी मार्गे नाही हा सागरी किनाऱ्यामार्गे काय सुंदर रस्ता होता मस्त समुद्राला लागून आणि कुठे कुठे कोळी गावांकडून. मध्ये बरेचदा फोटोग्राफी साठी थांबत थांबत १२च्या दरम्यान रत्नागिरीला टिळकआळीमधे काकाच्या घरी पोहोचलो. काकाचे भाडेकरू साळवी परिवार माझ्या परिचयाचे होते आणि काकाने त्यांना आधीच फोन करून सांगितले होते की मी येणार आहे. काकाच्या घराची चावी त्यांच्याकडे असते. साळवी काकांनी आमची विचार पूस केली आणि दिली चावी हातात. आम्ही सर्वांनी फ्रेश होऊन घेतले आणि समान काकांच्या घरीच ठेवून भगवती बंदराला लागून असलेला रतनदुर्ग किल्ला पाहायला निघालो. सकाळचा नाष्टा फार काय चांगला नव्हता म्हणून परत टिळक आळीतली फेमस टपरीवरची मिसळ खाऊ आणि मग किल्ला सर करू असे ठरले. मिसळ हाणली आणि निघालो किल्ला सर करायला. किल्ल्याच्या पायथ्या पर्येंत रस्ता आहे. बाइक लावल्या आणि घुसलो किल्ल्यात. किल्ल्यात शिरल्या-शिरल्या भगवती देवीचे मंदिर आहे. भगवती देवी हे रत्नागिरीच्या लोकांचे आराध्य दैवत मानले जाते. दर्शन घेतले आणि किल्ल्याचा फेर-फटका मारायला निघालो. किल्ल्याच्या तटबंदी दुरुस्तीचे काम चालू होते. आम्ही तटबंदि वरूनच फिरायचे ठरवले. तसे पाहायला गेल्यास तटबंदि आणि मंदिर सोडले तर बाकी काहीच नाही आहे. मधे सर्व माळरान आहे आणि किल्ला पण तसा छोटा आहे. मात्र किल्ल्याची बरीचशी बाजू समुद्राच्या दिशेने आहे त्यामुळे समुद्राच्या फेसाळलेल्या लाटा खडकांवर आपटताना पाहायला मिळतात. काय सुंदर नजारा होता तो. मी आणि राव ने बरेच फोटो काढले आणि भगवती मंदिराच्या बाजूला असलेल्या एक चौथऱ्यावर सावलीत बसलो.


Sea from Ratnadurg, Ratnagiri

आमच्या ट्रीपचा ठरल्याप्रमाणे पहिला टप्पा संपला आणि ठरल्याप्रमाणे सुजय व राजुला रजा द्यायची वेळ आली होती. पण राजूने आमच्या बरोबर पुढे ट्रीपवर यायचे ठरवल्यामुळे आता फक्त सुजयला रजा द्यायची वेळ आली. आम्ही पुढचे प्लॅनिंग करायला लागलो. रत्नागिरी वरुन मुंबईला निघणाऱ्या बसेस सर्व रात्रीच्या असतात तो पर्येंत सुजय एकटा काय करणार आणि वगैरे-वगैरे. पण काय पर्याय नव्हता आम्हाला माझ्या घरी देवरुखला संध्याकाळच्या आत पोहोचायचे होते. रतनदुर्ग उतरलो आणि टिळक आळीत मी व राजू मस्त माश्याच्या जेवणावर ताव मारू लागलो आणि राव व सुजय चिकन आणि मटन वर होते. जेवण आवरले आणि रत्नागिरी स्टॅंडला आलो सुजयसाठी मुंबईचे तिकीट पाहायला. आता मात्र सुजयचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. आम्ही सर्व आता पासून वेगळे होणार या भावनेने सुजयचा चेहरा पडला होता. समजू शकतो मी त्याच्या भावना कितीही भांडलो तरी आम्ही सर्व मित्र आहोत आणि आम्हाला या मजेदार ट्रीप वर सोडून जायला जमत नव्हते. सुजयचे रात्रीच्या मुंबई गाडीचे तिकीट दिले हातात आणि काही टाइमपास करण्यासाठी वाचायला पेपर व मासिके घेतली. आम्ही सुजयसाठी रात्री पर्येंत रत्नागिरी मधे थांबणार नव्हतो, आम्हाला संध्याकाळच्या आत देवरुख गाठायचे होते. सुजयची परतीची सोय करून परत काकाच्या घरी गेलो. समान उचलले आणि सुजयला पुन्हा रत्नागिरी स्टॅंड वर सोडले. सुजयचा निरोप घेण्यापुर्वी एक-एक मॅंगोला मारू असे ठरले. सुजय किती हळवा झाला होता की त्याने गरीब गाय सारखे आज्ञाकारक होऊन रावला विचारले मी आता तरी मॅंगोलाच्या ऐवजी थंप्स अप पीऊ का? आता माझी ट्रीप संपली. या वेळा सुजयच्या निरागस आणि बद्दललेल्या रूपाने आमचे सर्वांचेच मन हळवे झाले. आम्ही तिघांनी मॅंगोला आणि सुजयने  थंप्स अप मारून त्याला ट्रावल  ऑफीस मधे बसवले आणि एकमेकांचा निरोप घेऊन २ च्या दरम्यान देवरुखच्या दिशेने निघालो.


Hornbill, Devrukhरत्नागिरी ते देवरुख हे अंतर ५० किलोमीटर आहे. आरामात बाइक चालवत अधून मधून थांबत. २ तासांनी ४ वाजता देवरुखला माझ्या घरी पोहचलो. माझ्या देवरुखच्या घराचा अर्धा भाग भाड्याने दूरदर्शनचा इंजिनियर हरीलाल ला दिलेला होता आणि त्याला आईने आधीच कळवले होते की आम्ही येणार आहोत. त्याने सर्व घर साफ करून घेतले होते, नाही तर गेल्या-गेल्या आम्हाला साफ-सफाई करावी लागली असती. त्याचा कडून कळले की ग्राम पंचायतीचे पाणी उन्हाळ्या मुळे येत नाही आहे. पाहायला गेले तर कोकणात नेहमीच उन्हाळ्यात पाण्याचा प्रोब्लेम तर हा असतोच आम्हाला काय हे नवीन नव्हते. पण एक ३-४ दिवस उन्हात आणि मातीत माखून आम्ही देवरुख गाठले होते आणि आज मात्र काही केल्या आंघोळीची गरज होती. हरीलालच्या मदतीने ६० रुपये देऊन ५०० लिटर पाण्याचा टॅंकर मागवला. कपडे धुवायला भिजत घालून, आंघोळ्या करून घेतल्या. स्लॅपचे घर असल्या कारणास्तव घरात फार गरम होत होते.माझ्या घराच्या मागच्या बाजूला लागूनच भली मोठी आमराई आहे आणि त्या बाजूला सावली असल्या कारणास्तव थोडा थंडवा आहे. आम्ही जाऊन बसलो तिकडे हवा खायला. तेवढ्यात आमच्या कानावर पक्षाचा आवाज यायला लागला, पाहतोतर एक मोठा पक्षी जवळच फांदीवर बसलेला दिसला. राव या प्रकारची फोटोग्राफी करण्यात माहीर होता पाया मुळे ताटवरून उडी मारणे शक्य नव्हते. रावचा कॅमरा घेऊन मी मारली उडी तटवरून. उपद्याप करून एक-दोन फोटो माझ्या परीने काढून घरात जाऊन आरामा करत बसलो. राजू टाइम पास म्हणून गिटार वाजवू लागला. मी आणि राव, राजूने छेडलेल्या सुरांचा आनंद लुटत होतो. मला तो आजही छान आठवतो आहे. राजू कॉटवर बसून गिटार वाजवत होता, राव दरवाज्यात वारा खात आणि मी लादिवर आडवा पडून ऐकत होतो. मी ऐकता-ऐकता मस्त अंतराळत  पोहोचलो, कधी झोपलो कळलेच नाही. राव आणि राजूने बराच वेळ मैफिल चालू ठेवली. तासाभराची झोप काढून आम्ही कपडे धुवून घेतले आणि नंतर बराच वेळ हरीलाल बरोबर गप्पा टाकत बसलो.



