24.3.13

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग पहिला - नववा दिवस (कोल्हापुरात)

२६ मे २००५, सकाळी आरामात उठलो. प्लान प्रमाणेच सकाळी लवकर उठून अभिजीत राव, त्याचे आई-बाबा, विवेक-रश्मी, त्याचे काका-काकी आणि चुलत भावंडे सर्व कर्नाटकात त्यांच्या कुलदैवत यललंमा, सौंदतीला  गेले होते. आज मला पण कोल्हापुरात माझ्या आईचे सख्ये काका आणि सर्व चुलत भावंडे राहतात त्यांच्या पैकी एकाकडे जायचे होते. मी माझ्या जया मामला फोन लावून कधी आणि कसे यायचे हे विचारून घेतले. पण आज राजूचा ताप फारच वाढला होता. रावच्या मामांच्या घरातल्यांनी राजूची फारच छान सुश्रूषा केली. राजूची सर्व जबाबदारी त्यांनी घेतली आणि मी ११ च्या दरम्यान तयार होऊन जया मामाच्या घरी जायला निघालो.

पिट्ट्याने मला जया मामाच्या घराकडे कसे जायचे थोडे फार समजवले होते पण तरी हि मला सारखे मधे थांबून विचारावे लागत होते. मधेच एकदा मी एका ट्रॅफिक पोलिसाला विचारले की या ठिकाणी कसे जायचे. तो मला बोलला रस्ता सांगतो नंतर पहिले मला लाइसेन्स दाखव आणि मुंबईची गाडी कोल्हापूर पर्येंत कशी आली. मी बोललो चालवत आली....एवड्यात तो थोडासा खवसला आणि मला बोलला, हो का! मग आता गाडीचे सर्व पेपर दाखव. मी बाईकचे सर्व पेपर दाखवून त्याचे समाधान केले आणि पुढे परत तो आश्चर्य मुद्रा करून बोलला मुंबई वरुन कोल्हापूर पर्येंत बाईक चालवत आलात? मी त्यांना बोललो हा पण हळू-हळू आरामात फिरत-फिरत कोकणातून ८ दिवसात आलो आहोत. मग त्याचे अजून थोडे समाधान झाले आणि त्यांनी मला पत्ता सांगितला.

जया मामाच्या घरी मी जरा उशीराच पोहोचलो, सर्व माझी वाट पाहत होते. जया मामा काही कामासाठी बाहेर गेला होता पण सुधा मामी आणि तिचे बाबा होते. थोडा वेळ सर्वांशी गप्पा मारल्या आणि मग सुधा मामीने जेवणाची पाने वाढली. गप्पा मारत आमचे जेवण चालले होते. गप्पा जास्त करून मी बाईकने का एवढा लांब आलो आणि काय गरज होती वगैरे-वगैरे याच होत्या. सुधा मामीने माझ्यासाठी जेवणाचा बराच थट मांडला होता.  मस्त पोट भरून जेवलो आणि लागलो परत सुधा मामींच्या वडिलान बरोबर गप्पा मारायला. एवढ्यात जया मामाचा पण फोन आला त्याला उशीर होणार होता आणि म्हणून तो माझ्याशी फोन वर चर्चा करायला लागला. त्याने तर मला बाईक घाडगे पाटील ने परत मुंबईला पाठवून देतो आणि मला मस्त कोंडुसकरच्या   ए.सी. बस मध्ये बसवून देतो इथ पर्येंत पर्याय दिला. मी त्या सर्वांना सारखे समजावत होतो की मी बाईकने कोकणात आणि जवळ पासचा परिसर फिरायच्या पराक्रमावर निघालो आहे. तरी काही केल्या ते एकेनाच. तत्पूर्वी जया मामाने माझ्या आईला पण फोन लावून हे सर्व सांगितले होते.माझ्या आईने पण जया मामाला  सांगितले की अमेय काय ऐकणार नाही तो माझे पण ऐकत नाही. शेवटी जया मामाने पण प्रयेत्न थकले आणि मी, माझे म्हणणेच खरे केले. मला थोडे जाणवले होते की मी सुधा मामीचे बाबा आणि जया मामा यांना जरा नाराज केले आणि ते माझ्यावर थोडेसे रागवले होते. पण काय करणार मला बाइक ट्रीप तर पूर्ण करायची होतीच ना.

सर्वांचा निरोप घेऊन मी कोल्हापुरचे राजा शाहू महाराज यांचा न्यू पॅलेस पाहायला गेलो. शोधत शोधत मी  राजवाड्याकडे पोहोचलो आणि बाईक लावून महल पाहायला लागलो. संध्याकाळ होई पर्येंत मी महल पाहिला आणि सर्व उरकून परत रावच्या मामांच्या घरी गेलो. दिवसभराचा आराम आणि रावच्या मामांच्या घरातल्यांच्या संगोपणाने राजू आता मस्त बरा झाला होता. रावच्या मामीने आमच्या साठी मस्त तांबड्या रस्याचे आणि पांढऱ्या रस्याचे मटणाचे जेवण केले होते. थोडा वेळा गप्पा टप्पा मारत बसलो आणि जेवायला वाढले. मी या तांबड्या आणि पांढऱ्या रस्या बद्दल बरेचदा ऐकले होते पण आज काय ते चाखायला मिळणार होते. मनोसोक्त रस्सा हांडला आणि पुन्हा गप्पा टाकत बसलो. बराच वेळेच्या गप्पान नंतर सर्वच झोपी गेलो. 

No comments:

Post a Comment