Rajendra, of the guitar

देवरुख तसे फारच लहान शहर आहे. त्यावेळी देवरुखात एकाच हॉटेल होते आणि तेही १०-१०.३० ला बंद होते असे कळाले. ७ च्या दरम्यान आम्ही देवरुख स्टॅंडच्या समोर दीपक हॉटेल मधे शिरलो. परत मासे आणि चिकन ऑर्डर केले. जेवण येई पर्येंत आमच्या गप्पा चालू होत्या. दीपक हॉटेल पाहायला गेले तर फारच साधे आणि छोटे हॉटेल आहे. वरुन पर्मिट रूम असल्या कारणास्तव बरीच सारी लोकपण येतात. आमचा अवतार पाहून बर्‍याच लोकांना "कोण बाबा हे लोक आलेत"? असा पण प्रश्न एकडे ही पडलेला जाणवले. आमचा अवतार फारच विचित्र होता यात काय शंकाच नाही मात्र आमचे बरेचशे संभाषण इंग्लीश मधे चालले होते. विशेष करून माझा अवतार फारच विचित्र होता. मोरपिसी कलरची  ट्रेक पॅंट आणि पिवळ्या रंगाचा टी-शर्ट. त्यातल्या त्यात राजुच जरा बरा होता. राव पण मळलेले फाटके टी -शर्ट. बराच वेळ गप्पा टाकत जेवण उरकले आणि आलो घरी. ४-५ दिवसांचा थकवा होताच फार, मस्ती टंगळ मंगळ न करता तिघेही ११च्या दरम्यान झोपी गेलो.

30.10.12

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप- भाग पहिला- चौथा दिवस (दापोली ते गणपतीपुळे)

२१ मे २००६, आज अभिजित रावचा वाढदिवस. सकाळी उठलो प्रातविधी उरकून पुढच्या प्रवासासाठी सज्ज झालो. ऑलेक्सच्या परिवाराचा कालचा आश्चर्याचा अनुभव घेतल्यामुळे ते नाष्ट्याचा घाट घालतील याचा आधीच अंदाज मांडून आम्ही त्यांना नाष्टा करू नका असे सांगितले होते. त्यांच्या आम्हाला नाष्ट्याबद्दल फारच आग्रह चालू होता. आलेक्सच्या परिवाराचा या प्रेमाचा आम्ही चहा-बिस्किटा वर त्यांचे मन राखले आणि त्याच्या अंगणात सर्व परिवाराबरोबर एक फोटो काढला आणि त्यांचा निरोप घेतला. Alex and family, 5km outside of Dapoli वास्तविक ह्या परिवाराशी आमचा काय संबंध होता, काय नाते होते, कोण ऑलेक्स, कोण आम्ही, कोण कुठचे आणि कुठून आलेले. तरी हि माणुसकी, या धर्माचा वारसा जोपासणारी काही माणसे अजूनही आहेत याची जाणीव करून देणारा असा हा परिवार होता. ऑलेक्सच्या घरातून निघालो आणि दापोली-दाभोळ फाट्यावर नाष्ट्याला थांबलो. वास्तविक सर्वांना फार भूक लागली होती पण ऑलेक्सच्या परिवाराला त्रास नको म्हणून आम्ही संकोच बाळगत होतो. मस्त गरम-गरम मिसळ हाणत गप्पा टाकत होता. आज सर्वच मस्त मूड मध्ये होते. अभिजीतचा वाढदिवस होता ना, मूड मस्त असणार. अभिजीतला थोडावेळ फोना-फोनी करायची होती तो पर्येंत मी माझ्या बाईकचा तुटलेला आरसा नवीन बसवून आलो.

दापोली शहरातच दाभोळ, अंजनवेल, हेदवी, जयगड मार्गे गणपतीपुळे रस्त्याची विचारपूस करून घेतली कारण हा रस्ता मला फारसा लक्षात नव्हता. गेल्या २ दिवसान पेक्षा आज रावचा पाय बरा वाटत होता आणि वाढदिवसामुळे तो उत्साहात पण होता. आज त्याने बाईक चालवायचे पण ठरवले. थोडीशी त्याच्या पायाबद्दल विचारपूस करून सुजयने बाईकची चावी त्याच्याकडे दिली. आज राव आणि राजू एण्टाइसर वर आणि सुजय व मी विक्टर वर. पण रावला चढ-उतरायला आणि उठ बस करायला लागणारा वेळ मात्र तेवढाच होता. राव फक्त बाईक चालवण्या इतपतच बरा झाला होता. मुळात त्याचे दुखणे तेवढेच होते पण बाईक चालवायची दांगट इच्छाशक्ती मुळे त्याला त्याच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करायला सहज जमत होते.

आरामात मिसळ, पोहे, चहा, गप्पा, चहा असा नाष्टा उरकून १०.३०च्या दरम्यान आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. दापोली ते दाभोळ अंतर सुमारे ३० किलो-मीटरचे आहे. आमच्या सारख्या टवाळखोर भटक्यांना एवढे अंतर पार करायला एक-दीड तास लागायचा. आम्ही आरामात रेंगाळत टंगळ-मंगळ करत चालायचो. मधेच काही फोटो काढण्यासारखे वाटले तर बराच वेळ थांबून फोटो काढायचो. मग मधेच ह्याची खेच त्याची खेच असे हि व्हायचे आणि त्यावरून मस्ती. अशा प्रकारे आमचा प्रवास चालायचा.


दाभोळ जेट्टी गाठली आणि कळाले कि ट्रॉलर बिघडला आहे. पण नावे ने पैलतीरी घेऊन जात होते. आम्हाला प्रश्न पडला नावेत बाईक घेतील का? विचारपूस केल्या वर कळले कि बाईक पण नावेतून नेत आहे पैलतीरी. जीवात जीव आला हे ऐकून, नाही तर मजबूत फिरून जावे लागले असते. नाव येई पर्येंत आम्ही तिकडेच रन-रन त्या ऊनात बसलो होतो सावली पण नव्हती. बाईक वर काय सावली असते काय असे म्हणत एकमेकांना शिव्या घालत होतो, पण बाईक वरती ऊनाचा त्रास जरा कमी होतो कारण वारा लागत असतो म्हणा किंवा बाईक चालवायला आवडते म्हणून या त्रास कडे लक्ष जात नसावे म्हणूया ना. पण नुसते ऊनात बसायचे म्हंटले कि कंटाळा यायचा.One bike in... एवढ्यात नाव जेट्टीला लागली, नाव पाहून आम्हाला वाटले बाईक जातील काय या छोट्याश्या नावेत. कारण अजून पर्येंतच्या आमच्या प्रवासातली हि सर्वात छोटी नाव होती. पण लोकल लोकांना मानले पाहिजे. सर्वात पहेली माणसे बसवली दाबून आणि मग बाईक चढवल्या. नाव फारच लहान होती. नावेचा मध्य भाग, जो मोठा भाग असतो तो जेम-तेम बाईकचे पुढे चाक ते मागचे चाक राहील येवढाच होता. पाण्याला पण भरती होती. नाव फारच हलत होती आणि नावाडी पण फार नव्हते. एका नावढ्याच्या मदतीने मी आणि सुजयने आमच्या बाईक चढवल्या आणि मग रावला पण चढवले.Both the bikes in the boat!रावला एका बाजूला बसवून आम्ही बाईक पकडून उभे राहिलो. आमच्या मनात फारच धाक-धुक लागून राहिली होती. जर बाईक खाडीत पडली तर आणि वगैरे-वगैरे. या धाक-धुकी मुळे आमचे लक्ष बाजूला असलेल्या निसर्गाकडे जाताच नव्हते. वास्तविक दाभोळची खाडी फारच निसर्गरम्य आहे. निळे, हिरवे पाणी आणि तीरावर नारळाच्या बागा. काय छान नैसर्गिक प्रदेश होता तो आणि आम्ही नाकोत्या चिंतेत होतो. चिंतेतून डोके बाहेर निसर्गत काढले आणि निसर्गाचा आनंद लुटायला लागलो. पैलतीरावर अंजनवेलला पोहोचलो, बाईक काढल्या आणि रस्त्याला लागलो. अंजनवेल गावालाच लागून टेकडी वर गोपाळगड आहे. रान-रनत्या ऊनामुळे आणि रावला पण चढायला जमणार नाही या कारणास्तव गोपाळगडावर जायचे कि नाही या वर चर्चा सुरु झाली माझ्यात आणि राव मध्ये. नाही म्हंटले  तरी अर्ध्या-पाउण तासाचे तरी चढण होते. मी पेपर मध्ये वाचले होते आणि गिरीमित्र संमेलनाच्या वेळेला पण ऐकले होते कि गोपाळगड हा आता खाजगी मालमत्ता म्हणून एक मुसलमान परिवाराकडे आहे, त्यांची खानदानी मालमत्ता म्हणून. जर गड पाहायचा असेल तर या परिवाराची परवानगी घ्यावी लागते. शेवटी या सर्व कारणास्तव बहुमत गड नाही पाहायचा या दिशेला पडले. वास्तविक माझीच सर्वात जास्त गड पाहण्याची इच्छा होती. माझ्या एक काकांचे अंजनवेल हे गाव आहे आणि त्यांचे घर पण आहे या गावात हे मला माहित होते. गड केव्हा तरी पुन्हा पाहू असे म्हणत आम्ही पुढे गुहागरच्या दिशेने निघालो. अंजनवेलच्या पठारावर एनरॉलचा प्रकल्प वसलेला आहे. काय मस्त रस्ता होता एनरॉल पासून गुहागर पर्येंत कोकणातल्या राष्ट्रीय महामार्गासारखा वाटत होता.

गुहागर पार करून वेळणेश्वर मार्गे आम्ही हेदवी गाठले. हेदवी गावात शिरताच काही घरांच्या बाहेर "येथे घरगुती शाकाहारी जेवण मिळेल" अश्या पाट्या दिसल्या. ३ वाजले होते भूख फार रान-रणायला लागली होती. पहिले मंदिरात जाऊन दर्शन घेऊया आणि मग निवंत जेवण असे ठरले. मंदिर बंद होत होते असे कळले, पटा-पट हेदवीच्या दश-भूजा गणेश मूर्तीचे दर्शन घेऊन बाहेर आलो. मंदिराच्या आवारात फोटो काढले आणि निघालो जेवायला. हेदवी गणेश मंदिराच्या जवळ बहुतांश ब्राम्हण घरांची वस्ती आहे. जेवणाची पाटी लावणारी घर बरीचशी यातलीच होती. घुसलो आम्ही या पैकी एका घरात. पाने मांडे पर्येंत आम्ही हात पाय धुऊन आराम करत बसलो त्यांच्या पडवीत. त्यांनी पडवीतच बस्कुरे अंथरून पाने मांडली. मस्त घरगुती भाटूरड्यांचे जेवण चालले होते. बटाट्याची भाजी, गरम-गरम पोळ्या, सोलकढी.....मधेच त्यांनी आम्हाला विचारले "हापूस आंब्याचा रस वाटी पाहिजे का? १० रुपये वाटी". आम्ही कसले नाही सांगतोय मस्त मी, राव आणि राजूने तर मस्त दोन-दोन वाट्या हंडल्या. सुजय मात्र एकाच वाटीवर समाधान पावला. अहाहा! पोट भरून जेवलो आणि पानावरून उठलो. थोडा वेळ आराम केला आणि त्यांनाच विचारून घेतले जयगड कडे जायचा रस्ता. त्यांनी जवळच तवसाळेला नवीन जेट्टी झाल्याचे सांगितले आणि ट्रॉलर चे टायमिंग पण सांगितले. पटा-पट आवरले आणि निघालो तवसाळेच्या दिशेने.

५ चा ट्रॉलर होता म्हणून जरा बाईक जोरात हाकत होतो. सुजय माझी विक्टर चालवत होता आणि मी मागे. सुजयला जरा बाईक पळवायची परवानगी दिली तर तो रेमटवायला लागला. रस्ता खराब होता सुजय जराही इकडे-तिकडे पाहत नव्हता नुसती बाईक रेमटवत होता. एकदा-दोनदा तर त्याने खड्यात आपटले पण. तवसाळे जेट्टी ला जाणारा रस्ता मातीचा होता आणि मी सुजयला सांगत होतो जरा सांभाळून चालव वगैरे-वगैरे पण सुजय काय ऐकणार का. सुजयने बाईक अशी रेमटवली कि आम्ही बराच वेळ आधी येऊन पोहोचलो. ट्रॉलर येई पर्येंत आम्ही फोटो काढले आणि टाईम पास करत होतो. ट्रॉलर आल्यावर एक जीप आणि कार होती तिला पहिले जाऊ दिले आणि मग आम्ही चढलो. ट्रॉलरने पैलतीरी सोडल्यावर आता मी सुजय कडून बाईक घेतली चालवायला. जयगड बंदरच्या फाट्यावर थांबलो ब्रेंक साठी. आज अंधार पडायच्या आत आम्ही जयगड पाहून होईल असे काय वाटत नव्हते म्हणून सकाळी पहायचे असे आमच्या डोक्यात चालले होते. पण येवढ्यात सुजय बोलला जयगड बंदर आहे ना सुक्य माश्याचा तिकडे पण वास असणार. सुजयला जो हरणे मध्ये त्रास झाला त्यामुळे आम्ही जयगड किल्ला पहायचे पण रद्द करावे लागले आणि चौफे मार्गे गणपतीपुळेच्या दिशेने निघालो.

Tavsale jetty

अंधार पडायच्या आत आम्हाला गणपतीपुळे गाठायचे होते. आता मी पण जरा बाईक रेमटवत होतो आणि आता सुजय मला सांगत होता बघ तू बाईक खड्यात टाकलीस आणि आता बघ कशी चालावलीस आणि आता बघ तू कशी पळवतो आहेस वगैरे-वगैरे. सुरवातीला मी त्याचे ऐकून घेत होतो कारण तवसाळेच्या वेळेला मी त्याला बोललो होतो ना म्हणून. किबहुना त्यामुळे आता तो मला मुदामून बोलून दाखवत होता. बराच वेळ सारखी त्याची बड-बड चालूच होती आणि थोड्या वेळाने माझे जे डोके फिरले. मी बाईक अचानक रस्त्याच्या  बाजूला थांबवली. पटा-पट राव ने बाईक माझ्या बाजूला थांबवताच, मी सुजयला बोललो उतर आणि राजूला सांगितले तू इधर आजा. सुजयने डोक्याची भाजी करून टाकली. थोडा वेळ ठीक होते सारखीच तीच-तीच बड-बड. थोडीशी बाचा-बाची झाली आणि राजू माझ्या बरोबर बसला आणि सुजय रावच्या पाठी. या वेळेला मात्र सुजयला हा घाव जरा जास्त लागला असावा असे वाटले, कारण चौफे फाट्यावर पोहचलो आणि ब्रेंक साठी थांबलो असताना सुजयने अनपेक्षित असे वागणे दाखवले. सुजयने मुंबईला आमचा नाक्यावरचा मित्र पावतीला फोन लावून गणपतीपुळ्या वरून मुंबई साठी रात्रीच्या बसचे तिकीट काढायला सांगितले आणि आम्हाला बोलला मी चललो मुंबईला. ह्या सुजयच्या वागण्यामुळे आता रावचे टाळके सरकले. हे काय वागणे झाले काय आणि वगैरे-वगैरे. यावेळेला सुजय पण पेटला होता. मग मी आणि राजू पण कधी नव्हे तर बोलला सुजयला. वास्तविक सुजय आणि राजू या ट्रीपवर फक्त रत्नागिरी पर्येंतच येणार होते. उद्या तसे हि आपण रत्नागिरीला जाणार आहोतच आणि तिकडे तुमच्या ट्रीपचा शेवट होणारच आहे, मग आत कशाला नाटक करतो आहे असे सुजयला आप-आपल्या परीने सर्वांनी समजावण्याचा प्रयेत्न केला. पण सुजय आज काहीही ऐकण्याच्या मूड मध्ये नव्हता. आता राव आणि मी पण पेटलो. रावने तर कानपडत मारेन अशीच सुरवात केली तर आणि माझ्या कडे सुजयच्या बाबाचा नंबर होता, मी सुजयला बोललो तुझ्या बाबांशी बोलतो आणि त्यांनी परवानगी दिली तर मग तू खुशाल जा, तुला कुठून जायचे असेल तिकडन. आता मात्र सुजायचा सूर जरा नरम झाला आणि ठरल्या प्रमाणे रत्नागिरी वरून जायचे ठरले.

Ganpati Pule Mandir
या राड्यात राजू मात्र आता आमच्या बरोबर पुढे ट्रीपला येणार असे ठरले. राजूला बाईक ट्रीप आवडली होती. मग सुजयला अजून थोडे शांत केला आणि निघालो गणपतीपुळ्याला. या सर्व राड्यात अंधार पडला. या ट्रीप वरचा आमचा पहिला नाइट ड्राइव होता. आरामात सांभाळत आम्ही गणपतीपुळे गाठले. सर्वात पहिले राहाण्याची काय सोय होते का पाहायला लागलो. मंदिराची धर्मशाळा वगैरे काही आहे का पाहायला लागलो. असे काही नसल्याचे कळाले आणि भक्त निवास पण फुल आहे. मग आम्ही मंदिराच्या अंगणात झोपलो तर चालेल का असे विचारले. त्यांची नाहरकत घेऊन आम्ही जेवायला निघालो. बांबु हट मधे शिरलो. आम्ही एका टेबल वर जाऊन बसलो. आमच्या बाजूच्या टेबल वर अगोदर पासून एक फॅमिली बसली होती. त्यानी आमच्या कडे पहिले आणि टेबल बदलून लांब बसले. ४ दिवस बाइक वर ते ही आंघोळ न करता आणि मे महिन्याचे दिवस. आमच्या वासने बहुदा पळून गेले असतील असे आमच्या मधे हस्या पिकायला लागल्या. राजू, सुजय आणि रावच्या इंग्लीश गप्पा ऐकून त्याना प्रश्न पडला असावा. हे बर्‍या पैकी चांगले इंग्लीश बोलणारी माणसे पण राहणीमान का येवढे घाणेरडे. असो आम्हाला काय फरक पडतो. जेवण उरकून मंदिराकडे आलो. मंदिर बंद झाले होते आम्ही परत एकदा शिपायांची परवानगी घेतली आणि आमचे सामान मंदिराच्या आवारात असलेल्या दीपमाळाना लागून लावले आणि राजू गिटार घेऊन बीच वर गेला. पाठोपाठ आम्ही पण गेलो. मस्त बीच वर वाळूत बसून हेड लाईटच्या प्रकाशात तासभर राजू गिटार वाजवत होता आणि आम्ही गाणी म्हणत होतो. तासाभराच्या मैफिली नंतर श्रम परिहार झाला आणि परत मंदिराकडे आलो. दीपस्तंभाला लागूनच अंथरून पसरली आणि झोपलो.

21.10.12

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग पहिला - तिसरा दिवस (हरिहरेश्वर ते दापोली)

२० मे २००५, सकाळी हॉटेल वाल्यांच्या तयारीच्या आवाजाने आम्ही उठलो. आमचा सर्व संसार आवरला आणि हॉटेलच्या बेसिन मध्ये तोंड धुतले. हॉटेल चालू होई पर्येंत आम्ही आमचे प्रातविधी उरकायला गेलो. आता मात्र रावची परीक्षा होती. कारण सार्वजनिक शौचालयात कमोड संडास नसतात ना. मी रावच्या वेदना समजू शकत होते पण काय करणार सर्व त्याच्या वेदना सावरू शकत पण नव्हतो. संडासा मधली बस ऊठ  आणि त्या बरोबरच्या वेदना त्यालाच सहन कराव्या लागणार होत्या. मी त्याला शौचालया पर्येंत घेऊन गेलो. प्रातविधी आवरले आणि आलो बाहेर. बऱ्याच वेळाने राव बाहेर आला तेव्हा त्याचा चेहरा पाहण्यासारखा होता कुठून तरी युद्धा वरून परत आल्या सारखा. पण मानले पाहिजे रावला एवढ्या अनुकूल परीस्थित पण जिद्द राखून होता.

प्रत्येकाने आप-आपले प्रातविधी आटपले आणि नाष्ट्याला हॉटेल मध्ये परत आलो . मस्त गरम-गरम नाष्टा केला आणि हरिहरेश्वराचे दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो. हरिहरेश्वर पासून ५ किलो मीटर वर बागमांडला जेट्टी गाठली. जेट्टी वर होडी लागलीच होती. पटकन सुजयला पळत पाठवले बाईक चढवायच्या चौकशीला. कधी नव्हे तर आज सुजयने नखरे न करता ऐकले. वास्तविक सुजयला पण परिस्थितीचे गांभीर्य जाणतो, तसा सुजय आमचा शहाणा आहे पण बरेचदा मुद्दामून नाटक करतो. बाईक चढवून आम्ही होडीत बसलो आणि पैलतीरी बाणकोटच्या धक्क्याला उतरलो. बाईक बाहेर काढल्या आणि समोरच एस.टी.डी चे बूथ दिसले. प्रत्येकाने आप-आपल्या घरी ठरवले होते कि दिवसातून एकदा तरी फोन करायचा आणि काळाच्या करामती मधे आम्ही सर्वच विसरून गेलो. कोणी आप-आपल्या घरी फोन केले नव्हते म्हणून सर्वांच्याच घरी काळजीचे वातावरण होते आणि आमच्या सर्वांच्या पालकांनी एकमेकांना फोना-फोनी करून वातावरण अजून गंभीर करून ठेवले होते. मी जसा घरी फोन लावला तोच समोरून नुसती बडबड सुरु झाली. मग आईची समजूत घालून ठेवला फोन. माझ्या पाठोपाठ सुजय आणि रावची पण तीच अवस्था. मग पुन्हा घरी फोन करून बजावले कि काही कारणास्तव जर एक दिवस फोन आला नाही तर जग डोक्यावर घ्यायची गरज नाही. अजून पर्येंत आमच्या आक्सिडेंटचा किस्सा घरी सांगितला नव्हता. या सर्व राड्यात रावला नाहीलाजास्तव आमची करामत त्याच्या घरी सांगावी लागली. मी आणि सुजय तर हे घरी सांगूच शकत नव्हतो. नाहीतर आम्हाला तातडीचे घरी बोलावले असते नाहीतर अजून काहीतर मच-मच केली असती.

या सर्व राड्यात आम्ही रत्नागिरी जिल्हा गाठल्याचे विसरलो होते. आता आमची पुढचे ठिकाण होते बाणकोटचा किल्ला. गावात विचारले कि किल्ला कुठे आहे. बाणकोट किल्ला हा गावाच्या पाठी मागे डोंगरावर आहे असे कळाले. सुजय आज लीडरच्या रोल मध्ये आला होता. म्हणून तो पुढे आणि मागून मी. आम्ही किल्याकडे जाणारी घाटी चढायला लागलो. डांबरी रस्ता संपला आणि लाल मातीचा कोकणातला रस्ता चढत होते. बराच वेळ चढल्यावर देखील किल्याचा काही नामो-निशाण दिसेना, म्हणून मधेच एक घर दिसले तिकडे चौकशी करूया या विचाराने मी पुढे असलेल्या सुजयला मी जोरात ओरडून थांब सांगितले. तेवढ्यात राजू सुजयच्या बाईक वरून उतरला. सुजयने बाईक चालवत पुढे नेली. मला वाटले कि सुजय उतारावर बाईक उभी करायला जमणार नव्हते म्हणून त्याने बाईक पुढे नेली. पण पाहतो तर तो राजूला तिकडेच सोडून पुढे तसाच निघून गेला. मला जेव्हा हे जाणवले तेव्हा माझे असले टाळके सरकले आणि मी आई........, आई.........., .......... ........., ..........,..........., धो....., अशा असतील नसतील आणि त्या वेळी ज्या आठवल्या त्या शिव्या माझ्या कर्कश आवाजातून दिल्या, कि बाजूला ५० फुटावर असलेल्या घरातून वय वर्ष ५ ते ५० पर्यंतची असतील नसतील ती मंडळी बाहेर आली. त्यांना वाटले कि काय झाले बाहेर राडा वगैरे नाहीना. त्यांना काय माहित होते आम्हाच्या मध्ये असे नेहमीच चालते. सुजय तर पार पुढे निघून गेला होता, मी जे काही मंत्र उच्चार केला होते त्याच्या पलीकडे पोहोचला होता. एवढ्यात घोषणा देऊन घरातली माणसे जागी केली मग त्याचा परीपूर्ण वापर नको का करायला. मी त्यांना किल्ल्या कडे जाण्याचा मार्ग विचारायला गेलो. मे चा महिना आणि कोकणातील उन्हाळा. फार घामाघूम होत होते. सुजय येई पर्येंत त्याच्या अंगणात पडवीवर पाणी पीत बसलो चर्चा करीत बसलो. आम्ही कुठून आलो, कुठे जाणार आणि ते कुठले वगैरे-वगैरे. तेही मुंबईचे आहे आणि मे महिन्याच्या सुट्टीत आले होते गावी असे कळाले. थोड्या वेळाने सुजय किल्ल्या पर्येंत जाऊन आला. दुसर्याच्या घरात होते म्हणून मी त्याची थोड्या सौम्य भाषेत कान उघडणी केली.

आम्हाचे ४ जणांचे सर्व वजनदार समान त्याच्या घरात ठेवले आणि गेलो किल्ला फिरायला. रस्ता असे पर्येंत आणि बाईक नेऊ शकतो तो पर्येंत बाईक नेल्या. बाईक लावून थोडेसे चालल्यावरच किल्ल्याचा दरवाजा आला. रावला किल्ला पाहायला जमेल का हे आधीच गावात विचारून घेतले होते. पण रावला चालायला फार त्रास होत होता. बरेचदा आधारासाठी आमच्या पैकी त्याच्या बरोबर कोणी तरी असायचे. किल्ला फार मोठा नव्हताच. वास्तविक हा तर टेहाळणी किल्ला होता. फक्त ४ बुरुज आणि तटबंदि.या किल्ल्यावरून हरिहरेश्वर किनार पट्टीचा परिसर फार सुरेख दिसत होता. मुळात या किल्याच मूळ उधिष्ट हेच असाव, त्या परिसरातील देखरेख करण्यासाठी. अभिजीतला तिकडे एक वीडीओ क्लिप काढावीशी वाटली आणि ती त्याने काढली पण. सांगितले ना भाडखाव जिद्दीचा आहे. पण खरोखर समुद्र किनारा सुंदर दिसत होता. किल्ला छोटा असल्या कारणास्तव फार वेळ लागलाच नाही पाहायला. एक फेरा मारला आणि आलो बाहेर. बाईक घेऊन गेलो त्या घरी समान घ्यायला. पुन्हा एकदा सूखलेला घसा ओला करून घेतला आणि त्याला मंडळींचा निरोप घेऊन सुटलो पुढच्या प्रवासाला.



बाणकोट किल्ल्याचे टेकाड उतरलो आणि रस्त्याला लागलो. बाजूला एक छोटेसे दुकान पाहून थांबलो. फारच गर्मी होती आणि असणारच मे महिन्याचे दिवस होते. वरून ते ही कोकणातले, म्हणजे घामाच्या धारा. थोडी विश्रांती घेऊ आणि थंड पेय पण पिऊ असे वाटले. सुजयला पहिल्या दिवसा पासून रावने सोडा युक्त पेयासाठी मनाई केली होती. पण सुजय कसला ऐकतोय, झाली राव आणि सुजायची सुरवात. मग वरती घडलेला किस्सा पण आला मध्ये. पुन्हा एकदा सुजयने राव आणि माझ्याकडून शिव्या खाऊन घेतल्या आणि रावच्या ताकिदि प्रमाणे मॅंगोला डोसून पुढे मंडणगडाच्या दिशेने निघालो. मध्ये कुठेहि न थांबता २५ किलोमीटरचे अंतर आम्ही एका तासात गाठले. डोक्यावर ऊन रन-रनत होते आणि सकाळचा नाश्ता कुठल्या कुठे निघून गेला होता. पोटात पण भूक रन-रनायला लागली होती. मग मंडणगडावर जायच्या रस्त्याबद्दल चौकशी करून घेतली आणि एक मत करून एस.टी.स्टॅडच्या जवळच्या हॉटेल मध्ये शिरलो.

आज तर आमची मेजवानी होती. सुजयला मस्त बिर्यानी खायची हुक्की आली होती. आज सुजयला एवढ्या शिव्या घातल्या मग आता त्याला नाराज करणे अशक्य झाले आणि बिर्याणी खाण्यात विशेष काही दुष्परिणाम दिसत नव्हता. मस्त गप्पा-टप्पा टाकत प्रत्येकी एक-एक बिर्याणी हाणली. सुजय आणि राजुला एक कमी पडली म्हणून त्यांनी अजून एक मागवली आणि अर्धी-अर्धी हाणली. तो पर्येंत मी आणि रावने आराम करून घेतला. जेवण झाल्यावर सर्वांनी गप्पा टाकत अजुन थोडा वेळ आराम केला आणि गड पाहायला निघालो. मंडणगड शहराला लागूनच डोंगरावरती किल्ला आहे, किंबहुना असे म्हणायला पाहिजे की मंडणगड शहर किल्ल्याच्या बाजूला वसलेले आहे...असो. हॉटेलच्या बाहेर किल्ल्याकडे जाणार्‍या रस्त्याची चौकशी केली आणि कळाले गडावर जायला नवीन मातीचा रस्ता झाला आहे. अजुन रस्ता बनवण्याचे काम चालू आहे पण बाइक जाऊ शकते. मग काय लागलो त्या रस्त्याला.


जस-जसे वरती चढत होतो तस-तसा रस्ता खडतर होत होता आणि चढण पण फार होते. मधे एक घर दिसले आणि पोरे फिरत होती. सुजयला या ठिकाणी बाइक चढवायला फार त्रास होत होता. राव आणि सुजयने घराकडे थांबायचे ठरवले आणि मला व राजुला पुढे जा असे सांगितले. आमच्या कडचे सर्व समान त्यांच्या कडे ठेवले आणि निघालो पुढे गड पाहायला. समान नसल्यामुळे या रस्त्यावर बाइक चढायला फार त्रास होत नव्हता. एवढे चढण होते की एकदा-दोनदा बाइकचे पुढचे चाक वर झाल्यासारखे पण वाटे. त्यामुळे धडपडल्या सारखे झाले. मग मी आणि राजूने पुढे सरकून आमचे वजन पुढे टाकायचे ठरवले. मी थोडासा टाकिवर आलो आणि राजू मला चिटकून बसला. अशा पस्थितीत कसा-बसा रस्ता होता तिथ पर्येंत आलो, या पुढे बाइक चालवणे अशक्य होते. थोडासा प्रयेत्न केला पण कशाला नको तिकडे धाडस असे म्हणून सोडला विषय. आधीच आमचे एक आक्सिडेंट झाले होते ते काय पुरे नव्हते का? एका बाजूला बाइक लावली आणि निघालो पायी गड पाहायला. चार ढेंगा चाललो आणि गडाचे पठार आले, तसा एकदम मोठा गड नव्हता. एक पाण्याचे तळे आणि मंदिर सोडले तर गडाचे अस्थित्व काहीच नव्हते. जरा आजूबाजूला फेर-फटका मारला आणि मंदिराच्या सावलीत जाऊन बसलो. फारच ऊन होते आणि घामाने माखलो होतो, पाणी पिऊन थोडा वेळ आराम करत तिथेच बसलो. सावलीत जरा बरे वाटत होतो आणि मस्त वारा पण सुटला होता. म्हणून अजुन थोडा वेळ आराम करून घेतला. अधून-मधून एखाद-दुसरा फोटो पण काढून घेतले. छान रिलॅक्स झाल्यावर निघालो गड उतरायला.

बाइक घेऊन पुन्हा त्याच प्रकारे वजन सांभाळत निघालो. आता मात्र फारच जास्त त्रास होत होता. एक तर उतरण आणि ते ही मातीचा खडतर रस्ता. मी आणि राजू बाइक वरचा आमचा तोल कसा-बसा सांभाळून खाली येत होतो. एकदा-दोनदा आम्ही माती खाता-खाता वाचलो पण. सुजय आणि रावच्या जवळ आलो आणि पाहतो तर दोघेही सर्व समान घेऊन रस्त्याच्या मधे ऊनात उभे होते. त्यांनी आम्हाला जसे पाहिले, तसे लगेच या! असे हातवारे करू लागले आणि मजबूत शिव्या घालायला लागले. हरामखोर.....कुठे होतात...किती वेळ लावलात आणि वगैरे-वगैरे. मनसोक्त शिव्या देऊन, सर्व भडास काढली आणि मग सर्व हकिकत सांगितली. मंडणगड या परिसरात जमिनीत एक विशिष्ट प्रकारच्या मुंग्या आहेत. मुंग्या कसल्या लाल मुंगळे होते ते. कुठल्या ही सावलीत राहायची नौबत नव्हती, असे तिकडच्या आदिवासी पोरांनी सांगितले. म्हणून सुजय आणि अभिजीत ऊनात येऊन उभे होते. जसे मी आणि राजू गड पाहायला निघालो तेव्हाच सावलीत यांना मुंग्या चावायला लागल्या होत्या आणि जवळ-जवळ एक तास भर त्यांना ऊनात उभे राहायची शिक्षा झाली होती. अरे..रे..बिचारे....म्हणूनच खवसले होते माझ्यावर आणि साहजिक आहे. त्या आदिवासी मुलं कडून कळले की त्यांच्या घरात पण हे लोक जमिनीवर नाही झोपत. ४ एक फुटा वरती कापडाचा पाळणा करून झोपतात. तरी ही त्या पोरांच्या अंगावर मुंग्या चावल्याचे निशाण दिसत होते. हा वेगळा निराळा असा अनुभव मिळाला आम्हाला या ट्रीप वर. आम्हाला म्हणजे विशेष करून सुजय आणि अभिजीत रावला. मंडणगडाचा, मुंग्यांचा आणि त्या आदिवासी पोरांचा आम्ही निरोप घेऊन खाली मंडणगड शहरात आलो.

संध्याकाळ होण्याच्या आत आम्हाला हरणे बंदर गाठायचे होते, म्हणून जास्त वेळ न लावता एक-एक मँगोला गट्कला आणि सुटलो दापोलीच्या दिशेने. आक्सिडेंट मुळे बाइक वरुन चढ उतर करायला त्रास होयचा म्हणून बाइक वर बसल्या-बसल्या फोटो काढून घायचो आणि फारच गरज वाटली तर करामत करून उतरायचो. आरामात एक-दीड तासात आम्ही दापोली शहर गाठले. शहरात आल्याबरोबर सुजयला ऊत आला. दापोली हे बर्‍यापैकी मोठे शहर आहे. अलिबाग नंतर 3 दिवसांनी मोठ्या शहरात आल्या बरोबर सुजय सुटला होता. शहरात बाइक वेडी-वाकडी चालवणे हा तर सुजयचा हात खंडच. ३दिवस अरुंद रस्ते आणि ते ही कोकणातले वेडेवाकडे, सुजय एकदम कोंबडी होऊन बाइक चालवत होता. शहरात आल्या-आल्या शेर झाला आणि आपले रंग दाखवायला लागला. इकडन-तिकडन, ह्याच्या मधून-त्याच्या मधून, ह्याला दाब-त्याला दाब असे करत सुजय चालला होता आणि एवढ्यात सुजय एका मुलीला ठोकता-ठोकता वाचला. तसा सुजय कसला ठोकतोय त्याला अशा पद्धतीने बाईक चालवायची फार सराव आहे. पण हे पाहून आता रावचे टाळके सरकले. आज सुजयचा दिवसच फार खराब होता. रावने मला बाइक सुजयच्या जवळ घ्यायला सांगितली आणि मी तसे करताच. रावने सुजयच्या हेल्मेट वर जी जोरात टापली मारली आणि भो.....अशी सलकावून शिवी घालत सुजय विचित्र प्रकारे बाइक चालवत असल्या मुळे त्याला बड-बडायला सुरवात केली. लगेच आम्ही बाइक बाजूला थांबवली आणि आमच्या व सुजय मधे जी बाचा-बाची सुरू झाली. मी मात्र आता काही जास्त बोललो नाही. माझा सुजयला बोलायचा कोटा सकाळी संपला होता. तरी एक-दोनदा मधे बोललोच. भर शहरात रस्त्यावर एवढी मच-मच पाहून आजुबाजूचे लोक पण पाहायला लागले. मग जरा आम्ही आवरते घेतले. थोडीशी मांडवली करून निघालो हरणे बंदराच्या दिशेने. दापोली ते हरणे हे अंतर सुमारे १८ किलो मीटर आहे. पटापट हे अंतर कापून आम्ही हरणे एस.टी स्टॅंड गाठले. हरणे बंदर आणि सुवर्णदुर्गा बद्दल चौकशी करून त्या दिशेने निघालो. एस.टी स्टॅंड पासून हे अंतर २-३ किलो मीटर आहे. जस-जसे हरणे बंदराच्या जवळ जायला लागलो.तस-तसे सुक्या माशांचा फार वास यायला लागला आणि अचानक सुवर्णदुर्गाचे दर्शन झाले. बंदरावर तर मासळीचा फारच जास्त वास येत होता. सुजयला तर 2 मिनिटे पण उभे राहता येत नव्हते. या वास मुळे सुजयला तर उलटी झाल्यासारखे होत होते. तो बाइक वरुन उतरला पण नाही आणि राजुला घेऊन तसेच परत हरणे एस.टी स्टॅंड कडे गेला.  मी आणि राव बंदरावरूनच सुवर्णदुर्गाला मनसोक्त पाहत होतो आणि फोटो काढत होतो. हा किल्ला संपूर्ण पणे पाण्यात आहे. किल्ल्याकडे जाण्यास एकाही बोटीची सोय नाही आहे. जर हा किल्ला पाहायचा असेल तर खाजगीरित्या मच्छीमारांना घेऊन त्यांच्या बोटीतून जाऊ शकतो. पण पर्याय त्या वेळेला आमच्या कडे उपलब्ध नव्हता. वेळे अभावी पण आणि आर्थिकदृष्ट्या आम्हाला परवडणार नव्हते. सुवर्णदुर्गाला मनात आणि कॅमेऱ्यात भरून आम्ही त्याचा निरोप घेतला आणि हरणे एस.टी स्टॅंड जवळ आलो.

सुजय आणि राजू एस.टी स्टॅंडच्या समोरच उभे होते. सुजयचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. सुजय कोकणस्थ मराठा असल्याचे कळाले होते, माश्याच्या वासने उलटी होते. कोकणातल्या मराठ्याला किमान पानावर वासा करता तरी मासा लागतो आणि हा वासा ने उलटी करतो. अरे रे रे...वास्तविक आमचे आज रात्र काढण्याचे ठिकाण हरणे होते. पण सुजयच्या या परिस्थिती मुळे आणि तसे पाहायला गेले तर हरणे पण फार राहण्यासारखे ठिकाण वाटत नव्हते. म्हणून आम्ही दापोलीत राहायचे ठरवले. दापोली बर्‍यापैकी मोठे शहर असल्या कारणास्तव रस्त्यावर कुठेही राहायला मिळणे कठीण वाटत होते. म्हणून दापोलीच्या आधी कुठे तरी मंदिर किंवा शाळा पाहु असे एकमत झाले आणि दापोलीच्या दिशेने निघालो. जस-जसे दापोली जवळ यायला लागले तसे आम्ही मंदिर-शाळा पाहायला लागलो, पण काही दिसेचना. दापोलीच्या ५ किलोमीटर आधी माझ्या बाईकचा टायर पंचर झाला. आता काळोख पडत होता, अजुन राहण्याची ही काहीच सोय नव्हती. सुजयला पुढे दापोली शहरात पंचर काढणारा पाहायला सांगितले आणि जर तो यायला तयार झाला तर येताना घेऊन ये असेही बजावले. अशा पळापळीच्या कामासाठी सुजय मस्त कामाला येतो, किंबहुना त्याची हि आवडती कामे आहे. फक्त कधी कधी मात्र एकदम विचित्र वागतो. तो पर्येंत आजूबाजूला राहाण्यासारखे काही दिसते का असे पाहायला लागलो. एवढ्यात सुजय पंचरवाला घेउनच आला. भलताच पटा-पट होता. पंचरवाल्याने टायर काढून, सुजय परत घेऊन गेला त्याला. आता रावला बाईकच्या जवळ सर्व सामानाची रखवाली करायला बसवले आणि मी व राजू राहायची सोय पाहायला निघालो. रस्त्याला काळोख असल्या कारणास्तव मी हेडलॅंप लावून चाललो होतो. जरा पुढे गेलो आणि रस्त्या लागत असलेल्या टपरी कडून एक इसम आमच्या जवळ आला आणि बोलला "वॉट हॅपन सर" दापोली पासून ५ किलोमीटर अलीकडे अस्लीखीत इंग्लीश शब्द कानावर पडले हे ऐकून मी आणि राजू तीन ताड उडालो. मग आम्ही त्यांना सर्व हकिकत सांगायला लागलो. बाइक पंचर झाली आहे, मित्र पंचर काढायला टायर घेऊन गेला आहे, रात्र काढायला मंदिर, शाळा, अंगण मिळेल का वगैरे-वगैरे, आम्ही प्रवासी आहोत. चर्चेअंती तो इसम गोव्याचा आहे असे कळले आणि कामानिमित्त दापोली मधे राहतो. आम्ही प्रवासी आहोत हे त्याला माझ्या हेडलॅंप मुळे कळाले, कारण गोव्यात बरेच प्रवासी पाहिलेले होते त्याने. बर्याच चर्चा करून त्यांनी आम्हाला त्यांच्या अंगणात झोपा असे काबुल केले. हे ऐकून जीवात जीव आला. मग आम्ही त्यांच्या बरोबर बाइक कडे आलो. बराच वेळ रावला सामनापाशी बसवून ठेवले होते. त्याने बसल्या बसल्या ट्रायपॉट नसल्या कारणास्तव हेल्मेण्ट मधे कॅमरा ठेवून नाईटशॉट फोटो काढत होता. त्याने काढलेला तो हा फोटो. एवढ्यात सुजय पंचर काढून घेऊन आला. मग एकमेकांची ओळख परेड झाली. त्यात कळले की त्या इसमचे नाव ऑलेक्स आहे. ऑलेक्स हा मुळात गोव्याचा आणि कामानिमित्त दापोलीत येऊन परिवारासाहित राहत होता. टायर लावून सुजय परत पंचर वाल्याला सोडायला गेला आणि ऑलेक्स आम्हाला त्याच्या घरी घेऊन गेला.

ऑलेक्स ने त्याच्या घरच्या सर्व मंडळी बरोबर ओळख करून दिली आणि फ्रेश व्हायला सांगितले. एक-एक करून सर्व फ्रेश झालो आणि त्यांनी आम्हाला घरात बोलावून चहा दिला. जसे ओळखीचे पाहुणे घरी आल्यावर आपण जसे आदरतिथ्य करतो ना तसे ते आम्हाचे आदरतिथ्य करत होते. आम्हाला चहा बरोबर बिस्कीट आणि फरसाण पण दिले होते. वरुन खा-खा असे आग्रह पण चालला होता. हा परिवार वेगळाच होता, आमची त्यांची काय ओळख. थोड्या गप्पा मारत बसलो आणि मी सुजयला जेवणाची सोय पाहायला पाठवले. सुजय आणि राजू जाऊन कुठून तरी झणझणीत भुर्जी पाव घेऊन आले. ऑलेक्स ने आपण सर्व एकत्र जेऊ असे आम्हाला सांगितले. त्यांचे पण जेवण तयार झाले. पाने मांडली आणि घरात जाऊन पाहतो तर आमच्यासाठी पण पाने होती. भात, आमटी, भाजी, लोणचे, पापड आणि सर्वात आश्चर्याचा धक्का देणारा होते म्हणजे कुरवड्या आणि फेण्या तळल्या होत्या. त्यांना सांगितले आम्ही भुर्जी पाव आणला आहे. पण ते काही केल्या ऐकेना. ते बोलले ठेवा भुर्जी पाव आपण सर्व मिळून खाऊ हे. आम्हाला अजिबात अपेक्षित नव्हते. सर्वांनी सोबत जेवण आवरले आणि बाहेर अंगणात आलो. ऑलेक्स बरोबर अंगणात शतपावली घालत गप्पा मारत बसलो. ऑलेक्सच्या पोरांनी आमच्यासाठी चटई, रजई, चादरी आणि उश्या आणून टाकल्या. आम्ही त्यांना बोललो अंथरून नको आम्ही आमचे अंथरून आणले आहे. तरी काही केल्या ते एकेनाच . थोडावेळ ऑलेक्स परिवाराबरोबर गप्पा मारल्या आणि मस्त अंगणात झोपी गेलो.

21.6.12

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग पहिला - दुसरा दिवस (मुरुड ते हरिहरेश्वर)

१९ मे २००५, सकाळी आरामात ९च्या दरम्यान जाग आली त्या वेळेला उठलो. सर्वांनी पटा-पट आवरून घेतले कारण १० वाजता रूम सोडायच्या होत्या. रावला आज चालायला फारच त्रास होत होता. साहजिक आहे त्याच्या गुडघ्याला फारच मार लागला होतो. पुन्हा एकदा डॉक्टरांचे काय म्हणणे आहे ते मला पाहायचे होते. सर्वांनी चहा ढोसला आणि रूम सोडून डॉक्टरांन कडे गेलो. डॉक्टरांनी रावच्या गुडघ्याची पाहाणी करून आम्हाला सांगितले कि फार काळजी करायचे काही कारण नाही, फॅक्चर नाही आहे. पण थोडीशी काळजी नक्की घेतली पाहिजे. डॉक्टरांनी आमच्या ट्रीपची सर्व सविस्तर माहिती करून घेतली. फार मस्त दिलखुलास डॉक्टर होते आणि ते ही मुरुड सारख्या खेडे गावात. ते आमच्या पाठीवर प्रोसाहानाचा हात फिरवत आम्हाला म्हणाले जा पोरांनो मज्जा करा. डॉक्टरांनी दिलेल्या हिरवा कंदिलाच्या आनंदात त्यांचा निरोप घेतला आणि पुढच्या प्रवासाच्या निर्णयाच्या तयारीला लागलो.

प्रथम सर्वांना भुका लागल्या होत्या म्हणून नाष्टा करायला हॉटेल मध्ये घुसलो. नाष्टा कसला १२ वाजले होते, पण दिवसातील पहिला घास पोटात पडत होता म्हणून नाष्टाचं म्हणूया ना ....आता परत पुढचे काय या वर आलो. राजू, सुजय आणि राव आप-आपल्या मतावर ठाम होते. मात्र माझे मत आता डॉक्टरांच्या परवानगी  नंतर, रावच्या दिशेला झुकले होते. आमची चर्चा कधी मुंबई कडे परत जायचे या दिशेला जायची तर कधी पुढे गोव्याला जायचं या दिशे कडे जायची. पण शेवटी रावच्या हट्टाला, जिद्दीला आणि सर्वात जास्त करून त्याच्या हिमतीला आम्ही सर्व झुकलो आणि पुढे गोव्या कडे जायचे असे ठरवले.

नाष्टा उरकून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो . मात्र आता आमच्या ट्रीपचे अड्वेंचरचे प्रमाण वाढले होते याची परिपूर्ण जाणीव झाली आणि रावला या पुढील वेदना दायक प्रवासाची पण. कारण सुरवात झाली ती रावला  सामानासहित बाईक वर बसवायचे कसे? मग काय आता ट्रीप पुढे नेण्याची आहे असे ठरले तर करायचे आयुष्यातील मोठ -मोठे पराक्रम. यात सुजय माझी टीवीएस विक्टर बाईक चालवणार नाही अशी नाटकं  करायला लागला. कारण त्याला अशा स्टाइलची बाईक चालवायला त्रास होतो. काहीही नाटक त्याचे ...पण आम्हाला त्याच्या अशा नाटकांची फार सवय आहे, म्हणून त्याच्याशी फार हुज्जत न घालता त्याला रावची एन्टाईसर चालवायला दिली. वास्तविक सुजय कडे स्पेनडर बाईक होती ...पण काय करणार सुजय तो आणि त्याची नेहमीची फालतू नाटकं......पण आम्हाला त्याची सवय होतीच. एकदा दोनदा मी आणि राव ने त्याला समजावण्याचा प्रयत्न सुद्धा केला पण सुजयच तो कसला ऐकणार. शेवटी आम्ही माघार घेतली. पाहिले मी बाईक वर बसलो, मग राव आपला गुडघा सांभाळत राजू आणि सुजयच्या मदतीने मागे बसला. रावच्या पाठी वर राजू ने समान दिले आणि ऑल सेट म्हणत आम्ही निघालो पुढे .

आम्ह्चा पुढचा पल्ला होता खाडी पार करून दिघीला जायचे आणि पुढे बाईकने. पुन्हा एकदा आम्ही मुरुड जेट्टी गाठली. दिघीचे आमचे आणि बाईकचे तिकीट काढले आणि लौंच यायची वाट पाहत बसलो. आम्ही एकीकडे सावलीत बसलो असताना बाजूने काही फिरंग आले. फिरंग पाहताच सुजयने आपली इज्जत काढून घेतली. त्यांना तो बोलला 'हॅलो....' पण नाकावरची माशी जशी झटकावी तसे त्यांनी काहीही न बोलता, आमच्या पासून लांब उभे राहिले. सर्व खडा-खडा हसायला लागलो.....

थोड्या वेळाने लौंच आली आणि सर्व माणसांच्या पाठून लौंच वाल्यांनी बाईक चढवल्या. राव माझ्या मदतीने बाईकच्या बाजूला बसला आणि बाईक धरायची जबाबदारी घेतली .....वास्तविक त्याच्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. कारण आम्ही मस्त लौंचच्या टपावर जाऊन बसलो आणि रावला जळवायला लागलो . विशेष करून सुजय. मग राव कसला गप्प बसतोय, झाला सुरु सुजयला आणि मला चिडवायला. एक हिप्पी आणि दुसरा निग्रोला पाहून पळाले फिरंग. मात्र आम्ही मस्त मज्जा करत होते. छान वारा लागत होता लौंचच्या वर. पण ऊनाचे चटके हि लागत होते तसे ते बाईक वर पण लागणार होते. अधून-मधून सुजय वीडियो शूटिंग करत होता आणि मी फोटो काढत होते. मस्ती-मस्ती च्या अर्ध्या तासाच्या फेरी प्रवासाने आम्ही दिघी जेट्टी गाठली. लौंच वाल्यांनी बाईक उतरवल्या आणि आम्ही रावला उतरवले. मघास सारखे परत पराक्रम करून रावला बाईक वर चढवले आणि आम्ही जेट्टीच्या बाहेर आलो.

आमच्या प्लान नुसार पुढे पाहायचे ठिकाण दिवेआगर होते आणि आम्ही गावकऱ्यांना विचारून निघालो पुढे. आक्सिडेंट मुळे बराच वेळ निघून गेला होता. अधून-मधून फोटोग्राफिचे ब्रेंक घेत २ तासाने आम्ही दिवेआगर गाठले. जशा पराक्रमाने रावला बाईक वर चढवायचो तसेच पराक्रम त्याला उतरवण्यासाठी पण करावे लागत होते. पहिले समान, मग राव आणि शेवटी बाईक लावून मी उतरायचो. रावचे समान आणि राव ला उतरवायला राजूचा आणि सुजयचा फार मदतीचा हात होताच. तसे पाहायला गेले तर आमच्या आक्सिडेंट नंतर आम्ही सर्वच रावला जास्त त्रास होऊ नये याची काळजी घेत होते .


मंदिरात तशी फारशी गर्दी नव्हती. किंबहुना चार-पाच गावकरी सोडले तर कोणीच विशेषता पर्यटक नव्हते, फार बरे वाटले शांत पर्यटक स्थळ पाहून. आरामात सुवर्ण गणेश मूर्तीचे दर्शन घेतले आणि आलो बाहेर. आम्ह्चे मस्त आरामात रमत गमत व्यवहार चालले होते. आता सूर्याचा मारा जरा कमी झाला होता आणि मस्त वारा हि सुटला होता. थोडा वेळ टंगळ-मंगळ करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आम्हाला हरिहरेश्वर गाठायचे होते.


एक-सव्वा तासाचा रस्ता कापून आम्ही श्रीवर्धन गाठले. पण या सव्वा तासा मध्ये आम्ही आमच्या या ट्रीप मधला सर्वोत्तम रस्त्यावरून आलो होते. आहा-हा!! काय तो निसर्ग रम्य प्रवास आज हि माझ्या लक्षात आहे. डोंगराच्या कडेने जाणारा कोकणातला नागमोडी रस्ता, उजवी कडे खाली खडकांवर समुद्राच्या लाटा येऊन आधळत होत्या. मला तर असे वाटले होते कि आम्ही ऑस्ट्रेलीयाच्या कुठल्या तरी किनार पट्टी वरून बाईक चालवत श्रीवर्धनला आलो आहोत. थोडा वेळ स्वप्नातल्या ऑस्ट्रेलीया वरून फिरून अस्तीतवातल्या श्रीवर्धन हरिहरेश्वरच्या फाट्यावर उभे असल्याची जाण झाली. मग काय ५-१० मिनटे टंगळ-मंगळ आणि पुढे निघण्याच्या तयारीला लागलो. आता अंधार पडायच्या आधी आम्हाला हरिहरेश्वर गाठायचे होते. एकदां जे सुटलो ते थेट हरिहरेश्वराचे मंदिर गाठले. रावला उतरवायची कसरत करून बाईक लावल्या आणि शिरलो मंदिरात. मंदिरातही तशी फार गर्दी नव्हती. शांतपणे मनोसोक्त हरिहरेश्वराचे दर्शन घेतले आणि बाहेर आलो. जरा वेळ शांत बसून मग लागलो मंदिराचा परिसर पाहायला. मी आणि रावने तेवढ्यात मंदिराला लागून असलेल्या समुद्र किनाऱ्याचा फोटो काढू लागलो. मंदिराचा फेरफटका मारून झाल्यावर आम्ही रात्र काढायची जागा पहायच्या मार्गाला लागलो. मी मंदिराच्या कार्यालयात जाऊन विचारले आम्ही जर मंदिराच्या अंगणात झोपलो तर काही हरकत आहे का? त्यांची ना हरकत घेऊन आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. मंदिराचे आवर म्हंटले तर लगेच तसे काय झोपायला मिळणार नव्हतेच आणि शिवाय आम्हांला अजून जेवायचे पण होते . मग काय आलो बाईक जवळ आणि मस्ती करायला लागलो  इतक्यात रावचे लक्ष माझ्या बाईकचे काल झालेल्या आक्सिडेंट मुळे सैल झालेल्या चैन कडे गेले. मग मी पाहायला लागलो काय झाले ते. एवढ्यात बाजूला असलेले दोन इसामांनी पट-पट चैन टाइट करून दिली. मग आमच्या आणि त्यांच्या थोड्या गप्पा-गोष्टी सुरू झाल्या. चर्चान्ति कळाले कि त्यांच्यातला एक मेकॅनिक आहे आणि नेहमी मुंबई ते मंडणगड बाईकने जात असतात. आमच्या साठी जे अड्वेंचर होते तो त्याच्यासाठी नेहमीचा रस्ता होता. च्यामारी! हे तर आमच्या सारखेच भटके निघाले. मस्त बराच वेळ आमच्या मध्ये गप्पा चालल्या. ते कुठे कुठे फिरले आम्ही कुठे कुठे फिरलो, वगैरे-वगैरे. अंधार पडला आणि अजून त्यांना बरेच पुढे जायचे होते म्हणून ते आमचा निरोप घ्यायला लागले. आठवण म्हणून सर्वांचा मिळून एक फोटो काढला आणि एकमेकांचा निरोप घेऊन आप-आपल्या मार्गाला वळलो. ते निघाले मंडणगडाच्या मार्गाला आणि आम्ही ५० फुट वर असलेल्या हॉटेल मध्ये.

मस्त पैकी पोट भरून जेवलो आणि गेलो परत मंदिराच्या अंगणात. अजून पर्येंत मंदिर बंद नाही झाल्यामुळे थोड्या फार लोकांची ये-जा चालू होतीच. म्हणून तो पर्येंत एका बाजूला समान ठेवून बसलो होते. मंदिर परिसरामुळे जास्त मस्ती हि करायला मिळत नव्हती. थोड्या वेळाने आम्ही पथारी पसरली आणि पडलो आडवे, कंटाळा आला होता बसून-बसून. आता माणसे येणे कमी झाले होते, पण काही केल्या झोप येत नव्हती. फार गरम होत होते. थोडा वेळ पाहिले झोप येते का नंतर सर्वच वैतागलो आणि सर्व संसार आवरून बाहेर आलो. ज्या हॉटेल मध्ये आम्ही जेवलो होतो त्या हॉटेलच्या मालकाला विचारले कि त्याच्या हॉटेलच्या अंगणात झोपलो तर चालेल का. पहिला तो नाही बोलला पण नंतर थोडा वेळ विचार करून हो बोलला, मात्र हॉटेल बंद होऊन साफ-सफाई झाल्या वर. काय करणार नाहीलाजास्तव ठीक आहे असे म्हणून आम्ही बाईकवर बसून राहिलो. त्यातल्या त्यात हीच जागा बरी वाटत होती मंदिरा पेक्षा. समुद्राला लागून हॉटेल होते म्हणून वर फार छान वारा येत होता.

एक दीड तास आमच्या गप्पा, मस्ती, चर्चा चालू होत्या. मस्ती जास्त नव्हतो करत, कारण जास्त आवाज करून चालणार नाही. दुसर्याच्या आवारात होतो ना......असे फक्त बोलायला. खरे आम्ही फार थकलो होतो कधी झोपतोय असे झाले होते. आमच्या पैकी राजू, राव आणि सुजय हे जास्त करून इंग्लिश मधे संभाषण करणारे आणि जर मी असलो तर मराठी किंवा हिंदी त. या मुळे तिथल्या माणसांना ऐकायला अर्धे संभाषण इंग्लिश मध्ये तर उर्वरित मराठी-हिंदी मध्ये. मला हे, त्या हॉटेलचा मालक आणि त्याच्या काहीश्या कर्मचाऱ्यांच्या आमच्याकडे पाहण्याच्या दृष्टीकोनातूनच जाणवले होते. मला तर असे वाटत होते कि त्याच्या मनात असे चालले असेल कि "हि फार इंग्लिश बोलणारी, दिसायला पण चांगल्या घरातली दिसतात, पण हे काय विचित्र किंवा घाणेरडे कपडे घातले आहेत आणि इकडे रस्त्यावर झोपायची काय गरज भासली. हरिहरेश्वर मध्ये कितीतरी हॉटेल चांगले आहेत, घ्यायची होती एक रूम हॉटेल मध्ये आणि राहायचे होते तिकडे". बहुदा त्यांनी आमच्या बद्दल असा विचार केलेला पाहून मी मनातल्या मनात मिश्कील पणे हसलो आणि परत मिसळलो मित्रांबरोबर. आता सर्वांनाचा थोडी-थोडी पेंग यायला लागली होती टेबल वर बसल्या बसल्या. शेवटी त्या मालकाला आमची दया आली असावी. त्याने टेबल बाजूला करून आम्हाला एका बाजूला झोपायला जागा दिली. पटा-पट स्लीपिंग बॅगा पसरल्या आणि पडलो आडवे.

मला रावच्या बाईक च्या डिक्की तून एक समान काढायचे होते आणि राव च्या बाईकची चावी सुजय कडे होती. पण नेहमीच्या सवयी प्रमाणे सुजय बरीच नाटके करत होता. काही केल्या सुजय चावी देतच नव्हता मग मी पण सुजयच्या पाठला सोडतच नव्हतो. तो नाटकी तर मी चिवट बनलो आणि मग त्याला पण बराच त्रास दिला आणि रावच्या बाईकची चावी घेतली. मला हवे असलेले समान घेतले आणि सुजयला चावी देऊन झोपी गेलो.